|
सकाळचे साडेसहा वाजले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सूर्यनारायण नुकताच उगवला होता. खरंतर मला अजिबात उठायची इच्छा नव्हती. पण आता ड्युटीची वेळ झाली होती. सगळं आवरून मी रूमच्या बाहेर आले. हलकंसं धुकं उन्हाबरोबर लपंडाव खेळत होतं. त्यातच दवबिंदू हलकेच चमकत होते. दूरवरचा धबधबा मोत्यासारखा दिसत होता. माझ्या रूमबाहेरची दरी हिरवी शाल ओढून अजून साखरझोपेत होती. मी मात्र उठून कामाला लागले होते. अख्ख्या रीझॉर्टमधे इतक्या लवकर कुणीच उठले नसेल. इथे येणारे बहुतेक हनीमून कपल्सच. ते कशाला इतक्या पहाटे उठतील? मी आणि अभि जेव्हा गोव्याला गेलो होतो, तेव्हा काय केलं होतं? अभिच्या आठवणीसरशी अंगावर काटा आला. तीन वर्षें... तीन वर्ष मी त्याच्याशिवाय जगतेय. एकत्र जन्ममरणाच्या शपथा घेतल्या होत्या आम्ही. आणि आज तो हे सारं तोडून निघून गेला. मी मात्र वाट बघत राहिले...... तो परत येणार नाही हे माहित असूनही... तिथेच.. त्याची वाट बघत.. तशीच निश्चल.. पाठून कुणाच्या तरी पावलाचा आवाज आला. मी पाठी वळून पाहिलं. "उठलीस पण एवढ्यात? मला वाटलेलं दुपारपर्यंत तरी डोळॆ उघडणार नाहीस.. कालची रात्रच तशी होती ना.." तो मिश्किलपणॆ हसला. त्याने हलकेच माझ्या गालावरून हात फ़िरवला. मला या क्षणी त्याचा स्पर्श सुद्धा नकोसा होता.. "अभिजीत.. प्लीज.." मी त्याचा हात झिडकारला आणि तिथून निघाले. "सावरी..." त्याने आवाज दिला. पण मी थांबले नाही. स्वत:वरच मी चिडले होते. कदाचित त्याला हे समजल.ं असावं. तो तिथेच थांबला. मी रूमवर आले. चेहर्यावर गार पाणी मारलं. पण तरी मन काही शांत झालं नाही. कुणीतरी नाश्ता आणून ठेवला होता. माझी त्याच्याकडे बघण्याची सुध्दा इच्छा नव्हती. मी खिडकीच्या जवळ खुर्ची टाकून बसून राहिले. कुठून निघाले होते आणि कुठे पोचले होते. स्वत:शीच हिशोब मांडत बसले होते. हातात जमा काहीच नव्हतं. सगळं गमावलेली मी... आता काय मिळवण्याच्या पाठी होते कुणास ठाऊक? रूमची बेल वाजली. दारात पिंकी होती. रीझोर्टची चीफ़ शेफ़, तिला काहीतरी सामान मागवायचं होतं, मी काम सुरू केलं पण माझं लक्ष नव्हतं. "आसावरी... काय झालय? तू फ़ार उदास दिसतेस.." ती म्हणाली. "काही विशेष नाही. जरा घरची आठवण येत होती म्हणून..." मी सारवासारव करायचा प्रयत्न केला. "मग घरी जात का नाहीस. सुट्टी घे ना.. इथे जंगलात रहायचं तर वैताग आहे.." पिंकी बडबडत होती. माझं लक्ष नव्हतं. घर.. ते आता राहिलंच कुठे होतं. आई बाबाचे घर होतं. अभिचं घर होतं. पण माझंच घर नव्हतं. "अभिजीत पण पुढच्या महिन्यात सुट्टीवर जाणार आहे," पिंकीच्या या वाक्याने मी भानावर आले. खरंच तो म्हणाला होता... पुढच्या महिन्यात तो पुण्याला जाणार होता. येतेस का असेही विचारलं होतं. "पिंकी.. तुझी लिस्ट बरीच मोठी आहे. इथे हे सगळं सामान मिळणार नाही. चार पाच दिवस लागतील." मी विषय बदलायचा प्रयत्न केला. "ओके. पण लवकर.. आणि त्या फ़िशवाल्याला रोज फ़्रेश माल द्यायला सांग. परवा एक कस्टमर ओरडत होता." पिंकीच्या येण्याचा मला फ़ायदा झाला होता.. कामाचं रामायण पडलं होतं. आता माझ्याजवळ विचार करायला वेळ नव्हता. स्वत:ला स्वत:पासून विसरण्यासाठी तर मी इथे आले होते ना.. दिवस सगळा असाच कामात गेला. जरी मी या रीजॉर्टची administrator होते तरी माझ्या हाताखाली कुणीच नव्हतं. सगळी कामं मलाच बघायला लागत होती. त्यातच दिल्लीवरून आलेल्या एका कस्टमरच्या पोटात दुखायला लागलं. जवळचं शहर म्हणजे बेळगाव.. तिथपर्यत त्याला घेऊन गेले आणि चेक अप करून आणलं. हे जंगल रीजॉर्ट कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर होतं. पहिल्यान्दा जेव्हा इथे आले तेव्हा हरवल्यासारखं झालं होतं मला. आई बाबा तर अशा ठिकाणी मी एकटी कशी राहू शकेन या प्रश्नात तर मी आता इथे मी एकटीच... या आनंदात. मस्त हिरवीगार दरी... मोठ्यामोठ्या रूम्स. एकमेकापासून मुद्दामच लांब ठेवलेली कॉटेजेस. आणि सभोवताली किर्र जंगल. अभि जर इथे आला असता तर कायम इथेच राहायचं असं म्हणाला असता... आणि म्हणुन मी कायम इथे रहायचं ठरवलं. इथे दिवस कसा जायच कळायचाहि नाही... अवघा तीस जणाचा स्टाफ़ होता.. आता पावसाळा जवळ आल्यामुळे अर्धे लोक परत जाणार होते. फ़ारतर दहा बारा जण उरलो असतो आम्ही. आजचंही काम आटोपलं आणि मी माझ्या रुमवर आले. अख्ख्या रीजॉर्टमधलं हे सगळ्यात दूरचं कॉटेज. माझं कॉटेज संपलं की सुरू व्हायची खोल दरी... काळोखामधे मात्र दरी आहे की नाही ते समजायचंच नाही... आताही मी सगळे लाईट बंद केले आणि शांतपणे बेडवर पडून राहिले. अकरा साडे अकरा वाजले असावेत. रूमचा दरवाजा उघडला. मला कोण आलं ते बघायची वाटली नाही. माझ्या कॉटेजचा चावी माझ्याशिवाय फ़क्त अभिजीतजवळ होती. "सावरी... " त्याने मला आवाज दिला. "अभिजीत.. किती उशीर करतोस?" मी त्याच्या मिठीत शिरले. परत एकदा अपराधीपणाची भावना मनात येऊन गेली. परत एकदा अभिजीतच्या उष्ण श्वासात ती जळून गेली. मी विधवा होते... पण म्हणून मला जगण्याचा हक्क नव्हता? का मी माझ्या सासू सासर्याच्या आणि आई वडीलाच्या डोळ्यात धूळ फ़ेकत होते? माझ्या उण्यापुर्या दहा महिन्याच्या संसाराच्या आठवणी घेऊन मी कसं अख्खं आयुष्य जगणार होते? रात्र चढत गेली तसे सगळेच प्रश्न बाजुला पडत गेले. उरले ते फ़क्त देहाने देहाला दिलेले साद प्रतिसाद... पहाटे जाग आली... तर अभिजीत उठून निघून गेला होता. आता मला झोप येणं अशक्य होतं डोळ्यासमोर मला माझा अभि दिसायला लागला होता. अभि आणि मी.. कॉलेजात असताना आमची ओळख झाली आणि कधी प्रेमात पडलो तेच समजलं नाही. त्याला नोकरी लागल्या लागल्या लग्न करायचं असं आम्ही ठरवलं होतं. सुदैवाने त्यालाही लगेच नोकरी लागली. आणि सहा महिन्यात आम्ही लग्न केलं. नव्या घरात मला कधीच परक्यासारखं वाटलं नाही. आईनी मला अगदी लेकीसारखं वागवलं. त्याना खरंतर मुलीची खूप हौस होती. पण अभि तर एकुलता एक.. मग मलाच मुलगी मानून खूप लाड करायच्या. सासरे तर त्याहून गमतीशीर होते. आणि अभि.... स्वर्ग म्हणजे काय ते मला पहिल्यादा समजलं होतं. खूप सुखात होते मी.... पण कदाचित हे दु:खाच्या आधीच सुख होतं... कारण एके रात्री अभिला ऑफ़िसवरून यायला उशीर झाला.. तसा तो हल्ली होतच होता. पण रात्रीचे दीड वाजले तरी तो आला नाही. मी वाट बघून झोपी गेले तोच फ़ोन वाजला. बाबानी सगळी धावाधाव केली. अभिचे सगळे मित्र आले. माझे आईवडील पुण्यावरून आले. मला कित्येक वेळ नक्की काय चालू आहे तेच समजेना. आणि मग मला जेव्हा कळलं तोपर्यन्त अभि मला सोडून गेला होता... कायमचा. "आता जाउन येतो बघ,..." असं सकाळी म्हणाला होता आणि परतच आला नव्हता. आई बाबा पारच कोलमडले होते. त्याच्याकडे बघणारं कुणी नव्हतं. मला पुण्याला पाठवायला ते तयार झाले पण मी नाही म्हणून सांगितलं. आता हेच माझं घर होतं. अवघी बावीस वर्षाची मी... पांढर्या कपाळाने रहायला शिकले. वेळ जावा म्हणून पुढे interior desighner चा कोर्स केला. हळू हळू माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली. खरं तर मला पुन्हा एकदा डाव मांडायची कसलीही इच्छा नव्हती. पण आई बाबाना तसं मला सांगताही येईना. त्याना माझ्या भविष्याची काळजी होती. मी भूतकाळातच जगायचा हट्ट धरून बसले होते. माझी अवस्था माझ्या आई बाबाना बघवत नव्हती. खरं तर मी सुख आणि दु:खाच्या पलीकडे जाउन पोचले होते. मला अभिकडे जायला वेळ लागला नसता पण त्याच्या आईवडीलाकडे बघणारं कोण होतं? "आसावरी.." एके दिवशी बाबानी मला आवाज दिला. मुळातच त्याचा स्वभाव कमी बोलण्याचा होता आणि आता तर अजिबात बोलत नसत. "काय बाबा?" मी विचारलं. "हे वाच" त्यानी मला एक पत्र दिलं. माझ्या आईने माझं नाव एका विवाह मंडळात नोंदवलं होतं. मला तिचा इतका राग आला होता. मला न विचारता तिने हे काम केलं होतं. पण बाबा आणि काहीच बोलले नाहीत. उलट आईनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं. सगळं आयुष्य बालवाडेच्या मुलाब्वरोबर घालवलं असल्यामुळे असेल कदाचित पण त्याना न सांगता बरंच काही समजायचं. माझ्या मनातली प्रत्येक भावना त्या चटकन समजून घ्यायच्या. "आसावरी,,, अगं, एक माणूस गेलं म्हणून का आपलं जीवन थांबते? त्याचा इतक्याच दिवसाचे ऋण होतं त्याने फ़ेडलं.... आपलं अजून आहे असं समजायचं..." नाना तर्हेने त्या माझी समजून घालायच्या.. कधी मला पटायचं, कधी नाही. पण मी त्याना कधीच काही बोलले नाही. असेच परत एक पत्र आलं. नाशिकचा कुण्या बिजवराचं स्थळ होतं. आधी बाबानी मला विचारलं, "करायची ना पुढची बोलणी?" मला नकार द्यायचा होता... पण बाबाच्या पुढे बोलायची हिंमत झालीच नाही. त्याची भिती नव्हती.. पण त्याची माझ्याविषयीची ममता खूप काही सांगून गेली. पण इतकं सहज माझं नशीब यापुढे नव्हतंच. या माणसाच्या आईने माझी पत्रिका मागितली होती. या आधी ती काढलीच नव्हती. बाबाच्या ओळखीतल्या एका माणसाला सगळी माहिती दिली. तो दोन तीन दिवसात घेऊन येतो म्हणाला.... मी पायर्या चढून वर आले. दुपारचा एक वाजला असावा. घरात कुणीतरी आलं होतं. मी दरवाजा उघडून आत जाणार तेवढ्यात माझी पावलं थबकली. "हं... पत्रिका पाहून वाटलंच होतं मला. पण आता तुम्ही सांगितल्यावर विश्वास बसला. कठीण आहे हो... तुम्ही आधी पत्रिका पाहिली असती तर कदाचित सगळं टाळता आलं असतं... पण आता काय करणार? अहो, इतका कडक मंगळ.. कशी ही मुलगी संसार करेल? स्वत्:चं कुंकू स्वत्: पुसण्यतच हिला समाधान वाटेल आयुष्यभर..." तिथल्या तिथे धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर किती बरं झालं असतं.... म्हणजे अभिच्या अकाली जाण्याला मी जबाबदार होते. जर मी त्याच्या आयुष्यात आलेच नसते तर कदाचित.... मी मारलं होतं त्याला... माझं कुंकू मीच पुसलं होतं. अभिच्या जाण्यापेक्षाहीहे दु:ख मल असह्य झालं. मरणा मरणाच्या यातना देऊन गेलं. इतके दिवस आयुष्याला जोडणारी कुठेतरी एक नाळ शिल्लक होती. त्या एका वाक्याने तीही तुटली. आई बाबानी जर मला दोष दिला असता तर कदाचित बरंच झालं असतं. पण त्यानी मला यातलं काहीच सांगितलं नाही.. माझीच मला अपराधीपणाची भावना गिळायला लागली. तेव्हाच मी घर सोडण्याचा निर्णय घेतला.. कारण आता या घरात मी स्वत्:लाच परकी मानायला लागले होते. आई बाबानी खूप समजावलं पण मी ऐकायला तयारच नव्हते. नेमकं त्याचवेळेला अभिच्या एका मित्राने हे रीजॉर्ट सुरू केलं आणि मी इकडे शिफ़्ट झाले. खरं तर मला त्या वातावरणापासुन दूर जायचं होतं. कारण तिथल्या प्रत्येक गोष्टीशी अभि निगडीत होता. पण जागा बदलली म्हणून मन थोडीच बदलतं. इथं आल्यावरही प्रत्येक वेळेस तो आठवायचाच. पण इथे खरंच खूप छान वाटयचं. एक तर कुणालाही मी माज्झा भूतकाळ सांगितला नव्हता. कारण मला स्वत्:ला त्या "बिच्चारी" नजरेची कीव येत होती. मला इथे आल्यावर पहाटे लवकर उठायची सवय झाली. सकाळच्या प्रसन्न हवेत फ़िरायला खरंच खूप बरं वाटायचं. थंडीचे दिवस होते. त्यामुळे मी शाल ओडून अशीच भटकत होते. "हाय.." पाठून आवाज आला. मी वळून पाहिलं. साधारण पंचविशीचा एक तरूण होता. असच कुणी रीझॉर्टचा कस्टमर. पण मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. "हेलो" मी हसून उत्तर दिलं. "यु मस्ट बी आसावरी.." तो म्हणाला. मी नुसती हसले. "अभिजीत.." मी चमकून पाहिलं. त्याने हात पुढे केला होता. मी थिजल्यासारखी त्याच्या कदे बघत होते. मूळचा गोरा रंग.. पण उन्हाने बराच रापलेला. काळे डोळे. आणि चेहर्यावर हसू.. "केव्हा आलात? आणि कधीपर्य.त आहात?" मी विचारायचं म्हणून विचारलं. "काल रात्री आलो.. आणि कदाचित एक सहा महिने तरी इथे नक्कीच आहे.:" तो सहज म्हणाला. रीजॉर्टच्या एका दिवसाचं भाडं सहा हजार रुपये होतं..... "काय?" मी जरा जोरात विचारलं. "सहा महिने?" "हो, कदाचित जास्तही लागतील." तो म्हणाला. कदाचित तो माझी थट्टा करत असावा. "कुठल्या कॉटेजला आहात?" मी विचारलं. "त्या तिथल्या..." त्याने लांबवरती बोट दाखवलं. "पण त्यात तर स्टाफ़साठी आहेत.." मी बोलले. "मग?" त्याने माझ्याकडे पाहिलं. कदाचित माझ्या चेहयावरचे प्रश्नचिन्ह त्याने वाचलं असावं. "ओह.. मी अभिजीत.. इथला नवीन ecologist .." "ओके.." मी बोलले. "आणि या नोकरीशिवाय मी इथे Ph D पण करतोय. या भागातल्या reptiles वरती." मी आणि तो रेस्टॉरंट्पर्यन्त चालत आलू. कॉफ़ी घेऊन होईस्तोवर मला त्याने त्याच्याविषयी बर्cंच सा.गितलं होतं. पिंकीने तर आल्या आल्या त्याला रेडीओ हे नाव देऊनसुद्धा टाकलं होतं. त्याला सगळेजण अभि म्हणायचे.. मी कधीच म्हटलं नाही. अभिजीत केव्हा माझा मित्र झाला ते कळलंच नाही. सगळ्या स्टाफ़चा तसा तो लाडका होता. म्हातार्या गुरूकाकानी तर त्याला आपला मुलगाच मानलं होतं. दिवसभर जंगलात भटकायचा.. कसले तरी किळसवाणे प्राणी गोळा करायचा. आणि त्याचे फ़ोटो काढायचा. भरीस भर म्हणून जो भेटेल त्याला हे प्राणी दाखवायचा... आता गांडुळात बघण्यासारखं काही असतं का.. पण नाही.. हा चक्क त्या गांडुळाबरोबर चहा पीत गप्पा हाणायचा. पण त्याचं निसर्गावर खूप प्रेम होतं. अख्ख्या रीजॉर्टमधे एक जरी प्लास्टीकची पिशवी दिसली तरी तो भडकायचा. सुरुवातीला मला त्यात चिडण्यासारखं काय आहे तेच कळायचं नाही. पण हळू हळू त्याचं हे वेड लक्षात येत गेलं. रीजॉर्टमधे येणार्या सागळ्यासाठी तो रात्री एक लेक्चर द्यायचा. माणसाने निसर्गावर केलेलं आक्रमण त्याचा दुष्परिणाम्ल.. सगळं इतकं छान समजावून सांगायचा की बास... अभिजीतच्या लेक्चरच्या शेवटी तो एक वाक्य सांगायचा.. "लक्षात ठेवा माणसाने निसर्गावर कितीही आक्रमण केलं तरी निसर्गाचं काहीही बिघडत नाही.. मात्र मानवाने जपून रहायला हवं कारण आज आपण विसरलोय की आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत... " हे सांगतानाचा त्याचा आवेश मला खूप आवडायचा. कधी कधी मी मनातल्य मनात अभिची आणि अभिजीतची तुलना करायचे. एक नाव सोडलं तर दोघात काहीच समान नव्हतं. पण तरीही.. मनातल्या मनात तुलना व्हायचीच. अभिजीत आणि मी दररोज सकाळी फ़िरायला एकत्र जायचो. त्याचे आईवडील पुण्याला होते. एकच बहीण तिचंही लग्न झालं होतं. घरची परिस्थिती चांगली होती, म्हणूनच याच्या या जगावेगळ्या करीअरमधे येणं शक्य झालं होतं. "आसावरी... तू या जंगलात का राहतेस?" त्याने एकदा मला विचारलं.. "का म्हणजे मला आवडत..." मी हसून उत्तर दिलं. "नाही.. तुला इथं आवडत नाही..." "असं तुला का वाटतं..." मी त्याला विचारलं. "तू इथे आहेस कारण तू कसापासून तरी लांब जाण्याचा प्रयत्न करतेय्स.." त्याने धीर गंभीर आवाजात उत्तर दिलं... "तुला असं वाटतं की तू इथे राहिलीस तर जगापासुन दूर आहेस.. " मला कितीतरी वेळ त्याला काय उत्तर द्यायचं तेच सुचेना त्या दिवशी मला उठायला उशीरच झाला. बाहेर आले तोवर उन्हं वर आली होती. रीज़ॉर्टमधले कस्टमर जंगल सफ़ारीला गेले होते. मी पिंकीला कॉफ़ी बनवायला सांगितलं. तेवढ्यात अभिजीत आला.. "अरे, तू सफ़ारीला गेला नाहीस?" ही टूर नेण्याचं काम त्याचं असायचं. "नाही, थोडं बरं नाही म्हणून नाही गेलो." त्याचा आवाज पण एकदम खोल वाटला. "काय झालं?" मी विचारलं. "तीन दिवस झाले. ताप आहे," पिंकीने सांगितलं, "पण ऐकत अजिबात नाही, आज अगदी उठवतच नव्हतं म्हणून टूरला गेला नाही," "अरे मग मला नाही का सांगायचं? मेडीसीन्स आहेत माझ्याकडे." मी म्हणाले. "नको, मला त्या मेडीसीन्सचा कंटाळा येतो.." त्याने उत्तर दिलं. मी त्याच्या गालावर हात ठेवला. चांगलाच गरम होता तो.. पण माझ्या अंगावर शहारे का आले ते मलाच कळलं नाही.. मी त्याला मेडीसीन्स आणून दिले... पण का कोणास ठाउक मला तेव्हापासून त्याच्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस होईना. सतत तो त्याची नजर माझ्यावर रोखून आहे असंच वाटायचं. मी शक्यतो त्याच्याशी बोलणं टाळायला लागले. मी विधव आहे, मी मंगळी आहे हे स्वत्:च स्वत्:ला शंभरदा बजावायला लागले. कुठल्याही मोहात आता मला पडायचं नव्हतं. माझ्या अभिचा गेला होता.. पण मला अता कुणाचा ही बळी घ्यायचा नव्हता. असं म्हणतात की मन वार्यासारखं चंचल आहे, मी माझं मन दगडासारखं निगरगट्ट बनवत होते. जमलं असतं का मला हे? अभिजीतच्या नजरेतलं आमंत्रण मी केव्हाच ओळखलं होतं. पण तरीही जाणून बुजून मी अज्ञानी बनायचा प्रयत्न करत होते. स्वत्:लाच मी दगड बनवत होते.... मला स्वत्:ला सावरणं कठीण झालं होतं. कुठेतरी खोलवर आयुष्यामधे असणारी पुरुषाची गरज मलाही वाटत होती. पण तरीही मी समाजाला घाबरून होते. मात्र ही सगळी बंधने एका क्षणात तुटलीच. रात्रीचे नऊ वाजले होते. कुणीतरी दरवाजा खटखटवला. एवढ्या रात्री माझ्या कॉटेजवर कोण आलं असेल म्हणून मी दरवाजा उघडला. बाहेर काळामिट्ट काळोख होता. आणि दरवाजात अभिजीत उभा होता. "अभिजीत, तू काय करतोयस इथे?" तो काहीच बोलला नाही, फ़क्त दरवाजा धरून उभा राहिला. "अभिजीत..?" मी परत आवाज दिला. तो एकटक माझ्याकडे बघत होता. "आत येऊ?" त्याने विचारलं. "काय काम आहे?" मी आवाजात उसनं अवसान आणून विचारलं. "काही नाही" तो तितक्याच शांतपणे म्हणाला. "अभिजीत, हे बघ, मी इथे एकटी आहे आणि तुझं इतक्या रात्री इथे येणं शोभत नाही.. तू परत जा," मी ही दरवाज्यातच उभी राहिले. "नाही जाणार.." तो म्हणाला. एखाद्या चाकूने मला थंडपणे कापल्यासारख्या आवाजात. "हे बघ, अभिजीत.. मी एका घरची सून आहे. लग्न झालय माझं.. आता तरी परत जा..." माझा सूर आता विनवणीचा होता.. त्याने दरवाजा सोडला. माझ्या डोळ्यात भिती थरारून आली होती. एक मन म्हणत होतं त्याला परत जाऊ देऊ नकोस.. पण हे असं वागण्याचा हक्क मी गमावून बसले होते. की माझा तो समज होता. तो परत जाइल असं मला वाटलं. तो दोन पावलं पाठि सरकला. आणि त्याने माझा हात धरला... आणि मला कॉटेजच्या बाहेर ओढलं. त्याने बाहेरचा लाईट बंद केला. मी पूर्णपणे अंधारात होते. त्याचा चेहरा फ़क्त मला दिसत होता. त्याचे डोळे माझ्या चेहर्यात काहीतरि शोधत होते. "आसावरी.. मला आता या क्षणी तू हवी आहेस.." तो हळूच कुजबुजला. "अभिजीत.. प्लीज.." माझ्या आवाजातला दुबळा प्रतिकार मलाही जाणवला. ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रात्र ठरली. पहाटे पहाटे मी अभिजीतला माझी सगळी कहाणी सांगितली. मी मंगळी असल्यामुळे हे झालं असं सांगितल्यावर तो दिलखुलास हसला... "मूर्ख आहेस.. माझा अशा गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आणि तूही ठेवु नकोस.. उगाच डोक्याला ताप.. " तो सहजतेने म्हणाला. बेडच्या जवळच माझा आणि अभिचा एक फ़ोटो होता. मी तिकडे पाहिलं.... का कुणास ठाऊक.. मला अभि एकदम दिलखुलासपणे हसत असल्याचा भास झाला. ====================================
|
त्या रात्रीनंतर हे कायमच झालं. प्रत्येक रात्र हि अभिजीतच्या मिठीत आणि प्रत्येक दिवस त्या रात्रीच्या आठवणीत. अभिजीत मला खूप समजून घ्यायचा.. माझ्या भावनेची त्याला किंमत होती. मला तरी असं वाटायचं. आमच्या नात्याबद्दल तो कधीच काही बोलायचा नाही. विनाशब्दाचं असं हे नातं होतं. वासनेचं, शरीराचं, ज्यामध्ये भावनेला काहीच जागा नव्हती. जनावर होतो आम्ही.. समाजाने घातलेले सगळे निर्बंध मी तोडले होते. पाप आहे की पुण्य? माझी "गरज" ही माझा शाप बनू शकते का? नवर्याबरोबर भावनाचीही चिता जाळावी लागते का? किती प्रश्न मनात उठत होते. आणि उत्तर मिळायची अपेक्षाच नव्हती... प्रश्नच इतके भयाण तर उत्तरे किती भयानक... कधी कधी मी मनातले सगळं अभिजीतला बोलून दाखवायचे.. तो नुसता हसायचा... त्याच्या मते मी एखाद्या गोष्टीचा जरूरीपेक्षा जास्त विचार करायचे. असेलही.. पण माझं हे स्वरूप माझ्या सासरी किंवा माहेरी समजले तर काय होईल.. विचारानेच माझा थरकाप उडायचा. कुणाची भिती नव्हती.. मि जसे हवे तसे वागायला मोकळी होती.. पण मायेचा धाक फ़ार विचित्र असतो.. आई बाबाना जर कळलं तर ते मला काय म्हणतील याची धास्ती होती.. काही झालं तरी त्याच्या आयुष्यतून अभिला घालवायला मीच कारणीभूत होते ना...... "वेडी आहेस.. हे मंगळ वगैरे सर्व झूठ असतं. आकाशातल्या तार्याना कार करायचय आपलं जीवन घेऊन..." अभिजीत माझी समजून काढायचा.. पण तरीही.... कधीच मन अचानक उडी घ्यायचं... जर अभिजीतने मला लग्नासाठी विचारलं तर.. काय उत्तर देईन? त्याचा पत्रिकेवर विश्वास नव्हता. पण माझा होता. पुन्हा असं काही झालं तर.... कित्येकदा मी एकटीच रडत बसायचे. अभिची खूप आठवण यायची. तो जर मला सोडून गेला नसता तर... किती सुखी संसार होता माझा.. जास्त काही अपेक्षा नव्हती मला.. घर नवरा आणि मुलं यातच मी सुखी होते... दर महिन्याला येणार्या त्या क्षणाबरोबर जाणीव व्हायची की मी विधवा आहे... आणि विधवेला आई होण्याचा हक्क नसतो.. जरी जवळ पुरूष असला तरी.. या पुढचं आयुSःय एकटीनेच जगायचं होतं मला. सगळे घाव सोसूनदेखील दगडासारखं जगायचं होतं.
|
अभिजीत आज पुण्याला जाणार होता. त्याचं काम जवळ जवळ संपत आलं होतं. त्याला विद्यापीठामधे जाऊन त्याचं काम सबमिट करायचं होतं. एक गोष्ट जवळ जवळ नक्की झाली होती की अभिजीत आता लवकरच हे रीझॉर्ट सोडून जाणार होता. जशी जशी त्याची जायची वेळ जवळ येत गेली तशी तशी माझ्या मनात एक भिती येत गेली. तशी त्याला एखाद दुसरा आठवडा सोडून रहायची सवय होती पण आता मात्र परत एकटीने जगायचं?? माझ्या मनाला मी कसंही समजावलं असतं पण शरीराचं काय? वाघिणीला जशी रक्ताची चटक लागते तशी मला अभिजीतची लागली होती. आता परत त्याच्या शिवाय जगायचं.. जसं जसं त्याचं Ph D चं काम पूर्ण होत आलं तसं त्याचं माझ्या कॉटेजवर येणंही थांबलं. रात्रभर त्याचं काम चालू असायचं आणि मी मात्र इथे जागी तळमळत असायचे. तो पुण्याला जाण्या आधी मला भेटायला आला. त्याच्या कुशीत शिरून मी खूप रडले. तो मला शांतपणे थोपटत राहिला. त्याचा स्पर्श किती आश्वासक होता. आणि मी किती वेडी? हातातल्या वाळूला जितका धरायचा प्रयत्न केला जातो तितकीच ती हातातून निसटते.... अभिजीत माझा कधी नव्हताच.. मग त्याच्या जाण्याने मी का रडत होते? दगड बनायचं ठरवत असताना मी का मेण बनत होते? "सावरी,.. तू पण चल माझ्याबरोबर पुण्याला... तेवढाच तुला चेन्ज होईल..." त्याने माझी समजूत कढली "नको.. मी पुढच्या महिन्यात जाणार आहे. सुट्टी घेऊन.... " मी त्याला सांगितलं. "तिथे भेटशील मला?" त्याने विचारलं. "नाही.." "का?" "प्लीज.. अभिजीत... तुला माहीतीये ना मग तरी असं विचारतोस?" "कारण मला तू पुण्यात भेटशील याची खात्री आहे.. सावरी.. तू माझ्याशिवाय नाहि जगू शकणार.." तो माझ्या डोळ्यात बघत म्हणाला....
|
Meggi
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:38 am: |
| 
|
नंदिनी छान, welcome back
|
Vidyaraj
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:29 am: |
| 
|
नंदिनी, बघ एव्हड्या छान कथेला आम्ही मुकलो असतो. पुढचा भाग लवकरच येईल ही अपेक्षा आहे.
|
Lukkhi
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:27 pm: |
| 
|
पुढचा भाग लवकर टाका... इकडे सावरी गरोदर राहते की नाही यावर बेटींग सुरू झालेले आहे
|
Pendhya
| |
| Thursday, April 19, 2007 - 3:45 am: |
| 
|
नंदिनी, भाग छान लिहिलास. ही कथा ईतक्यात संपेल असं वाटत नाही. ( चांगल्यानेच म्हणतोय. ) बरेच प्रष्ण ऊभे राहीले आहेत.
|
lukkhi भलतच काहीतरी! अहो अशाने संस्कृतीरक्षक तुटुन पडतील
|
Lukkhi
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:12 am: |
| 
|
अहो, गरोदर रहायला जर संस्कृतीरक्षकांची हरकत असती तर तुम्ही आम्ही कसे झालो असतो? (आणि तथाकथित संस्कृतीरक्षकदेखिल). (त्यांची हरकत बेटींग ला असेल असे तर तुमचे म्हणणे नाही ना?) असो, विषयांतर नको (ते इथे यापूर्वी भरपूर झाले आहे)... कथा खरंच उत्कंठावर्धक आहे. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
|
malaa vatalela ki dusara abhijit suddha tapaktoy aata. reptiles var study karat hota na.
|
Chaffa
| |
| Friday, April 20, 2007 - 6:58 pm: |
| 
|
नंदिनी, मी सगळे भाग जमा करुन ठेवलेत आता एकदमच वाचीन नाहीतर तुटक तुटक वाचताना उगीच त्रास होतो. पण एकदम वाचायला जास्त छान वाटेल हे नक्की.
|
अभिजीतला पुण्याला जाऊन जवळ जवळ महिना होत आला. तो मला फ़ोन वगैरे करेल ही मला अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे जेव्हा त्याचा पहिल्यादा फ़ोन आला तेव्हा मी जरा चमकलेच. दर दोन तीन दिवसा आड त्याचा मला फ़ोन येतच होता.. पण त्याने मला फ़ोन केला की पिंकी अस्वस्थ दिसायची. मी तिला कारणही विचारलं. पण ती काहीच बोलली नाही. फ़क्त "त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नको.. साप आणि पुरुष कधी चावतील त्याचा नेम नाही" असं काहीतरी बोलली. वारंवार विचारून सुद्धा तिनं मला काहीच उत्तर दिलं नाही. काय कारण असावं? कदाचित माझ्याप्रमाणेच अभिजीतचे तिच्याबरोबरही संबंध असतील.. नाना शंका कुशंका माझ्या मनात्य रेंगाळायला लागल्या. परत परत मी मनाला एकच प्रश्न विचारला.. एकच उत्तर मिळालं. मला अजूनच अस्वस्थ करत... त्या दिवशी रूम बॉय माझा फ़ोन आल्याचं सांगत आला.. मी फ़ोन घेतला. पलीकडे सासूबाई होत्या. "अगं आसावरी... कुणाला नाही तर मला तरी सांगायचं.." खूप दिवसानी त्याचा आवाज खुश होता. मला काहीच कळेना.. "आई... काय?" मी विचारलं. "अगं तुझा तो मित्र घरी आला होता... रीझॉर्टवाला.." त्याचं नाव घेताना त्या किंचित अडखळल्या. "कोण अभिजीत?" मी माझ्या नकळत बोलून गेले. पुढच्याच क्षणी भितीची एक लहर जीव घेऊन गेली. तो घरी का गेला होता आणि त्याने घरी काय सांगितलं? आईचा आवाजातून उत्साह ओसंडून वाहत होता. "आधी मला खरंच वाटेना. मी त्याला म्हटलं सुद्धा माझी लेक असं काही असेल तर मला आधी सांगेल. पण मग..." "आई.. काय बोलताय तुम्ही? मी म्हणजे.. तसं काही.. अहो,.. मला...." माझे पाय कापत होते. डोकं अचानक गरगरायला लागलं. मी कोसळतेय की काय असं मला वाटायला लागलं. "अगं वेडाबाई घाबरतेस काय अशी? तुझ्या आयुष्यात नवीन कुणी आलं तर आनंदच आहे आम्हाला.." माझ्याच नकळत मी हुंदका दिला. "अहो, रडतेय ती..." आईनी बाबाकडे फ़ोन दिला. "आसावरी, अगं रडू नकोस. हे बघ, तो आज घरी येऊन गेला. मुलगा चांगला आहे. आईवडील ही भेटायला येत आहेत. तुझ्या आई वडीलाशीही बोलणी चालू आहेत. त्याचा मुहुर्तावर वगैरे विश्वास नाही. त्यामुळे रेजिस्टर पद्धतीने लग्न करायचं असं तो म्हणतोय.. " "काय?" माझ्या हातातून फ़ोन खाली पडला. कितीतरी वेळ मी तिथेच उभी होते. आई बाबा अभि, सगळ्याचे चेहरी माझ्याभोवती फ़िरत होते. मी कुठे आहे आणि काय आहे हेही मला कळेनासं झालं. अभिजीत माझ्या घरी लग्नाची बोलणी करायला गेला. का? मला न सांगता? एवढा मोठा निर्णय घेण्या आधी त्याने मला सांगितलंही नाही. विचारलं तर नाहीच. मी अख्खी रात्र जागुन काढली. अभिबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत होता. मधेच कुठेतरी अभिजीत यायचा. त्याचं हसणं बोलणं.... मधेच एक माणूस ओरडत यायचा.. "ही विधवा आहे.. मंगळी आहे.. स्वत्:चं कुंकू पुसण्यातच हिला समाधान वाटेल." दोन तीन दिवस असेच गेले. दिवस रात्र एकच विचार.. मी हे करू कीनको? अभिजीतबरोबर झोपताना काहीच विचार केला नाही.. पण त्याच्याबरोबर आयुष्य घालवताना मात्र मी अखंड विचार करत होते.
|
Manogat
| |
| Monday, April 23, 2007 - 8:58 am: |
| 
|
नंदिनि, तुम्हि मस्तच लिहिता, तुमच्या प्रत्येक कथेत विचरांचि प्रगल्भता आढळुन येते. so no comments on this story like every story this one is also too good आमच्य वाचक वर्गावर अशिच क्रुपा करत रहा....
|
Sakhi_d
| |
| Wednesday, April 25, 2007 - 6:24 am: |
| 
|
>>मात्र मी अखंड विचार करत होते. >> दोन दिवस मी पण विचारच करत होते... पण तु आचार कधी करणार?? लवकर टाक ना पुढचा भाग.... किती विचार करायला लावणार??
|
Zpratibha
| |
| Wednesday, April 25, 2007 - 7:31 am: |
| 
|
अगदि मनातल लिहलस सखी...
|
आज अभिजीत येणार होता. त्याचा तसा फोन आला होता. मला पहाटेच जाग आली. का कुणास ठाउक खूप भिती वाटत होती आणि तरीही मी जे काही करतेय ते बरोबर करतेय हे ही पटत होतं. रोजच्या प्रमाणे मी सकाळी फ़िरायला निघाले. पावसाळा दोन तीन दिवसावर होता. त्यामुळे ढगाळ वातावरण होतच. सूर्य उगवला तरीही ऊन नव्हतंच. डोंगर माथ्यावर ढग उतरले दिसत होते. कदाचित आज पावसाचा पहिला शिडकावा होईल. कदाचित होणारही नाही... मी आज पांढरीशुभ्र साडी नेसले. बाहेर किंचित थंडी होती म्हणून हिरवी शाल ओढली. अख्ख्या रीझॉर्टवर फिरून आल्यावर मी दरीच्या जवळ आले. शांतपणे तिथेच उभी राहिले. आयुष्याचा हिशोब मांडत होते. किती वेळ तिथे थांबले होते मलाच माहित नव्हतं. हळू हळू सुर्य वर चढत होता. ढगाच्या आडून चमकत होता. माझ्या मनातल्या आठवणीसारखा. "सावरी.... सावरी.." पाठून आवाज आला. कुणाचा हे सांगायला नकोच.. पण मी वळून पाहिलं नाही, तशीच शांत उभी राहिले. "इथे का उभी आहेस?" तो अगदी माझ्या पाठी येऊन थांबला. "अख्खं रीझॉर्टभर शोधतोय मी तुला... सावरी माय डार्लिंग.." त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. एखाद्या सापाला झिडकारावं तसा तो मी हटवला. इतक्या वेळाचा माझा संताप आता माझ्या डोळ्यात उतरला होता.. "कोण आहेस तू?" मी थंडपणे विचारलं. "म्हणजे?" तो किंचित चमकला. "माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारा तू कोण आहेस?" माझा आवाज अजूनही शांत होता. "सावरी, तुला म्हणायचय काय? तुझ्या सासरचे माहेरचे सगळे तयार आहेत.." "पण मी तयार आहे?" मी त्याचं वाक्य मधेच तोडलं. "म्हणजे.... सावरी प्लीज, माझा मंगळ कुंडली गोष्टीवर विश्वास नाही...." "माझाही नाही.... " "तू काय बोलतेस मला कळत नाही. " "कसं कळणार? कधी विचारलस तू मला? सांगितलस मला? निर्णय घेण्या आधी आणि नंतर ही... माझ्याशी संवाद साधावा असं तुला का वाटलं नाही?" "सावरी.... हे बघ तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि.." "अभिजीत... माझं तुझ्यावर प्रेम नाही. गैरसमजातून बाहेर ये." मी त्याच्या डोळ्यात बघत सांगितलं.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:10 am: |
| 
|
नंदिनी आता डोळ्यात किती वेळ बघायचे?? ए. भा. प्र.
|
"सावरी..." "हो अभिजीत, आणि मला हे ही ठाऊक आहे की तुझं माझ्यवर प्रेम नाही..." "तू मुर्खासारखं बोलतेयस" "ओह. रीअली? मी मूर्ख आहे आणि तू फ़ार शहाणा.. सुधारक... विधवा आणि मंगळी मुलीबरोबर लग्न करायला तयार झालेला... अभिजीत.. तू मुर्ख आहेस." "सावरी, माझ्या घरचे तयार नव्हते तरी मी त्याना पटवून दिलय की मला तुझ्यासोबतच.." "अभिच्या इन्शुरन्सचे दहा लाख, त्याच्या कंपनीतुन मिळालेले सात लाख, आईची पेन्शन, बाबाची पेन्शन वर मला बारा हजाराची नोकरी.. माझे सोळा तोळ्याचे दागिने आणि मुंबईत फ़्लॅट. मग तुझे आईवडील तयार होणारच ना?" "काय बोलतेस काय तू? एक तर तुझ्यासाठी मी अख्ख्या घराशी भांडतोय आणि तू मात्र मनाला येतील ते आरोप माझ्यावर लावत सुटली आहेस. " "आरोप? अभिजीत, मी हे सगळं बोलायच्या आधी तुझ्या बद्दल सगळी माहेती काढली आहे. तू खूप हुशार आहेस यात वाद नाही... पण मला ही थोडी फ़ार अक्कल देवाने दिलीच आहे ना?" "सावरी, हे बघ, तू अजून लहान आहेस, एवढं मोठं आयुष्य तू एकटी कशी काढणार आहेस?" "मलाच का हा प्रश्न? की मी एकटी कशी राहीन म्हणून... जो पर्यन्त एखाद्या बाईच्या गळ्यात डोरलं नसतं तोपर्यन्त तिला जगायचा धिकार नसतो का? कुणाची तरी कुबडी घेतल्याशिवाय तिला चालता येतच नाही का?" माझा आवाज भरून आला. माझ्या नकळत. "सावरी, तुझा काहीतरे गैर समज होतोय. माझ्याबरोबर चल. कॉफ़ी घे. मग आपण या विषयावर चर्चा करू.. ठीक आहे?" "नाही, अभिजीत,... हा विषय मला इथेच संपवायचा आहे. अभि गेल्यापासून एकटं राहण्याची शिक्षा मी भोगतेय. तुझ्याबरोबर झोपून मी स्वत्:ला नासवलं आहेच पण आता तुझ्या नावासोबत माझं नाव जोडून मला माझ्या त्या चुकीची इतकी मोठी शिक्षा नाही देणार..." "सावरी.... अगं असं काय करतेस? मी खूप खुश ठेवीन तुला. कशाचीही कमी पडू देणार नाही.. just believe me "नाही अभिजीत.... मी हा खेळ पुन्हा खेळणार नाही. अभिवर माझं झुप प्रेम होतं रे.. पण तो सोडून गेला म्हणून त्याच्याबरोबर माझं प्रेमही गेलं का? मला तुझी गरज शारीरिक पातळीवर होती. मनानं मी कायम त्याचीच राहिले." "सावरी... मी तुला म्हटलं का की तू त्याला विसर म्हणून? पण माझं तुझ्या वर खरंच प्रेम आहे.." "बास,,,, अभिजीत, अजून खोटं बोलू नकोस. तू मला कितीही समजावयाचा प्रयत्न केलास तरी मी हे केव्हाच मानणार नाही की तुझं माझ्यवर प्रेम आहे. असतं ना तर त्या रात्री कॉटेजवर आला नसतास... तुझ्या वासनेला मी प्रेम समजायची चूक कधीच केली नाही. प्रेम काय अस्तं याचा खूप छान अनुभव आहे मला.... "
|
"सावरी.. झाल्या गोष्टी विसर. नव्याने आयुष्याकडे बघ.." "अभिजीत, मी नव्यानेच तर आयुष्याकडे बघतेय. आणि आता सगळं कसं स्पष्ट दिसतय मला.कुणाचीही मदत न घेता मला माझं जीवन जगायचं आहे. त्यासाठी जे हवं ते करायची माझी तयारी आहे" "सावरी, तुला वेड लागलय" त्याचा आवाज किंचित चढला. "तू काय बोलतेस ना ते तुलाच कळत नाहीये" "हो, असेलही. पण म्हणुन या वेडाच्या भरात मी तुझ्याशी लग्न नाही करणार." माझाही आवाज तितकाच चढला. "सावरी.. तुला माझ्याशी लग्न करावं लागेल.. नाहीतर.." त्याने प्रत्येक शब्द अत्यन्त शांतपणे उच्चारला. "नाहीतर काय?" "मी सगळ्याना स्पेशली तुझ्या सासू सासर्याना जाऊन सांगेन की किती रात्री तू माझ्याबरोबर रंगवल्यास..." त्याच्या चेहर्यावर एक हलकंच स्मित होतं. धूर्तपणाचं. "अवश्य... अवश्य जाऊन सांग त्याना आधीच समजलेलं आहे की त्याच्या जावयाची काय लायकी आहे ती... तू जाऊन सिद्ध कर. अभिजीत, तुझ्या माहितीसाठी म्हणुन सांगते... एक वेळ आली होती की ज्यावेळेला मला वाटलं की मी तुझ्या प्रेमात पडतेय. शरीराचं नातंच तसं असतं. तुला नाही कळणार.. त्यासाठी स्त्रीचा जन्म घ्यावा लागतो. तुम्ही या सगळ्या क्रियेत अलिप्त राहू शकता. पण स्त्रीला शरीर आणि मन या वेगळ्या गोष्टी नसतात. आणि मग शरीराचं नातंच भावनिक होऊन जातं. त्यावेळेला मी माझ्या सासूबाईनाच विचारलं होतं की मी काय करू? त्यामुळे त्याना हे सगळं आधीपासून माहित आहे. नवीन माहिती काहीही मिळणार नाही" अभिजीतच्या चेहयावरचे स्मित गायब झाले. "तू जरा जास्तच शहाणपणा केलास असं वाटत नाही तुला?" त्याने मला विचारलं. "का? मी हा एवढा विचार केलेला असेन असं वाटलं नाही का तुला? अभिजीत, तुझ्या आयुष्यात कित्येक जण आले असतील आणि गेले असतील पण मी सगळ्यात जास्त विचर केला की तू फ़क्त माझ्याशी लग्न करायला झालास... तिथून पुढे सगळे दुवे एकमेकाना मिळत गेले.. अभिजीत, तुझ्या प्रेमाचा मुखवटा मी केव्हाच ओळखल होता. तुझ्याकडून मला आयुष्यभराच्या साथीची अपेक्षा कधीच नव्हती. आणि जेव्हा तू लग्नासाठी विचारलस तेव्हा तर कमालच वाटली.... किती सहजतेने तू हा विचार केलास की मी तुला नाही म्हणूच शकणार नाही म्हणून.... पण अभिजीत. मी नकार देत आहे. तुझ्यासारख्या पुरूषाबरोबर आयुष्य घालवण्यापेक्षा मी एकटी जगणं पसंद करेन. प्रश्न राहिला तो माझ्या गरजाचा... तुला जशी इथे आसावरी मिळाली तसं मलाही अजून कुणीतरी मिळेलच. तेव्हा अभिजीत आपलं नातं इथपर्यन्तच होतं. बाय.." हे सगळं त्याला अनपेक्षित असावं. "सावरी... तू पस्तावशील एक दिवस.." "माझं आयुष्य बघायला मी समर्थ आहे. आपण त्याची काळजी करू नका" तो पाठी वळून निघाला. मी शांतपणे तिथेच उभी राहिले. घेतलेला निर्णय बरोबर की चूक हे येणारा काळच ठरवणार होता. सध्या माझ्या हातात काय होतं? काहीच नाही. हलकेच वारा वाहत होता. मी तशीच शांत उभी होते. दगडासारखी. निश्चल.
|
स मा प्त स मा प्त स मा प्त
|
|
|