Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 17, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 17, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, April 13, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया ...
१० / ११ / ०६ ची कविता आहे .
आत्ता पोस्ट केली इतकंच .
:-)


Sumedhap
Saturday, April 14, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manik, jagu, Daad, Princess,R_joshi

Thanks to everyone!!!!!

Meghdhara
Sunday, April 15, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा मयुरा.. सुंदर रे.. पण रुक्षातून कडवटपणातून आलेलं सौंदर्यं जरा जास्तच टोकदार होतं.. अनुभूत दुखवल्या गेल्यापेक्षाही जास्त कधी कधी..

मेघा


Meenu
Sunday, April 15, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदी

ह्या झर्‍याच्या प्रवाहात,
किती सहज मिसळत जाताहेत,
लहान मोठे किती तरी झरे.

त्यांचं येणं..
कडेकपारी पार करुन,
आपापल्या लहानशा सीमा ओलांडून,
कधी ठेचकाळत तर कधी आवेगानं कोसळत.
जसं 'आपलं' कुणी भेटायला यावं,
सारा अहंकार सोडून..

बघता बघता झर्‍याचं,
निर्मळ नदीत कधी रुपांतर झालं,
कळलच नाही ना...?



Daad
Sunday, April 15, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, कविता अप्रतिमच. एक सांगू? त्या प्राजक्ताचं रोपण इथलं नाही ते वरतूनच घेऊन येते काळजाची माती. ते उपटून टाकणं कुणाच्याच हाती नाही. आणि त्यावर कडी म्हणजे फुलं कुणाच्या ओंजळीत, अंगणात पडायची तो एक वेगळाच योग!
एकमात्र खरं ह्या प्राजक्ताची फुलं नुसता आसमंतच नाही तर मातीही सुगंधीत करताहेत, रे!
मीनू, नेहमीप्रमाणे परत एक वेगळा विषय आणि साध्या सोप्प्या शब्दांत!


Meenu
Monday, April 16, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरी

पहीलं पाऊल मी का उचलु?
असा विचार करत, किती काळ..
ठामपणे उभे आहोत आपण,
आपापल्या जागी..

डोळे मिटल्यावरही,
स्पष्ट दिसणारी,
तुझी प्रतिमा,
उघड्या डोळ्यांनीही,
धुसरच दिसते आता..

तसा उशीरच झालाय खरं तर,
तरी पण..
फार उशीर नको व्हायला..


Zaad
Monday, April 16, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिरस्काराचे ढग

एक दिवस डोळ्यांत संतापाच्या सहस्त्र ठिणग्या घेऊन तू
माझ्याकडे आलास आणि मला मागितलेस तिरस्काराचे
चार ढग(ज्यांची माझ्याकडे काहीच कमी नव्हती) ;ते घेऊन
तू शहराशहरातून, गावागावातून जिथे जिथे माझी वस्ती
आहे तिथे तिथे फिरत राहिलास. तुझी प्रेमाची भूक जितकी
मोठी आहे तितकीच तुझ्या तिरस्काराची आगही असे मला
वाटून गेले तोच तू परत आलास आणि फक्त इतकंच म्हणालास,
'तू दिलेले ढग फार दुबळे वाटले मला...न फोडताच हे मी परत
आणले आहेत, नीट तपासून घे!' आणि कसल्याच उत्तराची वाट
न पाहता निघून गेलास. ते तिरस्काराचे ढग तपासून घ्यायची
तशी काहीच गरज नव्हती, ते जसेच्या तसे तू परत केले होतेस;
फक्त त्या ढगांमधला पाऊस तेवढा बदलून गेला होता...



Mankya
Monday, April 16, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू ... दोन्ही सुंदरच अन खूपच वेगळ्या ! लेखनशैली बदलली वाटतं तुझी, मला वाटलं; की खूप दिवसांनी तुझ्या कविता वाचल्या म्हणून कदाचित !
झाड .. थोडसं झेपलं नाही पण जे झेपलं ते उत्तमच !

माणिक !


Pulasti
Monday, April 16, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव - प्राजक्त मस्तच!
मीनु - दरी आणि नदी आवडल्या. तुझ्या लिखाणातला संयम वाखाणण्यासारखा आहे. म्हणायचंय ते लिहून झालं की एखादाही शब्द जास्तीचा न घालता त्या कवितेपुरती लेखणी ठेवतेस...
झाड - ढग आणि त्यातला पाऊस आवडला!
-- पुलस्ति.

Sumedhap
Monday, April 16, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विरह..

सर्वसुखी विश्वाचा माझ्या होतास तु आधार
का रे सख्या निघुन गेलास असा घेऊनी माघार?

काळासम जिवनी माझ्या आलास आणी गेलास
उरी उरला सहवास तुझा जसा गंध फुलास

आठवांचे काजवे ठेऊन गेलास मन मालवुन
एकल्याच ह्या प्याल्यात विरहाचे विष कालवुन

फार वाटतं तुझ्यासाठी चंदनासम झिजावे
शुष्क हे आयुष्य तुझ्या प्रेमाने पुन्हा भिजावे

डोळ्यांसोबत मनही माझे वाटेवर तुझ्या थांबले आहे
मंथन झाले तयाचे तरी भेटणे अजुन लांबले आहे

आभाळात माझ्या तुझे प्रेम दाटुन येऊदे
हे अंतर किंवा डोळे माझे काही एक मिटुन जाऊदे


Daad
Monday, April 16, 2007 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, परत एकदा विषय वेगळा आणि मांडणी नेटकी. पुलस्तिशी पूर्णत: सहमत!
झाड, कल्पना खूप आवडली.
सुमेधा, विरह मधल्या काही कल्पना खूप आवडल्या.
आठवांचे काजवे ठेवून गेलास, मन मालवून!
काळासम.....
छानच. ए, 'मंथन झाले तयाचे' - म्हणजे काय? मला खरच कळला नाही अर्थ इथे.


Mayurlankeshwar
Tuesday, April 17, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहू नकोस असं काही...

लिहू नकोस असं काही
बोलू नकोस असं काही
तुझ्या माझ्या चांदण्यांची
उल्का कधी होणार नाही

छत भले जळून जाईल
भिंतसुद्धा खचून जाईल
वेलीवरती पापण्यांच्या
फूल कोवळे थिजून जाईल

हातांमध्ये हात असू दे
मौनातही ओठ हसू दे
ह्या नक्षत्रांच्या रांगोळीची
मी राख होऊ देणार नाही

जगायचं मात्र असंच आहे
सार्‍या जाणीवांचं हसंच आहे
समजूत तू घालतेस तरी
दु:ख वेडंपिसंच आहे.

अशी हतबल होऊ नकोस
एकांती क्षण ओवू नकोस
उन सावलीचा खेळ वेडे
अर्ध्यामध्ये संपणार नाही.

रोज नवे नवे मरायचे
रोज नवे नवे जगायचे
पारा उडल्या आरशांमध्ये
जुनेच चेहरे बघायचे

मला जरा आठवून पहा
थेंब थेंब साठवून पहा
उरल्यासुरल्या सयींची
शपथ जुनी सुटणार नाही

ओंजळ ओंजळ रिती रिती
श्वास श्वास...माती माती
शून्यातूनही वजा झालो
काय सांग राहिले हाती?

आता अंकांची शाळा नको
आयुष्याचा पडताळा नको
आसवांच्या ह्या तोरणांचे
कर्ज कधी फिटणार नाही

शब्दच कसे मुके झाले?
अर्थाचेही का धुके झाले?
काजळ तुझे ओले ओले
अक्षर अक्षर फिके झाले...

लिहिता लिहिता संपेल सारं
वाहता वाहता कंपेल वारं
ह्या वादळलेल्या कवितेचा
मला निरोप घेणं जमणार नाही.
(मयूर)
















Pulasti
Tuesday, April 17, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! वा मयूर..!!

ओंजळ ओंजळ रिती रिती
श्वास श्वास...माती माती

आता अंकांची शाळा नको
आयुष्याचा पडताळा नको

शब्दच कसे मुके झाले?
अर्थाचेही का धुके झाले?

लिहिता लिहिता संपेल सारं
वाहता वाहता कंपेल वारं

... अप्रतिम!! ही कविता संपूच नये असं वाटत होतं...

-- पुलस्ति.

Daad
Tuesday, April 17, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा! खरच संपूच नये असं वाटलं ही कविता. अतिशय ओघवती रचना, नव्या नव्या कल्पना, साधे, सुंदर शब्द! व्वा, मयूर, मजा आया!
(मला उगीचच ही कविता मी आधी पोस्टलीये असं वाटतय, तरीही...)

रित्या मनाचे आक्रोश
मौनी घुसमटलेले
दंश साहल्याचे विष
ओठांआड दाटलेले

वेदनेचे पाणलोट
रोखलेले पापणीत
उसवीत प्राणबंध
ओघळले पदरात

मुक्या हाताने नको तू
चाचपूस बये भाळ
गोंन्दवणाच्या पल्याड
तुझे उघडे आभाळ

विस्कटल्या नजरेत,
कायमची सांजवेळ....
नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल......

-- शलाका


Smi_dod
Tuesday, April 17, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाउस!!!!

चिंब चिंब भिजायचे
पावसात....मनसोक्त
अगदी पाकळी पाकळी
उमलवुन.....
अंगभर पिसारा फ़ुलवुन
पण... ..तसा पाउस
बरसलाच नाही
आता कधीतरी
बाहेर पाउस बरसत असतो
अन मी मात्र कोरडी असत
कोरड्या मनाने,कोरड्या डोळ्याने
खिडकीतुन येणारे
चुकार तुषार झेलत....

स्मि


Sumedhap
Tuesday, April 17, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद दाद!!!!!!!!
मंथन झाले तयाचे म्हणजे इथे मी मनाच्या मंथानाबाबत म्हटले आहे....म्हणजे मन त्याच्या आठवणींने संपुर्ण ढवळुन निघाले आहे...तरीही अजुन त्याची भेट झाली नाही आहे..


Mayurlankeshwar
Tuesday, April 17, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद..पुलस्ति,दाद.
दाद...
मुक्या हाताने नको तू
चाचपूस बये भाळ
गोंन्दवणाच्या पल्याड
तुझे उघडे आभाळ

विस्कटल्या नजरेत,
कायमची सांजवेळ....
नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल.....
वा!! केवढे संवेदनशील शब्द आशयप्रगल्भ!!

स्मि..पाऊस आवडला... विशेषत: 'चुकार तुषार' छान!!


Smi_dod
Tuesday, April 17, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मयुर..

जगण...

मिळुनी सार्‍या वेदना
हसत हसत साहत गेले मी
परत परत त्यात
आपणहुन धावत गेले मी
रित्या करून राशी सुखांच्या
रिक्तहस्ते परत फ़िरले मी.....
गळुनी पडले बंध सारे
तरीही आठवणीत बंदिस्त राहिले मी
हात हातीचा कधीच सुटला
तरीही अजुन तोच स्पर्शते मी
दोष माझा नव्ह्ता तरीही
नशिबातील भोगांना त्या भोगते मी

स्मि


Vaibhav_joshi
Tuesday, April 17, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा

अप्रतिम कविता .

शलाका ... " काच बिंबाने फुटेल " ह्या ओळीवर अक्षरशः तडकल्याचा आवाज आला कानात .

स्मि ... लिहायला लागलीस का पुन्हा . मस्त .

पाऊस जास्त आवडली .


Vaibhav_joshi
Tuesday, April 17, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू ...
दरी मस्त आहे .

झाडा ..

काय आवडलं म्हणशील तर आख्खी कविता लिहावी लागेल पण सर्वात जास्त आवडलं

तिरस्काराचे
चार ढग(ज्यांची माझ्याकडे काहीच कमी नव्हती)

कंसांसकट ... किंवा कंसांमुळेच . कस सुचलं ?

सुमेधा

काळासम जिवनी माझ्या आलास आणी गेलास
उरी उरला सहवास तुझा जसा गंध फुलास

मी काळावर श्लेष घेतला आणि मजा आली .





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators