आकाशात साचलेले काळे ढग,
दुरून कुठूनतरी येणारा भिजलेल्या मातीचा वास,
येऊ घातलेल्या पावसाला जणू पिटाळून लावणारा वारा,
वारा अंगावर झेलत खिडकीत उभा मी,
चेहऱ्यावर आदळलेलं ते वाळकं पान
आठवतात मला ते चिखलाने भरलेले इवले इवले पाय,
माझं भिजलेलं डोकं पुसण्यासाठी हातात टॉवेल घेऊन दारात उभी आई,
पावसात भिजलेलं अंग घुसळून पाणी उडवणारा तो कुत्रा, समोरच्या मैदानावर चिखलात खेळणारी ती मुले
अवास्तव स्वप्नांच्या विश्वात
मी कधी वावरलोच नाही
वास्तवाचे भान माझ्या
मी कधी विसरलोच नाही
मर्यांदांची जाण माझ्या
सदा ठेवुनी मनी
प्रयत्नांची कास माझ्या
मी कधी सोडलीच नाही
असंख्य आली अपयशे
झाल्या अनेक उपेक्षा
यशाची त्या आस माझ्या
मी कधी गमावलीच नाही
दीर्घ अशा या प्रवासात
झाल्या अनेक जखमा
चिकाटीच्या औषधाने
त्या भरल्यात आता
ठेवलेल्या संयमाची
दिसू लागलीत फळे
जागोजागी दिसू लागलेत
आता यशाचे मळे...
***
अथांग या आकाशात
आता मला उडायला हवं
बंदिस्त या पिंजऱ्याचं दार
आता मला तोडायला हवं
आयुष्यातील क्लिष्ट गणितं
सोडवणं थांबवायला हवं
संसारातील सुख दु:ख
यातील लक्ष काढायला हवं
करण्यासारख्या असंख्य गोष्टी
वाचन, लेखन, ज्ञानसंवर्धन
व्यर्थ मनोरंजनातील वेळेचा
अपव्यय आता टाळायला हवा
मर्यादित या आयुष्यातील
प्रत्येक क्षणच महत्वाचा
एक एक क्षण कामी आणणं
कटाक्षानं पाळायला हवं
आलो, जगलो आणि मेलो
असे जीवन का जगावे
काहीतरी करुन जाणं
हेच ध्येय ठेवायला हवं...
***
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर
आस माझी फळास आली
आज अचानक कुठुन तरी ती
हलकेच माझ्या दारी आली
भेट तिची स्वप्न माझे
असे अचानक पुरे झाले
कोणत्या जन्मीचे पुण्य माझे
या जन्मी कामास आले
शोधात होतो सदैव तिच्या मी
गवसत नव्हती कुठे कधी ती
कसे तिला मी कुठे भेटावे
सांगत नव्हते कुणी मित्रही
आज अचानक भेट जाहली
जाणिव आहे ओळख नवी ही
तरी अडखळत हा चालू केला
संवाद त्या माझ्या कवितेशी...
***
सकारात्मकता जोपासूया. प्रतिकार शक्ती वाढवूया. निसर्ग काहीं सांगतोय.
फुलांनी फुलणं सुरूच ठेवलंय. उन्हाळा आपल्या पद्धतीने वाढतोच आहे. पावसाळा येईल. म्हणजे काळ पुढे जाणारच आहे. ऋतू असेच आपलं चक्र चालवणार आहेत.
या सकारात्मकतेसाठी ही कविता.
असें ऋतुनी
सजावेधजावे
नटूनि थटूनि
येणे करावे
असे फुलांनी
उमळणे करावे
हळूच हसोनी
मग दरवळावे
पहाटवाऱ्याने
कळीस स्पर्शावे
गूढ जाणिवेने
तिने थरथरावे
पानांच्या कुशीत
हळू नांदताना
स्वयंपण सोशीत
उन्हे पेलताना
माझे परम दैवत
हरवून बसलोय मी
पाठीशी उभी आधाराची भिंत
ढासळलेली पहातोय मी
माैज-मजेचे दिवस
आता सारे संपलेत
सारे बाल्य माझे
गमावून बसलोय मी
तुमचे ते हास्य
तुमचे ते बोलणे
हवेहवेसे ते सारे
आज शोधत बसलोय मी
आदर्श वडील कसे असावे
याचे मूर्तिमंत रुप तुम्ही
तुमच्या त्या वात्सल्यासाठी
अक्षरश: वेडावलोय मी
तुमच्याशी प्रेमभरा संवाद
क्वचित झालेला वाद
तरीही तुमच्या जवळ बसून
होणारी ती चर्चा आठवतोय मी
निरोप म्हणजे देवाला नमस्कार
निघताना हातावर घातलेलं दही
पाठीवर थरथरता हात आजीचा
सांगून जातो बरंच काही
न सैलावणारी घट्ट मिठी
छकुल्या हातांनी केलेला टाटा
जेव्हा दुरावतात सखे सोबती
जेव्हा वेगळ्या होतात वाटा
साता समुद्रांपार पहिली भरारी
सासरी चाललेल्या ताईची पाठवणी
हसण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न
दडवीत हुंदका
लपवीत डोळ्यातलं पाणी
सहवासातल्या क्षणांच्या आठवणींची दाटी
विरहाची हुरहूर जडावलेली अंतः करणं
निरोप म्हणजेच परतीचं तिकीट
निरोपातच असतं पुढल्या भेटीचं बोलावणं
शालेय जीवनात साधारण तेरा-चौदा वर्षांचा असताना मी एक बालकविता लिहिली. ती दै. सकाळमध्ये पाठवली. आश्चर्य म्हणजे ती छापूनही आली. त्यावेळी मला झालेला आनंद मला अजूनही आठवतोय. मी दै. सकाळचे ते पान घेऊन मोठ्या उत्साहाने शेजारच्या घरांत दाखवत सुटलो होतो.
अशा प्रकारे सकाळमध्ये छापून आल्यामुळे अतिशय उत्साहात येऊन मी त्या काळात अजून कविता करण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्या जमल्या नाहीत.
आणि एका व्हायरसने मुंबई थांबवली....
पायांना सवय नव्हती...थांबण्याची..
हातांना सवय होती...स्वतःला सावरण्याची...
आरश्यात स्वतःला फॉर्मलिटी म्हणून पहायचं...
बायकोने नवऱ्याशी आणि नवऱ्याने बायकोशी...
सकाळच्या प्रहरी....फॉर्मलिटी म्हणून हसायचं...
बूट चपला अडकवत तिडकवत...
रोजच स्वतःला झोकून द्यायचं...
जिवंत हाडा मांसाच्या महापुरात....
कसायाच्या दुकानात लटकवलेल्या निष्प्राण सोललेल्या प्राण्यासारखी...
माणसं लटकलेली ट्रेन च्या दरवाज्याला...म्हणे जगण्यासाठी....!
हल्ली मनाचा कोपरा हळवाच असतो
जाणून घेण्यास कोणी मोकळाच नसतो
मनुष्याच्या जत्रेत आपण एकाकीच असतो
गर्दीत माणसाच्या आपण एकटेच फिरतो
मैफलीत मित्रांच्या सहज हितगुज साधतो
जिंकून मात्र दोस्तीच्या जलशात हारतो
इतरांशी संभाषण साधायला वेळच नसतो
स्वत:शी नकळत अव्यक्त संवाद करतो
पान झडताना आपण ग्रीष्मात पाहतो
वर्षा ऋतुत आम्ही मात्र पुन्हा बहरतो