टुमदार घरांच्या टोळ्या
बदनाम मनांची वस्ती
जर इथे भेटलो असतो
तर फिकीर पडली नसती
तू भेटीला बोलवले
ती जागा संथ निराळी
सांजवतो डोह तिथे अन्
सुर्याचा संप कपाळी
वर अशा सभ्य खडकांवर
टाकून पाय बसताना
मन तर-तम, तर-तम करते
भोवती तूच असताना
वाचल्या पहा डोहाने
सावल्या एकरुपताना
नवखेच जाणवे काही
हे शब्द नवे सुचताना
आठवे पुन्हा शब्दांना
सत्याचा धुरकट रंग
जन्मभर पुरावा इतका
असतो का देह अभंग ?
--सुशांत ..
स्मरणरंजन : (वृत्त चंपकमाला)
त्या दिनराती त्या क्षणमाला
ती सुखदु:खे अंतरलेली
पैल नदीच्या अंधुक पात्री
नाव जुनीशी नांगरलेली
स्तब्ध नभाला मुग्ध भुईला
मंत्र कुणी का घालत आहे
धूळ धुक्याच्या चाहुलवाटा
दूर कुणी का चालत आहे
ओळख देता ती घरदारे
विस्कटलेले अर्थ कळावे
बांध फुटावा आणिक काही
आज नवे संदर्भ जुळावे
एक उसासा अस्फुट अश्रू
काजळओल्या पापणकाठी
आवर आता नीघच बाई
हीच असो श्रीशिल्लक गाठी..
भारती बिर्जे डिग्गीकर
आधी थोडी गर्दी जमते, गर्दीचा मग जमाव होतो
दंगे-धोपे होता होता एके दिवशी उठाव होतो
नारेबाजी, राडेबाजी, मारामार्या, अंदाधुंदी
जिथे पहावे तिथे क्रांतिचा अखेर हा स्थायिभाव होतो
लढो महात्मे शस्त्रावाचुन, लढो शस्त्रपुत क्रांतीकारी
लढ्यात दोन्ही सामान्यांचा अटळपणे रक्तस्राव होतो
आयोगांवर आयोगांचा रतीब शासन घालत बसते
सभात्याग अन् घोषणांत मग दुर्लक्षाचा ठराव होतो
रोज बातम्या पाहत पाहत हळवेपणही लयास जाते
खून, दरोडे, बळजबरीचाही डोळ्यांना सराव होतो
कुंकूमरेषा जुनाट कळकट
रुंद कपाळी विस्कटलेली
ठिपके ठिपक्यांनी बनलेली
त्वचा वयाने सुरकुतलेली
वस्त्र जरीचे पांघरलेली
आत जराशी पोखरलेली
काटक थोडी भेदक थोडी
पोकळ काठी घेउन हाती
बजरंगाच्या ओट्यावरती
एक म्हतारी झोपायाची.....
जुनाट गोणी अंथरलेली
त्यावर नाणी मंतरलेली
जखमांवरती चिंध्या बांधून
पाय पसरुनी तेथे लांबट
रस्त्यावरती कधी मंदिरी
किलकिल डोळे करुन अलगद
बघताना अन हसतानाही
भजन जुनेसे गात मजेने
देरे बाबा एक रुपैया
असेच काही बोलायाची....
शाळेमध्ये जातायेता
मित्रमंडळी माझ्यासोबत
बजरंगाचे दर्शन घेऊन
भाळावरती शेंदूर लावून
ओट्यावरच्या म्हातारीची
कधी घोंगडी ओढायाचो
शब्दफुलांना वेचवेचले
भाव मनीचे गुंफायाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला
झुळझुळणारी माझी कविता
सुरकुत्यात का अडकुन बसते?
आठवणींच्या दलदलीत ती
प्रचंड गुदमर सोसत असते
शैशव, यौवन थडग्यामधले
शब्द लागती खणावयाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला
बडबडगीते अता संपली
विरान घरट्यावरती लिहितो
श्रावणातल्या कविता सोडुन
कलमेमधुनी मी ओघळतो
ओठावरचे हास्य कालचे
आज लागले रडावयाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला
आयुष्याची दिशा बदलली
पुढे काय? हे मला कळेना
साथ सोडली प्रत्त्येकाने
हात धराया कुणी मिळेना
गूढ प्रदेशी अशी कशी ही
बात चुकतेच ठोकताळ्याची
मुंबईतील पावसाळ्याची
स्वाद देतो चहा न उंचीही
आठवण दाटते उकाळ्याची
बंद दारात कोंडली गेली
माणसे चाळितिल जिव्हाळ्याची
बाल्कनीतून जग खुले झाले
मौज नाहीच पोटमाळ्याची
कौतुके लाख पंढरीची पण
वाट माझी जुनी वडाळ्याची
होय गर्विष्ठ वाटतो "कैलास"
नम्रता बाणतो लव्हाळ्याची
--डॉ.कैलास गायकवाड
परदेशी, परगावी, कसा परका पाऊस
अनोळखी सरी, पडती दारी, नको तू न्हाऊस
पागोळ्यांच्या लयीचा ताल अनोळखी
कुंद सावळा अंधार अनोळखी
गार वा-याचा स्पर्श अनोळखी
नाही कुणी ओळखीच जवळपास
गंध ओल्या मातीचा येथला वेगळा
भिजणा-या मुलांच्या मुखी शब्द आगळा
कुणी काही बोले, ना येई आकळा
कसे सांगु गुज माझ्या मनीचे कुणास
आठवते हिरवाईतली तांबडी वाट
किनारी फुटणारी उधाणाची लाट
माडा-पोफळीतून बरसातीचा सरसराट
त्या श्रावणाची लागे मनास आस
गाव नदीची आसरा
काळा डोह सांभाळते
पोर बुडुनीया मरे
पूजा जोरात चालते
मेल्या पोराच्या आईचे
दु:ख डोहात जिरते
काळ्या उदास डोहाचे
भय सांजेला डसते
कुणी ऐकतो रातीला
गाणी अवेळी कातर
चाळ छुमछुमणारे
नदी किनारी वावर
छाया दिसते कुणाला
म्लान उदास बैसली
वाऱ्यावरती हलती
काळ्या ढगांची सावली
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
एक होता गाव
माळ(रा)नी त्याचे ठाव
सात-आठ्शे घरे त्यात
सगळे सवे रंक राव
आदिवासींचा नव विकास
होणार होता कायापालट
बांधले इमले डोंगरात
रान करुन भुई सपाट
येत होती लाल माती
गावात कधी कधी घसरुन
होते गावकरी गाफिल
पथारी पाय पसरुन
एस टी प्रात:काळ गावी आली
प्रवाशांना शोधी बोलावुन
अख्खा गाव की हो गेला
डोंगराच्या कुशीत सामावुन
सगळाच चिखल डोंगर
माणसे जनावरर्ही चिखल
कुणी कुणा धीर द्यावा
कुणी घ्यावी कुणाची दखल
किती स्वप्न ती भंगली
किती नातीगोती पांगली
कुणी सुर्य त्यांना दाखवला
उगवण्या आधीच ग्रहणला
जिणं असं क्षण भंगुर
किड्या मुंग्यापरी झालं
कशाला केली रानतोड
खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?
नाही उठत गोड शहार तनुवर
स्पर्शता लाडीक वारा?
रोजचच रहाट गाडगं, एक भरलं,
पुन्हा जहालं रितं
तोलून मोपून बोलायच, वागायचं
पाळायची जनरीत
आज गडगडले घन आली बरसात
स्वच्छंद भिजायच जरा
खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?
हिशेब ठिशेब सगळे अचूक
दिस जातो हेच पहात
जागच्या जागी निटनेटकं स्वच्छ
दिसतय ह्या घरात
थोडा वेळ तुडवुन चिखल, अनुभवुया
हिरवा परिसर सारा
खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?
आयुष्यभर जगायच सुरवंटासारखं,
घुसमटत आत
नाचावं पावसात बनावं फुलपाखरु
टाकून कात
हेच जगणं खरं, जपुन ठेवावा हाच
खजिना खरा