वेचले काटे होते कधी ज्यांच्यासाठी
दुषण आम्हाला तेच पुढे देत होते!
स्वतःच खड्ड्यात जाणून पडत ते होते
आरोप आमच्यावरच नित्य होत होते!
खोट्यानी अवघेची विश्वरूप ते व्यापिले,
खरं बोलणं आता खोटे ठरवले जातं होते!
श्वास जाता स्वतःचीच कबर बांधली सत्याने,
असत्याचे जहाल विष सर्वत्र भिनत होते!
आकांत आयुष्यात केला सत्यासाठी सत्याने,
पाने इतिहासाची असत्याने झळकणार होते!
इतिहासही आज वाटतो पक्का खोटा,
लढाईत विजेते जेव्हा खोटे ठरत होते!
✍️ हेमंत नाईक
कालचक्रा आली गती
प्राण देहा नाकारती
जीव जीवनावरती
भार झाले !!
येता कोरोनाची लाट
फुटे पावलांना वाट
मग नदी नाले घाट
पार झाले !!
ये खबर कानो कानी
आता भेटावे दुरुनी
बंद एकमेका झणी
दार झाले !!
नाही जीवनाची क्षिती
जगण्याची रणनीती
मग उपेक्षांचे किती
वार झाले !!
सुटे धीराची संगती
झाला दीन मूढमती
आले नकार सोबती
यार झाले !!
विश्वरूप विश्वेशाचे
हात झाले आधाराचे
तिथे डोळा आसवांचे
हार झाले !!
फिक्या चांदराती फिके चंद्र-तारे!
उडाले क्षणांचे खुळे रंग सारे!!
नको रेशमी प्रेमपाशात ओढू!
पुरे गुंतणे सांगती बंद दारे!!
कधी बोलशी तू हवेसे हवेसे!
कधी तोडशी पाश निमिषात का रे!!
नको वाट पाहू तिच्या सोबतीची!
तुझे तू नव्याने नवे गीत गा रे!!
मुक्या भावनांचा किती भार आहे!
किती आवरावे मनाचे पसारे!!
कळी पाकळीला विचारीत होती!
कसे ओळखावे विखारी इशारे!!
भली माणसे एकमेका म्हणाली!
वृथा भेटले ते गुलाबी शिकारे!!
इथे आसवांचे असे पूर आले!
जुन्या आठवांनी बुडाले किनारे!!
ओंजळ
ओंजळीत माझ्या..गुलाबी फुले ती,
प्रेमाचा तोच रंग..हा योगायोग नाही..१
सुखद क्षणाच्या.. त्या अविस्मरणीय स्मृति,
जपा ओंजळीत तयांना ..हरवायच्या नाही .२
ओंजळीत लपला..रात्री चंद्र भुतलीचा
रात्रीचा तो दिवस..मावळला नाही..३
ओंजळीत जपल्या..फुलांच्या त्या माळा ,
मोगऱ्याचा तो सुगंध..विसरायचा नाही..४
काळाने ओंजळीला..थरकाप दिला जरी तो
धर हात घट्ट हातात..घाबरायचे नाही ..५
✍️ हेमंत नाईक
काहिली..
खान्देशी आता पेटला,
वैशाखाचा तप्त वणवा..
अंगाला लागती चटके,
आसमंत झाला आवा..
घरट्यात सारे पक्षी
माणसे घरात दडली ..
दुपारी तो शुकशुकाट
रस्त्यावर नाही कुणी ..
दुपारीही तो शेतामंधी ,
राबतो पिकासाठी ..
डोईवर रुमाल, कांदा,
नित्य आहे साथी..
मेघ काळे येता नभी
काळजाचा ठोका चुके..
ग्रहण लागले भाग्याला,
जोरात पाणी कोसळले..
आला पाऊस अवकाळी,
कुठे गारांचा भडीमार..
आकंठ तो कर्जबाजारी ,
शेतमालाची लागली वाट..
तुझी आठवण
घाली रुजवण
शिंपीत रेशीमवाटा..
क्षणात कहर
क्षणात लहर
नाजूक गुलाबी काटा !!
तुझी आठवण
केवड्याचं बन
ओढाळ पाऊलवाट..
क्षणात विसावा
क्षणात दुरावा
सुगंधाची वहिवाट !!
तुझी आठवण
पाऊस मृगाचा
मनाला लागली आस
क्षणात हवासा
क्षणात नकोसा
सुखाचा बेगडी भास !!
मी मानसी
हलकेच मिठीत येतो, तो गारवा तूच आहे
अंगणी रोज दरवळतो, तो मारवा तूच आहे
गगन रंगवूनी देण्या सारे पंख उडे आकाशी
तरी उरे ऐकला शुभ्र, तो पारवा तूच आहे..!
तक्रार तुझी मी वेडी, सांगू कुणा कशी रे
ज्याने हे मन लुटावे, तो ठगवा तूच आहे..!
हे अत्तर शिंपडुनी का अतृप्त सोडिले तू ?
क्षणभर झरून गेला, का तो शिरवा तूच आहे..!
- अनिरुद्ध
कुठे निघाला तूच तुझ्या वाचून असा घाईत..?
किती आर्त ते शब्द दाटले तुझे तुझ्या शाईत...
रंगले दंगले तरी ना कळले तुला हे जीवन गाणे,
मनात असतो सूर तू शोधे भवती प्राणपणाने...
उमग स्वतःला त्यातच सारे ब्रम्हज्ञान समजेल,
नकळत अंती काळोखातून ज्योत नवी उजळेल..
एक सत्य अन तू ही एकला, द्वैत हे अद्वैताचे,
स्वर्गीय वृक्षापरी विश्व हे, फुल तू प्राजक्ताचे..!
-अनिरुद्ध
दिवसभर केलेल्या
तडजोडी, व्यवहार...
सगळ्याची पुटं
चढत रहातात त्याच्यावर.
लोकांची पापं स्वत:वर घेत
त्यांना आशिर्वाद देत
तो सगळा राप
स्वत:वर चढू देतो
भक्ताला आश्वस्त करत
सगळे शाप लेवत जातो
स्वत:वर
अन मग दुसऱ्या दिवशी
सचैल स्नानाने शुचिर्भूत होऊन
पुन्हा उभा रहातो कृष्ण,
....... दर्शनासाठी!
शांत पसरली सांज सुखाची मंद दिवे लावूनी
चंद्रकलेचे रूप पाहण्या रुळली तारांगणी
रमली खुलली कळी उमलली अबोल गंधाळुनी
अवचित किरणे पर्ण चुंबने घेता कवटाळुनी
कूजनमाला स्वररत्नांच्या बनी घुमू लागल्या
सांन्द्र धुक्याने बिलगून घेता हरितलता झाकल्या
कणकण मुरले अमृत झरले दवबिंदूंच्या हाती
ओल सुखाने बहरून आल्या नवतेजाच्या ज्योती
चित्र गोजिरे जणू स्वप्नवत सरले उमलून रजनी
सांजसखी तू अशी सोयरी रोज फुलावी नयनी
- अनिरुद्ध