प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय!
पुढच्यावेळी एकमेकांना दुखावताना...
नंतर हसून ’असूदे’ म्हणायचं असं ठरलंय!
कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!
तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!
कधी शेवटी तुला-मला हे कळेल तेंव्हा...
रडं उरातील वाहू द्यायचं असं ठरलंय!
फुकटे येथे राव किती?
चोर किती अन साव किती?
मी बुडताना मज हसले
काठावरती गाव किती?
लिहिताना पत्र सखीला
चुरगळले मी ताव किती?
नयनांचे पाणी सांगे
हृदयावरती घाव किती?
वेडे ते पुसती मजला
तव प्रेमाचा भाव किती?
प्रेताच्या टाळूवरचे
लोणी खाती राव किती?
ओझे भरता पापांचे
बुडते अलगद नाव किती?
दो हातांवर लक्ष्य तरी
बाकी आज पडाव किती?
दुनिया ही क्षणक्षण बदले
जीवन हे भरधाव किती?
कधी होऊया पक्षी आपण, अन उडूया आकाशी
वार्यासंगे पैज लाऊया, मारू गगनभरारी
कधी होऊया उनाड लाटा क्षितिज सागरावरच्या
बिलगू चंद्राच्या प्रतिबिंबा, साठवून अंतरी
कधी होऊया तरंग मनीचे, विचार सैरावैरा
होऊ आपण कविता, कधी अन उतरू कागदावरी
कधी होऊ आपण गाणे, अन होती स्वर हे रस्ते
शब्द कोवळे ऊन अंगणी पोचवती मज घरी..
सुख अतिच जाहले
सुख सोसवत नाही
भरुन वाहुन चालले
हाती मावतही नाही
केली माया गोळा
मोठे इमले बांधले
गेली पिले उडुनिया
घर एकटे राहीले
धन जाळाया नवे
नको नको ते उपाय
खोवूनिया मोरपिस
काक लागले नाचाया
लोभ सत्ता संपत्तीचा
सर्व हवे फक्त मला
सारा कल्लोळ उत्सवाचा
मुका, आवाज आतला
चहुकडे मांडला
सुखासिनतेचा बाजार
कष्ट नाही शरीराला
भेटे नवा नवाच आजार
नाही थांबायाला वेळ
उरीपोटि धावताना
हे सारं कशासाठी
स्वत:लाच विचाराया
मला काय आवडते
मनाला ठाऊक नाही
हवे हवेच्या ध्यासात
दूसरे काही सुचत नाही
ह्या वेगाच्या वेडात
सुखामागे लागायचे
लक्ष्मीच्या उपासनेत
सरस्वतीला विसरायचे
अवघड अवघड बोलत असते
तरी मला मी सांगत असते
बोल जरासे माणसातले
राहूदे जरा काळजातले
स्पर्शांमधली अतर्क्य कळकळ
डोळ्यांतील नेहेमीची खळबळ
श्वासांमधले उष्ण उसासे
हृद्यी घुमती पोकळ वासे
कधी पहाते नुसते भेदक
कधी हासते विषण्ण सूचक
कसे कळावे सांग कुणाला
सर्व इंद्रिये लाव पणाला...
गाठ जरासे शब्दही कधी
ऐक मनाचे सांगही कधी
बोल कधीतरी बोल ना जरा
ओठही कधी खोल ना जरा
सोपे सोपे जोड शब्द अन्
ओव अर्थ त्यातून भाबडा
खोल, गूढ, अन्वयार्थ सारे
टाक! ठेव तो शब्द रांगडा!
हळवे कातर अशक्य काही
सदैव धुमसत काचत असते
आत कुणीतरी सदा सर्वदा
स्वप्न फाटके टाचत असते
’त्यास’ एकटे सोड कधीतरी
प्रेमाने मन तुडूंब भरले सरोवरी त्या विहर सख्या
गूज मनीचे सांगुन कानी उठव तयावर लहर सख्या
तुला पाहता ओळख पटली लगेच साताजन्माची
असे वाटते याच क्षणी की गोठुन जावा प्रहर सख्या
पेलवेल ना धनू शिवाचे ? तनू तुझी सुकुमार असे......
या शंकेने मनामध्ये बघ, केला आहे कहर सख्या
तुझे दुःख दे, तुझी वेदना, तुझी यातना मलाच दे..
काहीही दे, नकोस देऊ पण विरहाचे जहर सख्या
वसंत होउन भेटलास तू या धरतीच्या कन्येला
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो आहे बहर सख्या
भाग्यश्री कुलकर्णी
.
महाराष्ट्रच्या एका भागातली शेतकऱ्यांची खालावलेल्या आर्थिक स्थितीच्या बातम्या पेपरात वाचून एक चीनचा शेतकरी त्या भागात नक्की प्रश्न काय आहे हे पाहण्यासाठी आला, त्यासाठी त्याने एका गावात जावुन पाहायचं ठरविले. रस्त्याने जाता-जाता एका शेतात निंबाच्या झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्याला पाहून चीनचा शेतकरी म्हणाला,
“तू असा काय बसून आहेस, काही काम नाही काय?”
“कामं तर भरपूर पडलेली आहेत, पण.....”
“शेतात चांगलं काम कर, शेतातून भरपूर उत्पादन काढ!”
“त्यानं काय होईल?”
“ते बाजारात नेऊन विकलं की बरेच पैसे मिळतील!”
“... जास्त पैसे मिळाल्याने काय होईल?”
“तुला एवढं सुद्धा कळत नाही.... तुला आरामात जगता येईल”
चालला आहे कशाचा खल अता?
पाहिजे बदलावयाला दल अता!
व्हायचे होऊन गेले! जाऊ दे!
ना कशाचाही मनाला सल अता
वादळाने ध्वस्त केली झोपडी
पण तरीही हा दिवा प्रज्वल अता
कोण तू? कुठली? न तुजला जाणतो
एक नाते जाणतो; निर्मल अता
पाश संसारातले उद्गारती
सोडुनी दे वासनांवर जल अता
मायबापाला म्हणावे पंढरी
नांदतो देहांत त्या विठ्ठल अता
भेटतो येथे ठकाला ठक महा
तू तसा तर मी असा; बोंबल अता
(सदर गझल ही श्री. निशिकांत देशपांडे यांच्या गझलेवर तरही आहे.)
एकच माझी इच्छा होती,
नावापुढं तुझ्या,
माझंच नाव असावं!
नियतीला पण हे मंजूरच नव्हतं!
माझाही असा विश्वास आहे.
"भगवान के घर में देर है,
अंधेर नहीं!"
काल जेव्हा तुझ्या मुलीनं
मला "मामा" म्हणून हाक मारली,
तेव्हाच माझ्या मनानं,
पुन्हा एकदा ठरवलं,
तुझ्या नाहीतर जाऊ दे,
तुझ्या मुलीच्या नावापुढं तरी,
आता माझं आडनावं,
लावता येईल!
सून म्हणून!
“कही दबी दबी सी…कही छुपी छुपी सी….तेरी मेरी लव स्टोरी….कभी बारिशो में भीगी तो महक उठी….तेरी मेरी लव स्टोरी !!!”
सकाळी ऑफिसला जाताना अचानक तिचे लक्ष टीव्ही कडे गेले. स्टार प्लस वर एक नवीन सिरीयल सुरु होणार होती त्याच हे शीर्षक गीत होते. हे गाणे आणि त्या सिरीयलची जाहिरात तिला भयंकर आवडायची. तिने रिंगटोन पण याच गाण्याची ठेवली होती. एरव्ही “सिरीयल” या शब्दाने सुद्धा ती वैतागायची. पण “ऑफिसच्या कामाच्या गडबडीतून एकमेकांना दिलेली १० मिनिट” या concept मुळे ती या सिरीयल कडे आकर्षित झाली