स्थित्यंतर
पाउल टाकलंय उंबरठ्याबाहेर,
मन अजून घरातच रेंगाळतंय..
नव्याच्या लखलखटात बावरून,
माजघरातला अंधार शोधतंय..
'माझं' घर आता 'आईचं', 'माझी' माणसं 'माहेर'
संदर्भ बदलतायत भोवतीचे, मी ही बदलतेय बहुतेक
पण खरंच, बदलेन का मी?
स्वतःचे स्वतःशी चाललेले अखंड संवाद..मध्यच अडखळतेय, सावरतेय.
स्वतःचं सामान आवरताना, एकट्यानेच रडतीय.
आनंद की हुरहुर अधिक, सांगता येणं कठीण आहे,
आठवांचे सारे बंध, असं सोडून जाणंही कठीण आहे!
नवं जोडायला जमेल का?
जुनं सोडायला जमेल का?
माहिती नाही..कळेलच लवकर!
बावरलेलं मन, येईल मग माजघर सोडून!