मृगजळ - (अंतिम)

Submitted by प्राजु on 1 July, 2009 - 10:54

मृगजळ - १
मृगजळ - २

माय.. ए माय! उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब." ताट वाढता वाढता ती बोलत होती..
मायचं ताट वाढून घेऊन ती माय जवळ आली.."माय... ए माय... माय गं!!! माऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!" हातातलं ताट थाडकन् खाली पडलं. मायनं जगणं केव्हाच संपवलं होतं आणि ती खूप खूप लांब निघून गेली होती.........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माय गेली.. आणि तिच्याबरोबर राणीनं पाहिलेलं स्वप्नही गेलं. राणीच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. राणीवर आभाळ कोसळलं होतं. तिची माय.. तिला पदोपदी जपणारी, शाळेला सोडायला येणारी, तिच्यासाठी आबासारख्या नराधमाची रखेली बनून राहणारी, आणि तरिही आबापासून राणीला जपणारी.. लहानपणी राणीचं बोट धरून तिला शाळेत सोडणारी.. गुत्त्यावर भांडी-फरशी करत करत इतर घरची कामं करून राणीसाठी नवनवीन वस्तू आणणारी... आणि शेवटच्या क्षणी राणीला' मला माफ कर 'म्हणणारी..! मायची हजारो रूपं राणीसमोर यायला लागली.
'माय... माझी माय... माझी माय गेली...!!!' राणीचं मन हे मानायला तयारच नव्हतं. अशीच विचार करत ती झोपून राहिली होती... डोळ्यांना अखंड धार लागली होती. इतक्यात दार वाजलं आणि तिच्या कानावर काहीतरी कुजबुज ऐकायला आली. आबा!!! .. हो आबाचाच आवाज!!
"आजच घेऊन जा ... म्या उद्या येतू खोलीवर. पन ४००० रूपयांच्या खाली न्हाय बघ...." आबा बोलत होता.
" आजचा दिस जरा कळ काढ आबा. उद्या खोलीवर आलास की तिचं रगात तूच काढ की... हाय काय न्हाय काय! पण ४००० रूप्पय म्हणजे लय जास्त हाईत बघ.. तीन हजारात जमव की रं."
हा दुसरा आवाज तानाचा होता. हो.. हा ताना चंदाचा दलाल होता. राणीच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. तिला आठवलं मायनं सांगितलेलं. तिला आठवली आबाची हिडीस नजर... आणि रगात काढणार म्हणजे काय हे न समजण्याइतकी ती वेडी नव्हती. पुढचं तिला ऐकवेना.. ती सरळ उठून खिडकीत येऊन बसली.
आजच... आजचीच रात्र... बास!! उद्या नाही...तिच्या मनाने उचल खाल्ली. पुन्हा एकदा सगळी तयारी केली. प्लॅन तर तयारच होता... मात्र आता त्यात ती एकटीच होती. तिचा आधार असलेली तिची माय तोच्यासोबत नव्हती. आबा आणि ताना चं बोलणं बंद झाल्यावर..तिनं एकदा कानोसा घेतला. मायच्या पलंगाखालची लाकडी मोडकी पेटी काढली. त्यात मायच्या वस्तू होत्या. मायनं थोडेसे साठवलेले पैसे होते. राणीनं पुन्हा सामान सगळं एकत्र करून ठेवलं. तिन्ही सांज होत आली होती. खिडकीतून दिसणार्‍या कोपर्‍यावरच्या मरीआईच्या देवळाकडे पाहून हात जोडले. एकवार गुत्त्यात जाऊन आबा कुठे आहे पाहून आली. आबा अजूनही तानाशीच बोलत होता. दोघं मिळून बाटली घेऊन बसले होते. हीच योग्य वेळ!!!! ती तश्शीच परत आली आपलं बोचकं उचललं आणि गुत्त्याच्या मागे असलेला बाभूळ बनातून तीने चालायला सुरूवात केली. ती देवाकडं प्रार्थना करत होती की, आबाच्या ओळखीचं कोणी भेटू नये...! इतक्यात..म्हादा दिसलाच! आबाच्या पंक्तीला कायम असणारा म्हादा... ! तिला भिती वाटली. आता हा आपल्याला काहीतरी विचारणार?? आपण काय सांगायचं?? हा आबाला जाऊन सांगणार... आबा मग त्याची माणसं घेऊन येणार... काय होणार??
हा विचार करत असतानाच म्हादा जवळ आला.. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं?? एकवार तिच्याकडे पाहिलं त्यानं. तिच्या हातातलं तिचं बोचकं.... आणि तिच्या भेदरलेला चेहरा पाहून्"जपून जा बाई..!!" इतकंच तो म्हणाला. राणीला आश्चर्य वाटलं. त्याच्याकडे पाहून हलकंस स्मित करत ती पळत सुटली. निदान म्हादा आबाला जाऊन सांगेल अशी भिती तरी नव्हती. खूप पळल्यावर तिला धाप लागली. तिनं सहज मागे वळून पाहिलं... वस्ती लांब राहिली होती. समोरचा डोंगर पार केला की, हाय वे लागत होता. राणी पुन्हा नव्या जोमाने पळायला लागली. भराभर डोंगर चढू लागली. जणू मायनं जाताना तिला स्वत:चं सगळं बळ दिलं होतं. काट्याकुट्यातून.. झाडांचा आधार घेत राणी हायवे वर आली. ती हाय्वेवर येईपर्यंत अंधार अगदी गडद्द झाला होता. तिला भूकही लागली होती. पण हा हायवे म्हणजे आबाच्या दारूचे फुगे ने-आण करणार्‍या लोकांचा रोजचा रस्त होता. आणि फुग्यांची ने-आण रात्रिच्या गुन्हेगारी अंधारातच होते हे ही ती जाणून होती. काहीही करून हा भाग लवकरात लवकर सोडला पाहिजे. घामाने डबडबलेली राणी... हायवे वर उभी होती. समोरून येणार्‍या एका ट्र्कला तीने हात केला. ट्र्क थांबला. काहीही विचार न करता ती चढली. आणि मग तिच्या लक्षात आलं ज्या ट्र्क मध्ये चढलो आहोत तो ट्र्क वस्तीवरच्याच सिकंदरचा होता. म्हणजे हा ट्रक आता वस्तीवरच निघाला होता. सिकंदरचा भाऊ सुंदर ट्र्क वर होता. तिला काही समजायच्या आत ट्र्क चालू झाला होता आणि रस्त्याला लागला होता. एक क्षण!!! फक्त एक क्षण विचार करून राणीनं धावत्या ट्रक मधून खाली उडी टाकली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडी-झुडपात ती एकदम गुडूप झाली. सुंदर ट्रकमधून उतरला झाडीच्या थोडं आजूबाजूला त्याने पाहिलं पण अंधारात काहीही न दिसल्याने त्याने नाद सोडून दिला आणि तो रस्त्याला लागला. तो गेला... मात्र आता राणी पळाली ही बातमी खूपच लवकर आबाला समजणार होती. राणीच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही. ट्र्क गेल्यावर ती झाडीतून बाहेर आली.. आणि मागून येणारी एस्टी बस तिने हात दाखवून थांबवली. आणि ती त्यात चढली. कुठे जाणार ही बस.. काहीही माहिती नव्हतं. कंडक्टरनं विचारलं, "कुठं जायचं..?" त्यावर फक्त "शेवटचा ष्टॉप..!" इतकंच उत्तर दिलं तिनं. विचित्र नजरेने बघत कंडेक्टरनं तिकिट काढलं आणि , " ३५ रूपये." असं म्हणत तिच्या हातात तिकिट दिलं. मायनं साठवलेले पैसे किती होते तेही तिला माहिती नव्हतं. त्यातून तिने २० ची एक नोट, १० ची एक नोट, २ ची एक नोट आणि १ रूपयाची ३ नाणी काढून दिली.
बसने वेग घेतला... श्रमाने आणि भूकेमुळे थकलेल्या राणीला किंचित ग्लानी आली.
बसचा शेवटचा स्टॉप आला तशी ती बसमधून उतरली. कोणतं गाव आहे .. ?? काहीही माहिती नव्हतं. रात्रीच्या अंधारात ती त्या गावाच्या गल्लीतून चालत निघाली. एका गल्लीच्या कोपर्‍यावर असताना तिला लांबून आवाज आला, "हुर्रर्र.. हॉ.... हैक... हुर्रर्र...!" तिने पाहिलं एक माणूस शेळ्या हाकत निघाला होता. त्याच्याशी बोलावं का? मदत मागावी का? असा विचार करत असतानाच तो तिच्या जवळ आला.. गडद्द अंधार असला तरी समोर एक मुलगी उभी आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही.
"कोन?? कोन हाय तिथं??" तो म्हणाला.
"म्या... म्या रानी!!" चाचपडत ती म्हणाली.
"हिथं कशापाई हुबी बाय तू ऑ??" तो म्हणाला.
"मी लांबच्या गावास्नं आलेय.. आजची रात्र काडायची हाय.. जागा मिळन का कुटं??' थोडं धीटपणे तिनं विचारलं.
"माज्या घरी चालनार असंल तर चल बाय.. .." असं म्हणत तो पुढे चालू लागला. राणीला प्रश्न पडला.."काय करावं?? याच्या वर विश्वास ठेवावा का? जावं का नको?? " पण आताच्या परिस्थितीत तिला त्याच्या बरोबर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. ती गुमान त्याच्या पाठोपाठ गेली. त्याच घर म्हणजे एक खोपटं होतं. बाहेर शेळ्या बांधून तो आत गेला. तो एकटाच रहात होता. याने तिला खायला काही हवे का विचारले. पण तिने नको म्हणून सांगितलं. एका कोपर्‍यात आपलं बोचकं घेऊन ती पडून राहिली. आजची रात्र तोंड लपवायला जागा मिळाली हेच तिच्यासाठी खूप होतं. उद्या सकाळी काय करायचं ते ठरवता येणार होतं. त्या झोपडी वजा घरात असं काय होतं देव जाणे , पण राणीला पडल्या पडल्या गाढ झोप लागली.
सकाळी शेळ्यांच्या ओरडण्याने तिला जाग आली. उजाडलं होतं. ती उठून बसली. कालचा तो माणूस चुलीशेजारी बसून काहीतरी करत होता. तिच्या चाहूलीने त्याने मागे वळून पाहिलं... . आणि... तो तिच्याकडे पहातच राहिला..... ! तिचे विस्कटलेले केस... कालच्या श्रमाने आलेला थकवा.. पण आता थोडीफार आलेली निश्चिंती! राणी तशाही अवस्थेत खूप देखणी दिसत होती.

"मी... मी सारंगा!! ................ च... च्या..! घेनार ना?" तो म्हणाला. मानेनेच तीने 'हो' म्हणून सांगितले. उठून ती आन्हिकं उरकून आली. त्याने तिला चहा दिला आणि स्वतःही घेतला. तो चहा घेत असताना ती त्याच्याकडे पहात होती. साधारण ३०-३२ वयाचा असणारा तो.. पण चेहर्‍यावरून त्याचं मन स्वच्छ असेल असं वाट होतं. नाही म्हंटलं तरी तिलाही तो आवडला होता. चहा झाल्यावर थोडंसं वातावरण सैलावलं. किंचित हसून तिने त्याचे आभार मानले.

"बाय.. कुटून आलिस?? अन् इतक्या रातच्याला कशी काय आलिस म्हनायची? भ्या नाय का वाटली?" त्याने विचारलं.
"ते सांगन कवातरी. मला सांग.. हितं कुटं काम मिळन का मला? काय बी असुदे.. म्या करन." ती म्हणाली.
"मिळन की! हितं यक कासार हाय.. त्याच्याकडं जाशील का? येनार्‍या बायांना बांगड्या दावायच्या अन् भरायच्या." त्यानं सांगितलं. "पन तुझं नाव काय म्हनायचं??"
"मी रानी...मी करन ते काम.." राणी उत्साहानं म्हणाली. दोघांमध्ये काहीही विशेष संवाद न होता त्यांच्यामध्ये एक नाजूक धागा जुळायला लागला आहे.. असं राणीला वाटलं.
राणी कामाला लागली. हे काम तिला आवडलं. तिच्या ओळखी झाल्या. राखी नावाची नवी मैत्रीण मिळाली तिला. दोघींचं छान जमलं होतं. खूप लवकर त्या अगदी जिवश्च कंठश्च मैत्रीणी झाल्या. राखीच्या मदतीने तिला एका भाजीवालिच्या घरी एक खोलीही मिळाली रहायला. सारंगालाही ती भेटत होती. कासाराच्या दुकानाला मंगळावारी सुट्टी असायची तेव्हा राणी सारंगा बरोबर त्याच्या शेळ्या हाकायला जात असे. रानातून वनातून त्याच्या बरोबर फिरताना तिला खूप मजा वाटायची. सारंगा खूप काळजी घ्यायचा तिची. तिला नदीवर त्याने नेलं. नदीवरच्या मंदीरात ती जाऊन आली. त्याच्या शेळ्याही राणीला आता ओळखू लागल्या. पावसाळ्यांत ती ,राखी आणि सारंगा तिघे मिळून डोंगर मथ्यावर चढून जायचे. तिथून दिसणारा गावचा परिसर राणीला फार आवडायचा. नदीच्या मऊ मऊ मातीत चिखलाने माखलेले पाय घेऊन चालताना तिला होणारा आनंद अवर्णनिय होता. तिला हळूहळू सारंगाच्या आवडीनिवडीही समजल्या. आपल्या आणि त्याच्या आवडीनिवडी कित्ती जुळतात नै!!! असंही तिला हजारवेळा वाटलं.

कारवानांच्या वस्तीवर एक स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये केवळ संभोगापुरतं असलेलं नातं... आणि हे.. तिचं आणि सारंगाचं नातं ज्याला सध्यातरी काहीच नाव नव्हतं!!! किती फरक होता दोन्हीमध्ये!!! स्त्री-पुरूषामध्ये अशाही प्रकारचं नातं असू शकतं याचा तिने विचारही केला नव्हता. दिवसेंदिवस ती सारंगाच्या जास्ती जवळ जाऊ लागली. सारंगालाही तिच्याबद्दल आपुलकी वाटत होतीच. सारंगालाही तिच्या आवडीनिवडी समजल्या होत्या. कधी कधी तो शेताच्या कामासाठी तालुक्याच्या गावी जायचा तेव्हा तिच्यासाठी तिथून मिठाई घेऊन यायचा. ती मिठाई बघून राणीला मायची खूप आठवण यायची. पण तिने अजून सारंगाला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं नव्हतं. तिला भिती वाटायची आपली माय रखेली होती आणि आपल्या बापाचं नावंही आपल्याला माहिती नाही हे समजलं तर .. सारंगा कदाचित आपल्याला दूर लोटेल.
गावात जत्रा आली होती, सारंगा आणि राणी दोघंच जत्रेला गेले होते. उंच पाळण्यात सारंगा शेजारी बसताना तिला अजिबात भिती वाटली नाही. जत्रेत भरपूर हिंडून दोघं अगदी दमून घरी परतली. राणीला सारंगाचा इतका लळा लागला की तिला त्याच्या अस्तित्वापुढे भूतकाळाच्या खुणा थिट्या वाटू लागल्या. भूतकाळावर तिने मात केली होती. कारवानांच्या वस्तीत राहणार्‍या रखेलीची ती राणी हा शिक्का पूर्णपणे पुसून निघाला होता. ती होती आता सारंगाची आणि राखीची मैत्रीण.

"काय गं रानी?? सारंगाशी लगिन करशिल का?"... तिच्याकडे रोखून खट्याळ नजरेनं राखीनं विचारलं. राणी किंचितशी लाजली. तिला पुरेपूर माहिती होतं की, जर सारंगानं लग्नासंबंधी विचारलं तर आपण नाही म्हणू शकणारच नाही...
''राखी, अख्ख्या जिंदगानीत हा पहिलाच माणूस मला असा भेटला बघ, ज्याच्यावर इस्वास टाकावा असं वाटलं. याची नजर मला कधीही वाईट नाही बघ वाटली. " राणी शुन्यात नजर लावत म्हणाली. त्यानंतर त्या दोघी खूप वेळ सारंगाबद्दलच बोलत होत्या.
बरेच दिवस असेच गेले. राणी सारंगाने आपल्याला मागणी घालावी यासाठी आतुरतेने वाट पहात होती. मनांतल्या मनांत तिला मायचे बोल आठवत होते. "तुला बी कुणीतरी भेटल... तुला समजून घेनारा, तुज्या बा सारखा.'......... बा!!! पुन्हा बा आठवला की, राणीच्या मनातले विचार मनांतच विरून जात होते. सारंगाला काय सांगायचं बा बद्दल आणि माय बद्दल सुद्धा? एकेदिवशी ती सारंगाबरोबर त्याच्या शेळ्या हाकायला गेली होती रानांत..
तिथे नदीच्या काठावर नेहमीप्रमाणे बसून तळ्यात दगड टाकणं चालू होतं तिचं. सारंगा आला...
"हां बघ.... ह्ये बघ.. ह्ये कशे दोन पेरू गावले आता.. ह्यो मोठा तुला अन् ह्यो ल्हान मला..कसं??" सारंगा तिच्याकडे बघून हसत म्हणाला.
" लई दिसापासनं यक इचार येतोया मनांत... " राणी त्याच्या हातातला पेरू घेत त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली. त्याच्या डोळ्यांत बघत असतानाही तिच्या मनांत आलं, किती साधा आहे हा!! किती प्रेम आहे याच्या डोळ्यांत आपल्याबद्दल!!!
"कसला गं इचार? सांग की..." सारंगाच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.
" सारंगा, मी कोन कुटली.. काय ठाव हाय का तुला?" राणीनं विचारलेल्या प्रश्नानं सारंगा गोंधळला.
"म्हन्जे?".. सारंगाने विचारलं.
"म्हन्जे.. माझ्याबद्दल काय माहिती हाय का तुला?" राणीनं पुन्हा विचारलं.
"न्हाय बा. पन यक नक्की, तू लई चांगली हायस. ज्या घरी जाशील त्या घराला लई सुखी ठेवशील बघ.." सारंगा म्हणाला.
" सारंगा... तुज्याशी लई दिसापास्नं बोलायचं व्हतं.. बोलू का? पन, जे सांगन ना... तू रागावायचं न्हाय हां. ... " असं म्हणून मनाचा हिय्या करून राणीनं आपला भूतकाळ सारंगाला सांगायला सुरूवात केली. तिच्या दृष्टीने त्याला सगळं माहिती असणं आवश्यक होतं. ती जे काही सांगत होती.. ते अगदी मन लावून सारंगा ऐकत होता. मध्ये मध्ये त्याच्या चेहर्‍यावरचे भावही बदलत होते. मध्येच दु:खी होत होता.. मध्येच डोळ्यांत पाणी येत होतं त्याच्या. राणीचं सांगून संपलं तसं त्याने अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहिलं .. आणि म्हणाला, " जाऊदे.. जे झालं ते झालं.. पण आता हितून पुढं तुजं तुलाच खंबीर र्‍हायला हवं बाई..जमान लई वाईट हाय.तुला कसलीबी मदत लागली.. ह्यो सारंगा यील धावून. बिनदिक्कत हाक मार..." तिला धीर देत तो म्हणाला.
"सारंगा, मगाशी म्हनालास.. मी ज्या घरी जाईन त्या घराला सुखी ठेवीन म्हणून!!!... सारंगा... मला तुझ्या घराला सुखी करायचं हाय्!! माज्या संगट लगीन करशील..?" राणी डोळ्यांत पाणी आणून म्हणाली. सारंगा आता काय म्हणेल.. .. याचा विचार करत ती एकटक त्याच्या चेहर्‍याकडं बघत होती.
सारंगा मंद हसला... म्हणाला, "तू अजून १८ वर्स पूर्न बी न्ह्यायस. आनी मी तर ३१ वर्साचा हाय. तू ल्हान हाईस.. थोडी मोठ्ठी हो... मग बघूया.." सारंगा समजावणीच्या सूरांत म्हणाला...आणि तिथून उठला. शेळ्यांना हाकत चालू लागला. राणीला त्याच्या या वागण्याचं थोडं आश्चर्य वाटलं.. पण काही न बोलता तीही मुकाट त्याच्यामागे चालू लागली.

दुसरे दिवशी सकाळी.. राणी उठली. आज सारंगाकडून काय ते उत्तर घ्यायचंच.. हो तर हो अन् न्हाय तर न्हाय!!! असा निश्चय करून घरातून बाहेर पडली. सारंगाच्या घरी आली. झोपडीच्या दाराला टाळं ठोकलं होतं. 'आत्ता सकाळच्या पारी कुटं गेला ह्यो??' असा विचार करत ती तो ज्या शेतात काम करत असे त्या शेताकडे निघाली. शेतावरही तो नव्हता. शेताच्या मालकाकडे जाऊन तिने चौकशी केली तो तिथेही नव्हता. शेळ्या घेऊन रानांत गेला असेल लवकर म्हणून ती रानांत जाऊन आली. सगळ्या नेहमीच्या जागा तिने पाहिल्या... पण सारंगा कुठेच नव्हता. 'कुठे गेला असेल?? कालच्या आपल्या बोलण्याचा राग तर आला नसेल??..... पण नाही.. तसं असतं तर आपल्याला नक्की बोलला असता...' असा विचार करत ती संपूर्ण गावांत वणवण भटकत होती. कुठे शोधू ?? काय करू ? असं झालं होतं तिला. त्याला शोधण्यासाठी वणवण भटकत असतानाच तिला राखी भेटली. राणीचा रडवेला चेहरा पाहून ती काय ते समजली.... काहीही न बोलता तिने एक चिठ्ठी राणीच्या हातात सरकवली आणि अतिशय जड आंत: करणाने ती तिथून निघून गेली. राणीने चिठ्ठी उघडली,
" मला माफी कर रानी... तू काल मला तुझ्या आयुष्याबद्दल सांगून रिकामी झालीस. पन म्या कोनाला सांगू. तुला मी सांगूच शकलो नसतो ही गोष्ट... आनि सांगितल्यानंतर मला तुला तोंड सुद्धा दाखवावं वाटनार न्हाई याची खात्री होती.. म्हनून ही चिट्टी..
रानी........ म्या... म्या तुझा बा हाय!!!!!!!!!!!!!!! शक्य झालं तर मला माफी कर...."

सारंगा.... माजा बा!!!!!!!!!!!!!! माजा बा!!!!!!!!!!!!!!!! म्हनजे मायचा "त्यो".. हाच सारंगा.............
"माऽऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!! " एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली आणि त्याक्षणी राणी रस्त्यावर कोसळली होती.
वाळवंटात पाण्याचा झरा फुटता फुटता आटून गेला होता...

(संपूर्ण)...

(हा भाग थोडा मोठा झाला आहे. कारण मला कथा याच भागांत संपवायची होती. चौथा भाग लिहिण्याचे पेशन्स माझ्यात नाहीयेत. वाचकांनी समजून घ्यावे ही विनंती. Happy )

गुलमोहर: 

ओह , आधीचे भाग खरे म्हणजे मी वाचले होते , पण का कोण जाणे राणीच्या वडिलांचे नांव सारंगा आहे , हे डोक्यातून साफ निघून गेले होते . म्हणून धक्का बसला . कथा म्हणून आवडली .
सर्वात आवडले म्हणजे ( माझ्यामते ) भाषेला असलेला कोल्हापुरी टच . म्हणून कुठेतरी सूर्यकांत - जयश्री गडकर ( माझी आवडती जोडी ) यांच्या काळातील सिनेमा बघत असल्यासारखे वाटले . मस्त .

फार छान. थोडक्यात आटोपली. चांगला प्रयत्न, पण या भागात संपवायची आहे याचे प्रयोजन कळले नाही.

खुप छान वातावरण निर्मिति आणि भाषा. क्खुप गुंतुन गेले होते मी कथेत, राणिचा सुटकेचा प्रयत्न मृगजळ ठरु नये अशि मनोमन प्रार्थना करतच शेवट वाचला, पण शेवट पटला मात्र नाहि माझामते एअवढ सगळ घडुन गेल्यावर सारंगा नक्किच आपल्या मुलिचि काळजि घेइल पण अर्थातच हा आपआपला दृष्टिकोन आहे. एक गोष्ट आणखि खटकलि ती म्हणजे राणिच आणि तिच्या आइच विलक्षण सुंदर असण! ज्या वातावराणात त्या होत्या तिथे स्त्री असण पुरेस आहे खर म्हणजे त्यातहि तरुण वय असेल तर त्यांच्या नशिबातिल हे भोग अटळ. राणि जर दिसायला चारचौघिंसारखि असति तर कथा अधिक वास्तववादि झालि असति अस मला वाटल. पण कथा खुप खरि वाटलि आणि म्हणुनच खुप आवडलि.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

कथा फार छान झालीय. शेवटच्या भागात उत्सुकता ताणली गेली अगदी. क्लायमॅक्स छान जमलाय पण शेवटावरुन सारंगा ते गाव सोडुन नीघुन जातो अस सुचीत करायचय तर ते फार खटकतय. स्वतःच्या मुलीला ईतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर काहीही चुकीच वागला नसताना सत्य कळल्यावर तीला सोडुन जाण जरा फील्मी वाटतय. शेवटामुळे ३ भागांत जी उंची गाठली गेली तीला जरा गालबोट लागल अस वाटल. पण कदाचीत त्यामुळे कथेचा शेवट ईंट्रेस्टींग होणार असेल तर ठीक आहे हा शेवट (थोड नापसंतीनेच) Happy

SUPRB............................
MINDBLOWING. ...............................
EXTREME KAY BOLU MALA KALAT NAHI.
KHARCH KITI ULTIMATE LIKHAN AAHE.
AGADI MI MANTRMUGDH JHALE VACHTANA.
PAN KATHEVAR MALA THODA DOUT AALA TE TYACH VAY EKUN PAN BAPACHYA PREMAT PADN AANI MAG PUNHA TOCH TRAS SAHAN KARN.
KAS JIVAN AST NAHI.

AE ZINDAGI GALE LAGA LE.
AE ZINDAGI GALE LAGA LE.
HUMNE BHI TERE HAR EK GUM KO GALE SE LAGAYA HAI NA..................