दिल मिले ना मिले....

Submitted by झुलेलाल on 13 June, 2009 - 11:17

दिल मिले ना मिले....

`माणूस पहिल्यांदा कोणता विचार करतो?'... त्यानं मला विचारलं, आणि मी उत्तर न देता त्याच्याकडे बघत राहिलो.
त्याच्या प्रश्‍नाचा संदर्भ माझ्या लक्षात येत नव्हता. मी निवडणुकीविषयी बोलत होतो आणि त्यानं अचानक हा प्रश्‍न माझ्यासमोर फेकला होता.
`अर्थातच, समाजाचा!'... माझा कोरा चेहरा पाहून त्यानंच काही क्षणानंतर उत्तर दिलं. तरीही माझा चेहरा कोराच होता.
इतके दिवस, निवडणुकीचे रागरंग न्याहाळत फिरताना भेटलेली माणसं आपापल्या समस्यांनी त्रासली आहेत, असं मला वाटत होतं.
प्रत्येकाच्या समस्या मात्र समान होत्या. त्यामुळेच, त्या सामाजिक समस्या बनल्याचा माझा निष्कर्ष होता.
पण `माणूस पहिल्यांदा समाजाचा विचार करतो', असं तो म्हणाला तेव्हा मी विचार करायला लागलो.
नंतर त्याचं बोलणं जसजसं स्पष्ट होत गेलं, तसतसा माझा गोंधळही संपत गेला.
माणूस पहिल्यांदा समाजाचा विचार करतो, म्हणजे तो ज्या जातीचा आहे, त्याचा पहिल्यांदा विचार करतो... असंच त्याला म्हणायचं होतं.
`माणूस आपल्या समाजाच्याच उमेदवाराला मत देणार... मग तो कुठल्याही पक्षाचा असो'... त्यानं आणखी रोखठोक स्पष्ट केलं आणि मी अक्षरशः अचंबित झालो.
इथल्या मतदारांच्या मानसिकतेनं, राजकारण, निवडणुकांचे आडाखे यांची साधारणपणे आखली जाणारी गणितंच पुसून टाकली होती.
निकष फक्त एकच!... जात.
`माणूस फक्त जातीचा विचार पहिल्यांदा करतो... पक्ष नंतर' त्याचं हे मत मी ऐकलं आणि रावेर मतदारसंघातलं त्यावरच आधारलेलं विश्‍लेषणही ऐकण्यासाठी मी थोडासा पुढे झुकलो...
या मतदारसंघात लेवा पाटील समाजाच्या आणि मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. म्हणजे, ज्या समाजाचे मतदार इथे सर्वाधिक मतदान करतील, तो उमेदवार निवडून येणार... तो कोणत्या पक्षाचा, हे महत्त्वाचे नाही... मी तर्क लढविला.
एरंडोल मतदारसंघ नकाशावरून पुसला गेल्यानंतर अस्तित्वात आलेला रावेर मतदारसंघ हा सर्वांत मोठा मतदारसंघ असल्याचा अभिमान इथल्या मतदारांमध्ये रुजला आहे. जवळपास 14 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात उमेदवार कितीही असले, तरी मराठा विरुद्ध लेवा पाटील अशी सरळ दुरंगी लढत आहे, असे मानतात. म्हणूनच, `आता नाही तर पुन्हा कधीच नाही' हे इथल्या दोन्ही बाजूंच्या प्रचाराचं परवलीचं वाक्‍य आहे.
`गेली असंख्य वर्षं एकाच समाजाचा खासदार निवडून दिला, आता बदल हवा. आता दुसऱ्या समाजाला लोकसभेत पाठवा,' असा संदेश एका बाजूने दिला जातो, तर `या वेळी हा बदल झालाच, तर पुन्हा आपल्या समाजाचा उमेदवार कधीच लोकसभेत जाणार नाही' असा प्रचार दुसऱ्या बाजूने केला जातो.
रावेर मतदारसंघातली लढाई ही दोन प्रस्थापित, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांची आहे, हे केवळ म्हणण्यापुरतं... कारण, तिथल्या उमेदवारांची निवडणूक चिन्हं त्या पक्षांची आहेत; पण खरं तर इथली लढाई दोन प्रस्थापित समाजांमधील, जातींमधील राजकीय वर्चस्वाची...
...रावेरचं हे चित्र अगदी सुशिक्षित मतदारांमध्ये आणि अगदी सामान्य, अर्धशिक्षित किंवा अशिक्षितांमध्येही तसंच भिनलेलं...
उन्हाचा कडाका ओसरत असताना, संध्याकाळच्या वेळी तिथल्या एसटी स्टॅंडवर गर्दी सुरू होते... आसपासची माणसं आपापल्या गावी जाण्यासाठी तिथं जमतात. सहा आसनी रिक्षांमध्ये इंच-इंच जागेत मावेल एवढी गर्दी कोंबून झाली, की उरलेली गर्दी एसटीची वाट पाहत ताटकळते.
मग निवडणुकीच्याही गप्पा रंगत जातात. उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, त्याचं काम काय, तो समस्या सोडवतो की नाही, असले प्रश्‍न त्यात नसतात. तो कोणत्या समाजाचा आहे, हेच तिथे महत्त्वाचे असते. शिवाय, नाराजीचे मुद्दे असतातच...
`कशाला हवं हे मतदान...?' कुणीतरी वैतागल्यासारखा बडबडून जातो.
मग अचानक सगळेच गंभीर होतात.
`नाही... तो आपला हक्क आहे. तो बजावलाच पाहिजे... म्हणून तरी मतदान करायचंच'... एक जण आणखी गंभीरपणे बोलून जातो.
मग अशाच गप्पा मारतामारता कुणीतरी गर्दीतच एक शेर फेकतो...
`शहर अन्जाना है, लोग भी अनजाने है... हाथ तो मिलाते चलो, दिल मिले ना मिले...'
आणि गर्दी माना हलवत पसंती दर्शवते. गाडी येते, गर्दी पांगूनही जाते...

गुलमोहर: 

पहिले स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो तो माणुस.