माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - भरत - भरत.

Submitted by भरत. on 26 September, 2021 - 15:22

या विषयावर मी लिहीन असं मला वाटलं नव्हतं. पण मनीमोहोर यांचा लेख वाचला आणि काही गोष्टी आठवल्या, म्हणून लिहितोय. या रूढार्थाने बकेट लिस्ट नसतील कदाचित. काही गोष्टी तर अशा आहेत, की अशी उद्दिष्टे ठेवायची असतात हे माहीतही नव्हतं.

तर पहिलं. मी नोकरी करत असताना फायनान्शल प्लानिंग, रिटायरमेंट प्लानिंग इ. शब्द आतासारखे सहज आणि वरचेवर कानावर पडत नसत ; अगदी वित्तसंस्थेत काम करीत असूनही . एकदा एका सहकार्‍याचं पाहून १००% बेसिक पे पी एफ मध्ये टाकायला सुरुवात केली. तेव्हा आमचा पी एफ आमचीच संस्था मॅनेज करीत असे आणि १४ % व्याज मिळत असे. हे पुढल्या पे रिव्हिजनपर्यंत करता आले. पुढे व्याज दर थोडे कमी झाले तरी पॉवर ऑफ कंपाउंडिंग काम करीत होतीच. या शिवाय टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS आणि येणार्‍या प्रत्येक इक्विटी योजनेत थोडेफार पैसे टाकायचे असं सुरूच होतं. २००३ मध्ये आमच्याकडे VRS आली. कर्मचार्‍यांचं सरासरी वय चाळिशीच्या आत असल्याने त्याला VSS - Voluntary separation scheme असं नाव दिलं होतं. मी पहिल्याच दिवशी फॉर्म भरून टाकला. जितकं सेपरेशन पॅकेज मिळणार होतं तितकाच पैसा पी एफ मध्येही जमा झाला होता. अशा प्रकारे कुठलाही विचार न करता आणि मुद्दाम न ठरवून माझा रिटायरमेंट फंड जमला होता.

स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काही काळ स्वतःला जगापासून तोडून घेतलं होतं. काम करायची संधी असूनही ती घ्यावीशी वाटली नव्हती. मग जवळपास दहा वर्षांनी आपल्याला आवडणारं काही तरी काम करायचं ; पैशासाठी नाही, असा विचार आला. volunteer service बद्दल शोधलं असता
NGOs साठी एकत्रित प्लाटफॉर्म अशा एका संकेतस्थळावर वर आमच्या भागातल्या एका संस्थेची underprivileged मुलांसाठी मराठी आणि हिंदी शिकवणारी व्यक्ती Tutor पाहिजे अशी नोंद दिसली. त्यांना इमेल पाठवून दिलं. मग " हे उगाच केलं . आपल्याला झेपायचं नाही. ही जुनी नोंद आहे. त्यांना आतापर्यंत शिक्षक मिळाले असतील. उत्तर नकोच यायला." असे मनाचे खेळ सुरू झाले. पण ईमेलला उत्तर आलं. मी जाऊन भेटून आलो. आमच्या जवळच्याच कॉन्हेंट शाळेशी संलग्न ऑर्फनेजमधल्या मुलांसाठी त्यांना ट्युटर हवे होते. तिथे जाऊ लागलो ; आठवड्यातले पाचही दिवस दोनदोन तास. दहावीच्या मुलांच्या व्हेकेशन क्लासनेच सुरुवात झाली. आधी फक्त मराठी मग नववीचं गणितही शिकवायला लागलो. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं असलं तरी इंग्रजीतून गणित शिकवायला काही अडचण आली नाही. फक्त जॉमेट्री बॉक्समधल्या काही वस्तूंची नावं मुलांनाच विचारायला लागायची. मी दिलेल्या परीक्षांचे निकाल पाहताना झाली नाही अशी धाकधूक दर वर्षी मुलांचे एसेसीचे निकाल पाहताना व्हायची. हायलाइट्स - माझ्या दुसर्‍या वर्षात नववीच्या मुलांना दुसरी टर्म अर्धी संपल्यावर गणितही शिकवायला घेतलं. सामान्य गणित जे शाळेत अजिबात शिकवलं जायचं नाही, बीजगणित- भूमिती घेतलेल्या मुलांची शिकवणी आणि ज्यांचे बेसिक्स पक्के नाहीत त्यांना तेही असं शिकवत त्या वर्षी नववीतून दहावीला १२ मुलं गेली. नेहमी ५-७ मुलंच असत.
बोर्डाच्या कृपेने का होईना, त्या शाळेचा दहावीचा निकाल १००% लागला नाही तरी बोर्डिंगचा मात्र कायम १००% असे. पण एक खंत म्हणजे बहुतेक मुलांना मराठीत सगळ्यांत कमी गुण असत. बहुतेकांच्या बेस्ट ऑफ फाइव्ह मध्ये मराठीचे गुण नसत.

माझ्या लक्षात आलं की अनेक मुलांची अक्षर ओळखही नववीपर्यंत पक्की नसते. वजाबाक्या, भागाकार करता येत नाहीत. माझ्या तिथल्या सातव्या वर्षी मी सहावीचा वर्ग घेऊन एक टर्म फक्त अक्षर ओळख , बाराखडी पक्की करणं, वाचता आणि ऐकून लिहिता येणं आणि पाचवीपर्यंतचं अंकगणित करून घेतलं.
मग सेव्हन इयर इच प्रत्यक्षात आली आणि माझं तिथे जाणं थांबलं.
आधी ही मुलं पुढे काय करतील अशी मला त्यांची काळजी वाटे. पण आता ती काय काम करतात हे कळतं तेव्हा आनंद होतो, अभिमानही वाटतो. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या सुरुवातीच्या महिन्यांत माझ्या पहिल्या बॅचच्या एका मुलाने मला दुबईहून फोन केला. NCHMCT मधून अ‍ॅडमिशन मिळवून नामांकित संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आज तो तिथे पोचला होता. कोणाकडून तरी माझा फोन नंबर त्याने मिळवला. दहावीत असताना त्याने माझ्याशी व इतरही शिक्षकांशी वाद घातले होते. (आमच्या वेळी याला उलट उत्तर देणं म्हणत.) "सर, तुम्ही (अनेकवचन) आमच्यासाठी किती काय केलं. आज आम्ही जे काय आहोत , ते तुमच्यामुळे!" असं सिनेमानाटकपुस्तकातलं वाक्य मला प्रत्यक्षात ऐकायला मिळालं.

समाजाचं काही देणं अंशतः तरी उतराई होण्याची इच्छा अशा प्रकारे पुरी करता आली.

आता मनिमोहर यांच्या लेखामुळे ज्याबद्दल मला लिहावंसं वाटलं ती इच्छा. मुलांना मराठी शिकवता शिकवता आपणही मराठीचा पुढचा अभ्यास करायला हवा असं वाटू लागलं. पण त्याबद्दल जरा नंतर.

व्यवस्थित नोकरी लागल्यानंतर पुढे शिकायची आणि त्याहून परीक्षा द्यायची गरज आणि इच्छा बहुतेकांसाठी तरी संपलेल्या असतात. ( आता कदाचित हे वाक्य भूतकाळातच लिहावं लागेल.)
तर मी नोकरी मिळेपर्यंत काय करायचं म्हणून icwa चा कोर्स करत होतो. इंटर झालं होतं. त्या जोरावर इथे अनेकांचा डोळा असलेला अकाउंट्स सेक्शन मिळाला ( आणि शेवटपर्यंत मानगुटीवर बसला) पण इंटर केलंय तर फायनल ही करायचंच होतं. इंटरचे विषय बी कॉमपेक्षा फार वेगळे नव्हते. पण फायनलला कॉस्ट ऑडिट हा एक पेपर होता. त्यात त्या वेळी त्यांच्या टेक्स्टबुक मधले प्रश्न कमी आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठीच्या ऑडिटवरच प्रश्न अधिक होते. या पेपरात मला दहा गुण मिळाल्याचं आठवतंय. आयुष्यातला सगळ्यात कमी स्कोर. यासाठी त्यांनी वेगवेगळी बुकलेट्स काढली होती असं कळलं. शिवाय या परीक्षेत एकेक पेपर सुटला असं होत नाही. एका ग्रुपमधले सगळे पेपर एकत्र पास व्हावं लागत असे. प्रत्येक विषयात किमान ३५ पण सगळे मिळून किमान ५०% असं पासिंग होतं. पण आणखी एकच प्रयत्न लागला.

पुढे आमचं सेक्शन वर्ल्ड ट्रेड सेंटरला हलवलं गेलं. IIB (आता IIBF) चं ऑफिस शेजारीच आर्केड मध्ये होतं. त्यामुळे मेंबरशिप घ्यावी असं वाटलं. परीक्षेचा फॉर्म भरला. सुट्टी घेतली आणि लोळून घालवली. फक्त दोनच पेपर दिले . त्यात अकाउंट्सच्या अभ्यासाची मला फार गरज नव्हती. फक्त तेवढाच सुटला. कॉमर्स शिवाय इतर शाखांचे लोक इथेच अडकून राहयचे.
इथेही पासिंगचे ५०% गुण. पण एकेक विषय सोडवायची सोय होती. मग मेकर टॉवरमधल्या त्यांच्या लायब्ररीतून इतर विषयांच्या नोट्स विकत घेतल्या. त्या सायक्लोस्टाइल केलेल्या असत. पण त्यामुळे ऑफिसला जातायेता ट्रेनमध्ये उभ्याउभ्याही वाचता येत. असा अभ्यास करून सुटीच्या भानगडीत न पडता दोनदोनच पेपर देत पार्ट १ पार पडला.

मग पार्ट २. बँकांतल्या लोकांना असलेल्या विषयापेक्षा वेगळे विषय आम्हा म्युचुअल फंडवाल्यांसाठी होते. . त्यातले काही मी ICWA च्या वेळी अभ्यासले होते. यातला आमच्या संस्थेच्या कामकाजाबद्दलचा पेपर तेवढा दिला. मग इंदूरला बदली झाली. रिझल्ट तिथेच कळला. तिथे पहिला ग्रुप पास झालेला एक सहकारी होता. माझ्या पास होण्याचा त्यालाही आनंद झाला कारण त्याला आता सोबत होती. तिथे दुसरं कोणी ही परीक्षा द्यायला तयार नव्हतं.
इथेही जसे जमतील तसे पेपर देत चार प्रयत्नांत गंगेत घोडं न्हालं. पण चक्क आमच्या पहिल्या - UTI & Mutual Funds या पेपरला एकदा गटांगळी खाल्ली. शेवटच्या वेळी निकाल ivrs वरून ऐकल्याचा आठवतोय.
परीक्षेला वर्गात आम्ही दोघेच असू. आणि अर्थात पर्यवेक्षक. माझे सगळे पेपर सुटले पण सहकार्‍याचे दोन पेपर राहिले होते. ते देताना तर तो एकटाच होता. पर्यवेक्षकाने त्याला चहा दिला म्हणे!
आय आय बीचं स्थानिक पातळीवर काम चालवायला एक कमिटी होती. त्यात वेगवेगळ्या बँकांचे लोक असत. मी कोर्स करतोय म्हटल्यावर माझी तीत वर्णी लागली. कोरम भरण्यापलीकडे काही करायचं नव्हतं.

अरे हो! या तीनही परीक्षांची मला एकेक इन्क्रिमेंट मिळाली आणि त्याने सेपरेशन पॅकेजमध्ये फरक पडला.

२००० नंतर अ‍ॅम्फीने डिस्ट्रिब्युटर्ससाठी परीक्षेचा नियम काढला. एम्प्लॉयीज् सुद्धा ही परीक्षा देऊ लागले.. NCFM ची ही MCQ based परीक्षा ऑनलाइन आणि त्यात निगेटिव्ह मार्किंग पासिंग ६०. पेपर सबमिट करताच निकाल कळत असे. आमचा ब्रँच मॅनेजर आधीच मुंबईला जाऊन परीक्षा देऊन आला. एके रविवारी इंदूरमध्ये परीक्षा होणार असं ठरलं. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिस्ट्र्यूट त्यासाठी बुक झाली होती. इतर मॉड्युलची परीक्षा देणारेही होते. आमच्या ऑफिसमधले दोघे सकाळी परीक्षेला गेले . त्यांचा निकाल ऐकून आम्हा इतरांना टेन्शन आलं. त्यात कनेक्टिव्हिटी मुळे आमची वेळ पुढे ढकलली जात होती. ऑफिसमध्येच टाइमपास चालला होता. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करायची सवय असल्याने मी मात्र सगळ्या गदारोळात पुस्तकात डोके खुपसून होतो. शेवटी संध्याकाळी सगळ्यांचे नंबर एकदमच लागले. माझ पेपर सोडवून झाल्यावर मी एकदा तपासून पाहिला आणि सबमिट् करायला म्हणून तिथल्या पर्यवेक्षकाला बोलावलं. तोवर त्या बॅचमध्ये कुणीच पेपर सबमिट केला नव्हता. सबमिट करताच काही क्षणांतच निकाल आणि मार्क कळले. आणि कसं कोण जाणे मी पेपर सबमिट केलाय हे सगळ्या रूमला , विशेषतः माझ्या कलीग्जना कळलं. आमचा मॅनेजर , जो सगळ्यात जास्त टेन्स होता, त्याने एक सिगरेट ब्रेक घेतला होता ; खोलीच्या दुसर्‍या टोकापासून माझ्यापर्यंत पोचला. माझा निकाल कळल्यावर इतरांचीही भीड चेपली व त्यांनीही पेपर सबमिट् केले. सकाळी बसलेले दोघे सोडले तर सगळे पास झाले होते. एजंट लोकही परीक्षेला असल्याने आणखी कोणी फेल झालं असतं तर ते लाजिरवाणं वाटलं असतं.
काही दिवसांनी NCFM च्याच Capital market module लाही बसलो. पण इथे थोडक्यात हुकलं.

आता जरा भरकन पुढे म्हणजे शिकवता शिकवता मला मराठी शिकायची हुक्की आली त्याबद्दल. लगेच मुंबई विद्यापीठाच्या IDOL ला बी ए प्रवेश घेतला. तीन विषय घ्यावे लागतात म्हणून मराठीच्या जोडीला इकॉनॉमिक्स आणि एज्युकेशन घेतले.
आता परीक्षा देताना वेगळ्याच समस्या. आतापर्यंत लिहायची , ट्रेन प्रवासाची सवय सुटली होती. काही काही कॉलेजांतल्या लहानशा बाकांवर बसून पाठ अवघडायची. तोवर चाळिशी लागली होती. मी बायफोकल काँटॅक्ट लेन्स वापरायचो. तर लिहिताना पेपर डोळ्यांच्या जास्तच जवळ असे. पहिलं वर्षं झालं. दुसर्‍या वर्षी तीन विषयांचे प्रत्येकी दोन पेपर अधिक फाउंडेशन कोर्स आणि एक अ‍ॅन्सिलरी सब्जेक्ट म्हणून अ‍ॅडव्हर्टायझिंग. पण या दोहोंचे पेपर इतर पेपर असलेल्याच दिवशी सकाळी होते. एका दिवशी दोन पेपर देणं शक्य नाही, म्हणून त्यांना दांडी मारली आणि मार्कशीटवर पहिल्यांदा केटी पाहिली. ( प्रोफेशनल एक्झाम्सना किती अटेंप्ट उरलेत असं छापून यायचं. ) ते ऑक्टोबर मध्ये सुटले.

टी वायला मुख्य विषय कोणता किंवा कोणते दोन घ्यायचे हे ठरवायचं होतं.
मराठीसाठी मी गाइड वगैरे न वाचता, अभ्यासक्रमाला लावलेलं मूळ पुस्तक = साहित्यकृती वाचायचो. त्यासंबंधी काही पुस्तकं मिळाली तर ती. इथे मुंमग्रंसंचा उपयोग झाला. मी दोन्ही वर्षांच्या उत्तर पत्रिकांच्या फोटोकॉपीज मागून घेतल्या होत्या. त्यावरून आणि मार्कांवरून परीक्षकांना काय अपेक्षित आहे ते मला कळलेलं नाही, इतकं समजलं होतं. एका पेपरमध्ये परीक्षकाकडून मी नापास झालो होतो. मॉडरेटरने दयाबुद्धी दाखवून वर ढकललं होतं.
मग टी वायला इकॉनॉमिक्सचेच सहा पेपर द्यायचे असं ठरलं. बी कॉम , ICWA , IIB तिन्हीतही इकॉनॉमिक्स होतं. पण ते इथे सेकंड
इयरपर्यंतच पुरलं. IDOL चं स्टडि मटेरियल वाचताना मला त्यातला चुकाच खुपत राहात. मग त्यात दिलेली काही रेफरन्स बुक्स विकत घेतली. परदेशी लेखकांनी लिहिलेली टेक्स्टबुक्सही किती सुंदर असतात ते बी कॉम करतानाही मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सायकॉलॉजीच्या वेळी पाहिलं होतं.
इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सची पुस्तकंही हॅरी पॉटर सिरीजसारखीच रंजक वाटली.

नोकरी करत नसलो, तरी नेहमीच्या व्यापांतून अभ्यासाला वेळ काढणं सोपं नव्हतं. पण इथे चीटिंगची चांगली सोय होती. पेपर पॅटर्न असा होता की तुम्ही निम्मेच किंवा कोणतेही पाच चॅप्टर्स, सेक्शन्स केले तरी चालणार होतं. मग सेक्शनमध्ये कमी पानं आणि समजायला सोपे कन्सेप्ट्स या निकषांवर निवड केली. सेकंड इयरपर्यंत खूप नवा अभ्यास नव्हता, त्यामुळे नोट्स काढल्या नाहीत. ग्राफ्स इ. सराव न करताच परीक्षेत
काढता आले याबद्दल आपल्याच स्मरणशक्तीचं कौतुक वाटलं. पण आता अभ्यास IDOL च्या स्टडी मटेरियलवरून नव्हता . त्यामुळे लाँग बुक्स विकत घेऊन नोट्स काढल्या. किती वर्षानी शाईची पेनं वापरली.
परीक्षा झाली. यथावकाश निकाल लागला. फर्स्टक्लास थोडक्यात हुकला होता. मन थोडं खट्टू झालं. IDOL सगळ्या परीक्षार्थींचा निकाल नंतर एकत्र पी डी एफ मध्ये पब्लिश करतं. त्यात पाहून कळलं की पाचसहा जणांनाच माझ्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते.
या वयातही कॉम्पिटिटीव्ह स्पिरिट उफाळून आलं. बेटरमेंट ऑफ ग्रेड्स साठी पुन्हा परीक्षा दिली. माझ्या मते पेपर मागच्या वेळपेक्षा चांगले गेले होते. पण निकाल लागला तेव्हा इन व्हॅलिड असा काही रिमार्क होता. मग डिटेल्ड निकाल आल्यावर कळलं की मागच्या वेळपेक्षा एकूण मार्क कमी मिळाल्याने इनव्हॅलिड. ज्यात गणिती प्रॉब्लेम होते त्याच स्कोरिंग पेपरला आता गुण कमी झाले होते.
दहावी नंतर सायन्स करायचं नाही म्हणून कॉमर्सला गेलो. तेव्हा अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट असले काही प्रकार नव्हते. कॉमर्सला गेलो म्हणूनच बोलणी खाल्ली होती. त्यामुळे आर्ट्सचा विचारही शक्य नव्हता. पण आता एका आवडत्या विषयाचा अभ्यास करता आला. घेतलेली सगळी टेक्स्टबुक्स अजून आहेत. ऑप्शनला टाकलेले चॅप्टर्स वाचायचे आहेत.
आता इतिहासाचा असाच अभ्यास करायचा आहे . संस्कृत शिकायचं आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताचं व्याकरण समजून घ्यायचं आहे.

सध्या परिस्थितीच रोज परीक्षा घेते आहे आणि इथे कोणताही प्रश्न ऑप्शनला टाकायची सोय नाही , त्यामुळे हे सगळं पुढे कधीतरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुकास्पद आणि प्रेरणादायी
शेवटचं वाक्य वाचून काळजी वाटली.
जी काही अडचण असेल ती लवकर दूर होवो ही सदिच्छा.

वाचून दडपून गेले आहे! Happy
परिस्थितीचे पेपर्स लवकर सुटोत आणि वेळोवेळी ऑप्शनला टाकलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येवोत. Happy

प्रेरणादायी . गॅप नंतर शिक्षण घेणे अवघड असतं असं बरेच जण म्हणतात तुम्ही अवघड टप्पा पार केलात पुढेही कराल त्यासाठी शुभेच्छा.

वा भरत., तुमची बकेट लिस्ट प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यातही केवळ स्वकौतुकाचे ढोल न वाजवता कुठे कमी पडलात ते मोकळेपणाने सांगितलं हे विशेष आवडलं.
पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.... Happy

कौतुक आणि शुभेच्छांसाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

व्यत्यय, नक्की लिहा.

Srd , तुम्ही प्रथम ही संस्था करीत असलेल्या सर्वेक्षणाबद्दल ASER Reports वाचलंय का?
ग्रामीण आणि शहरी सरकारी शाळांतील शिक्षकांना शिक्षणेतर कामं असतात हे खरं. पण मी जायचो त्या शाळेत हे कारण नसावं. एकेका वर्गात ७०-८० मुलं आणि कमी गुण मिळालेल्या मुलांना सुटीत शिकवून अपेक्षित पातळीपर्यंत आणण्याच्या पोटनियमाला बदल देत आठवीपर्यंत नापास न करण्याचा नियम ही कारणं असावीत.

मनीमोहोर , हो UTI. अर्थात आमचं पालकत्व तोवर IDBI कडे आलं होतं. पण स्टाफ रूल्स, पे रिव्हिजन इ.साठी रिझर्व बँकेच्या मागेच चालायचो. तिथून डेप्युटेशनवर आलेल्यांना मग परत जायचा पर्याय दिला आणि जे इथे थांबले ते कसे भरभर पुढे गेले, अमुक एक व्यक्ती ही युटीआयसाठी रिक्रूट केलेली पहिली व्यक्ती इत्यादी कथा ऐकायला मिळायच्या.

मनीमोहोर , हो UTI. अर्थात आमचं पालकत्व तोवर IDBI कडे आलं होतं. पण स्टाफ रूल्स, पे रिव्हिजन इ.साठी रिझर्व बँकेच्या मागेच चालायचो. तिथून डेप्युटेशनवर आलेल्यांना मग परत जायचा पर्याय दिला आणि जे इथे थांबले ते कसे भरभर पुढे गेले, अमुक एक व्यक्ती ही युटीआयसाठी रिक्रूट केलेली पहिली व्यक्ती इत्यादी कथा ऐकायला मिळायच्या. >> हो uti, nabard ही आमची एकेक dept होती एके काळी. त्यामुळे सगळा स्टाफ rbi चाच असे. मग सेपरेट झाली तेव्हा option दिला काही राहिले तिथेच , काही आले rbi मध्ये परत. Uti च ऑफिस तेव्हा मरीन लाईन्स ला होतं.

लिखाण अतिशय आवडले, प्रेरणादायी व प्रांजळ आहे. ज्या मायबोलीकरांबद्दल मला खूप आदर वाटतो त्यांपैकी तुम्ही आहात. तो आदर हे वाचून दुणावला. तुमची बकेट लिस्ट ही माझ्या अपूर्ण बकेट लिस्ट सारखी वाटते त्यामुळे हे एक प्रकारचे रिमाईन्डरही झाले.
तुम्हाला शुभेच्छा भरत Happy
गणपती बाप्पा(शेवटच्या परिच्छेदातले) तुमचे सगळे त्रास दूर करो ह्याही सदिच्छा .

मस्त लिहिलंय. मी पण बरेच दिवस एक परीक्षा द्यायची असा विचार करत आहे ह्या लेखानन्तर आता नक्कीच देईन तयारी करून.

आणी हो,
गणपती बाप्पा(शेवटच्या परिच्छेदातले) तुमचे सगळे त्रास दूर करो ह्याही सदिच्छा .

भारीच. म्हणजे काय काय आणि किती? कौतुकास्पद आहे.
मलाही इतिहास शिकायचा आहे पण फक्त पुढे ढकलणे चालू आहे. परत नवीन कारण सुचायच्या आधी आता एडमिशन घेवूनच टाकते. Happy

फारच प्रेरणादायी आहे.. माझ्या कॅरेक्टरच्या अगदी उलट आहे म्हणून विशेष आदर वाटतो असे काही लोकांच्या आयुष्यभर जिद्दीने शिकण्याबद्दल वाचले की.. ग्रेट !

ग्रेट भरतजी!
एवढा संयम, चिवटपणा मला जमेल का नाही ही शंकाच आहे.

भरत यांचा एकूण प्रवास हा खरंच खूप प्रेरणादायी आहे. वाचून वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे मलाही माझा प्रवास शेयर करावा असा वाटलं म्हणून  प्रतिसाद देतोय. कुटुंबाची कनिष्ठ माध्यम वर्गीय परिस्थिती होती पण आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहित होते. टीमउळे १९८७ साली दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर सांगलीत वालचंद महाविद्यालयात यांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेतला. उत्तम गुण मिळवून पास झालो व कॉलेज मार्फत भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी कंपनीत मुंबई इथे रुजू झालो. अजून शिकू पदवी शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करणे भाग पडले. दोन वर्षात नोकरीत कायम झालो. त्यावेळी कंपनीतील ९५०० अभियंत्यांपैकी मी सर्वात तरुण अभियंता होतो. याला कारण म्हणजे डिप्लोमा १८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच पूर्ण झाला होता. पण कंपनीत पदवी झाल्यानंतर पदोन्नती किती पटापट मिळतात व डिप्लोमावाल्याना किती घासत बसावे लागते हे पाहत होतो. म्हणून धाडस करीन ३ वर्षांनी म्हणजे ९३ साली पुढील पदवी शिक्षणासाठी चांगला पगार देणारी नोकरी सोडली व सांगली जवळच एका नव्या खाजगी महाविद्यालयात यांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला. १०वि नंतर डिप्लोमा केल्याने अकरावी  बारावीच्या गणिताचा काहीच गंध न्हवता व प्रथम वर्ष पदवीचे गणितही झाले न्हवते. शिवाय नोकरीमुळे आधी शिकलेले गणित सुद्धा विसरून गेलो होतो. त्यामुळे व्हायचे तेच झाले व M ३ मध्ये दणकून नापास झालो. पुढच्या सत्रात पुन्हा नापास झालो अन मनात M ३ ची अशी दहशत बसली कि पुढील दोन वर्षे इतर सर्व विषयात उत्तम गुणांनी पास झालो पण गणितात मात्र ६ वेळा नापास झाल्याने १ वर्ष घरी बसण्याची वेळ आली. अगदी पदवी पस होणे शक्य नाही आता पुन्हा डिप्लोमाच्या मार्क्स आणि अनुभवावर शिक्षण सोडून पुन्हा नोकरी करायची या निर्णयापर्यंत आलो. पण कॉलेजमधीलच एका सरानी खूप छान मार्गदर्शन केले व सातव्या प्रयत्नांत शेवटी गणित पास झालो व नंतर पदवी सुद्धा उत्तम गुणांनी पास झालो. पण बरोबरचे मित्र १ वर्ष पुढे निघून गेले होते. नंतर ९७ साल ते २००० पर्यंत विविध ठिकाणी नोकरी केली, भरपूर फिरलो व पुण्य्त २००१ साली एक व्यवसाय चालू केला.  दरम्यान लग्न व मुलगा झाला. सहज म्हणून सांगलीत अनुदानित महाविद्यालयात व्याख्याता पदासाठी अर्ज केला व निवडही झाली. कॉलेज खूप चांगले अन प्रसिद्ध असल्याने व पुन्हा परतून मूळ घरी रहायला मिळणार असल्याने कसेबसे पत्नीला पुण्याहून सांगलीत रहाण्यासाठी तयार केले व सांगलीत २००४ च्या अखेरीस व्याख्याता म्हणून रुजू झालो, मात्र शैक्षणिक पात्रता केवळ पदवी हीच होती.  नंतर पुढील प्रगतीसाठी पदव्युत्तर शिक्षण गरजेचे वाटू लागले. मग शिकवत शिकवत पुन्हा एम टेक २००९ ते २०१२ मध्ये पूर्ण केले. एव्हाना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी समोर येत होत्या व त्यानुसार PhD करणे पुढील प्रगतीसाठी आवश्यक वाटू लागले होते. सहज म्हणून IIT  दिल्ली, मुंबई आणि रुरकी इथे अर्ज केला व शासनाच्या योजनेनुसार २०१४ साली तीन वर्षासाठी निवड झाली. जेवण कुटुंब चौकोनी झाले होते, आई वडील थकले होते व माझी चाळीशी होऊन गेली होती व मुलेही मोठी होत होती. पुन्हा पत्नीशी सल्ला मसलत केली व PhD साठी बायको मुलांसह तीन वर्षासाठी हरिद्वारला गेलो.  इथे पहिल्या वर्षी थियरी कोर्समध्ये स्पर्धा गेट पास झालेल्या व बावीस तेविशीतल्या मुलांशी होती. शिवाय त्या मुलांना ४० गुण मिळाले तरी पुरेसे व PhD साठी मात्र ६० गुण आवश्यक होते. ते हि व्यवस्थित पार पडले. एव्हाना ती वर्षे संपली पण PhD पूर्ण नाही झाली. त्यामुळे २०१७ साली सांगलीत रुजू झालो व जमेल तसे संशोधनाचे काम इथून पुढे करत राहिलो. अखेरीस २०१९ च्या शेवटी वयाच्या ४८व्या वर्षी विद्या वाचस्पती पदवी संपादन केली.  असा काहीसा अडखळत, मध्ये मध्ये विश्रांती घेत माझा इथवरचा शिक्षणाचा प्रवास झाला. अजूनही मी विद्यार्थी असताना अस्तित्वातच नसलेले अभ्यासक्रम आता शिकवावे लागतात व त्यासाठी नवीन गोष्टी शिकाव्या लागताहेत. आणि हा शिक्षण प्रवास शेवटपर्यंत चालू राहील असे वाटते.

भरत यांचा एकूण प्रवास हा खरंच खूप प्रेरणादायी आहे. वाचून वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे मलाही माझा प्रवास शेयर करावा असा वाटलं म्हणून  प्रतिसाद देतोय. कुटुंबाची कनिष्ठ माध्यम वर्गीय परिस्थिती होती पण आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहित होते. टीमउळे १९८७ साली दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर सांगलीत वालचंद महाविद्यालयात यांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेतला. उत्तम गुण मिळवून पास झालो व कॉलेज मार्फत भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी कंपनीत मुंबई इथे रुजू झालो. अजून शिकू पदवी शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करणे भाग पडले. डॉ वर्षात नोकरीत कायम झालो. त्यावेळी कंपनीतील ९५०० अभियंत्यांपैकी मी सर्वात तरुण अभियंता होतो. याला कारण म्हणजे डिप्लोमा १८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच पूर्ण झाला होता. पण कंपनीत पदवी झाल्यानंतर पदोन्नती किती पटापट मिळतात व डिप्लोमावाल्याना किती घासत बसावे लागते हे पाहत होतो. म्हणून धाडस करीन ३ वर्षांनी म्हणजे ९३ साली पुढील पदवी शिक्षणासाठी चांगला पगार देणारी नोकरी सोडली व सांगली जवळच एका नव्या खाजगी महाविद्यालयात यांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला. १०वि नंतर डिप्लोमा केल्याने अकरावी  बारावीच्या गणिताचा काहीच गंध न्हवता व प्रथम वर्ष पदवीचे गणितही झाले न्हवते. शिवाय नोकरीमुळे आधी शिकलेले गणित सुद्धा विसरून गेलो होतो. त्यामुळे व्हायचे तेच झाले व M ३ मध्ये दणकून नापास झालो. पुढच्या सत्रात पुन्हा नापास झालो अन मनात M ३ ची अशी दहशत बसली कि पुढील दोन वर्षे इतर सर्व विषयात उत्तम गुणांनी पास झालो पण गणितात मात्र ६ वेळा नापास झाल्याने १ वर्ष घरी बसण्याची वेळ आली. अगदी पदवी पस होणे शक्य नाही आता पुन्हा डिप्लोमाच्या मार्क्स आणि अनुभवावर शिक्षण सोडून पुन्हा नोकरी करायची या निर्णयापर्यंत आलो. पण कॉलेजमधीलच एका सरानी खूप छान मार्गदर्शन केले व सातव्या प्रयत्नांत शेवटी गणित पस झालो व नंतर पदवी सुद्धा उत्तम गुणांनी पस झालो. पण बरोबरचे मित्र १ वर्ष पुढे निघून गेले होते. नंतर ९७ साल ते २००० पर्यंत विविध ठिकाणी नोकरी केली, भरपूर फिरलो व पुण्य्त २००१ साली एक व्यवसाय चालू केला.  दरम्यान लग्न व मुलगा झाला. सहज म्हणून सांगलीत अनुदानित महाविद्यालयात व्याख्याता पदासाठी अर्ज केला व निवडही झाली. कॉलेज खूप चांगले अन प्रसिद्ध असल्याने व पुन्हा परतून मूळ घरी रहायला मिळणार असल्याने कसेबसे पत्नीला पुण्याहून सांगलीत रहाण्यासाठी तयार केले व सांगलीत २००४ च्या अखेरीस व्याख्याता म्हणून रुजू झालो, मात्र शैक्षणिक पात्रता केवळ पदवी हीच होती.  नंतर पुढील प्रगतीसाठी पदव्युत्तर शिक्षण गरजेचे वाटू लागले. मग शिकवत शिकवत पुन्हा एम टेक २००९ ते २०१२ मध्ये पूर्ण केले. एव्हाना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी समोर येत होत्या व त्यानुसार PhD करणे पुढील प्रगतीसाठी आवश्यक वाटू लागले होते. सहज म्हणून IIT  दिल्ली, मुंबई आणि रुरकी इथे अर्ज केला व शासनाच्या योजनेनुसार २०१४ साली तीन वर्षासाठी निवड झाली. जेवण कुटुंब चौकोनी झाले होते, आई वडील थकले होते व माझी चाळीशी होऊन गेली होती व मुलेही मोठी होत होती. पुन्हा पत्नीशी सल्ला मसलत केली व PhD साठी बायको मुलांसह तीन वर्षासाठी हरिद्वारला गेलो.  इथे पहिल्या वर्षी थियरी कोर्समध्ये स्पर्धा गेट पस झालेल्या व बावीस तेविशीतल्या मुलांशी होती. शिवाय त्या मुलांना ४० गन मिळाले तरी पुरेसे व PhD साठी मात्र ६० गन आवश्यक होते. ते हि व्यवस्थित पार पडले. एव्हाना ती वर्षे संपली पण PhD पूर्ण नाही झाली. त्यामुळे २०१७ साली सांगलीत रुजू झालो व जमेल तसे संशोधनाचे काम इथून पुढे करत राहिलो. अखेरीस २०१९ च्या शेवटी वयाच्या ४८वय वर्षी विद्या वाचस्पती पदवी संपादन केली.  असा काहीसा अडखळत, मध्ये मध्ये विश्रांती घेत माझा इथवरचा शिक्षणाचा प्रवास झाला. अजूनही मी विद्यार्थी असताना अस्तित्वातच नसलेले अभ्यासक्रम आता शिकवावे लागतात व त्यासाठी नवीन गोष्टी शिकाव्या लागताहेत. आणि हा शिक्षण प्रवास शेवटपर्यंत चालू राहील असे वाटते.

Sharadg खूपच स्फुर्तीदायक. घरच्या मंडळींनी दिलेली साथ अत्यंत मोलाची
ह्याला वेगळा धागा काढूनच न्याय द्या.

Sharadg खूपच स्फुर्तीदायक. घरच्या मंडळींनी दिलेली साथ अत्यंत मोलाची
ह्याला वेगळा धागा काढूनच न्याय द्या.>>>> +१.

Sharadg परिस्थितीमुळे सुरुवातीला जमले नाही, पण तुम्ही संपूर्ण मात केलीत. महान! वेगळा धागा काढा.

Pages