चातुर्मासाच्या कथा- चतुर मा'सी'सह (शिळासप्तमी)

Submitted by Barcelona on 13 August, 2021 - 22:06

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गांव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना.
(सॉंग सिच्यूएशन आली ना बाप्पा सुरुवातीलाच आणि रखरखीत जागेचं गाणं लागेल - "सारी के फॉल-सा मॅच किया रे" द्या वाजवून. उंट, वाळवंट सगळं आहे)

जळदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. "राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल."
(देवता लोकांचा एच आर झोपला काय? असल्या मागण्या करणारीला “देवता” पोर्टफोलियो का दिला आहे अजून ??)

हें राजानं ऐकलं. घरीं आला. मनीं विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाहीं. पण ही गोष्ट घडते कशी? सून कबूल होईल कशी? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरीं पाठवावं, मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली, सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊं माखूं घातलं, जेवूं घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यांत नेऊन ठेविला.
( Sad यापेक्षा सिनेमातले शक्ती कपूर, अमरीश पुरी बरे… )

जळदेवता प्रसन्न झाल्या, तळ्याला महापूर पाणी आलं.
(आता आला का जलशुद्धीकरणाचा खर्च!!)

पुढं राजाची सून माहेराहून येऊं लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनीं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली; वशाची आठवण झाली. तो वसा काय? तळ्याच्या पाळीं जावं, त्याची पूजा करावी. काकडीचं पान घ्यावं. वर दहींभात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी, आणि वाण भावाला द्यावं. एक मुटकुळं तळ्यांत टाकावं, आणि जळदेवतांची प्रार्थना करावी.
(तळ्याकाठी अजून जोशी वडेवाले किंवा मामांची मिसळ नाही. काकडीचे पान ८ इंच आसपास असते. त्यात इंच दोन्ही बाजूला सोडून सहा इंची व्यासाचा दहीभात खायचा. भावाला न्याहरीला पण पुरायचा नाही. सध्याचे भाऊ १८इंची पिझ्झे मागवतील.)
(शिवराई ..... म्हणजे ह्या कथा १९व्या शतकात लिहील्या आहेत??????????)

"जय देवी आई माते, आमच्या वंशीं कोणी पाण्यांत बुडाले असतील ते आम्हांस परत मिळोत." याप्रमाणं तळ्यांत उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर, बळी दिलेला मुलगा पाय ओढूं लागला.
(पुन्हा सॉंग सिच्यूएशन - अभी मुझमे कहीं बाकी थोडी है जिंदगी… )

पाय कोण ओढतां म्हणून पाहूं लागली, तों तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं त्याला कडेवर घेतलं. आश्चर्य करूं लागली. सासरी येऊं लागली. राजाला कळलं. सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले.
(तिने किंवा भावाने ट्विटर अपडेट टाकला का काय ?? )

तिला विचारलं, “अग अग मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला?” “मी शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यांत वाण दिलं, जळदेवतांची प्रार्थना केली. मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं.” राजाला फार आनंद झाला. तिच्यावर अधिक ममता करूं लागला.
(गप ना बाई!!! एकदा कळलं की तुला परत आणता येतो की दर दुष्काळाला बळी द्यायचे. )

जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हां आम्हां होवोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणांचे द्वारीं सुफळ संपूर्ण.
(जलसंधारण हा महत्त्वाचा विषय आहे पण माझ्यासारख्या अनेकींना त्याविषयी माहिती नसते. सार्वजनिक गणेशोत्सव असतो तशी जलसंधारणासाठी सार्वजनिक शिळासप्तमी असावी. बळी वगैरे कायदेशीर गुन्हे प्रकार कारण्यापेक्षा बंधारे, जलसंरक्षण असे खात्रीचे मार्ग माहिती करून घ्यावे आणि अनुसरावे. #नवराकायकुंकवापुरताहोता!! #मॉडर्नचातुर्मास)

__________________________
चातुर्मासाच्या कथा हा आपल्या लोकपरंपरेचा वारसा आहे. त्यातील लयवेल्हाळपण, भाबडेपण आकर्षक आहे आणि काळ बदलला तरी परिकथेसारख्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे त्या जात आहेत. ह्या कथा टिकायला हव्या. त्या नव्या स्वरूपात लिहीण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जरा मजेशीर प्रश्न विचारून कुणा समर्थ लेखकाला 'क्या किजिएगा इस स्टोरी का?' ह्याचे उत्तर द्यायला भाग पाडायचे इतपतच धाग्याचा उद्देश. धार्मिक भावना दुखावण्याचा, खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही. जरा सजगपणे वाचू इतकंच!!
मूळ कथा विनाकंस, सी ताईची कॉमेंट्री कंसात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शिळासप्तमी शिळे अन्न खपवायची सोय वाटलेली>>>>> खरंतर मला पण शिर्षक वाचल्यावर तस़च वाटलं आधी Lol

Lol भारी

(मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं.
- ते पोरं, स्विमिंग सुट घालूनच पाण्यात उतरवलं असणार. बघा.)

अजुन जोशींना ट्विटर मिळाला नसावा, नाहीतर तळ्याकाठी वड्याचा प्रपंच झोकात थाटला असता.

हायला मला पण शिळं अन्न संपवण्याची काहीतरी आयडिया असेल असं वाटलेलं. हि वेगळीच गोष्ट निघाली. Lol मस्त सी

धमाल Lol , एक मिडियम साईझ दहीभात द्या म्हणता यायला हवे. किती दुष्ट राजा/आजा , पुन्हा म्हणून विश्वास ठेवू नये , दुसरी बेबीसिटर बघावी.
#नवराकायकुंकवापुरताहोता!! >>>हवं तसं रोलची काटछाट करतात नं , कोणी लिहिल्यात कथा कोण जाणे! आपल्या अरेबिअन नाईट्स Wink

भारी गोष्ट Lol

माझी आई दरवर्षी कोकणी पद्धतीच्या आंबोळ्या करायची शिळासप्तमीला, आणि शेजारच्या काकूला सवाष्ण म्हणून बोलवायची. त्यामुळे शिळेच्या दिवशी आंबोळ्या आणि नारळाचं वेलचीयुक्त वगैरे मस्त दूध हा मुख्य मेनू. बाकी भाजी-आमटी भात, डाव्या बाजूचे पदार्थ ही मंडळी सायडिंगला असायची.
आईला करायला झेपेल तेव्हा शिकून घेणार आहे. मला खूप आवडतात तिच्या हातच्या आंबोळ्या.

मारून जिवंत करायचा फंडा हिट दिसतोय सर्व कथांमध्ये.
सत्यवान सावित्रीतही हेच झाले होते.
महाभारतातही अशी एक कथा होती ना, तळ्यातला यक्ष सर्व पांडवांना मारतो, मग युधिष्टिर प्रश्नांची उत्तरे देऊन पुन्हा जिवंत करतो.

ऑन ए सिरीअस नोट, अ‍ॅक्चुअली काहीतरी तथ्य असणार यात असे वाटते. अमृत वगैरे पेय प्रत्यक्षात अस्तित्वात असावे पुरातन काळात. आपण मायबोलीकर ईथे कोकाकोला पेप्सी शीतयुद्धात रमलो आहोत, मला वाटते या पेयाचा फॉर्म्युला शोधायला हवा. सुरुवात मायबोली गणेशोत्सव रेसिपी पदार्थात मोदक करंज्या करण्याऐवजी अमृततुल्य पेय बनवायच्या स्पर्धेपासून करायला हवी. जर हे पेय एखाद्या महिलेने शोधले तर अचानक स्वयंपाकघरात काम करायचे महत्वही याने वाढेल आणि पुरुषही तिथे शिरकाव करतील. विचार करा संयोजक...

Lol
सगळे सोमिरसपान करतात, तेच नवे अमृत आहे
माबोकरांचे. पूर्वी सोमरस आता सोमिरस, Biggrin रोज तितके प्रतिसाद द्यावे लागतात, रहावत नाही. काही जणांना धागे काढावेच लागतात. Wink

सगळे भाग वाचले या मालिकेचे! मूळ कथा अनेक दिवसांनी वाचल्या गेल्या आणि त्यावरची टिप्पणी as usual चपखल!
या शिळासप्तमी मधल्या शिळा शब्दाचा अर्थ काय आहे असा प्रश्न पडला. गोष्ट जलदेवतेची आहे ना?

हो ही गोष्ट जलदेवतेची आहे. मात्र शिळासप्तमीला शितळासप्तमी असे पण म्हणतात. मुलांना गोवर, कांजण्या, देवी (आता नाही) इ शरीरात ताप्/दाह निर्माण करणारे आजार होतात. त्या नष्ट करणारी देवी शितळादेवी आहे. ही पार्वतीचा अवतार मानतात. ती गाढवावर बसलेली हातात कडूनिंब, झाडू, पंखा इ घेऊन असते. तिला नैवेद्याला दही-भात, खीर, बासुंदी इ शीत पदार्थ लागतात. हिच्या पूजनार्थ कुणी कुणी शितळासप्तमीला चूल पेटवत नाहीत. (शिळे खा!! शितळा सप्तमी दर आठवड्याला साजरी करून एक दिवस सैपाकातून सुट्टी घ्यायला ही माझी हरकत नाही Wink ).

श्रद्धा असावी पण ज्या गोष्टी आज विज्ञानाच्या मदतीने सोडवता येतात त्या तशा सोडवणे श्रेयस्कर म्हणून वेळेवर गोवर कांजण्या लस देणे, आजारी झाल्यावर मुलांना डॉक्टरकडे नेणे उत्तम. ह्या गोष्टींचा उद्देश कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही तर केवळ लोकवांड्ग्मय वाचणे इतकाच आहे. काळानुरूप जलसंधारण वगैरे उपयोगी असेल ते करावं नि बाकी सोडून द्यावे असं वाटतं.

बरोबर, शितळादेवी असणार! चौलला शितळादेवीचं छान मंदिर आहे तिथे गेल्येय मी. चौल माझ्या आजीचं माहेर Happy

श्रद्धा असावी पण ज्या गोष्टी आज विज्ञानाच्या मदतीने सोडवता येतात त्या तशा सोडवणे श्रेयस्कर >> याला हजारो मोदक!

गुजराथ्यांत आदल्या दिवशी रांधण छठ असते. म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या पोटपूजेसाठी तयारी. डबल काम.
पण तिथे शीतला सातम कृष्णपक्षात असते