बॉलीवुडचा हिमालय...( वीक एंड लिखाण )
मी असाच फेसबुक आणि व्हाट्सॅप सर्फिंग करत होतो नेहमीप्रमाणे. व्हाट्सअॅपवर बातमी वाचण्यात आली की प्रसिध्द सिनेनट दिलिपकुमार यांचे निधन. मी थोड्यावेळ सुन्नच झालो. घालमेल व्हायला लागली. पुन्हा मनाने विचार केला की ही बातमी चूक असावी कारण आतापर्यंत व्हाट्सअॅपच्या बातम्यानुसार दिलिपकुमार यांना आठदहा वेळेस तरी मारले गेले असेल. म्हणून मी रेडियोवर बातम्या लावल्या आणि ही मृत्यूची बातमी खरी असल्याचे आढळले. ही घटना सात जुलैची आहे. माझ्या डोळ्यासमोरून त्याच्या कारकिर्दीचा गोषवाराच सरकू लागला. मी त्याचा अगदी पहिल्यापासून फॅन आहे. त्याचे लीड रोल असलेले अनेक चित्रपट आठवू लागले. मी जे जे चित्रपट पाहिले ते सारे एंजॉय केले पुरेपूर. त्याने फिल्म इंडस्ट्रीवर आणि रसिकांच्या मनावर जवळ जवळ पन्नास वर्षे अनिभिशिक्त साम्राटाप्रमाणे राज्य केले.
अशा या गुणी नटाचा जन्म ११.१२. १९२२ रोजी झाला. त्याचे मूळ नाव मोहमद युसुफ खान असे होते. त्या काळात बहुतांश नटांनी चित्रपटात टोपण नावे घेण्याची प्रथा होती आणि तो मोहमद युसुफ खानचा दिलिपकुमार झाला. त्याची कारकिर्द अक्षरशः डोळे दिपवणारी होती.
दिलिपकुमारचा पहिला चित्रपट ज्वारभाटा (१९४४) हा होता जो बाँबे टाकीजच्या बॅनरखाली निघाला होता. त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत पासष्ट सिनेमात काम केले. त्यांचे सर्वच पिक्चर्स गाजले होते त्या जमान्यात. पण विशेष नमूद करावे असे अंदाज (१९४७) आन (१९५२) दाग (१९५२) देवदास (१९५५) मुगल-ए-आझम (१९६०) गंगा जमुना (१९६१) आणि राम और शाम--कॉमेडी (१९६७). त्यांनी १९७६ मधे पाच वर्षासाठी चित्रपट सन्यास घेतला. त्यांनी १९८१ मधे तयार झालेल्या क्रांती या चित्रपटापासून चरित्र अभिनेता म्हणून कामास सुरुवात केली. त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे "किला"जो १९९६ मधे बनला. त्यांच्या जीवनाच्या उल्लेखनीय बाबी अशा:
१) १९५० हे त्यांच्यासाठी ब्रेक थ्रू वर्ष ठरले. त्या यशानंतर पुन्हा कधीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
२) सर्व नामवंत नट्या जशा की मधुबाला, वैजयंतीमाला, नरगीस, निम्मी, मीनाकुमारी, कामिनी कौशल बरोबर त्यांनी नायकाची भूमिका केली.
३) मुगल-ए-आझम या चित्रपटाने त्या काळचे बॉक्स ऑफिस कलेक्षनचे सर्व उच्चांक मोडले. त्या नंतर तब्बल अकरा वर्षानी हाथी मेरे साथी (१९७१) आंणि शोले (१९७५) या चित्रपटांनी मुगल-ए-आझम पेक्षा जास्त कमाई केली.
४) त्यांना सुरू झाल्यानंतरचे पहिले फिल्म फेअर बेस्ट अॅक्टर आवार्ड दाग या चित्रपटासाठी मिळाले. त्या नंतर सात वेळ हे आवार्ड त्यांनी पटकावले. म्हणजे एकूण आठ अवार्ड्स!
५) हे ही एक रेकॉर्ड आहे की ते एकमेव अभिनेत होते त्या काळी ज्यांनी फिल्ममधे काम करण्यासाठी एक लाख रुपये घेतले ज्याची २००९ ची किंमत ८५ लाख किंवा यूयस $ एक लाख वीस हजार होती.
६) दिलिपकुमारने गाण्यासाठी जास्त आवाज मोहमद रफी, तलत महमूद, कधी कधी मुकेश यांचा घेतला. किशोरकुमारचा आवाज फारच कमी घेतला. माझ्या माहितीप्रमाणे १९७० मधे तयार झालेली फिल्म सगिना महातो मधे एक गाणे किशोरने गायले होते. त्याचे बोल होते "साला मै तो साब बन गया"
७) दिलिपकुमारची मेहनत घेण्याची तयारी वादातीत होती. दिल दिया दर्द लिया या चित्रपटात एक सीन आहे. प्राण दिलीपकुमारला शेतात जाऊन बंदूक आणायला सांगतो. तो पळत जाऊन परत येतो आणि मोठे श्वास घेत प्राणला सांगतो की बंदुक खेत मे नही है. रसरंग मासिकात मी वाचले आहे की हा सीन वठवण्यासाठी दिलिपकुमार दोन किलोमिटर जोरात पळाला होता. हे सारे धाप लागलेले प्रभावीपणे चित्रित व्हावे म्हणून. त्याची भूमिकेशी कमिटमेंट जबरदस्त होती.
८) त्याची स्वतःची फिल्म प्रॉडक्शन कंपनी होती जिचे नाव सिटीझन्स फिल्म्स असे होते. याच कंपनीने गंगा जमुना हा चित्रपट काढला होता.
९) त्यांच्या सुपर अॅक्टींग बद्दल बोलणेच नको. एकच किस्सा सांगतो. मधुमती या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित केलेले गाणे आहे ज्याचे बोल आहेत
"टूटे हुये ख्वाबोने, हमको ये सिखाया है
दिलने जिसे पाया था आखोंने गवाया है.
या गाण्यात दिलिपकुमार एका मोठया दगडावर बसलेला आहे. हावभाव कांहीही नाहीत. फक्त कपाळावरची एक शीर फडफडत असते जी सारी घालमेल सांगून जाते.
१०) त्यांच्या आयुष्यात बर्याच स्त्रिया येवून गेल्या. ते मधुबालात गुंतले होते. हे नाते सात वर्षे टिकले. गंगा जमुनाच्यावेळी त्यांची केमिस्ट्री वैजयंतीमाला बरोबर पण जुळली होती असे बोलले जाते. ते तिच्या ड्रेस आणि साडीचा शेड पण शुटींगसाठी निवडत असत. आसमा साहिबांशी १९८१ मधे लग्न केले. १९८६ मधे त्यांनी साइरा बानूशी लग्न केले. हे लग्न शेवटपर्यंत टिकले.
असा हा थोडक्यात गोषवारा एका झंझावाती आयुष्याचा. लिहावे तर किती लिहावे! एवढ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला बॉलीवुडचा हिमालय म्हणू नये तर काय म्हणावे?
दिलिपकुमर यांची खासियत म्हणजे लोक नृत्य. याची एक झलक दाखवण्यासाठी गंगा जमुनातील एका गाण्याची लिंक देतोय खाली. वाजवून बघणे. न वाजल्यास यूट्यूब वरून ऐकणे. क्लिक करा:
https://www.youtube.com/watch?v=ya5h0g39UvI
निशिकांत देश्पांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
{१९८६ मधे त्यांनी साइरा
{१९८६ मधे त्यांनी साइरा बानूशी लग्न केले. हे लग्न शेवटपर्यंत टिकले}
१९६६..
उत्तम मृत्यूलेख.
उत्तम मृत्यूलेख.
छान माहीती मिळाली
छान माहीती मिळाली