अंधार---( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 1 May, 2021 - 11:58

अंधार-- ( वीक एंड लिखाण--०२. ०५. २०२१)
कांही दिवसांपूर्वी करोनाने बाधित झाल्यामुळे यासदराखाली   लिखाण होऊ शकले नाही.  आज मागे वळून विचार करताना माझे मलाच खूप हसू येते.    
सखीला प्रकाशाची कमतरता पडू नये म्हणून मी तिला म्हणतो की मी अंधाराला बांध बांधला आहे किंवा अंधाराशी करेन दोस्ती किंवा सूर्य कटोरी घेउन हाती, अंधाराची भीक मागतो असे अंधाराचे उदात्तिकरण करत स्वत:ला एक अवलिया/कलंदर कवी माणनारा मी, जेंव्हा बाका प्रसंग येऊन उभा राहिला तेंव्हा माझी छबी मला वेगळीच दिसली. मी या नवीन दर्शनाने भांबाऊनच गेलो. जिकडे तिकडे दवाखान्यात दाखल केल्यापासून किर्र अंधारच दिसत होता. नैराश्याने आशावादावर मात केलेली बघत होतो. हा काळ मी कधीही विसरणार नाही. निराशेचे झुंड घोळक्याने येत होते आणि आशेची पणती या वादळात विझेल याची मनात सदैव होती.
तब्बल नऊ दिवस अशा भयानक अवस्थेत दवाखान्यात काढले. मला दवाखान्यात दाखल करतानाच जिवाची घालमेल सुरू झाली. जो काळ तेथे विलाजासाठी रहाणे अवश्यक होते तो एक लांबच लांब अंधाराचा बोगदा वाटू लागला आणि या टनेलच्या शेवटी कुठेही प्रकाश किरण दिसेना.  दवाखान्यात दाखल व्हायच्या आदलेदिवशी मी माझ्या सर्व चाहत्यांना माहितीसठी एक पोस्ट टाकली.
जेंव्हा माझा अज्ञातवास संपला आणि मी घरी आलो त्या दिवशी एकदम हायसे वाटले. आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी सायंकाळी घरी आलो त्यादिवशीच माझ्या प्रकृतीत अमुलाग्र सुधारणा दिसली आणि माझ्या आनंदास पारावार उरला नाही. चार पाच दिवस आराम करून मी ऑनलाईन गेलो तर माझ्या मित्र मैत्रिणींच्या सदिछ्चांचा धो धो पाऊस पडून गेला होता.आता मला एकदम पालटलेले चित्र दिसत होते. एकीकडे अंधाराचा माझ्यावर होत असलेला  हल्ला तर दुसरीकडे  सदिच्छांची माझ्या बाजूने असलेली त्सुनामी आणि डॉक्टर लोकांचे अथक परिश्रम. या तुंबळ लढाईत विजय शेवटी प्रकाशाचाच झाला आणि मी आपल्यासमोर या सदराखाली लिहिण्यास खडखडीत तंदुरुस्त उभा आहे.
पण ज्या दिवशी अ‍ॅड्मिट व्हायचे होते त्या दिवशीची माझी मनोव्यथा दर्शवणारी एक रचना माझ्याकडून लिहिली गेली जी मी पोस्ट नाही करू शकलो. ती रचना खाली माझ्या चाहत्यांसाठी देत आहे. कविता पूर्ण झाल्यावर टाईप करताना पुन्हा मनात आले की नकारात्मकता हा माझा गुणधर्म नाही. म्हणून शेवटचे कडवे वाढवून पॉझिटिव्ह लँडिंग केले या रचनेचे. शेवटी मला पण माझा डीएनए बदलणे जमूच शकत नाही. ही भूमिका सांगणारी ही कविता.---

कविता आता रचेन म्हणतो

प्रकाश मागे सोडुन पुढती निघेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो
 
प्रतिबिंबाला आरशातल्या वेध लागले
ग्रहण लागण्या वेळ! तरीही चित्त गोठले
राहू केतू संगे दोस्ती करेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

डोळे मिटुनी बसेन मजला आत बघाया
आत्म परिक्षण केले नाही गेलो वाया
काळोखातच कोठे आहे? बघेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

जुनी जळमटे आठवणींची मिटवायाला
काळोखाचे रंग लागलो उधळायाला
एक काजवा कुणाचा तरी बनेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

हृदयाच्या ठोक्यांनाही पण कळून चुकले
हिशोब करतो श्वास संपले, किती राहिले
वजावटी अन्  बेरजातुनी सुटेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

पिंड असावा बंडखोर हे तत्व पाळले
किती संकटे आली गेली ना जुमानले
झोपडीतही दरबारी आळवेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

गोंधळलेले मनही हल्ली विचार करते
अस्तित्वाविन अंधाराचे असणे असते
प्रकाश नसण्यालाच जमाना तम का म्हणतो?
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३  

Group content visibility: 
Public - accessible to all site users