औरंगाबाद एअरपोर्ट वरून घरी जाताना स्नेहानी रजतला सुखरूप पोचल्याचं कळवलं. श्रद्धा तेव्हा कॉलेजमधे गेली होती त्यामुळे रात्री पुन्हा सविस्तर फोन करायचं ठरलं.
तसंही रजत नेहेमी फोनवर फक्त कामापुरतंच बोलायचा. या बाबतीत त्याचे विचार अगदी स्पष्ट होते....'फोन हा ख्याली खुशाली कळावी म्हणून आणि अगदी महत्वाचे निरोप देण्यासाठी म्हणून वापरायचा असतो...उगीच तास न् तास गप्पा मारण्यासाठी नसतो.' यावरून सुरुवातीला एक दोन वेळा त्याच्यात आणि स्नेहामधे अगदी वादविवाद म्हणता येईल इतकी गहन चर्चा पण झाली होती.
सुरुवातीला जेव्हा रजत बाहेरगावी जायचा तेव्हा स्नेहाला त्याची खूप काळजी वाटायची.... तिकडचं जेवण कसं असेल, हॉटेलची रूम comfortable असेल ना, त्याचे कपडे नीट प्रेस करून मिळत असतील ना, त्याचं काम सुरळीत चालू असेल ना... हजार प्रश्न असायचे तिच्या मनात... पण रजत मात्र फक्त 'हो','नाही' अशी एकाक्षरी उत्तरं द्यायचा ... आणि जर कधी स्नेहाची प्रश्नावली लांबतीये असं वाटलं तर सरळ " घरी आलो की सविस्तर सांगीन"- असं म्हणून मोकळा व्हायचा. त्यामुळे आता स्नेहालाही तीच सवय लागली होती.
रात्री श्रद्धानी मात्र खूप वेळ गप्पा मारल्या. अगदी क्षणाक्षणाचा वृत्तांत घेतला स्नेहाकडून आणि तिच्या आणि रजतच्या पूर्ण दिवसाची खबरबात पण अगदी सविस्तर सांगितली. स्नेहा येणार म्हणून तिचे आई बाबा पण चार पाच दिवसांसाठी तिच्या सासरी आले होते राहायला..त्यामुळे दोन्ही आज्या आणि दोन्ही आजोबांशी पण श्रद्धाच्या गप्पा झाल्या...'आई नसताना मी किती छान मॅनेज करतीये बघा' हे वाक्य तिनी प्रत्येकाला ऐकवलं. फोनवर बोलणं झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ सगळे गप्पा मारत बसले होते...विषय एकच- 'श्रद्धा आणि तिच्या आठवणी'!! दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचं होतं म्हणून स्नेहा मात्र गप्पा मधेच सोडून झोपायला निघून गेली.
Reunion चे ते दोन दिवस कसे आणि कधी संपले ते स्नेहाला कळलंच नाही. त्यांच्या ग्रुप मधले काही जण वगळता त्यांच्या बारावीच्या वर्गातले बाकी सगळे मित्र मैत्रिणी आले होते... तीस चाळीस जण तर नक्कीच असतील. सगळ्यांना भेटायच्या आधी स्नेहाच्या मनात थोडी धास्ती होती...आणि ते साहजिकच होतं ...कारण काही जणांना तर ती तब्बल पंचवीस वर्षांनंतर भेटणार होती. इतक्या वर्षांत बऱ्याचदा लोकांचे स्वभाव बदलतात, त्यांच्या आयुष्याच्या, मैत्रीच्या कल्पनाही बदलतात. पण जेव्हा ती सगळ्यांना भेटली तेव्हा तिला जाणवलं की तिच्या मनातली ती धास्ती अनाठायी होती. सुरुवातीच्या Hi, Hello सारख्या formalities नंतर हळूहळू सगळं वातावरण इतकं खेळकर होऊन गेलं.... लवकरच सगळे त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत जाऊन पोचले. एकमेकांची थट्टा मस्करी सुरू झाली ; हास्य विनोदाच्या फैरी झडायला लागल्या. स्नेहाला पण खूप छान वाटत होतं. पण त्या सगळ्या गर्दीत तिची नजर मात्र सलीलला शोधत होती. त्या सकाळी जेव्हा स्नेहानी त्याला व्हॉट्सऍप वर मेसेज करून विचारलं होतं तेव्हा तर तो म्हणाला होता की 'नक्की येईन' म्हणून ... 'पण इतका वेळ झाला तरी अजून कसा नाही आला? विचारू का त्याला मेसेज करून ?' स्नेहानी पर्स मधून फोन काढला. 'नको, राहू दे... उगीच त्याला वाटेल की मी त्याला मिस करतीये की काय! नसते गैरसमज नको व्हायला,' असा विचार करत तिनी फोन परत आत टाकला. पण तिनी जरी सलीलला कळू दिलं नसलं तरी तिला स्वतःला सत्य माहीत होतं... ती खरंच सलीलला मिस करत होती.
एकीकडे इतर मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत असताना तिच्या मनात मात्र खूपच गोंधळ उडाला होता. 'कालपासून हे काय झालंय मला ? सारखे सलीलचे विचार, त्याची आठवण !! आठवणींमधे खूप शक्ती असते असं म्हणतात... एखाद्या स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाला जर त्याच्या भूतकाळातल्या काही घटनांची आठवण करून द्यायची असेल तर त्याला प्रत्यक्ष त्या घटनास्थळी नेतात, तेव्हाची परिस्थिती पुन्हा निर्माण करतात- असं ऐकलं होतं मी ... माझ्या बाबतीत पण तसंच काहीसं झालं आहे का? इतकी वर्षं मी सलीलच्या ज्या आठवणी खूप खोल दडवून ठेवल्या होत्या त्या आता पुन्हा उफाळून वर येतायत का? तेव्हाचे मित्र मैत्रिणी, तेव्हाच्या गप्पा गोष्टी, तीच जागा .... सगळं काही अगदी तेच ... तसंच ! त्यामुळेच माझं मन पण आता तेव्हासारखाच विचार करायला लागलंय का?'
स्नेहा आपल्या विचारांत इतकी मग्न झाली होती की अजय तिच्यासमोर उभा राहून तिला काहीतरी विचारत होता हेही लक्षात नाही आलं तिच्या ! शेवटी तिच्या चेहेऱ्यासमोरून हात फिरवत तो म्हणाला," अगं ए स्नेहा...कुठे हरवलीयेस ? मी काय विचारतोय तिकडे लक्षच नाहीये तुझं. एवढी कोणाची आठवण येतीये ....नवऱ्याची की काय ?" त्याच्या या वाक्यावर आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्यांनी स्नेहाला रजतवरून चिडवायला सुरुवात केली. अजयचं बोलणं ऐकून स्नेहाला खूप ओशाळल्यासारखं झालं...जणू काही तिची चोरी पकडली गेली होती...उगीच काहीतरी कारण सांगून तिनी वेळ मारून नेली आणि अजयला विचारलं," माझं सोड पण मला एक सांग.. तू तर म्हणाला होतास की सगळी गँग येणार आहे म्हणून ; पण अजून काही जण यायचे आहेत.. " तिनी जरी स्पष्टपणे सलीलचं नाव घेतलं नसलं तरी तिच्या प्रश्नाचा रोख त्याच दिशेनी होता ! आणि हे इतरांना कळू नये म्हणून तिचा प्रयत्न चालू होता. अजय काही बोलणार इतक्यात सलील येताना दिसला. त्याला बघताच स्नेहाला मनातून खूप बरं वाटलं.
तो संपूर्ण दिवस सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तेवढ्या वेळापुरते सगळेच आपलं वय, आपलं काम, आपल्या जबाबदाऱ्या सगळं काही विसरून गेले होते. जणू काही मधली पंचवीस वर्षं अचानक हवेत विरून गेली होती. सगळ्यांना असं वाटत होतं की नुकतीच बारावीची परीक्षा संपलीये आणि सगळे farewell पार्टीसाठी एकत्र जमलेत. अंताक्षरी, dumb charades वगैरे खेळून झाल्यावर एक खूप मोठ्ठं फोटो सेशन झालं सगळ्यांचं. त्या दिवशी कॉलेजचं कॅन्टीन अगदी दणाणून सोडलं होतं सगळ्यांनी.... अजयला या सगळ्याची कल्पना होतीच आणि म्हणूनच यासाठी त्यानी रविवारचा दिवस निवडला होता....म्हणजे त्यांच्या दंगामस्ती मधे कोणाचा व्यत्यय नको आणि त्यांच्यामुळे इतर कोणाला त्रासही व्हायला नको...
स्नेहाला बऱ्याच वर्षांनंतर आज असं मोकळं, निर्बंध, स्वच्छंदी वाटत होतं.आज ती रजतची बायको नव्हती ; श्रद्धाची आई नव्हती.... आज ती फक्त स्नेहा होती. आणि तिचा तो आनंद, ते समाधान तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तिच्या निखळ हसण्यातून पाझरत होतं. तिचा तो निरागस चेहेरा सलीलचं लक्ष वेधून घेत होता....अगदी त्यानी कितीही रोखायचा प्रयत्न केला तरी त्याला न जुमानता त्याची नजर वारंवार स्नेहाच्या नजरेचा ठाव घ्यायचा प्रयत्न करत होती .
क्रमशः