प्रतिजैविके :--समज आणि गैरसमज.

Submitted by सुबोध खरे on 21 February, 2020 - 01:10

प्रतिजैविके :-- समज आणि गैरसमज.

सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?

सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ.

यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.

यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.

या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव

जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी किंवा जिवाणूंनी इतर जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.

यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.

जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.

१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.

२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.

दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.

काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
पाळी पुढे ढकलण्यासाठी वहिनीला दिलेली औषधे डॉक्टरांना न विचारता घेतली आणि नंतर पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे आलेल्या महिलेला तुम्ही "गरोदर आहात" त्यामुळे पाळी अली नाही हे सांगितल्यावर धक्का बसला. अर्थात तिला गर्भपात करून घेण्याची पुढची कटकट आणि खर्च आलाच.

दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.

३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.

४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.

५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.

६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.

७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते.

दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो.

अशीच स्थिती क्षयरोगाच्या रुग्णात दिसते. सुरुवातीला औषधे घेतल्यामुळे क्षयरोगाचे जंतू मोठ्या प्रमाणावर मरतात आणि त्यांचे विष शरीरभर पसरते. यामुळे रुग्णाची भूक जाते जेवण पचत नाही आणि त्याचे वजनही कमी होते. यामुळे अनेक रुग्ण विशेषतः हातावर पोट असणारे आणि शारीरिक कष्टाचे काम करणारे रुग्ण औषध सोडून देतात. यामुळे रोग बरा तर होत नाहीच परंतु शरीरात शिल्लक राहिलेले क्षयरोगाचे जंतू या प्रतिजैविकाला जुमानेनासे होतात( antibiotic resistant)

या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.

८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.

काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?

"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.

९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात केवळ "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही.

याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.

यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"

मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1

१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.

प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे

१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते

२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.

३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.

४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.

प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही.
बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते. त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात.
माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चा ही झाली आहे. केवळ त्याचे वैयक्तिक मत.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो.
तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की.

प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो.

जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने.

या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले.

जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली.

कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो.
ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो.

सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही.

दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे.
नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात.

मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो.

मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग औषध घ्या अथवा घेऊ नका. सर्दी खोकल्यासारखे अनेक साधे आजार घरगुती उपचारांनी बरे होतातच आणि सुरुवातीला तसेच करावे असाच मी आग्रह धरेन.

बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच.
शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल.

आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे?

१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.

बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे.

हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉ. अरुण समसी सारखा अपवादात्मक एखादा आधुनिक शास्त्राचा डॉक्टर होमिओपॅथीचा व्यवसाय करतो ही बातमी होते.

परंतु 70-80 टक्के होमिओपॅथीचे डॉक्टरआपल्या शास्त्राची औषधे देण्याऐवजी आधुनिक औषधेच का देतात याचे कारण आपण सांगाल का?

योग्य लिखाण डॉक्टर !

इतर पॅथी बद्दल राग यासाठी योग्य की त्यांनी त्यांचे लिमिट ओळखायला हवे. पेशंट ला फसवणे थांबवायला हवे.
या निमित्ताने माधव बाग या हृदय रोगावर आयुर्वेदिक उपचार देणाऱ्या कंपनीचा अनुभव आठवला. लाख रुपये आणि वर्ष जाऊन फक्त चुना लागला , आणि प्लास्टी वर भागले असते नंतर बायपास करावी लागली .

तेव्हा पासून अशा लोकांच्या बाबतीत कानाला खडा !

मुतखडा चे ही तेच आहे, MBBS सांगतो 2/3mm खडा पडु शकतो, पाणी प्या . तोच खडा आयुर्वेदिक औषधाने पडला की वैद्य पाठ थोपटून घेतात.

प्रतिजैविक चा परिणाम कमी होण्यासाठी लोकांचा पाच दिवसांपैकी 3 दिवसाची औषधे द्या , फरक पडला तर थांबवू नाही फरक पडला तर 3 दिवसांनी अजून स्ट्रॉंग औषधे घेऊ हा स्वभाव कारणीभूत आहे.

आर्यन कितवे खोटे नाव माहीत नाही.
पण एक लक्षात ठेव अनुभवातून आलेलं
ज्ञान हेच खरे.
>> राजू तूला असे म्हणायचं आहे की एमबीबीएस डॉक्टर चार वर्षे व इंटर्नशिप करताना अनुभव घेत नाहीत? फक्त थियरी शिकतात?
जरा डोळे उघडून आजूबाजूला बघत जा हो.

क्षयरोगाचे उपचार घेत असताना किती काळ औषधे बंद केली तर बॅक्टरीया ड्रग रेसिस्टंट होऊ शकतात?

असे नक्की सांगता येत नाही , पण दोन महिन्यापेक्षा जास्त गेप असेल तर पुन्हा एकदा टेस्ट करून बघायची , तशीही टेस्ट फुकटच असते. स्पुटम सी बी नाट

बकीचे टी बी असेल उदा गाठ , पाठ, मेंदू , छातीत पाणी वगैरे , तर इतर टेस्ट करून किंवा टी बी एक्सपर्ट एडवाइस देतात , तसे करावे,

टी बी म्हणजे कर्ज असते , डोस चुकले की खाते एन पी ए त जाते ( आमचे लोक असे सांगतात)

मलेरिया चा मला अनुभव आहे मध्येच कोर्स सोडल्या मुळे काही दिवसांनी परत मलेरिया झाला.
आणि खूप खतरनाक अवस्था झाली .
मला तर वाटायला लागलं होते आता काही जगत नाही.

सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही.

मुंबई मधील एक प्रसिद्ध डॉक्टर हेच सांगायचे पालकांना.
नवीन आलेल्या लोकांसाठी पाहिले ते लेक्चर द्यायचे त्यांना वेळ नसेल तर रेकॉर्डेड ऐकवलं जायचं.
मुलांना लगेच औषध देवू नका वाट बघा त्याच्या शरीराला प्रतिकार करू ध्या.

चांगला लेख!
Antibiotics बरोबर antacids का घ्यायची याचं कारण प्रतिजैविकांमुळे आपल्या शरीरातले (विशेषतः पोटातले) चांगले जीवाणू (gut microflora) नष्ट होतात. त्यामुळे अन्न पचनावर परिणाम होऊन acidity वाढू शकते असं असावं असं मला वाटत होते. म्हणून antibiotics चा कोर्स सुरू असताना antacids, बी काँप्लेक्सच्या गोळ्या, probiotics आणि जेवणात दह्याचा समावेश असावा असे म्हणतात. हे चुकीचं आहे का?

खरं? काय नाव त्या डॉक्टरांचं? नाव सांगायला लाजू नका राजू.

Submitted by आर्यन वाळुंज on 22 February, 2020 - 02:25.
ह्या आयडी च अवतार कार्य संपलं आहे.
पण हा आयडी ह्या वेळेस जास्त दिवस टिकला.
आता नवीन कोणत्या नावाने आयडी बनवायचा त्याच्या तयारीला लागा
वेळ खूप कमी आहे.
Myboli च्या प्रशासकांनी परत लाथ मारून हकलयची योजना पूर्ण केली आहे.
फक्त वेळ ठरली की झाले

नाव घ्या ना गडे! लाजता कशाला? सगळी आपलीच लोक आहेत.

आता तुमच्या पुढच्या आयडी चा जन्म स्त्री रुपात असणार असा अंदाज आहे

अतिशय आवडला लेख. खूप छान माहिती. आणि आधुनिक वैद्यकाच्या सर्व मर्यादा, औषध कंपन्या आणि डॉ. यांच साटंलोटं , हे लक्षात घेऊनही इतर पॅथींबद्दल ची स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ मतं आवडली. शक्यतो वाद / निरर्थक बाचाबाची नको म्हणून अधुनिक डॉ. तो विषय टाळतात. पण प्लासिबो
इफेक्ट , शरीराची स्वतःची प्रतिकारक्षमता याच्या जीवावर जो फ्रॉड चालतो त्यावर डोळ्यात अंजन घालणे आवश्यक आहे. इतर पॅथी वाईट आहेत अशातला भाग नाही, पण त्यातल्या मर्यादांच आकलन आणि संशोधन याबाबत तोकड्या आहेत. कुठलाही अभिनिवेश न ठेवता त्यात कसोटीवर उतरणारं संशोधन झालं तर किती चांग्लं होईल. ( अशा फ्रॉड चा मी स्वतः जवळून अनुभव घेतला आहे. पण घरच्यां च्या अतिरिक्त प्रेशर मुळॅ आणि ऑलरेडी आजारपण आणि भिडस्त स्वभावामुळे यामुळे फार सहन करावे लागले आहे . उशीरा गुण येतो म्हणून नक्की किती वेळ वाट पहाय्ची, नंतर अ‍ॅलोपाथीचे औषध चालू असताना परत या औषधाची गरज काय, परिणाम कसा कळणार इ. प्रश्न अगदी प्रंजळपणे , न दुखवता विचारल्यावर सुद्धा घरातून आणि घरच्या नातेवाईक डॉ. कडून उत्तरं तर नाहीच पण अतिशय वाईट वागणूक मिळाली. ). लोकांच्या (बुद्धी गहाण ठेवून) दुखावणार्‍या भावना या विषाणू/जीवाणू इतक्याच घातक आहेत आणि त्यावर खरेतर प्रभावी उपायाची गरज आहे. (Inception सिनेमाची आठवण आली!)

राजेश, तुम्ही गैरसमज पसरवण्याची क्लासिक देसी केस आहात. समजुन सुधारण्यासारखे वाटत नाही. सो अपने हाल पे सुखी रहा.
>>> राजेश भाऊ राग मानू नका पणा हा सल्ला अमलात आणा. काहीही लिहिण्याआधी विचार करा. स्वत:ला प्रश्न विचारा. आपली माहिती तपासून पहा. रेटून बोलण्याऐवजी अभ्यास करून बोला.

>> राजेश भाऊ राग मानू नका पणा हा सल्ला अमलात आणा. काहीही लिहिण्याआधी विचार करा. स्वत:ला प्रश्न विचारा. आपली माहिती तपासून पहा. रेटून बोलण्याऐवजी अभ्यास करून बोला.
आर्यन भावूं
तुमच्या मताचा आदर आहे.
पण एक विनंती आहे पुढल्या आयडी चे नाव सोप आणि सुटसुटीत ठेवा

राजेश भाऊ कृपया अॅडमीन यांचा विपू पहा.
बघितल्या.
विविध अवतारात तुम्ही आमच्या खूप चुगल्या केल्या आहेत
अडमिन कडे.
पण तुमच्या आरोपात काहीच तथ्य नसल्या मुळे आणि मुळातच असलेला तुमचा खोडसाळ स्वभाव स्वस्थ बसू देत नसल्यामुळे तुम्ही तक्रारी करत आहात.
आणि त्या मुळेच तुमच्या वरच कारवाई होत आहे हे तुमच्या आता पर्यंत लक्षात यायला हवं होते.

बरं मी इथेच थांबतो. उगाच चांगल्या धाग्यावर असली चर्चा नको. तूम्ही नरमले हेच खूप झाले.

लेख खूप आवडला. अत्यंत माहितीपूर्ण आहे. अत्यंत परखड व रोखठोक लिखाण. वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यवसायिकांची नावे थेट घेतल्याने मायबोलीवर हा लेख दीर्घकाळ राहील कि नाही याबद्दल शंका वाटते. पण हे कुणीतरी लिहिणे आवश्यकच होते. ते एक डॉक्टर तांबे म्हणून आहेत त्यांचा उल्लेख राहून गेला बहुतेक या लेखात. "घरचा डॉक्टर" नावाची एका प्रसिद्ध दैनिकाची अख्खी पुरवणी गेली कित्येक वर्षे यांनी आयुर्वेदाच्या नावाखाली हायजॅक केली आहे. जे चार चौघांना माहित असते तेच ज्ञान अध्ये मध्ये संस्कृत सुभाषिते टाकून फार मोठे वैद्यकीय तत्व सांगितल्याच्या अविर्भावात हे लिहित असतात. शिसारी येऊन अखेर या दैनिकाचे सबस्क्रीप्शनच मी बंद केले. मुळात आयुर्वेदाचे वैद्य स्वत:च्या नावामागे डॉक्टर हा शब्द का जोडतात हेच कळत नाही. आयुर्वेदात त्यांच्यासाठी वैद्य हि पदवी आहे.

ऍलोपॅथी हि आयुर्वेद आणि होमिओपॅथीचा पुढचा टप्पा म्हणूनच विकसित झाली आहे असे वाचले आहे. "बाराव्या शतकानंतर वाढ खुंटलेले.." हि माहिती मनोमन पटली.

आपण यापुढेही असे लेख लिहित रहाल हि अपेक्षा. धन्यवाद.

जिवाणू ना आणि विषाणू ना प्रतिकार करायची प्रतेक व्यक्तीच्या शरीराची ताकत वेग वेगळी असते.
डास चावला म्हणून प्रत्येकालाच मलेरिया होत नाही.
डोळे येणे ह्याला सुद्धा जिवाणू च कारणीभूत असतात असे ऐकलं आहे.
पण मला जसे समजतंय तसे एकदा सुद्धा माझे डोळे आले नाहीत.
मुंबई मध्ये एक वर्षी डोळे येण्याची साथ आली होती आणि बहुतेक सर्वांचे डोळे आले होते तेव्हा सुधा माझ्या वर ह्या साथीचा काहीच परिणाम झाला नाही.

वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यवसायिकांची नावे थेट घेतल्याने मायबोलीवर हा लेख दीर्घकाळ राहील कि नाही याबद्दल शंका वाटते. पण हे कुणीतरी लिहिणे आवश्यकच होते. ते एक डॉक्टर तांबे म्हणून आहेत त्यांचा उल्लेख राहून गेला बहुतेक या लेखात.

त्या प्रख्यात वैद्यकीय व्यवसायिकांबद्दल मला कोणताही वैयक्तिक अनुभव नाही परंतु मी केलेल्या मर्यादित चाचण्यात मला आलेला अनुभव मी लिहिलेला आहे. लोकांचा अनुभव वेगळा असू शकतो.
श्री बालाजी तांबे यांच्या उपचाराबद्दल मला काहीही माहिती नाही. ते एक प्रशिक्षित इंजिनियर आहेत आणि त्यांची बहीण आमच्या शेजारी राहते आणि आईची चांगली मैत्रीण असल्यामुळे ते एकदा आमच्या घरी येऊन गेले एवढे सोडले तर आला त्यांच्या बद्दल काहीही माहिती नाही. पण या माहितीचा या धाग्याशी काहीच संबंध नाही.

प्रतिजैविकांबरोबर जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात याचे कारण त्या गोळ्या आपल्या शरीराची चयापचय सुधारून आपल्याला रोगातून आणि अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यास मदत करतात.
Antacid च्या गोळ्या देण्याचे असे काही कारण नाही.
काही प्रतिजैविकांमुळे आतड्यातील दुर्गुणी बरोबर सगुणी जंतू सुद्धा म्हणजे मारले जातात यामुळे त्या बरोबर ताक दही खाणे( यातील लॅक्टोबॅसिलस जे जंतू आतड्यातील उपकारक जंतूनपैकी एक आहेत) हे उपयुक्त ठरते.

ताक दही खाण्याऐवजी प्रो बायोटिक गोळ्या घेणे कसे मॉडर्न वाटते पण परिणाम तोच होतो.

Pages