हैदराबाद- महिला अत्याचार मानसिकता.

Submitted by प्रशि_क on 1 December, 2019 - 00:01

नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.

मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.

काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.

एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.

कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.

पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.

तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.

Group content visibility: 
Use group defaults

बरोबर भरत. वकील न मिळणे, वकिलांवर त्यांची केस लढू नये म्हणून दबाव आणणे/त्यांना ट्रोल करणे चुकीचे आहे.

अशा केसेस फास्ट ट्रॅकवर चालवाव्यात, जास्तीत जास्त सहा महिन्यात तडीस न्याव्यात.

आरिफ म्हणून जो आरोपी आहे तो 2 वर्ष
विना परवाना ट्रक चालवत होता.
आणि बलात्कार होण्याची आदी 2 दिवस त्याला पोलिस नी अटक केली होती .
विना परवाना च्या गुन्ह्यात.
मी माझ्या अगोदरच्या पोस्ट मध्ये विचार व्यक्त केला होता .
छोटे छोटे गुन्हे करणारे च मोठे गुन्हे करतात.
वारंवार नियमभंग करणारे,कायदे मोडणारे जी लोक असतात त्यांच्या वर सुरवातीला च कडक कारवाई करून जेरबंद करून ठेवले पाहिजे .
मोठा गुन्हा होण्याची वाट बघण्यात अर्थ नाही.
बलात्कारी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे पुरुष असतात .
कायदे पाळणारे सभ्य पुरुष बलात्कार करत नाहीत ..मग किती एकांत मिळाला तरी

निर्भया प्रकरणापासून सुरु असलेल्या ह्या चक्रात आजपर्यंत अनेकदा बलात्कार घडलेय पण समाजाने मेणबत्त्या जाळण्याशिवाय काय केले अद्यापही निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी का झाली नाही माणसात मुळातच सैतान लपलेला असतो आणि कधीकधी तो अशा निच पातळीवर उतरतो पण मला वाटते की इंटरनेट वर असलेल्या काही सेक्सी साठीही याला कारणीभूत आहेत त्यावर त्वरित बंदी घातली पाहिजे. इतकेच नाही तर गुन्हेगारांना ताबडतोब फाशी आणि तीही भरचौकात दिली पाहिजे या गुन्ह्यांसाठी सौदी राष्ट्राची न्याय व्यवस्था लागु करुन गुन्हेगारांना तीन महिन्यांत फाशी दिली तर समाजात कायद्याची भीती निर्माण होईल.

कठोर शासन होत नाही हे माहीत असल्यामुळे गुन्हेगारी मानसिकता वाढतेय असे वाटते. कायद्यात सुधारणा करून गुन्ह्याना कठोरात कठोर शासन व्हायला हवे.

Haydrabad मधील आरोपी नी जनतेच्या हवाली करावे अशी मागणी जया bachhan नी लोकसभेत केली.
अशी प्रतिक्रिया सामान्य व्यक्ती नी दिली तर समजू शकतो पण लोकसभेत प्रतिनिधी असणाऱ्या जबाबदारी व्यक्ती नी करणे म्हणजे दुर्दैवच आहे.
आरोपी ना कडक शिक्षा होणे अती गरजेचं आहे,त्यांचा गुन्हा अत्यंत क्रूर आहे ह्या बाबत कोणतेच दुमत नाही.
पण कायद्या नी .
दोन्ही बाजू कोर्टात ऐकून घेतल्या नंतर.
त्या साठी पोलिस नी आणि जनतेनी भक्कम पुरावे सादर करावेत .
कसलीच शह निशा न घेता सजा देण्याची पद्धत कायद्या chya राज्यात चालत नाही ते कायद्या chya राज्याच्या च मुळावर येईल ह्याचे भान नक्की असावे.
आपल्या न्याय यंत्रणा आणि पोलिस खाते ह्या मध्ये त्रुटी आहेत .
त्या मध्ये बदल करून सक्षम आणि संवेदनशील यंत्रणा उभी करणे हाच योग्य उपाय आहे.
जनतेनी च गुन्हेगार न शिक्षा द्यावे अशी भावना निर्माण होणे हा सर्वात मोठा पुरावा आहे आपल्या यंत्रणा कुचकामी असल्याच्या

<< ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. >>

----- अत्यंत चिड आणणारी घटना आहे... Angry
त्या तरुणीला झालेल्या शारिरीक त्रासाची, यातनांची कल्पनाही करवत नाही. अपराध्यांना लवकरात लवकर कायदेशीर मार्गाने कठोरात कठोर शिक्षा व्हावी. अनेक अडचणी आहेत, आणि न्याय यंत्रणा, तपास यंत्रणेची परिक्षा आहे.

<<< अजनबी यांनी लिहलेले अगदी चपखल आहे ,राजेश यांचेही. झोपडपट्टि छाप ,रानगट , व्यसनी लोकांपासुन महिलांनी जपूनच रहावे. असे लोक जनरली ब्लू कॉलर कामं करत असतात व जात्याच गुन्हेगारी वृत्तीची असतात. अमेरीकेतही असलेच लोक गुन्हेगार्या करत असतात. शहरांच्या आजूबाजूला पसरलेल्या झोपडपट्ट्या गलिच्छ वस्त्यांमध्ये असले किडे पडीक असतात. अश्या एरीयात पोलिस चौक्या वाढवाव्यात ,सिसिटीव्ही नेटवर्क वाढवावे. >>

------ महिलांनी प्रत्येकापासूनच सावध रहायला हवे... असले गुन्हे केवळ झोपडपट्टीवालेच करतात या भ्रमात रहू नका. पण ते जेव्हा करतात तेव्हाच चर्चा जास्त होते आणि त्यांचे अपराध अत्यंत ठळकपणे दिसतात.

समाजांत "मानाचा " दर्जा असणारे, मोठा हुद्दा, श्रीमंत, आणि बहुतेक प्रकरणांत जवळचे नातलग / परिचयाचे लोक पण अत्याचार करतात. बहुतेक अत्याचारांच्या घटणांत त्यांचेच प्रमाण जास्त असते... अत्याचार करणारी व्यक्ती निर्व्यसनी पण असू शकते. पण ९० % घटनांत कुठेही चर्चा होत नाही, तक्रार नोंदवली जात नाही.... तक्रार नोंदवायला गेल्यावर पोलिस दखल घेतातच असेही नाही (उनावची घटना.... वडिलांना प्राणाची जबर किंमत मोजावी लागली साध्या FIR साठी... ). परिचयातल्या व्यक्तीने केलेल्या अत्याचारांची तेव्हढी चर्चा होत नाही. अनेक अनेक कारणांनी प्रकरण दडपण्याकडे कल असतो. Sad

महिलांनी/ स्त्रीने प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक व्यक्तीपासून सावध रहायचे... जे आपल्या हातामधे सहज आहे ते करत रहायचे. सावधगिरीचे अनेक उपाय निर्भया नंतर अनेकांनी मांडले होते.... ते आजही उपयोगाचे आहेत.

विकृत व्यक्ती , समाजाच्या कुठल्याही हुद्द्यावर, कुठल्याही स्थळी, कुठल्याही रुपात असु शकते. फक्त झोपडपट्टी मध्येच असते असे नाही. इथेच आंतरजालावर सापडतात.
बर्‍याच वर्षापुर्वी बातमी एकलेली आमच्या ओळखीतल्या शिक्षिकेने सांगितलेली, तिची बदली गावात होती. तिने नोकरी सोडली कारण तिच्याच शाळेतील , मुख्याधापकने एका विध्याद्र्थीनीवर सतत ५ वर्षे लैंगिक छळ केला होता, आणि हो गावातीलच होता. खालच्या जातीतली मुलगी त्यामुळे काहीच पॉवर नसते हो त्यांना असे दुर्दैवाने त्या म्हणत होत्या. तेव्हा गावात होत नाही, शहरात होते असे सुद्धा नाही.

कॉलेज मुलामुलींच्या ग्रुपमध्ये अशा घटनांवर चर्चा कशा पद्धतीने होते हे जाणून घ्यायचं आहे.

अशा घटनांना अंत नाही, भारतातील महिला सुरक्षित आहेत का, अनेक वेळा न्यायाला विलंब होतो आणि शिक्षा झाली तरी अंमलबजावणी लवकर होते काॽ निर्णयाचे गुन्हेगार आजही जीवंत आहेत अशा गुन्हेगारांना सौदी न्याय लावायला हवा तिनं महिण्यात भर चौकात फाशी द्यायला हवे . राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज प्रक्रिया नाकारली पाहिजे कारण यांनी कुठे द्या दाखवलेली असते.

सतत सावध रहायचं म्हणजे मनावर सतत भीती किंवा दडपण बाळगून रहायचं ..की कोण येईल आणि माझ्यावर हल्ला करेल. कोण जाणे समोरच्याच्या मनात काय आहे, कोण जाणे खरेच मैत्री किंवा प्रेम आहे की जवळीक साधायचा प्रयत्न करतोय. कोण जाणे खरा आहे की खोटा आहे, सर्वांकडेच संशय वृत्तीने बघत रहायचं....मग निर्भय वातावरणात कधी जगायला मिळणार? मुलगी म्हणून जन्माला आलो तिथेच चुकले असं वाटायला लागेल प्रत्येक मुलीला....

@वेडोबा खरे आहे.
आय आय टी मुंबईत मी ग्रंथालयाच्या रेस्ट्रुम मध्ये गेले होते (अराउंड १९९४- ९५). आरशापुढे उभे असताना मला डोळ्याच्या कोपर्‍यातून कोणीतरी व्यक्ती तेथिल खिडकीमधुन, डोकावताना दिसली. मी तडक बाहेर जाउन शिपायास सांगीतले की मागच्या बाजूस कोणीतरी आहे. त्याने मला वेड्यात काढले. तरीही सांगण्यावरुन तो मागे पहावयास गेला असता त्या माणसाने धूम ठोकली व तो डोकावणारा माणूस काही हाती लागला नाही. तदुपरांत तेथिल मागे जाण्याचा रस्ता बंद वगैरे केला गेला पण हा 'पीपिंग टॉम' प्रकार किती काळ चाललेला कोणास ठाउक.
.
परदेशात प्रथम प्रथम, रेस्टरुममध्ये कोणी नसे तव्हा अचानक एखादी स्त्री आत शिरली तरी धस्स होत असे, का तर वर लिहील्याप्रमाणे, पूर्वानुभव. आता सरावले आहे.
__________________________________
एग्झिबिशनिस्ट विकृत प्रकार तर सर्रास होतात. अंगाला विकृत स्पर्श तर १००% प्रत्येक मुलीबरोबर घडलेले असतात.

मला आठवत नाही की ती खिडकी मेन रुमला लागून होती जेणेकरुन फक्त आरशासमोरील मुली दिसाव्यात की अजुन अंतर्भागात होती ते.

"अंगमेहनत, पडीक काम करणारे.... असे लोक जनरली ब्लू कॉलर कामं करत असतात व जात्याच गुन्हेगारी वृत्तीची असतात."

---> एका लहान मुलीवर मंदिरातील पुजाऱ्यांनी अमानुष बलात्कार करून ठार मारल्याची घटना याच देशात काही महिन्यांपूर्वीच घडली होती, पुण्यात सदाशिव पेठेत वृद्धाने दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती, दिल्लीमधील निर्भया केस मधले काही आरोपी सुशिक्षित होते, याशिवाय आसाराम पासून अलीकडे पळून गेलेल्या नित्यानंद पर्यंत अनेक भोंदूबाबांवर बलात्काराचे आरोप केले गेले आहेत. निसर्गात लैंगिक भूक सर्वाना असते व त्याबाबत होणारी उपासमार आर्थिक किंवा सामाजिक स्टेटस वर अवलंबून नसते. फरक इतकाच आहे कि ब्लू कॉलर कामं करणाऱ्यांची अमानुषता जगासमोर येते पण व्हाईट कॉलर बलात्काऱ्यांची येत नाही. कारण माध्यमे आणि यंत्रणा विकल्या गेल्या आहेत. आणि याहून भयंकर प्रकार हा आहे कि पोलिसांनी पकडलेले लोकच गुन्हेगार आहेत यावर आपण लगेच शिक्कामोर्तब करतो. सामाजिक दबाव आल्याने पोलिसांनी गरीब व्यक्तीला पकडून बळीचा बकरा केल्याची उदाहरणे घडलेली आहेत. Ryan international school मध्ये लहान मुलाची निर्घुण हत्या झाल्यानंतर पोलिसांनी स्कूल बसच्या ड्रायवर ला आरोपी म्हणून हजर करून त्याच्याकडून जबरदस्ती कबुली जवाब घेतला होता. नंतर त्याने गुन्हा केला नव्हताच असे समोर आले.

अंगमेहनत, पडीक काम करणारे.... असे लोक जनरली ब्लू कॉलर कामं करत असतात व जात्याच गुन्हेगारी वृत्तीची असतात. >> .... हे जनरलायझेशन फार पटण्यासारखे नाही. मागे सिरियल्स मधल्या कुठल्याशा नटाने मोलकर्णीवर बलात्कार केल्याचे आठवते. उच्चभ्रू समाजात, इतर सर्व समाजात ह्या गोष्टी चालत असतात. तुलनेने त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे घटना संख्येने कमी असतील एव्हढेच. अंगमेहनत, ब्लू कॉलर कामं करणारी बहुसंख्य माणसं फार चांगली असतात असा माझा अनुभव... परदेशात थँक यू, सॉरी, रहदारीचे नियम काटेकोर पाळणे, कचरा न करणे, स्त्रियांसाठी दार उघडून थांबणे ह्या व अशा किमान गोष्टी प्रत्येक लहान मुलाला शाळेत, घरी रोजच्या वागणुकीत अंगवळणी पडलेल्या असतात. अगदी एखादा ट्रक ड्राइवर, क्रेन ऑपरेटर किंवा त्याचा मुलगा असला तरीही. आपल्याला समाज म्हणून ह्या पासून काही शिकता आलं तर त्याची गुन्हे कमी करण्यास मदत होईल. किंवा ज्याप्रमाणे साक्षरता अभियान, स्वच्छ भारत मोहीम राबवली, त्याच धर्तीवर काहीतरी मोठ्या मोहिमेची कल्पना करून ती राबवली पाहिजे. घटना घडण्याआधीच कशी थांबवता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे. काहीतरी वाईट झाल्यानंतर फाशी द्या म्हणणारे, मेणबत्त्या घेऊन निघणारे ह्यांचा काय उपयोग?

फाशी देवून प्रश्न सुटत असते तर .
खून होण्याचे प्रमाण कमी झाले असते..
प्रश्नाच्या मुळाशी न जाता वर वर एकद्या विषयावर विचार करण्याची बेकार खोड आहे भारतीय लोकात.
त्या मुळे आज पर्यंत एक पण प्रश्न सुटला नाही .
उलट ज्या सोप्या समस्या होत्या त्यांनी विराट रूप धारण केले

त्या चौघांनाही पोलिसांनी यमसदनी पाठवले. जिथे गुन्हा कोणी केला हे स्पष्ट आहे त्या आरोपींबाबत हा अगदी चांगला निर्णय आहे.

अत्यंत चुकीची गोष्ट. आता असा पायंडा पडेल. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. त्यांनी न्याय करणं अपेक्षित नाही. ते काम न्यायालयाचं आहे.

वेगवेगळे रीपोर्ट्स. येताहेत. पोलिसांना माहिती खरे काय खोटे.

रीकन्स्ट्र्क्ट केले म्हणजे नक्की काय ते त्यांनाच माहित...

आता नक्की तेच गुन्हेगार होते की नाही, हे कधीच कळणार नाही. कारण ते कोर्टात सिद्ध करायची गरज राहिली नाही. जर ते नसतील, तर खरे गुन्हेगार मोकाट.

आंध्रातल्या या जुन्या एन्काउंटर बद्दलच्या या बातम्या.
https://indianexpress.com/article/india/india-others/police-kill-20-work...
https://indianexpress.com/article/india/india-others/7-of-20-shot-dead-w...

सगळ्या लोकांना न्यायाचा समान हक्क नाही, असंच म्हणावं लागेल.
मग ती बलात्कारपीडित स्त्री असेल किंवा एखादा आरोपी. समाजातल्या त्याच्या स्थानावर न्याय होण्याची किंवा न्याय दिला असे दाखवण्याची शक्यता ठरते.

बलात्कारित स्त्री आर्थिक - सामाजिक निम्न वर्गातली असेल तर आपल्या भावना चेतवत नाहीत. तेच मध्यमवर्गातली सुशिक्षित असेल तर आपण पेटून उठतो. कारण तिच्याबाबत जे झालं ते आपल्याबाबत होऊ शकतं ही भीती दाटून येते. तेच निम्न वर्गातल्या स्त्रीबद्दल वाटत नाही.

Sad

<< बलात्कारित स्त्री आर्थिक - सामाजिक निम्न वर्गातली असेल तर आपल्या भावना चेतवत नाहीत. तेच मध्यमवर्गातली सुशिक्षित असेल तर आपण पेटून उठतो. कारण तिच्याबाबत जे झालं ते आपल्याबाबत होऊ शकतं ही भीती दाटून येते. तेच निम्न वर्गातल्या स्त्रीबद्दल वाटत नाही. >>

----- अगदी कडवट आहे पण खरी परिस्थिती आहे...

Pages