Odd Man Out (भाग १३)

Submitted by nimita on 11 March, 2019 - 05:39

नम्रतानी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तिच्या गालांवर ओघळलेले अश्रू संग्रामच्या नजरेतून सुटले नाही.तिला इतकं भावुक झालेलं बघून तो खूप कासावीस झाला. 'असं एकदम सुनवायला नको होतं तिला...' संग्रामला उपरती झाली. 'पण आता लक्षात येऊन काय उपयोग? The damage is already been done .' संग्राम मनातल्या मनात स्वतःलाच दटावत म्हणाला -'And this is not the first time. आजपर्यंत कितीतरी वेळा असंच झालंय... झालंय म्हणण्यापेक्षा असंच 'केलंयस' तू संग्राम..ती बिचारी तिच्या मनातलं सगळं काही तुझ्याबरोबर शेअर करते..फक्त एकाच अपेक्षेनी- की तू तिला समजून घेशील, तिच्या वाभऱ्या मनाला दिलासा देशील... पण तू मात्र तिला धीर देण्याऐवजी आपलंच घोडं दामटत बसतोस.'

स्वतःला हजार शिव्या घालत संग्राम नम्रताच्या मागे गेला.त्यानी घरभर शोधलं पण नम्रता कुठेच नव्हती. तो काही क्षण संभ्रमात पडला.... पण मग लगेचच त्याला काहीतरी आठवलं आणि तो बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाच्या दिशेनी निघाला. एकदा कधीतरी बोलता बोलता नम्रता म्हणाली होती ,"तुला माहितीये संग्राम, जेव्हा जेव्हा मी त्या झाडाला बघते ना, तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते...तीही अशीच होती..शांत, शीतल- कायम आपल्या प्रेमाची सावली देणारी- पण तरीही मनानी खंबीर ... त्या झाडाच्या सावलीत बसले ना की आजीच्या जवळ जाऊन बसल्यासारखं वाटतं मला ! एक वेगळंच मानसिक बळ मिळतं.."

नम्रताचं आणि तिच्या आजीचं नातं खूप घट्ट होतं.तिच्या बारशाच्या वेळी तिचं 'नम्रता' हे नाव पण तिच्या आजीनीच सुचवलं होतं. तान्ह्या नम्रताला कुशीत घेऊन त्या म्हणाल्या होत्या," खूप सालस आणि प्रेमळ स्वभाव असणार हिचा.... बघा तुम्ही...मी आत्ताच सांगून ठेवतीये."

नातीचं खूप कौतुक होतं आजीला.नम्रताच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची आजी स्वतः तिच्यासाठी गुळाच्या पोळ्या बनवायची...नम्रताला आवडतात म्हणून ;नम्रताला पण रोज रात्री गोष्ट सांगायला आजीच हवी असायची. तिच्या आजीच्या शेवटच्या आजारपणात नम्रता कायम तिच्या उशा-पायथ्याशी असायची. सकाळी कॉलेजला जाण्याआधी निदान दोन मिनिटं का होईना पण आजीशी गप्पा मारायची..त्याशिवाय दोघींनाही चैन नाही पडायचं. आपल्या आजारपणाला कंटाळून कधी कधी तिची आजी काहीसं विचित्र वागायची...औषध नको, जेवण नको...अगदी एखाद्या लहान मुलासारखी हट्ट करायची ...घरातल्या सगळ्यांचं समजावणं, विनंती करणं फोल ठरायचं तिच्या हट्टापुढे. अशावेळी मग सगळ्यांना एकच आशा असायची..आणि ती म्हणजे नम्रता !आणि खरंच इतरांना पुरून उरणारी आजी नम्रताचं मात्र सगळं ऐकायची. आजीला मनवण्यासाठी कधी कुठला पवित्रा घ्यायचा हे नम्रताला बरोब्बर ठाऊक होतं.

जेव्हा तिची आजी औषध घ्यायला मना करायची तेव्हा नम्रता तिला एकच प्रश्न विचारायची," असं काय गं आजी ? माझ्या लग्नात तू माझ्या नवऱ्याबरोबर नाचणार आहेस ना? मला तसं प्रॉमिस केलंयस तू...मग त्यासाठी तब्येत ठणठणीत हवी ना तुझी ?" नम्रताची ही मात्रा बरोबर लागू पडायची आणि घरातले सगळे 'हुश्श' म्हणत आपापल्या कामाला लागायचे.

नम्रताचा होणारा नवरा आर्मी मधे आहे हे कळल्यावर तिच्या आजीला खूप आनंद झाला होता. एका भावुक क्षणी नम्रताला जवळ घेऊन ती म्हणाली," आता मला तुझी काळजी नाही हो! तुझ्यासारख्या हळव्या, नाजूक मनाच्या मुलीला सांभाळून घ्यायला, समजून घ्यायला संग्राम सारखा कणखर मनाचा मुलगाच हवा. आयुष्यभर सुखात ठेवेल तो तुला...माझी खात्री आहे." आपल्या लुगड्याच्या पदरानी आपले डोळे टिपत आजीनी नम्रताच्या डोक्यावर आशीर्वादाचा थरथरता हात ठेवला.

लग्नाआधी संग्राम जेव्हा पहिल्यांदा घरी येणार होता त्या दिवशी तर आजीची लगबग बघण्यासारखी होती. सकाळ पासूनच तिचा active mode ऑन झाला होता. बसल्या जागेवरून सगळ्यांना सूचना देणं चालू होतं.... "घर नीट आवरलेलं हवं बर का.. इथे तिथे पसारा नका करू. आणि खायला काय करणार आहात गं? नम्रता, काय आवडतं गं त्याला? चहा, कॉफी बरोबर लिंबाच्या सरबताची पण सोय करून ठेवा म्हणजे ऐनवेळी धावपळ नको.. नम्रता, तू ना तुझा तो निळ्या रंगाचा अनारकली का काय म्हणतात ना तो ड्रेस घाल...त्याच्यात खूप गोड दिसतेस बघ तू."

आजीच्या उत्साहाला जणू उधाण आलं होतं. नम्रताच्या आईला जवळ बोलावून हळूच तिला म्हणाली," कपाटातलं माझं अबोली रंगाचं लुगडं काढून दे मला." संग्राम यायच्या तासभर आधीच आजीला तयार होऊन बसलेली बघून नम्रता म्हणाली," अगं, अजून वेळ आहे त्याला यायला." त्यावर तिला जवळ बोलावत आजी म्हणाली होती," ते सगळं राहू दे, तू आधी सांग- मी व्यवस्थित तयार झालीये ना? म्हणजे तुझी आजी शोभतीये ना?" नम्रता काही बोलणार इतक्यात तिचा दादा म्हणाला," आजी, अगं आज तू असली खतरनाक सुंदर दिसतीयेस ना...तुला बघून संग्राम एकदम फ्लॅट होतो की नाही बघ," त्याच्या त्या मिश्किल वाक्यावर आजी मनोमन खुश झाली पण लटक्या रागानी त्याच्या गालावर हलकेच चापटी देत म्हणाली," गप रे ! तुझ्या जीभेला काही हाड आहे का ? चहाटळ कुठला!"

त्या दिवशी संग्राम जेव्हा आजीला भेटायला तिच्या खोलीत गेला तेव्हा त्याला भेटून, त्याच्याशी बोलून तिला खूप समाधान वाटलं. पहिल्या काही वाक्यांतच संग्रामनी आजीचं मन जिंकून घेतलं होतं. हळूहळू त्यांच्या दोघांच्या गप्पा इतक्या रंगल्या की त्या खोलीत त्यांच्याशिवाय नम्रता पण बसलीये हेसुद्धा विसरून गेले दोघं. जणू काही ती नम्रताची नव्हे तर संग्रामचीच आजी होती.. त्यावेळी एक क्षण नम्रताला संग्रामबद्दल असूया वाटली होती...आजपर्यंत आजीच्या मनात तिचं जे स्थान होतं त्यात आता संग्रामही वाटेकरी झाला होता. पण मग पुढच्याच क्षणी स्वतःच्या स्वार्थी मनाला दटावत तिनी मनातल्या मनात आजी आणि संग्रामची, त्यांच्यात निर्माण झालेल्या त्या खास ऋणानुबंधाची दृष्ट काढली.

आजीला नमस्कार करून संग्राम जेव्हा जायला निघाला तेव्हा आजीनी त्याला हाक मारून जवळ बोलावलं आणि विचारलं," बाकी सगळं ठीक आहे पण तुला नाचता येतं ना? तुझ्या बरोबर नाचता यावं म्हणून मी इतकी वर्षं नम्रता म्हणेल तसं सगळं करतीये!" तिचा हा प्रश्न ऐकून खोलीत मोठा हशा पिकला. आपलं हसू कसंबसं आवरत संग्राम म्हणाला," हो आजी, नम्रतानी सांगितलंय मला सगळं. तुमच्या इतकं छान नाचायला जमणार नाही कदाचित, पण माझी प्रॅक्टिस चालू आहे...." मधे थोडा pause घेऊन नम्रताकडे बघत, हलकेच एक डोळा मिटत तो मिश्कीलपणे म्हणाला," तसंही आता यापुढे आयुष्यभर तुमच्या नातीच्या तालावरच नाचायचं आहे ना मला!" त्याचं हे बोलणं ऐकून पुन्हा एकदा सगळं घर हास्यानी भरून गेलं आणि यावेळी आजी पण अगदी दिलखुलास हसली. पण सगळ्या लोकांसमोर संग्रामनी केलेली ही धिटाई बघून नम्रताचा जीव मात्र लाजून अर्धा झाला.

त्या दिवसानंतर नम्रताच्या आजीला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त संग्राम च दिसत होता. त्याच्या कौतुकानी तिचा दिवस सुरू व्हायचा आणि आपल्या नातीच्या सुखी संसाराची स्वप्नं बघत रात्र उलटायची. लग्नानंतरही जोपर्यंत आजी हयात होती तोपर्यंत रोज सकाळी नम्रता तिला फोन करून तिच्याशी गप्पा मारायची,पण संग्रामची खुशाली कळल्यानंतर मगच आजी फोन बंद करायची.

आत्ता बागेत जाता जाता संग्रामला हे सगळं आठवत होतं.आणि म्हणूनच नम्रता झाडापाशी असणार याची त्याला खात्री होती.

आणि त्याचा अंदाज खरा ठरला..नम्रता कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या पारावर बसली होती....एकटक त्या झाडाकडे बघत!!! तिला तसं बघून संग्रामला अजूनच अपराधी वाटायला लागलं. तो झपाझप पावलं टाकत नम्रतापाशी जाऊन पोचला.

पण नम्रता तिच्या विचारांत इतकी गढून गेली होती की संग्राम तिथे आल्याचं तिला कळलंही नाही. तिच्याशेजारी बसून तिचा हात आपल्या हातात घेत संग्राम म्हणाला," I am sorry, Namrata. मी असं एकदम तुला सूनवायला नको होतं. खरं म्हणजे मीच तुझ्या मागे लागलो होतो की मला खरं कारण सांग म्हणून....आणि जेव्हा तू सांगायला लागलीस तेव्हा मी पुरतं ऐकून न घेताच तुला गप्प केलं. सॉरी !" त्याच्या या बोलण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता नम्रता उठून आत जायला निघाली. तिला पुन्हा आपल्या शेजारी बसवत संग्राम म्हणाला," अशी गप्प नको ना बसू..काही तरी बोल ना... प्लीज गं!"

"It's okay संग्राम ! माझंच चुकलं.. मलाच लक्षात यायला हवं होतं... तसंही तू म्हणतोसच ना की मी जरा जास्तच विचार करते !! या बाबतीत पण तसंच असेल...मी उगीचच पराचा कावळा करतीये बहुतेक.. पण मी तरी काय करू ? मी माझ्याकडून खूप प्रयत्न करते रे जास्त इमोशनली विचार नाही करायचा म्हणून, पण नाही जमत मला तुझ्यासारखं प्रॅक्टिकल होणं..I am an emotional fool. "

"ए, माझ्या बायकोला fool वगैरे नाही म्हणायचं हं.. सांगून ठेवतोय." नम्रताचा मूड ठीक व्हावा म्हणून संग्राम तिला खोटं खोटं ओरडत म्हणाला.."हां, तशी ती जरा जास्तच हळवी आहे म्हणा..अगदी साध्या साध्य गोष्टींवर खूप विचार करत बसते आणि मग स्वतःलाच त्रास करून घेते...पण हे सगळं जरी खरं असलं तरी जेव्हा गरज असते तेव्हा तिचं हे हळवं मन वज्राहून ही कठीण होतं... त्यामुळे तिला काही नाही म्हणायचं.." संग्रामचं हे बोलणं ऐकून नम्रतानी आश्चर्यानी त्याच्याकडे पाहिलं. जणू काही त्याच्या त्या वाक्यातून तिला तिच्याच स्वभावाचा एक नवा पैलू समजला होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! अगदी सहज लिहिलय. छान शैली आहे. आवडले.
काही भाग राहून गेलेत वाचायचे. आता पुन्हा पहिल्यापासुन वाचेन.