दिल-विल प्यार-व्यार

Submitted by AMIT BALKRISHNA... on 14 December, 2018 - 02:27

सतीश,राजेश आणि महेश तिघे सच्चे दोस्त, अगदी लंगोटीयार अस काही तरी असतं ना, ते, अगदी तसं, तिघांच्या शाळा वेग-वेगळ्या पण एकाच इयत्ते मध्ये असताना भेटलेले (आयुष्यातील महत्वाची घटना म्हणा हवं तर) हे तिघे आजही एकत्र आहेत. एकमेका शिवाय चैन पडत नाही या तिघांना ....आता महेश अमेरिकेत नोकरीस आहे तर सतीश खासगी बँकेत मोठ्या पदावर आहे आणि राजेशचा स्वत:चा व्यवसाय आहे. हे तिघे बीड चे. साधारण वीस-एक वर्षापूर्वीची गोष्ट, पदव्युत्तर शिक्षण घेत असताना सतीश ची औरंगाबादेत एका कार्यक्रमात मीनल शी ओळख झाली. मीनल मुळची औरंगाबाद ची, ती तिथे शास्त्र शाखेत शिकत होती. ह्या ओळखीला खरे पाठबळ मिळाले ते टेलीफोन ने !! दो दिल मिल रहें है, अस काहीतरी सिन होता तो, तेंव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे फोनवर संपर्क, एकमेकास ओळखणे मग विविध विषयावर चर्चा, वेळी-अवेळी फोन, रंगणाऱ्या गप्पा आणि अर्थातच संपर्कातून पुढील पायरी... (फक्त सतीशच्या मनात) तुम्ही ओळखलं असेलच.....हे फोना फोनी प्रकरण सतीश च्या घरी माहिती होते, त्यांचा होकार होता अस मी म्हणणार नाहि पण कल्पना होती.एके दिवशी सतीश, राजेश आणि महेश यांच्यात चर्चा रंगली मीनल चे खरच प्रेम आहे का ? नाही? कसं ओळखावं , कुणीच अनुभवी नाही (आणि बहुतेक अनुभव लागतही नाही अशा परिस्थितीत, तुम्हीही सहमत असाल) पण तरीही राजेश आणि महेश ने भरपूर सल्ले सतीश ला दिले. अस करू, तस करू आणि शेवटी ठरलं कि औरंगाबादला जायचं आणि मिनलला विचारायचं ?
औरंगाबादला जायचं प्लानिंग सुरु झालं, कसं जायचं, कधी जायचं आणि महत्वाचं मीनलला कुठे भेटायचं? पण एक प्रश्न होता जो तिघांना पडला होता, “घरी काय सांगायचं?” मग तिघांनी ठरवलं खर काय ते सांगायचं, “औरांगाबादला” जाणार आहोत अस खरचं सांगायचं ठरलं, तिघांनी आप-आपल्या घरी सांगितले आणि मग एस.टी.महामंडळ च्या बस ने प्रवास सुरु झाला औरांगाबादचा, दरम्यान सतीश ने मीनल च्या घराजवळचे एक महाविद्यालय भेटीचे ठिकाण म्हणून ठरविले होते. सकाळी औरांगाबाद ला पोहोचल्यावर राजेश आणि महेश ला उत्सुकता होती मीनल ला भेटायची कारण त्यांच्या जिवा-भावाच्या मित्राची पसंती काय आहे हे त्यांना पहायचे होते. हि उत्सुकता भेटीची वेळ येई पर्यंत सांभाळणे अवघड होणार होते म्हणून दोघांनी सतीशची गम्मत करायचे ठरविले आणि तिघे गमती-जमती करण्यात मग्न झाले.
अशात सकाळचा नाश्ता, चहा घेण्याचे कुणाला तरी सुचलं आणि दोघांनी अगोदरच भेटीसाठी कासावीस झालेल्या बिचाऱ्या सतीश कडे मागणी केली, “अरे त्या मीनल पायी आम्हाला विसरतो कि काय?” चहा, नाश्ता काही विचारशील कि नाही,” यावर सतीश लागलीच म्हणाला, “चला दोस्तहो, करुया ! तुमच्या साठी काय पण!! नाश्ता संपवून तिघांची स्वारी निघाली महाविद्यालयाकडे जिथे मीनल येणार होती. एव्हाना दहा वाजत आले होते, मीनल ने अकरा ची वेळ दिली होती, “ती एव्हाना घरातून निघाली असेल”, सतीश म्हणाला, दोघांनी माना हलवून होकार दर्शविला. घड्याळ आता “एक” ची वेळ दाखवीत होते पण मीनल काही आली नव्हती आणि आता मात्र तिघांच्या मनात विविध विचारांचे काहूर माजायला सुरुवात झाली होती.
काय झालं असेल? का आली नसेल मीनल? सतीश ने दोघांना विचारले पण यांना तरी कुठे माहिती होते, यांनी आपलं धीर द्यायचा प्रयत्न केला , “येईल मित्रा, येईल” आपण वाट पाहूयात, आणि तिथेच महाविद्यालयाच्या बागेत तिघे वाट पहात बसले. एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि वाट पहात पहात तिघांची पूर्णपणे वाट लागली होती. आता परत घरी (अर्थातच स्वत:च्या) निघण्यावाचून कुठलाही पर्याय राहिला नव्हता. मधल्या काळात सतीश ने मीनल ला फोन देखील केले होते पण ती फोनवर आलीच नाही. सतीश पुरता कोलमडला होता, त्याला काहीच सुचतं नव्हतं, आपल्या बरोबर अस कसं झाल याचाच विचार तो करत होता. महेश आणि राजेश दोघांनी त्याला समजावून सांगितले कि काही तरी अडचण असेल त्यामुळे ती आली नसेल, पण सतीश चा काही केल्या विश्वास बसत नव्हता शेवटी तिघे बीड च्या बस मध्ये बसले आणि घर गाठले.
घरी येताच सतीश ने त्याच्या वडिलांना खरी काय ती हकीकत सांगितली, त्यावर सतीश चे वडील म्हणाले, “ काही तरी करत बसता ?”, तुम्ही तिघे अभ्यासाचं बघा... आयुष्यात स्वत:ला सिद्ध तरी करा मग आहेच कि दिल-विल प्यार-व्यार, खरचं म्हणाले होते सतीश चे वडील, आता या तिघांनाही कळतं कि तो एक चुकीचा विचार होता, मित्रावरील प्रेमापोटी घेतलेला चुकीचा निर्णय होता, कालाय तस्मै नम: पुढे सतीश चे लग्न झाले तो आता संसारात सुखी आहे आणि मीनल हि तिच्या संसारात सुखी आहे.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

www.amitkamatkar.blogspot.com

ता.क.:- आज मीनल ने सतीश ला तिच्या कामासाठी फोन केला आणि परत सगळ्या आठवणी ताज्या झाल्या म्हणून हा लेख प्रपंच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर.
सगळ्या होतकरू तरूण मुलांनी ह्यातून नक्की योग्य तो बोध घ्यावा.
आधी करियर, कुटुंब आणि मग दिल विल प्यार व्यार.... बरोबरना कामतकरजी.

अर्धीच वाटते कथा. ती मीनल का नाही आली?
सतीश आणि मीनल अजून संपर्कात आहेत, मग कारण नाही विचारलं का तिला?