पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त – ६. चुपके चुपके (१९७५)

Submitted by स्वप्ना_राज on 10 February, 2018 - 05:38

हिंदी चित्रपटात ज्याला प्रेमाने 'नीली छत्रीवाला' किंवा 'उपरवाला' म्हणतात त्याची एक सवय मला आता पक्की ठाऊक झालेय. तुमच्या ज्या मोठ्या इच्छा असतात ना त्या तो उशिराने धावणाऱ्या लोकलसारखा उशिराने पूर्ण करतो किंवा रद्द झालेल्या लोकलसारख्या पार निकालात काढतो. पण ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात त्या मात्र पूर्ण करतो. आता हेच बघा ना.......’बुढ्ढा मिल गया' वर लिहिलं तेव्हा २-३ जणांनी 'चुपके चुपके' मध्ये सुद्धा ओमप्रकाशची चांगली भूमिका असल्याने तो पहायचा सल्ला दिला. आणि नेमकं १-२ दिवसात एका चॅनेलवर तो पहायची संधी मिळाली. असो 'हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिशपे दम निकले' अशी आपल्या सर्वांचीच स्थिती असताना इच्छा छोटी असो वा मोठी, ती पूर्ण झाल्याचं समाधान आहेच. नाही का?

तर आता कथेविषयी. ह्या कथेचा नायक आहे डॉक्टर परिमल त्रिपाठी. बॉटनीचा प्रोफेसर. चित्रपट सुरु होतो तेव्हा कुठल्याश्या हिलस्टेशनवर तो सरकारी बंगल्यात काही दिवस रहात असतो. बंगल्याच्या म्हातार्या रखवालदाराचा नातू आजारी असतो पण त्याची एक दिवसाची सुट्टी मंजूर झालेली नसते म्हणून डॉक्टर परिमल त्याला तिथून चालत चार-पाच तासांच्या अंतरावर असलेल्या गावात जायची परवानगी देतो. रखवालदार डोंगर उतरून जातो आणि १-२ दिवसानंतर येणार असणारी मुलींच्या कॉलेजची स्टडी ट्रीप आधीच येऊन पोचते. आता रखवालदाराची नोकरी वाचवायला त्याची भूमिका निभावण्यावाचून डॉक्टर परिमलला गत्यंतर नसतं. भरीत भर म्हणून ह्या पोरीना डॉक्टर परिमलने लिहिलेलं पुस्तक अभ्यासाला असतं, त्यामुळे त्याचं नाव खोलीच्या बाहेर लिहिलेलं पाहून त्या ह्याला त्याच्याबद्दल विचारतात. तो बाहेर गेलाय असं सांगून तो वेळ मारून नेतो. पण त्यातली एक मुलगी, सुलेखा, मात्र त्याला डॉक्टर परिमलबद्दल बरीच माहिती विचारते. दुसर्या दिवशी खरा रखवालदार येतो तेव्हा तो आपला काका असल्याची थाप परिमल मारतो. पण सुलेखा मात्र त्यांचं बोलणं ऐकते. डॉक्टर परिमलने रखवालदाराची नोकरी वाचवायला त्याचं काम केलं हे पाहून ती बरीच इम्प्रेस होते. डॉक्टर परिमलसुध्दा तिच्याकडे आकर्षित होतो.

आणि मग दोघांच्या लग्नाची बोलणी सुरु होतात. परिमलचे भाऊ आणि भावजय इंग्लंडमध्ये स्थायिक असल्याने ५-६ दिवसांवर असलेला मुहूर्त इलाहाबादमधल्या लग्नासाठी पक्का केला जातो. मुंबईला असलेली सुलेखाची मोठी बहिण सुमी आणि तिचा नवरा राघवेंद्र मात्र त्यांची धाकटी मुलगी रत्ना तापाने आजारी असल्यामुळे लग्नाला येऊ शकत नाहीत. त्या दोघांनी 'परिमलचा फोटो पाठव' म्हणून सांगितलेलं असतं खरं पण चेष्टेखोर स्वभाव असलेला परिमल त्याचे लहानपणचे फोटो पाठवून देतो. एव्हाना तो सुलेखाच्या तोंडून तिच्या जिजाजीची, म्हणजे राघवेंद्रची, स्तुती ऐकून जाम वैतागलेला असतो. लग्नानंतर मित्रमंडळीच्या घरी पार्ट्या अटेंड करून करून परिमलच्या पोटाची वाट लागते. सुलेखा परिमलची शपथ घेऊन जाहीर करते की काही दिवस ती त्याच्यासोबत कुठेही येणार नाही. तेव्हढ्यात तिचा मोठा भाऊ हरिपाद सुमी आणि राघवेंद्रचा निरोप घेऊन पोचतो. त्यांनी परिमल आणि सुलेखाला मुंबईला राहायला बोलावलेलं असतं. राघवेंद्रने हरिपादवर आणखी एक कामगिरी सोपवलेली असते ती म्हणजे एक शुद्ध हिंदी बोलणारा ड्रायव्हर इलाहाबादवरून पाठवणे. त्याचा सध्याचा ड्रायव्हर जेम्स अशुद्ध भाषेत बोलत असल्याने शुद्ध भाषेचा पुरस्कर्ता असलेला राघवेंद्र त्याला पार कंटाळलेला असतो.

हे ऐकून मिश्कील परिमलला एक कल्पना सुचते. एवीतेवी सुलेखाच्या प्रतिज्ञेमुळे त्या दोघांना मुंबईला एकत्र जाता येणार नसतं. मग परिमलने ड्रायव्हर प्यारेमोहन बनून आधी जावं आणि मागून सुलेखाने एकटीने जावं. सुलेखा आणि हरिपाद त्याला सांगून पाहतात की राघवेंद्र इतका हुशार आहे की तो लगेच ओळखेल. पण परिमल आपल्या हट्टावर कायम राहतो. परिमलला पटण्याला लेक्चर्स द्यायची असल्याने तो नंतर येईल असं राघवेंद्र आणि सुमीला सांगितलं जातं. प्यारेमोहन अतिशुद्ध हिंदी बोलून आणि इंग्रजीबद्दल प्रश्न विचारून (अगर डी ओ डू होता है और टी ओ टू होता है तो जी ओ गु क्यो नही होता?) राघवेंद्रला काव आणतोच. पण जेव्हा सुलेखा तिथे पोचते तेव्हा ती आणि प्यारेमोहन असा काही अभिनय करतात की राघवेंद्र आणि सुमीची खात्रीच पटते की महाबोअर परिमलसोबत सुलेखा खुश नाही आणि म्हणून ड्रायव्हरसोबत फिरतेय.

परिमलचा जिवलग मित्र सुकुमार हा परिमल बनून मुंबईला दाखल होतो तेव्हा तर ह्या सावळ्या गोंधळात अधिकच भर पडते. तो यायच्या आधी सुलेखा आणि प्यारेमोहन घरातून गायब होतात. आपली बायको घरी नाही म्हणून रागावून (!) परिमल उर्फ सुकुमार त्याचा मित्र प्रशांतच्या घरी राहायला जातो. तर तिथे असलेली प्रशांतची मेहुणी वसुधा डॉक्टर परिमल समजून त्याला बॉटनीबद्दल प्रश्न विचारून हैराण करते. सुकुमार वसुधावर खुश असूनही परिमलच्या भूमिकेत असल्याने त्याला 'प्यारका इजहार' करायची चोरी होते. मेहुणी ड्रायव्हरसोबत पळून गेलेय आणि तिचा नवरा दुसर्याच मुलीच्या मागे लागलाय हे जेव्हा राघवेंद्रच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इथे शादीशुदा परिमल आपल्या बहिणीच्या मागे लागलाय हे बघून प्रशांतची बायको हवालदिल होते. आणि हे सगळं रामायण बघताना आपली मात्र झक्कास करमणूक होते. यथावकाश सगळा गुंता सुटतो तेव्हा स्वत:ला तिस्मारखां समजणाऱ्या राघवेंद्रची होणारी लोभस प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

पिक्चरचे हिरोज अर्थात राघवेंद्र बनलेला ओमप्रकाश आणि परिमल झालेला धर्मेंद्र. ओमप्रकाशने मेहुणीची थट्टामस्करी करणारा, 'मै आदमीको सूंघकर उसे पहचान लेता हूं' अशी बढाई मारणारा, प्यारेमोहनच्या कारवायांनी त्रासलेला, मेहुणीच्या काळजीने ग्रासलेला, प्रेमळ, कुटुंबवत्सल राघवेंद्र मस्त साकारलाय. धर्मेंद्रला कॉमेडी जमेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण त्याने परिमलचा मिस्कीलपणा बरोबर पेललाय. विशेषत: त्याच्या एखाद्या कृतीने राघवेंद्र त्रासला की तो जो काही हसतो त्या निरागस हास्यावर मी टोटल फिदा झाले. अमिताभला सुकुमारच्या भूमिकेत फार थोडा वेळ मिळालाय. बाकीचा वेळ तो अत्यंत रुक्ष असा डॉक्टर परिमल असल्याची अ‍ॅक्टिंग करत असल्याने नाकावर घसरलेला चष्मा सावरून घेण्यापलीकडे त्याला फारसं काम नाही. शर्मिला टागोरने सुलेखाच्या भूमिकेत चक्क नैसर्गिक अभिनय केलाय. अहो आश्चर्यम! बाकी भूमिकांत जया भादुरी (वसुधा), असरानी (प्रशांत), डेविड (सुलेखा आणि सुमीचा मोठा भाऊ हरिपाद), उषा किरण (सुमी) आणि केश्तो मुकर्जी (ड्रायव्हर जेम्स) आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला शर्मिलाबरोबर कॉलेजातल्या मुलींचा जो ग्रुप येतो त्यात मराठी अभिनेत्री नयना आपटेसुद्धा दिसते.

हिंदी चित्रपटांचा अविभाज्य भाग म्हणजे गाणी. ह्या चित्रपटात दोन झक्कास गाणी आहेत - अबके सजन सावनमे आणि चुपके चुपके चल री पुर्वैय्या. 'अबके सजन सावनमे' चं पिक्चरायझेशनसुध्दा पुन्हापुन्हा बघावं असंच. घरच्या सगळ्या लोकांपासून चोरून पडद्यामागून धर्मेद्रचा हात धरून गाणारी शर्मिला, ती शंका आल्याबरोबर सहज उठल्यासारखं दाखवून पडदा चेक करणारा ओमप्रकाश, म्युझिकच्या तालावर केकचा तुकडा मटकावणारा असरानी आणि जिन्यात लपून गाणं ऐकणारा ड्रायव्हरच्या वेशातला धर्मेंद्र. ‘सारेगमा' आणि 'बागोमें कैसे ये फूल खिलते है' ठीकठाक.

एक-दोन गोष्टी पटल्या नाहीत. हिलस्टेशनवरच्या भेटीनंतर लगेच सुलेखाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन बंगल्याचा चौकीदार येतो. वसुधा आणि सुकुमारच्या बाबतीत सुध्दा ‘झट मंगनी पट ब्याह' हे काही झेपलं नाही. सुकुमारला भेटल्यावर सुलेखा 'बहिणीच्या मोठ्या मुलीला हे स्थळ चांगलं आहे' असं परिमलला म्हणते तेव्हा तो 'सुकुमारला प्रशांतची मेहुणी आवडते' असं म्हणतो पण वसुधाने सुकुमारला पाहिलेलंच नसतं. कदाचित माझी ऐकण्यात चूक झाली असेल किंवा चित्रपट एडिट करून दाखवला गेला असेल. आणि हो, आजकालच्या एव्हढ्यातेव्हढ्यावरून अस्मिता दुखावण्याच्या काळात हा चित्रपट रिलिज झाला असता तर ड्रायव्हर्सनी तोडफोड केली असती का असा विचार मनात येऊन गेलाच. Happy

२४ * ७ ब्रेकिंग न्यूजच्या, सोशल मिडियाच्या ह्या बिझी जमान्यात एक हलकाफुलका, डोक्याला जास्त शॉट न देता निर्भेळ करमणूक करणारा कौटुंबिक चित्रपट पहायची इच्छा असेल तर हा चित्रपट नक्की पहा. सॅटीस्फॅक्शन गॅरन्टीड. आपुनका वादा है दोस्त!!
-------
विकी ट्रिव्हिया: ह्या चित्रपटाच्या वेळेस जया भादुरी गरोदर होती पण तिचे शॉट्स इतक्या कुशलपणे घेतलेत की हे आपल्या लक्षातही येत नाही. नेटवरून अशीही माहिती मिळते की बंगल्यातले काही शॉट्स एन.सी. सिप्पीच्या बंगल्यात घेतलेत जो आता अमिताभचा बंगला 'जलसा' आहे. १९८० च्या फेब्रुवारीत लोकांनी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये म्हणून सरकारने हा चित्रपट दूरदर्शनवरसुध्दा दाखवला होता म्हणे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९८० च्या फेब्रुवारीत लोकांनी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये म्हणून सरकारने हा चित्रपट दूरदर्शनवरसुध्दा दाखवला होता म्हणे. >>> हा नाही गुड्डी दाखवलेला. मी खूप लहान होते पण आमच्याकडे tv नव्हता आणि बाबांनी शेजारी पाठवलं नव्हतं बघायला त्यामुळे आवर्जून लक्षात राहीलंय. >>>>>>

हो! मलाही आठवतंय. तेव्हा टीव्हीवर 'गुड्डी' सिनेमाच दाखवला होता.

आणि ते सूर्यग्रहणही आठवतंय. भर दुपारी दोन वाजता खग्रास सूर्यग्रहण लागणार होते. सर्व लोक आपापल्या घरात, उत्सुकतेने आणि काहीसे घाबरून, टिव्हीसमोर बसले होते. सिनेमाच्या मध्ये मध्ये दर दहा पंधरा मिनिटांनी ग्रहणाची स्थिती टीव्हीवर दाखवत होते. आणि जेव्हा सूर्याला पूर्ण ग्रहण लागले, तेव्हा तर भर दुपारी आभाळ सूर्यास्ताच्या वेळेसारखं तांबूस होऊन अंधारलं होतं. रात्र होत आली असं वाटून सर्व पक्षी आपापल्या घरट्यात परतून चिडीचूप बसले होते. सगळे रस्ते ओस पडले होते. बाहेरील वातावरण अगदी भकास झाले होते. जसं काही लढाई संपलेलं रणांगणच! आणि जेव्हा ग्रहण सुटले, तसं "दे दान, सुटे गिरान!!" असं गल्लोगल्ली ओरडत, दान मागत गोरगरीब हिंडू लागले. त्या भयाण वातावरणात त्यांचे ओरडणे भेसूर वाटत होते.

अजूनही ते सूर्यग्रहण माझ्या पक्क्या आठवणीत आहे.

Pages