हिंदी चित्रपटात ज्याला प्रेमाने 'नीली छत्रीवाला' किंवा 'उपरवाला' म्हणतात त्याची एक सवय मला आता पक्की ठाऊक झालेय. तुमच्या ज्या मोठ्या इच्छा असतात ना त्या तो उशिराने धावणाऱ्या लोकलसारखा उशिराने पूर्ण करतो किंवा रद्द झालेल्या लोकलसारख्या पार निकालात काढतो. पण ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात त्या मात्र पूर्ण करतो. आता हेच बघा ना.......’बुढ्ढा मिल गया' वर लिहिलं तेव्हा २-३ जणांनी 'चुपके चुपके' मध्ये सुद्धा ओमप्रकाशची चांगली भूमिका असल्याने तो पहायचा सल्ला दिला. आणि नेमकं १-२ दिवसात एका चॅनेलवर तो पहायची संधी मिळाली. असो 'हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिशपे दम निकले' अशी आपल्या सर्वांचीच स्थिती असताना इच्छा छोटी असो वा मोठी, ती पूर्ण झाल्याचं समाधान आहेच. नाही का?
तर आता कथेविषयी. ह्या कथेचा नायक आहे डॉक्टर परिमल त्रिपाठी. बॉटनीचा प्रोफेसर. चित्रपट सुरु होतो तेव्हा कुठल्याश्या हिलस्टेशनवर तो सरकारी बंगल्यात काही दिवस रहात असतो. बंगल्याच्या म्हातार्या रखवालदाराचा नातू आजारी असतो पण त्याची एक दिवसाची सुट्टी मंजूर झालेली नसते म्हणून डॉक्टर परिमल त्याला तिथून चालत चार-पाच तासांच्या अंतरावर असलेल्या गावात जायची परवानगी देतो. रखवालदार डोंगर उतरून जातो आणि १-२ दिवसानंतर येणार असणारी मुलींच्या कॉलेजची स्टडी ट्रीप आधीच येऊन पोचते. आता रखवालदाराची नोकरी वाचवायला त्याची भूमिका निभावण्यावाचून डॉक्टर परिमलला गत्यंतर नसतं. भरीत भर म्हणून ह्या पोरीना डॉक्टर परिमलने लिहिलेलं पुस्तक अभ्यासाला असतं, त्यामुळे त्याचं नाव खोलीच्या बाहेर लिहिलेलं पाहून त्या ह्याला त्याच्याबद्दल विचारतात. तो बाहेर गेलाय असं सांगून तो वेळ मारून नेतो. पण त्यातली एक मुलगी, सुलेखा, मात्र त्याला डॉक्टर परिमलबद्दल बरीच माहिती विचारते. दुसर्या दिवशी खरा रखवालदार येतो तेव्हा तो आपला काका असल्याची थाप परिमल मारतो. पण सुलेखा मात्र त्यांचं बोलणं ऐकते. डॉक्टर परिमलने रखवालदाराची नोकरी वाचवायला त्याचं काम केलं हे पाहून ती बरीच इम्प्रेस होते. डॉक्टर परिमलसुध्दा तिच्याकडे आकर्षित होतो.
आणि मग दोघांच्या लग्नाची बोलणी सुरु होतात. परिमलचे भाऊ आणि भावजय इंग्लंडमध्ये स्थायिक असल्याने ५-६ दिवसांवर असलेला मुहूर्त इलाहाबादमधल्या लग्नासाठी पक्का केला जातो. मुंबईला असलेली सुलेखाची मोठी बहिण सुमी आणि तिचा नवरा राघवेंद्र मात्र त्यांची धाकटी मुलगी रत्ना तापाने आजारी असल्यामुळे लग्नाला येऊ शकत नाहीत. त्या दोघांनी 'परिमलचा फोटो पाठव' म्हणून सांगितलेलं असतं खरं पण चेष्टेखोर स्वभाव असलेला परिमल त्याचे लहानपणचे फोटो पाठवून देतो. एव्हाना तो सुलेखाच्या तोंडून तिच्या जिजाजीची, म्हणजे राघवेंद्रची, स्तुती ऐकून जाम वैतागलेला असतो. लग्नानंतर मित्रमंडळीच्या घरी पार्ट्या अटेंड करून करून परिमलच्या पोटाची वाट लागते. सुलेखा परिमलची शपथ घेऊन जाहीर करते की काही दिवस ती त्याच्यासोबत कुठेही येणार नाही. तेव्हढ्यात तिचा मोठा भाऊ हरिपाद सुमी आणि राघवेंद्रचा निरोप घेऊन पोचतो. त्यांनी परिमल आणि सुलेखाला मुंबईला राहायला बोलावलेलं असतं. राघवेंद्रने हरिपादवर आणखी एक कामगिरी सोपवलेली असते ती म्हणजे एक शुद्ध हिंदी बोलणारा ड्रायव्हर इलाहाबादवरून पाठवणे. त्याचा सध्याचा ड्रायव्हर जेम्स अशुद्ध भाषेत बोलत असल्याने शुद्ध भाषेचा पुरस्कर्ता असलेला राघवेंद्र त्याला पार कंटाळलेला असतो.
हे ऐकून मिश्कील परिमलला एक कल्पना सुचते. एवीतेवी सुलेखाच्या प्रतिज्ञेमुळे त्या दोघांना मुंबईला एकत्र जाता येणार नसतं. मग परिमलने ड्रायव्हर प्यारेमोहन बनून आधी जावं आणि मागून सुलेखाने एकटीने जावं. सुलेखा आणि हरिपाद त्याला सांगून पाहतात की राघवेंद्र इतका हुशार आहे की तो लगेच ओळखेल. पण परिमल आपल्या हट्टावर कायम राहतो. परिमलला पटण्याला लेक्चर्स द्यायची असल्याने तो नंतर येईल असं राघवेंद्र आणि सुमीला सांगितलं जातं. प्यारेमोहन अतिशुद्ध हिंदी बोलून आणि इंग्रजीबद्दल प्रश्न विचारून (अगर डी ओ डू होता है और टी ओ टू होता है तो जी ओ गु क्यो नही होता?) राघवेंद्रला काव आणतोच. पण जेव्हा सुलेखा तिथे पोचते तेव्हा ती आणि प्यारेमोहन असा काही अभिनय करतात की राघवेंद्र आणि सुमीची खात्रीच पटते की महाबोअर परिमलसोबत सुलेखा खुश नाही आणि म्हणून ड्रायव्हरसोबत फिरतेय.
परिमलचा जिवलग मित्र सुकुमार हा परिमल बनून मुंबईला दाखल होतो तेव्हा तर ह्या सावळ्या गोंधळात अधिकच भर पडते. तो यायच्या आधी सुलेखा आणि प्यारेमोहन घरातून गायब होतात. आपली बायको घरी नाही म्हणून रागावून (!) परिमल उर्फ सुकुमार त्याचा मित्र प्रशांतच्या घरी राहायला जातो. तर तिथे असलेली प्रशांतची मेहुणी वसुधा डॉक्टर परिमल समजून त्याला बॉटनीबद्दल प्रश्न विचारून हैराण करते. सुकुमार वसुधावर खुश असूनही परिमलच्या भूमिकेत असल्याने त्याला 'प्यारका इजहार' करायची चोरी होते. मेहुणी ड्रायव्हरसोबत पळून गेलेय आणि तिचा नवरा दुसर्याच मुलीच्या मागे लागलाय हे जेव्हा राघवेंद्रच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इथे शादीशुदा परिमल आपल्या बहिणीच्या मागे लागलाय हे बघून प्रशांतची बायको हवालदिल होते. आणि हे सगळं रामायण बघताना आपली मात्र झक्कास करमणूक होते. यथावकाश सगळा गुंता सुटतो तेव्हा स्वत:ला तिस्मारखां समजणाऱ्या राघवेंद्रची होणारी लोभस प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.
पिक्चरचे हिरोज अर्थात राघवेंद्र बनलेला ओमप्रकाश आणि परिमल झालेला धर्मेंद्र. ओमप्रकाशने मेहुणीची थट्टामस्करी करणारा, 'मै आदमीको सूंघकर उसे पहचान लेता हूं' अशी बढाई मारणारा, प्यारेमोहनच्या कारवायांनी त्रासलेला, मेहुणीच्या काळजीने ग्रासलेला, प्रेमळ, कुटुंबवत्सल राघवेंद्र मस्त साकारलाय. धर्मेंद्रला कॉमेडी जमेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण त्याने परिमलचा मिस्कीलपणा बरोबर पेललाय. विशेषत: त्याच्या एखाद्या कृतीने राघवेंद्र त्रासला की तो जो काही हसतो त्या निरागस हास्यावर मी टोटल फिदा झाले. अमिताभला सुकुमारच्या भूमिकेत फार थोडा वेळ मिळालाय. बाकीचा वेळ तो अत्यंत रुक्ष असा डॉक्टर परिमल असल्याची अॅक्टिंग करत असल्याने नाकावर घसरलेला चष्मा सावरून घेण्यापलीकडे त्याला फारसं काम नाही. शर्मिला टागोरने सुलेखाच्या भूमिकेत चक्क नैसर्गिक अभिनय केलाय. अहो आश्चर्यम! बाकी भूमिकांत जया भादुरी (वसुधा), असरानी (प्रशांत), डेविड (सुलेखा आणि सुमीचा मोठा भाऊ हरिपाद), उषा किरण (सुमी) आणि केश्तो मुकर्जी (ड्रायव्हर जेम्स) आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला शर्मिलाबरोबर कॉलेजातल्या मुलींचा जो ग्रुप येतो त्यात मराठी अभिनेत्री नयना आपटेसुद्धा दिसते.
हिंदी चित्रपटांचा अविभाज्य भाग म्हणजे गाणी. ह्या चित्रपटात दोन झक्कास गाणी आहेत - अबके सजन सावनमे आणि चुपके चुपके चल री पुर्वैय्या. 'अबके सजन सावनमे' चं पिक्चरायझेशनसुध्दा पुन्हापुन्हा बघावं असंच. घरच्या सगळ्या लोकांपासून चोरून पडद्यामागून धर्मेद्रचा हात धरून गाणारी शर्मिला, ती शंका आल्याबरोबर सहज उठल्यासारखं दाखवून पडदा चेक करणारा ओमप्रकाश, म्युझिकच्या तालावर केकचा तुकडा मटकावणारा असरानी आणि जिन्यात लपून गाणं ऐकणारा ड्रायव्हरच्या वेशातला धर्मेंद्र. ‘सारेगमा' आणि 'बागोमें कैसे ये फूल खिलते है' ठीकठाक.
एक-दोन गोष्टी पटल्या नाहीत. हिलस्टेशनवरच्या भेटीनंतर लगेच सुलेखाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन बंगल्याचा चौकीदार येतो. वसुधा आणि सुकुमारच्या बाबतीत सुध्दा ‘झट मंगनी पट ब्याह' हे काही झेपलं नाही. सुकुमारला भेटल्यावर सुलेखा 'बहिणीच्या मोठ्या मुलीला हे स्थळ चांगलं आहे' असं परिमलला म्हणते तेव्हा तो 'सुकुमारला प्रशांतची मेहुणी आवडते' असं म्हणतो पण वसुधाने सुकुमारला पाहिलेलंच नसतं. कदाचित माझी ऐकण्यात चूक झाली असेल किंवा चित्रपट एडिट करून दाखवला गेला असेल. आणि हो, आजकालच्या एव्हढ्यातेव्हढ्यावरून अस्मिता दुखावण्याच्या काळात हा चित्रपट रिलिज झाला असता तर ड्रायव्हर्सनी तोडफोड केली असती का असा विचार मनात येऊन गेलाच.
२४ * ७ ब्रेकिंग न्यूजच्या, सोशल मिडियाच्या ह्या बिझी जमान्यात एक हलकाफुलका, डोक्याला जास्त शॉट न देता निर्भेळ करमणूक करणारा कौटुंबिक चित्रपट पहायची इच्छा असेल तर हा चित्रपट नक्की पहा. सॅटीस्फॅक्शन गॅरन्टीड. आपुनका वादा है दोस्त!!
-------
विकी ट्रिव्हिया: ह्या चित्रपटाच्या वेळेस जया भादुरी गरोदर होती पण तिचे शॉट्स इतक्या कुशलपणे घेतलेत की हे आपल्या लक्षातही येत नाही. नेटवरून अशीही माहिती मिळते की बंगल्यातले काही शॉट्स एन.सी. सिप्पीच्या बंगल्यात घेतलेत जो आता अमिताभचा बंगला 'जलसा' आहे. १९८० च्या फेब्रुवारीत लोकांनी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये म्हणून सरकारने हा चित्रपट दूरदर्शनवरसुध्दा दाखवला होता म्हणे.
परीचय पण यादीत घे! माझा अजून
परीचय पण यादीत घे! माझा अजून एक अॉटाफे सिनेमा.
फारएन्ड, ललिता-प्रीति,
फारएन्ड, ललिता-प्रीति, तुमच्या पोस्टस वाचून चित्रपट कसा पहावा ते कळलं. धन्यवाद! आशूचँप, चूक लक्शात आणून दिल्यबद्दल धन्यवाद!
दक्षिणा....सॉल्लीड लिस्ट आहे. मला खरं तर आंधी, अनामिका, बावर्ची वगैरे बर्याच चित्रपटांबद्दल लिहायचं होतं. पण ते पाहून अनेक वर्षं झाली आहेत. त्यामुळे पुन्हा पाहिल्याशिवाय लिहिता येत नाही. आणि हो....अग मला मराठी, हिंदी आणि इंग्रजी सोडून अन्य भाषा येत नाहीत
गुमनाम, बीस साल बाद, कोहरा, मेरा साया हे चित्रपट कुठल्यातरी चॅनेलवर पहाता यावेत आणि इथे लिहिता यावं अशी एक सुप्त इच्छा आहे. मजा आ जायेगा.
झंपी, छोटीसी बात नक्की पाहेन.
कोहरा पाहून माझी प्रचंड
कोहरा पाहून माझी प्रचंड निराशा झाली. एकतर मूळ कथानक परकीय, त्याचे भारतीयिकरण जमले नाही. आणि मूळ कथेत हिरोकडेही थोडा दोष जातो, जो भारतीय हिरोत अजिबात चालणार नाही त्यामुळे पूर्णपणे उडवलाय. एवढे केल्यावर जी कथा उरते ती न शेंडा न बुडखा अशी उरते.
सुंदर
सुंदर
परवा इतकी छान प्रतिक्रिया लिहीली होती पण दुर्दैवाने डीडीट झाली.
या अगोदर मी म्हटलं होतं की हा चित्रपट कलाकारांनी मस्त enjoy केलाय.
ओमप्रकाश, धर्मेंद्र, शर्मिला सगळ्यांनी विनोदाचा सुर उत्तम पकडला आहे.
खरतर अमिताभ तेव्हा सुपर स्टार झाला होता पण इतक्याश्या रोल मध्ये काय काम केलं?? मला नाही वाटत आताचा एखादा स्टार अशी भुमिका स्विकारेल आणि निभावू शकेल.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
चुपके चुपके हज्जारो वेळा पाहिला आहे आणि जवळजवळ पाठ आहे. हा चित्रपट पाहिल्यावर मला पहिल्यांदा लक्षात आलं होतं की धर्मेंद्र अतिशय अंडररेटेड कलाकार आहे.
मला एक पहेली नावाचा पिक्चर पण
मला एक पहेली नावाचा पिक्चर पण खूप आवडायचा. एक नॉर्मल वेस्टर्न मिनी कपड्यातली भरपूर वॉर्डरोब असलेली तरुणी भूत आहे असा शेवटी शोध लागतो तेव्हा मनात बरेच प्रश्न आले.
कत्ल ऑटाफे.खूप अहेड ऑफ टाईम पिक्चर आहे.
बातो बातो मे पण.
परीचय पण यादीत घे! >>> हो फार
परीचय पण यादीत घे! >>> हो फार गोड पिक्चर.
येस, परिचय सुंदरच! सीता और
येस, परिचय सुंदरच! सीता और गीता हाही माझा खूप आवडता पिक्चर! कधीही, कुठूनही बघायला सुरुवात करता येते हेमामालिनीने चांगला अभिनय केलाय. काही काही प्रसंग महान आहेत.. पोलिस स्टेशनमधला, अदलाबदलीनंतरचे धर्मेंद्रबरोबरचे अनेक, संजीवकुमारबरोबरचा कार आपटते तेव्हाचा.
"खरतर अमिताभ तेव्हा सुपर
"खरतर अमिताभ तेव्हा सुपर स्टार झाला होता पण इतक्याश्या रोल मध्ये काय काम केलं?" - अमिताभ हृषिकेश मुकर्जी च्या सिनेमात बरेच वेळा छोटा रोल करायचा. मला वाटतं सासूरवाडीचं काहीतरी कनेक्शन होतं. अर्थात चुपके-चुपके मधे त्या मानानं त्याचा रोल मोठा आहे -जरी धर्मेंद्र ईतका मोठा रोल नसला तरिही, आणी महत्वाचा पण आहे.
बाय द वे धर्मेन्द्र टोटल धमाल
बाय द वे धर्मेन्द्र टोटल धमाल कॉमेडी करू शकतो, स्क्रिप्ट चांगली असेल तर. इव्हन शोले मधे त्याचा ७०-८० टक्के रोल विनोदीच आहे शेवटचा बदला सोडला तर.
खरतर अमिताभ तेव्हा सुपर स्टार झाला होता पण इतक्याश्या रोल मध्ये काय काम केलं?? >>> चुपके चुपके रिलीज झाला तेव्हा 'दीवार' नुकताच हिट झाला होता, इतकेच. अगदी सुपरस्टार वगैरे नव्हता तोपर्यंत. विकीपीडिया वर पाहिले तर दीवार चा रिलीज जाने. १९७५, चुपके चुपके एप्रिल १९७५ आणि शोले ऑगस्ट १९७५.
अर्थात हृषिकेष मुखर्जींकरता अमिताभ कितीही साधे रोल्स सुद्धा करत असे. अगदी डॉन, त्रिशूल ई च्या धिंगाण्यामधे सुद्धा त्याने 'आलाप' मधे काम केले होते. गोलमाल मधल्या त्या गाण्यात अमोल पालेकर ला तो सुपरस्टार झाला आहे असे स्वप्न दिसते व त्यात त्याची सही घ्यायला फॅन्स येतात, तेव्हा बाजूला फूटपाथवर बसलेल्या अमिताभचा एक सेकंदाचा गेस्ट रोल धमाल आहे.
'फ्रेण्ड्स' मधे जसे हॉलीवूडचे दिग्गज कलाकार व इतर फेमस लोक 'कॅमिओज' करतात व सहसा ते कॅमिओज त्यांच्या पब्लिक इमेजच्या पेक्षा एकदम फटकून असतात ( ही क्लिप पाहा. यातला टोपी विकणारा म्हणजे व्हर्जिन ग्रूप चा सीईओ रिचर्ड ब्रॅन्सन आहे) तसे अनेकदा हृषिकेष मुखर्जीं व बासू चटर्जींच्या चित्रपटात असे. अशी self-depracating कॉमेडी हिंदी मधे फार क्वचित दिसली आहे. ओम शांती ओम मधे शेवटी फराह खान ला न घेता सगळे निघून जातात व तिला रिक्षा करून जावे लागते असा काही तरी सीन लक्षात आहे. असा एखाद दुसराच अपवाद.
अमिताभ हृषिकेश मुकर्जी च्या
अमिताभ हृषिकेश मुकर्जी च्या सिनेमात बरेच वेळा छोटा रोल करायचा. >>> ग्रेट माइण्ड्स, फेफ माझी पोस्ट लिहायला बराच वेळ लागला त्यामुळे दोन्ही क्रॉस झाल्या सासुरवाडी कनेक्शन माहीत नाही, असू शकेल. अनेक वर्षे अमिताभ चे एकेका दिग्दर्शकाबरोबर असे चित्रपट मोजले तर यांचेच सर्वात जास्त होते. आताचे माहीत नाही.
अमिताभचा इंग्लिश विंग्लिश
अमिताभचा इंग्लिश विंग्लिश मधेही लक्षात राहील असा छोटासा रोल आहे.
कोशिश मधे दिलीपकुमारनेही२ मिनिटांचा रोल केलाय.
चुपके चुपके ऑटाफे पिक्चर आहे.
चुपके चुपके ऑटाफे पिक्चर आहे. सुरवातीला सोनी वर पाहिला होता. त्यानंतर मग युट्युब वर बरेच वेळा पाहिला. खुपच मजा येते बघताना. त्यांची ती शुद्ध हिंदी, सुरवातीचा चौकीदार, अमिताभ ची उडणारी धांदल. मस्तच एकदम. आणि धर्मेंद्र काय हँडसम दिसायचा त्यावेळेस. अनुपमाच्या वेळेस म्हटले तसेच. हृषीदांनी धर्मेंद्रला खुप सुंदर रोल्स दिले आणि त्याने त्यांचे सोने केले !!
नरम-गरम पण घ्याच यादीत...
नरम-गरम पण घ्याच यादीत...
नरम गरम मध्ये शत्रुघन सिन्हा
नरम गरम मध्ये शत्रुघन सिन्हा धमाल आहे
नरम गरम मध्ये शाब्दिक विनोद
नरम गरम मध्ये शाब्दिक विनोद खूप मस्त आहेत, कलाकारांनी टायमिंग उत्तम रित्या सांभाळले आहे पण नंतर थोडा बोअर होतो.
स्वप्ना मस्त चाललेय मालिका हि
स्वप्ना मस्त चाललेय मालिका हि तुझी . त्यानिमित्ताने तू जुने जुने पिक्चर बघायला भाग पाडत्येस .
आज मी आता यु ट्यूब वर बघितला
>>'अब के सजन सावन मे' आणि
>>'अब के सजन सावन मे' आणि 'चुपके चुपके' गाण्याची चाल, संगीत आणि गायकी सुपर रोमॅण्टिक टोन मधे आहे. मात्र आनंद बक्षी ने अगदीच काहीतरी लिहीली आहेत गाणी. साहिर किंवा गुलजार ने मजा आणली असती. विशेषत: चुपके चुपके गाण्यात कन्हैय्या ला यमक म्हणून दैय्या रे दैय्या, ताथैय्या ताथैय्या वगैरे काय वाट्टेल ते वापरले आहे. अगदी पुलंच्या "एक थोडं गच्ची बसतंय का बघा" लॉजिक वापरून लिहीलेले<< सौ टके पते की बात.. बक्षींची गाणी छान असायची पण ते अश्या यमकांच्या पाट्या बर्याच दा टाकत असत बहुदा... उगाच नाही ४१ वेळेला नॉमिनेशन असून ही केवळ ४ दा फिल्म्फेअर चे अॅवॉर्ड मिळाले आत्ता ताल मधलं च गाणे घ्या ना. नीचे इश्क है... उपर रब है, इन दोनो के बीच में सब है | इक नही सौ बातें कर लो, सौ बातों का इक मतलब है....... काही काय.. आवरा
स्वप्ना ही सिरीज वाचून पुन्हा
स्वप्ना ही सिरीज वाचून पुन्हा सर्व चित्रपट पाहायची इच्च्।आ होत आहे. सर्वच भाग खूप छान आहेत. फोन्वर वाचले जातत त्यामुळे कमेंट टाकणं होत नव्हतं.
हा चित्रपट तर मस्त्च.
अवांतरः आनंद बक्षी चा विषय
अवांतरः आनंद बक्षी चा विषय निघालाच आहे तर हे आणखीन एकः कल नही आना| मुझे ना बुलाना| मारेगा ताना|जमाना|
पण हाच माणुस, कुछ तो लोग कहेंगे पण लिहून जातो.
चुपके चुपके एकदम आवडता पिक्चर
चुपके चुपके एकदम आवडता पिक्चर. स्वप्ना_राज लेख मस्त आणि फेरफटका, फारेण्ड, मि_अनू ह्यांच्या विशेष टिप्पण्याही मस्त.
लहान मुलगी रत्ना चा रोल केलेला मुलगा(?) बरेच सिनेमांतून दिसायचा ना तेव्हा. तो प्रत्यक्षात मुलगा होता की मुलगी तेच आठवत नाही आता.
रत्ना चा रोल केलेला मास्टर
रत्ना चा रोल केलेला मास्टर बिट्टू होता. त्याचं खरं नाव विशाल देसाई.
हे ऑटॉफे काय आहे?
हे ऑटॉफे काय आहे?
त्या छोट्याश्या मुलीचे आई बाप
त्या छोट्याश्या मुलीचे आई बाप म्हणून ओमप्रकाश आणी उषा किरण जास्त मोठे वाटत नाहीत का? मला तर आधी ते आजी आजोबाच वाटलेले तिचे.
ऑटाफे - ऑल टाइम फेवरिट
ऑटाफे - ऑल टाइम फेवरिट
रश्मी, हो मलाही ओमप्रकाशच्या वयाच्या मानाने धाकटी मुलगी बरीच लहान वाटते. पण त्यांना एक मोठी मुलगी पण आहे बहुतेक, जी होस्टेलला असल्याचा उल्लेख आहे.
हो बरोबर.
हो बरोबर.
तसे तर शेरलॉक होम्स च्या बर्याच कथांमध्ये पण विवाहीत कपल मधला माणूस एकदम मिड एज/पन्नाशीला पोहचत असल्यासारखा दिसत असलेला आणि बाई फ्रेशर+फारतर ३-४ वर्षे,सुंदर अशी असते.
(डान्सिंग मेन/अॅबी ग्रेंज). आणि ते त्या माणसाचे पहिलेच लग्न असते.
ओमप्रकाश आणि रत्ना ची (त्यावेळी आई नसलेली) आई यांचेही असेच असेल.
कन्हैय्या ला यमक म्हणून
कन्हैय्या ला यमक म्हणून दैय्या रे दैय्या, ताथैय्या ताथैय्या वगैरे काय वाट्टेल>>
अगदी बरोबर लिहीलयं. हे गाण मलाही फारस नाही आवडत.
इतका टिपेचा आवाज लावून गायची काहीच गरज नव्हती. जयाने जर खरच गाऊन अभिनय करायच ठरवलं असत तर अभिषेक तिथेच झाला असता.
ओके धन्यवाद वावे आणी अनू.
ओके धन्यवाद वावे आणी अनू.
मस्त... धर्मेंद्र आणि अमिताभ
मस्त... धर्मेंद्र आणि अमिताभ साठी नेहमी बघते हा सिनेमा... कमाल टायमिंग.. धर्मेंद्र अशक्य देखणा दिसतो..
चुपके चुपके, गोलमाल (जुना), अंगुर, खूबसूरत, चष्मे बद्दूर (दीप्ती नवल- फारुख शेख), कथा , छोटीसी बात, जाने भी दो यारों हे आणि असे अनेक सिनेमे माझ्या घरी सगळ्यांचेच ऑल time favorite आहेत.. कितीही वेळा बघू शकतो आम्ही..
मजा आली ही पोस्ट वाचून
हा सिनेमा एकदा धर्मेंद्र-ओम
हा सिनेमा एकदा धर्मेंद्र-ओम प्रकाशच्या जुगलबंदीसाठी पाहावा आणि एकदा फक्त अमिताभसाठी !! (सारेगामा गाण्यात पाया रचला जातो. आणि `हू ना नहीं, है ना' - हा सीन म्हणजे कळसाध्याय!)>>> अगदी अगदी..
'हूं ना नहीं, है ना' ला तर मी दर वेळी तेवढ्याच intensity ने फुटते..
अमिताभचं नाकावरचा चश्मा adjust करणं supercute आहे
Pages