खोटी नाणी

Submitted by कुमार१ on 2 July, 2017 - 22:11

ही मैत्री, प्रीती, ही तर खोटी नाणी
बाजार भरविती गाऊन त्यांची गाणी

मित्रहो, या आहेत रॉय किणीकरांच्या एका कवितेतील दोन ओळी. यांनी माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे. ते म्हणतात ते अगदी खरे आहे. मैत्री व प्रीती या दोन्ही प्रांतांमध्ये असंख्य खोटी नाणी कायम खुळखुळत असतात. माझ्या काही परिचितांना त्यांच्या आयुष्यात अशा खोट्या नाण्यांचे चांगलेच अनुभव आले. त्यांनी ते मला सांगितले. मला ते भावले. ते आपल्यासमोर सादर करतो.
***
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रसाद नुकताच एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षात गेला होता. वसतीगृहात राहून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याचे शिक्षण चालू होते. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांचे हॉस्पिटल प्रशिक्षण चालू होते. प्रत्यक्ष रुग्णासोबत डॉक्टर जो विद्यार्थ्यांच्या लहान गटाचा तास घेतात, त्याला ‘क्लिनिक’ म्हणतात.
एके दिवशी प्रसादच्या २५ जणांच्या गटाचे क्लिनिक एका हॉस्पिटलमध्ये चालू होते. हे हॉस्पिटल मुलांच्या वसतीगृहापासून दोन कि.मी. अंतरावर होते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी तेथे सायकलने आले होते. उकाड्याचे दिवस होते. खच्चून भरलेल्या हॉस्पिटलमधील एका अरुंद जागेत डॉ. जोशी हे क्लिनिक घेत होते. सर्व विद्यार्थी ते उभ्यानेच ऐकत होते.
अचानक प्रसादला अस्वस्थ वाटू लागले. त्याला किंचित चक्कर आली आणि काही कळायच्या आत तो एकदम बाजूच्या मुलांच्या अंगावर पडला. दोन मिनिटांसाठी त्याची शुद्ध हरपली. याला वैद्यकीय शास्त्रात syncope म्हणतात. हॉस्पिटल प्रशिक्षणाच्या सुरवातीच्या काळात असे प्रकार अधूनमधून होत असतात. आता प्रसाद शुद्धीवर आला. डॉ.जोशींनी त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले व थोडा वेळ झोपवून ठेवले. मग त्यांनी ‘क्लिनिक’मधल्या रुग्णाच्या आजाराची चर्चा थोडावेळ बाजूलां ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांना या ‘सिंकोप’ प्रकाराची माहिती दिली. त्यामध्ये घाबरण्यासारखे काही नसते, असेही सांगितले.
नंतर ते प्रसादला म्हणाले, ‘आता तू होस्टेलवर जाऊन विश्रांती घे.फक्त जाताना एकटा जाऊ नकोस. तुझ्या या वर्गमित्रांपैकी कोणाला एकाला (किंवा एकीला! ) बरोबर घेऊन जा.” प्रसादला आता जरा बरे वाटत होते. पण त्याचे डोके हलके झाल्यासारखे जाणवत होते आणि असा प्रकार आयुष्यात प्रथमच घडल्याने कसेतरीच वाटत होते. आता त्याला वाटले, की आपल्या या गटातील कोणीही एक चटकन पुढे येईल व त्याला सोबत करेल. तो आशेने एखाद्या सोबत्याची वाट पाहू लागला. पण तसे काही घडेना. मग त्याने मुलांच्या घोळक्यात मागे उभे असलेल्या एक-दोघांना हळूच विचारले. पण, त्या दोघांनी जरा नाराजीच दाखवली आणि ते क्लिनिकमध्येच लक्ष देऊ लागले. दरम्यान प्रसादाच्या डोक्यातला हलकेपणा अजून टिकून होता. एकीकडे डॉ. जोशींचे शिकवणे चालू होते. साधारण दहा मिनिटे वाट पाहिल्यावर प्रसादच्या लक्षात आले, की कोणीही त्याच्याबरोबर यायला उत्सुक नव्हते. सर्वजण त्या क्लिनिकमध्ये मग्न होते. त्याला मगाशी आलेल्या चक्करेपेक्षा हाच मोठा धक्का होता. हताशपणे तो त्या समूहाकडे पाहत राहिला.

शेवटी तो उठला व एकटाच सायकल मारत होस्टेलला परतला. त्याचे सहकारी वर्गमित्र हे सर्वजण त्या कॉलेजमध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळवून आलेले भावी डॉक्टर्स होते. पण, या प्रसंगी त्यांच्यापैकी एकालाही आपल्या अडचणीत असलेल्या सहकाऱ्याला मदत करावी असे वाटले नाही. प्रसादबरोबर जाण्यापेक्षा त्या तासाचे शिक्षण न बुडणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक महत्वाचे होते! सेवाभाव हा डॉक्टरच्या अंगी असावा लागणारा प्राथमिक गुण त्यांच्यापैकी एकातही नसावा?
प्रसादने ‘सिंकोप’चा धक्का त्या दिवसभरात पचवला. पण, अत्यंत गरजेच्या वेळी त्याला कोणीही सोबत न केल्याची जखम आजही – एक यशस्वी डॉक्टर होऊन अनेक वर्षे झाल्यावरही – तो उरी बाळगून आहे.
……
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या शहरातील हा एक प्रसंग. विनय व संजय हे दोघे तरुण अभियंते. दोघे कॉलेज जीवनातले वर्गमित्र. त्यांनी एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आणि आता आपापल्या व्यवसायात मग्न. एका वर्षी, हे दोघेही सदस्य असलेल्या अभियंत्यांच्या संस्थेने एक अभिनव उपक्रम जाहीर केला होता- तो म्हणजे महाराष्ट्रातील अभियंत्यांचे साहित्यसंमेलन. त्या दोघांनीही त्यासाठी नावनोंदणी केली होती. विनयने आतापर्यंत थोडेफार लेखन केलेले होते. तो संमेलनातल्या कथाकथनात भाग घेणार होता. तर संजयचा संमेलनाला यायचा हेतू म्हणजे जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेणे, हा होता.

संमेलन पूर्ण एक दिवसाचे होते. या दोघांची भेट सकाळच्या चहापानाच्या वेळेत झाली. गपागोष्टी, चेष्टामस्करी इ. झाल्यावर विनयने तो स्वतःची एक कथा कार्यक्रमात सादर करणार असल्याचे संजयला सांगितले. त्यावर संजयने फारसे औत्सुक्य न दाखवता, तो केवळ प्रेक्षक म्हणून संमेलनाला आल्याचे सांगितले. संमेलनाला महाराष्ट्रातील अनेक गावांतून अनेक उत्साही अभियंते आलेले होते. विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरलेली होती. त्यामध्ये परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन इ. चा समावेश होता. कथाकथनाचा कार्यक्रम उशीरा रात्री आठ वाजता होता.

कार्यक्रम चालू झाले आणि पुढे सरकत होते. दुपारी दोनला सर्वांचे स्नेहभोजन झाले. तेव्हाच्या गप्पांमध्ये विनय व संजयने जुन्या आठवणींना उजाळा दिला. आताच्या कार्यक्रमांवर चर्चा झाली. बोलण्याच्या ओघात विनयने पुन्हा एकदा त्याचे कथाकथन असल्याचे संजयला सांगितले. तरीही संजय थंडच होता. त्याने त्याबाबत कोणतीही उत्सुकता न दाखवता विषयांतर केले. संजयला विनय लेखन करतो हे माहीत होते. त्याचे काही लेखन संजयने पूर्वी वाचलेही होते. त्यामुळे विनयची एवढीच माफक अपेक्षा होती, की संजय त्याला विचारेल की कोणती कथा त्याने कथनासाठी निवडलीय. परंतु विनयच्या पदरी अपेक्षाभंगच आला.

भोजनोत्तर पुढचे कार्यक्रम झाले. बघताबघता संध्याकाळच्या चहापानाची वेळ झाली. पुन्हा एकदा मित्रमंडळी एकत्र. चहाचा घोट घेताना संजयने विनयला सांगितले, की तो आता बोअर झालाय आणि चहापान उरकताच निघून जाणार आहे. इथपर्यंत ठीक होते. पण, त्याची पुढची प्रतिक्रिया मात्र विनयला चांगलीच खचविणारी ठरली. संजय म्हणाला, “आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकाचे बरं असतं बुवा. बोअर झालं की सरळ कटता येतं. तू मात्र कार्यक्रमात भाग घेतलेला असल्याने अडकून पडला आहेस!”

विनयला अजूनही वेडी अशा होती की हा गृहस्थ निदान आपल्या आजच्या कथेचे नाव तरी विचारेल आणि मग निघेल. पण छे! पठ्या जणू त्या गावचाच नव्हता. यावर विनयने त्याला स्वतःहून अधिक सांगणे म्हणजे वेडेपणा ठरला असता. मग संजयने फालतू गप्पाटप्पा करून विनयला अच्छा केले व तो निघून गेला. यथावकाश त्याचा कार्यक्रम झाला. त्याच्या कथनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संमेलनाची सांगता झाली. विनयच्या दृष्टीने संमेलन उत्साहवर्धक ठरले होते. पण, त्याचबरोबर मित्र म्हणवणाऱ्या एका अरसिक सहकाऱ्याच्या अनपेक्षित व अत्यंत थंड्या प्रतिसादामुळे आलेली खिन्नता त्याला छळत राहिली.
..........
आणि आता प्रीतीच्या प्रांतातील एक किस्सा. शरद हा एक वैज्ञानिक. त्याची एकूण करीअरच ‘अ’ दर्जाची. दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत अगदी वरच्या क्रमांकाने झळकलेला. त्यानंतर जाणीवपूर्वक व्यावसायिक शाखांच्या वाटेला न फिरकता विज्ञानाकडे वळलेला. पुढे त्याने या शाखेतील एकेक टप्पे पार करीत पी.एच.डी. लीलया प्राप्त केली. कुशाग्र बुद्धीचा शरद मूलभूत संशोधन करण्याच्या इराद्यानेच विज्ञानाकडे वळला होता. कॉलेजच्या सुरवातीपासूनच त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिले होते.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना असणाऱ्या करमणुकीच्या अनेक आकर्षणापासून तो कित्येक कोस दूर होता. नाही म्हणायला त्याला अभ्यासापासून विचलित करणारी एक गोष्ट होती. त्यांच्याच वर्गातली नेहा ही त्याच्यावर चक्क ‘मरत’ होती. शरद तिला कटाक्षाने दूर ठेवायला बघे. पण ती पक्की वस्ताद. काही ना काही कारण काढून ती त्याला सतत चिकटायला बघे. तशी ती अभ्यासात यथातथाच. केवळ कॉलेजचे आयुष्य उपभोगायचे म्हणून कॉलेजला येणारी. तेव्हा अशा नेहाने तिथल्या पहिल्याच वर्षी शरदसारखा देखणा व हुशार मुलगा हेरला, यात नवल ते काय?

शरदने हर प्रकारे तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहाचे प्रेमजाल इतके प्रभावी होते की शेवटी शरदमधला पुरुष त्यात अडकलाच. मग काय, या प्रेमप्रकरणाला अपेक्षित गती आली. मग एकमेकाचे जीवनसाथी होण्याच्या आणाभाका झाल्या. भावी वैवाहिक आयुंष्यात शरद संशोधनात स्वतःला झोकून देईल, तर नेहा ही एक उत्तम गृहिणी म्हणून त्याला साथ देईल, असेही ठरले.
दरम्यान शरदने पीएचडी वर स्वस्थ न बसता परदेशातील पोस्ट- डॉक्ट च्या प्रवेशाची तयारी चालू केली. त्याला त्यासाठी अमेरिकेतून सहज आमंत्रण मिळाले. नेहाला त्याचा अभिमान वाटला. आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. नंतर शरद आणि यथावकाश नेहा हे अमेरिकेत दाखल झाले.

तेथील संशोधन प्रयोगशाळा म्हणजे शरदच्या दृष्टीने अक्षरशः कामाचे नंदनवन होत्या. त्यात तो दिवसाचे सोळा तास त्याच्या कामात देहभान हरपून गढून जाई. नेहाला त्याच्या या जीवनशैलीशी जुळवून घेणे भाग होते. त्यांचे सुरवातीचे दिवस तसे सुखात गेले. नंतर मात्र नेहाला घरी एकटेपणा जाणवू लागला. दिवस खायला उठे. नोकरीयोग्य व्हिसा नव्हताच. शेवटी वेळ जायला म्हणून तिने एका जवळच्या क्लबचे सभासदत्व घेतले.

हळूहळू क्लबात तिच्या ओळखी वाढल्या. तिथे रुपेश हा तरुणही नियमित येई. रुपेशचे खानदान अमेरिकेत तीन पिढ्या हॉटेलच्या व्यवसायात स्थिरावले होते. गर्भश्रीमंत असलेल्या रुपेशची जीवनशैली एकूणच मौजमस्तीची होती. अशा माणसाची नेहावर नजर न पडली तरच नवल. त्याने तिच्याशी सलगी केली आणि काही महिन्यांतच तिला आपल्या जाळ्यात व्यवस्थित अडकवले.
सुरवातीस नेहाला मनातून अपराधी वाटे. पण हळूहळू त्या गुलछबू माणसात ती कशी गुंतत गेली हे तिलाच कळले नाही. घरातील एकटेपणा, शरदचे संसारापेक्षा संशोधनात अधिक रमणे आणि रुपेशचे प्रभावी ‘माया’जाल या सगळ्यांमुळे ती अगदी वाहवत गेली. बघताबघता परपुरुषाशी ओळख, मैत्री, प्रेम(?) आणि अखेरीस शरीरसुख असे टप्पे तिने अगदी सहज पार केले.

अमेरिकेतले मुक्त वातावरण, रुपेशच्या संपत्तीचे आकर्षण आणि सुखासीनतेची लागलेली चटक यांच्यापुढे नेहाला आता शरदची सोज्वळ बायको बनून राहणे अवघडच होते. त्यातून रुपेशला ती अगदी लग्नाची बायको म्हणून नसली तरी चालणार होते! लग्नाविना सहजीवनासाठी तो एका पायावर तयार होता. फक्त तिने शरदला पूर्ण सोडून यावे एवढीच त्याची मागणी.
मग काय, अपेक्षेप्रमाणेच या प्रकरणाचा शेवट. शरदला बसलेला मानसिक धक्का, त्यांचा घटस्फोट आणि नव्या जोडीचे निव्वळ सहजीवन सुरू! या सगळ्यात बळी कोणाचा गेला, तर शरदचा. कोणामुळे? तर प्रीतीच्या एका खोट्या नाण्यामुळे. शरदच्या दैदिप्यमान वैज्ञानिक कारकिर्दीला लागलेला हा सांसारिक कलंक तो कधीच विसरू शकणार नव्हता.
*************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार लेख वाचला,
आधीच माफी मागते कारण माझे मत थोडे वेगळे वाटेल. तिन्ही प्रसंग पाहता मला त्यात अपेक्षाभंगामुळे झालेल्या दु:खाने समोरच्याला 'खोटं नाणं' ठरवलं गेल्यासारखं वाटतंय.
१. प्रसाद ला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्टेल पर्यंत कुणीतरी सोबत करावी ही अपेक्षा असूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि तो खट्टू झाला. वर वर पाहता हा प्रसंग माणुसकी नसल्यासारखा वाटतो. आणि तो तसा बरोबर आहे, पण डॉक्टर, सायंटिस्ट असं उच्च बुद्धिमत्तेचं काम करणार्‍या लोकांना बर्‍याचदा इंटरपर्सनल स्किल्स थोडी कमी असण्याची शक्यता असते कारण त्यांचा फोकस एकच असतो 'अभ्यास' एकाही टॉपिक ची एकही ओळ शिकायची चुकायला नको.. इतके काटेकोर असतात कधीकधी हुशार लोक, त्याच्यापुढे त्यांना भाव, भावना कधी कधी कमी महत्वाच्या वाटतात.
दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या बरोबर इतकं रिलेट करण्यासाठी त्या व्यक्तीबरोबर तितकी मैत्री/सख्य असावं लागतं ते ही प्रसाद आणि त्याच्या सह्यपाठी यांच्यात नसेल. दूर का जा? मी माझं उदा. देते रस्त्यात मला अपघात वगैरे झाला तर मी तिथे जात नाही, महत्वाचं कारण म्हणजे मी रक्त्/जखमा किंवा समोरच्याला वेदना होतेय हे सहन करू शकत नाही, याचा अर्थ मला माणुसकी नाही असा होत नाही, तेच मी माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला अत्यंत जखमी अवस्थेत ती विव्हळत असताना स्वतः हॉस्पिटल मध्ये घेउन गेले आहे म्हणजेच दोन व्यक्तींमध्ये असलेला बाँड महत्वाचा आहे.

दुसर्‍या प्रसंगात पुन्हा, माझे कथावाचन आहे आणि समोरच्याला मी हे जेव्हा सांगतोय तेव्हा त्याने त्यावर सुसंगत अशी प्रतिक्रिया द्यावी ही अपेक्षा पुर्ण न झाल्याने विनय नाराज झाला.
पण एखाद्या प्रसंगी तिथे उपस्थित असणार्‍या प्रत्येक माणसाचा विचार वेगळा असू शकतो. त्या घटनेचं/सोहळ्याचं आपल्याला जितकं महत्व असेल तितकंच समोरच्याला असावं हे जरूरी नाही. उदा. एखाद्या लग्नात अनेक लोक जातात, त्यात निव्वळ लाजेकाजेस्तव, किंवा यांच्या कडून चांगला आहेर आला होता म्हणून, ह्या कार्यालयात उत्तम जेवण मिळते म्हणून, किंवा परतीचा आहेर जबरदस्त असेल, मला या कुटुंबाबद्दल खरोखरी खूप आस्था आहे म्हणून.. इ. अनेक प्रकारचे अजेंडे ठेवून लोक आले असतील. याचा अर्थ ते चूक नाहीत. आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना चूक्/बरोबर ठरवतो. संजय क्लियर होता की त्याला तिथे फक्त मित्र भेटणार आहेत म्हणून तो तिथे जातोय, त्यात गैर काहीही नाही. तो आपल्या जागी योग्य आहे असं मला वाटतं.

तिसरं उदा. तर आपल्या समाजाचं प्रातिनिधिक उदा. आहे. प्रेम किंवा आकर्षण या दोन्ही गोष्टी मानव्यसुलभ आणि नैसर्गिक आहेत त्यामुळे लग्न म्हणजे फक्त इतकंच.. (इतकंच म्हणजे आपापल्या कुवती प्रमाणे लोक त्यात गोष्टी अ‍ॅड करतात त्या आणि तितक्या) त्यामुळे प्रत्येकासाठी नात्याची व्याख्या वेगवेगळी असू शकते. निव्वळ पैसे मिळवतोय चांगले, वय आहे, शारिरिक क्षमता आहे म्हणून लग्न करणारे लोक या समाजात कमी नाहित, त्याच उलट लग्न म्हणजे नक्की काय? ते समजून मग लग्न करणारे लोक अत्यंत कमी असतात. लग्न करताना जरी अजेंडा मटेरियलिस्टिक असला तरीही कालांतराने ते नाते मॅच्युअर होत जाते, कारण दोघांचीही सर्वांगिण वाढ होत असते. पण जसं मी पहिल्या काही ओळीत लिहिलंय की अती हुशार लोक थोडे 'कोरडे' असण्याकडे झुकलेले असू शकतात कदाचित शरद तसा असेल, नेहाने ज्या हुशारीवर भाळून त्याच्याशी लग्न केले त्या हुशारीचा तिला नंतर कंटाळा आला कारण त्यात तिला ओलावा दिसला नाही, प्रेम करण्याच वय हे तसंच होत जिथे तिला तो हुशारी मुळे 'हिरो' वाटला. पुढे मोठे झाल्यावर त्या हुशारी सोबतच त्याला नातं म्हणजे काय हे कळायला हवं होतं, लग्न म्हणजे काय हे कळायला हवं होतं ही नेहाची अपेक्षा न पुर्ण झाल्याने ती दुसर्‍याकडे खेचली गेली.. व्हेअरइन; शरद अगेन वॉज व्हेरी क्लियर अबाऊट हिज स्टडी अ‍ॅन्ड करियर पण दुर्दैवाने तो हि थोडा चूकला कारण त्याने नेहाला गृहित धरले. वेळ बदलतो तशी माणसं सुद्धा चांगल्यासाठी बदलतात, पण नाते बदलावे यासाठी प्रयत्न दोघांनी करावे लागतात.

दक्षिणा, दीर्घ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार ! वाचकाने त्याचे मत जरी लेखकास प्रतिकूल असेल तरी जरूर मांडावे. हेच तर चांगल्या चर्चेचे लक्षण आहे.
तुमच्या मताचा आदर करीत मी त्यावर कोणताही प्रतिवाद करणार नाही. वाचकाच्या मताचा आदर मी केलाच पाहिजे.

तिन्ही प्रसंग पाहता मला त्यात अपेक्षाभंगामुळे झालेल्या दु:खाने समोरच्याला 'खोटं नाणं' ठरवलं गेल्यासारखं वाटतंय. >> त्याचे काय अहे ना, जगातील ९९.९% लोकांना कुठल्याही कर्मातून अपेक्षा असतेच. आपण सारे 'सामान्य माणूस' असतो. म्हणून असे दु ख होतेच.
'फलाची अपेक्षा न धरता कर्म करा' हे वाचायला सोपे पण आचरणात आणायला अतिशय कठीण आहे.

साद संपूर्ण अनुमोदन Happy
टोटली ऑब्जेक्टिव्ह होण्याचा प्रयत्न केलाय मी पण खुद्द त्या प्रसंगात गुंतलेली व्यक्ती म्हणून माझी वागणूक निराळी असू शकते.

तीन प्रसंगातला शेवट्चा सोडुन पहिले दोन पटले.
पहिल्यात आपल्या सहकार्‍याला त्याच्या होस्टेलपर्यंत सोडायला कुणीतरी जायला हवं होतं. त्यात एकदुसर्‍याशी बाँडींग वैगेरेचे खरतर गरज नव्हती. त्याला चक्कर आली म्हणुन चल मी तुला सोडुन येतो असं म्हणून स्वतःहुनच कुणीतरी सोडायला जायला हवं होतं. तो आपल्यातलाच एक आपल्यासारखाच आहे ही गोष्ट महत्वाची नाही का?
दुसर्यात तो त्याचा मित्र आहे. आणि आपला मित्र तीन तीनदा स्वतःच्या कथावाचनाबद्दल सांगत असताना, नाव विचारायचं तर दुरच, कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीच निघुन जाणं म्हणजे ती मैत्री तकलादु आहे हेच दाखवतं.

तिसरीत खोटं नाणं नाही म्हणुन शकत. त्रास शरदला झालाय हे मान्यच. पण नेहाची बाजुही आहे काही. नाती टिकवण्यासाठी दोन्हीकडुन प्रयत्न असावा लगतो.
वैम.

पंडित व सस्मित, प्रतिसाद आवडले.
३ प्रसंगांबाबत वाचकांची मतांतरे आहेत हे बघून आनंद झाला.

पहिल्यात आपल्या सहकार्‍याला त्याच्या होस्टेलपर्यंत सोडायला कुणीतरी जायला हवं होतं. त्यात एकदुसर्‍याशी बाँडींग वैगेरेचे खरतर गरज नव्हती. त्याला चक्कर आली म्हणुन चल मी तुला सोडुन येतो असं म्हणून स्वतःहुनच कुणीतरी सोडायला जायला हवं होतं. तो आपल्यातलाच एक आपल्यासारखाच आहे ही गोष्ट महत्वाची नाही का? >>
एकदम सहमत ! भावी डॉ. ना हे समजत / जाणवत नसेल तर असे डॉ. पुढे समाजाच्या तरी किती उपयोगाचे ?

दुसर्यात तो त्याचा मित्र आहे. आणि आपला मित्र तीन तीनदा स्वतःच्या कथावाचनाबद्दल सांगत असताना, नाव विचारायचं तर दुरच, कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीच निघुन जाणं म्हणजे ती मैत्री तकलादु आहे हेच दाखवतं. >>>
बस्स! संजयने फक्त कथेचे नाव विचारावे एवढीच विनयची माफक अपेक्षा होती. कार्यक्रमास थांबणे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न असतो.

दुसर्‍या प्रसंगाबाबत : साहित्य संमेलनाला आलेला माणूस कथेचे नावही न विचारण्याइतका कोरडा असू शकतो ? तोही पूर्वपरिचित असताना ? मला यात संजयचे जलन दिसते. या वृत्तीच्या मुळाशी माणसाची सहज कौतुक न करण्याची वृत्ती दिसते.
एकूणच शहरी पांढरपेशांत लहानपणापासून दुसर्‍याचे कौतुक करायला शिकवले जात नाही. दुसर्‍याची दखल न घेणे, जाणूनबुजून अनुल्लेख असे दुर्गुण मात्र आपोआप शिकले जातात.

एकूणच शहरी पांढरपेशांत लहानपणापासून दुसर्‍याचे कौतुक करायला शिकवले जात नाही. दुसर्‍याची दखल न घेणे, जाणूनबुजून अनुल्लेख असे दुर्गुण मात्र आपोआप शिकले जातात. >>>> +१००००

एकूणच शहरी पांढरपेशांत लहानपणापासून दुसर्‍याचे कौतुक करायला शिकवले जात नाही. दुसर्‍याची दखल न घेणे, जाणूनबुजून अनुल्लेख असे दुर्गुण मात्र आपोआप शिकले जातात. >>>> 'कौतुक! चुकून कधीतरी' ह्या विषयावर सदर धागाकर्त्यांचा एक लेख आहे. त्यांची परवानगी गृहीत धरून मी त्याची लिंक खाली देत आहे. नक्की वाचा.
http://www.maayboli.com/node/61047

पहिल्या प्रसंगात कोणीतरी प्रसादसोबत जायला हवे होते असे वाटले.

पण दुसरा आणि तिसरा प्रसंग खोटे नाणे म्हणण्यासारखा वाटला नाही. दुसऱ्याततर 'संजयचा संमेलनाला यायचा हेतू म्हणजे जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेणे, हा होता.'असे क्लिअर असताना परत परत आपल्या कथेबद्दल कशाला सांगायचं?ं

एकूणच शहरी पांढरपेशांत लहानपणापासून दुसर्‍याचे कौतुक करायला शिकवले जात नाही. दुसर्‍याची दखल न घेणे, जाणूनबुजून अनुल्लेख असे दुर्गुण मात्र आपोआप शिकले जातात.
>>
+११११

वाचक हो, क्षणभर आपण लेखातील प्रसंग बाजूला ठेवू. पण, लेखाच्या सुरवातीला दिलेल्या किणीकरांच्या ओळींत स्पष्ट म्हटले आहे की मैत्री व प्रीती ही खोटी नाणी आहेत.
तेव्हा या ओळीबद्दल आपल्याला काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक.

पहिल्यात आपल्या सहकार्‍याला त्याच्या होस्टेलपर्यंत सोडायला कुणीतरी जायला हवं होतं. त्यात एकदुसर्‍याशी बाँडींग वैगेरेचे खरतर गरज नव्हती. त्याला चक्कर आली म्हणुन चल मी तुला सोडुन येतो असं म्हणून स्वतःहुनच कुणीतरी सोडायला जायला हवं होतं. ?>>>>>> खरंय.अशाप्रसंगी, व्यक्तीचा आत्मविश्वास जरा ढळल्यासारखा होतो.त्यावेळी सहानुभूती (सह+ अनुभूती) गरजेची असते.
दुसरा प्रसंगात विनयचे पटत नाही.

षणभर आपण लेखातील प्रसंग बाजूला ठेवू>>>>> अरे ,हे नजरेआड झालं.
मैत्री व प्रीती ही खोटी नाणी आहेत.>>>>> माझ्यामते असं नाही.पण एकमेकांना गृहित धरले की अंतराय येऊ शकतो.
माणूस स्व्तःवर सर्वात जास्त प्रेम करतो.तरीही जगताना माणसाला मैत्रीच्या शिड्या लागतात.प्रत्येकाचा परीघ कमीअधिक प्रमाणात विस्तारत असतो.त्याच्यामधे आपण सामावू शकलो नाही तर समोरचा तेवढा प्रतिसाद देऊ शकत नाही.मग मी माझा परीघ विस्तृत करण्याऐवजी समोरच्याला का दोष देऊ?
पण जगताना ह्या २ गोष्टी आवश्यक आहेत्त्या त्या टप्प्याव्र त्यांची खूप मदत होते.
बुद्धांचे एक वा़य आहे तृष्णा(अपेक्षा) हे सर्व दु:खाचे मूळ आहे.आपल्यासारखी सामान्य माणसे लहानमोठ्या अपेक्षा बाळगून असतातच्,त्यातून कधी अपेक्षाभंग झाला की मग दु:खी होतात.

देवकी, चांगला प्रतिसाद. सहमत.
वर साद यांनी म्हटल्याप्रमाणे :
'फलाची अपेक्षा न धरता कर्म करा' हे वाचायला सोपे पण आचरणात आणायला अतिशय कठीण आहे. >>> + एकावर अनंत शून्ये !

अश्या लेखांवर बरेचदा प्रतिसाद किस्सा पटला / पटला नाही या स्वरुपात येतात. माझाही तसाच आहे. फक्त प्रत्येक माणूस आपण आपल्या नजरेतून बघतो आणि आपला चष्मा काही आदर्श आणि तटस्थ नसतो हे लक्षात घ्यायला हवे.

1) सोबत येणारा मित्र हा खास असतो. तो एक असेल किंवा ग्रूप असेल. ते जोडावे लागतात. जर सर्व वर्गमित्र एकाच पातळीचे असले तर सारे एकमेकाच्या तोण्डाकडे बघत तिथेच थांबणार हे साहजिकच आहे.

2) कुठल्याही साहित्यिकाने माझे साहित्याचे फॉर्मेलिटी म्हणून का होईना कौतुक करा ही अपेक्षा फारच आहे. त्या दिवशी विनोद धाग्यावर एक जोक वाचलेला. ट्रेनमध्ये दोन व्यक्ती भेटतात. एक म्हणतो मी कवी आहे. तसे दुसरा म्हणतो मी बहिरा आहे. हा जोक असला तरी हे फॅक्टही आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याला ज्या कलेत गती आहे त्याची आवड नसलेल्याला अरसिक असल्याचा शिक्का मारणे हे तर त्याहून चूक.

3) आपल्याकडे जो अभ्यासू असतो तो आदर्श व्यक्ती आणि जो फन लविंग असतो ती उथळ व्यक्ती असे सहज समजले जाते. मला तर वाटते हा स्वतंत्र धाग्याचाच विषय आहे. असो. पण या समजातूनच त्या मुलीवरच ठपका टाकत तिला हे नाते तुटण्याबद्दल दोषी ठरवले आहे.

मैत्री आणि प्रिती ही नाणी खोटी असती तर दुनिया चालली नसती.
दिवस आहे तशी रात्र पण आहे, काळं आहे तिथे पांढरं पण आहे. त्यामुळे प्रीती आणि मैत्रीत काही नाणी खोटी जरी असली तरी काही खरी असतात आणि आहेतच.

ऋ व दक्षिणा, समतोल प्रतिसाद. आभार !

आता थोडेसे "मित्र" व "परिचित" यातील फरकाबद्दल लिहीतो.
आपल्या वर्गातले सहाध्यायी, नोकरीतील सहकारी, खूप वर्षे शेजारी राहणारे इ. सगळे हे आपले केवळ "परिचित" असतात. त्यापैकी अत्यल्पच आपले "मित्र" होउ शकतात.

'मित्र' हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

'मित्र' हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे. >> १००% खरी गोष्ट आहे. मैत्र हे मन जुळण्यावर असते.
खरंतर सख्या बहिणी सुद्धा एकत्र वाढलेल्या असतात, वयातही फारसा फरक नसतो पण गरजेचे नाही की प्रत्येक घरात बहिणी या एकमेकांच्या मैत्रिणी असतीलच. त्या उलट काही काळच एकत्र घालवलेला असूनही काही व्यक्ती आयुष्यभराच्या साथीदार मैत्रिणी होतात.
मी आणि माझी एक मैत्रिण कैक वर्षांपुर्वी हॉस्टेल ला एकत्र रहात होतो ते ही फक्त २ वर्ष. त्यानंतर वाटा वेगळ्या झाल्या, ६ वर्ष संपर्कात नव्हतो कारण नंबर्/पत्ता काहीही माहिती नव्हतं. दोघींनी ही एकमेकिंना शोधायचा खूप प्रयत्न केला पण तिला माझे घर आठवत नव्हते आणि मला तिचे सासरचे घर बदलल्याचे माहित नव्हते. पण ईच्छा तिथे मार्ग, एके दिवशी मी रहात होते त्या एरियात येऊन तिने पुन्हा पुन्हा आठवून पाहिले एक दोनदा असे केल्यावर तिला माझे घर आठवले, तेव्हापासून आम्ही पुन्हा ट्च मध्ये आहोत. गेल्या ५ वर्षात आम्ही फक्त ३ वेळा भेटलोय. पण मैत्र आयुष्यभराचं आहे. Happy