Whats app... सुविचारांचा महापूर

Submitted by फूल on 12 June, 2017 - 21:04

पूर्वी कसं होतं नं कि महात्मा गांधी, वीर सावरकर, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद यांसारखे थोर विचारवंत, ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे संत होते... त्यांनी लिहायचं, आपण जमेल तेवढं झेपेल तेवढं वाचायचं... आणि वाचल्यावर त्यांच्या चरणांचं फक्त तीर्थच प्यावं अशी केवळ आशा बाळगायची...

पण आता काही तसं राहिलं नाही... “थोबाडपुस्तक” आणि “काय आहे” यांसारख्या तंत्र क्रांतीमुळे आता घरोघरी पावसाळ्यात कुत्राच्या छत्र्या उगवतात तसे लेखक-कवी-विचारवंत-समाज प्रबोधक-प्रवचनकार उगवलेत... त्यांना सतत काही ना काही होत असतं... कधी सुविचार होतात, कधी कविता होतात, कधी समाज प्रबोधन करणारे लेख होतात, कधी काहीच नाही झालं तर मग शुभेच्छा होतात.... असं काहीही त्यांना झालं रे झालं की लग्गेच ते भ्रमणध्वनी हातात घेतात, दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी टकटक संदेश टंकलिखित करतात आणि send…

कलेला कुठलंहि बंधन असू नये असं म्हणतात... तद्वत या कलेलाहि व्याकरण, शुद्धलेखन अश्या तुच्छ गोष्टींचं बंधन नसतं... आपण लिहिलेल्या विचारातली सुसंगती तर जाउच दे पण मुळात दोन वाक्यांचा अर्था-अर्थी काही सबंध आहे का हा अतिशय साधा, अगदी अतिसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्यानेहि करण्याजोगा विचार या संदेशांमध्ये केलेला आढळत नाही... उचलली जीभ लावली टाळ्याला... आला विचार फेकला आंतरजालावर... वा वा म्हणणारे यांच्यासारखेच हुजरे मुजरे करून तोच संदेश पुढे धाडायाला तय्यार बसलेलेच असतात... याचं त्याला आणि गाढव ओझ्याला... आता उदाहरणच द्यायचं झालं तर...

“प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल... एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल...”

फक्त भगवंत आणि कुटुंब... समाज, गुरुजन, मित्र-मैत्रिणी ह्या बाकी घटकांचा विचार करायची गरज नाही... मग एखादा अनाथ असेल तर... त्याने फक्त भगवंताला आनंदी करायचं... पण मेसेज इथेच संपत नाही... गडबड करायची नाही, एवढ्यात पाणी ओतायचं नाही... अजून मेसेज होतोय...

“जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळु द्या, चिंताना वाफ होउन उडुन जाउ द्या, दु:खाना विरघळुन जाउ द्या, चुकाना गाळुन घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.”

हा मेसेज वाचून माझी मैत्रीण म्हणाली, “माझा थोडा problem आहे... ही रेसिपी जशीच्या तशी मला नाही वापरता येणार कारण मी डीप डीप चा चहा पिते... मग अहंकाराला कधी उकळू?” मी म्हटलं, “अहंकाराला न उकळल्याची चूक गाळून घे म्हणजे झालं..” आणि हो खाली शुभ सकाळ! म्हणजे किती समर्पक मेसेज आहे... सकाळी प्रात:विधी म्हणून ज्या ज्या गोष्टी होतात त्यात हा पण एक मेसेज झाला... आता पाणी ओतायला हरकत नाही...

या मेसेजला एकच माणूस वा म्हणाला आणि तो म्हणजे माझा नवरा... मी मराठी लेखिका असल्याने मराठीत मी त्याला काहीही पाठवलं की तो कौतुक करतो... त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय.. हा मेसेज त्याला पाठवल्यावर त्याला वाटलं की तो मीच लिहिलाय... आणि उगाच वाद नकोत म्हणून तो लग्गेच कौतुक करून मोकळा झाला... परवा तर वाणसामानाची यादी मराठीत लिहून पाठवली तर त्यालाही तेच... वा वा... उभं दिसलं की कविता आणि आडवा दिसला की लेख असं मानणारा आहे तो.. त्यामुळे उभी यादी त्याला कविता वाटली पटकन... असो थोडं विषयांतर झालं... पण हा लेखही मी whats app वर टाकणार आहेच त्यामुळे थोडं विषयांतर चालेल... आणि तसंही whats app वर म्हटलंच आहे की, (हे मी दासबोधात सांगितलंच आहे किंवा भगवद्गीतेत सांगितलंच आहे अश्या अर्थी म्हणतेय हं...)
एक पेन चुक करू शकतं.
पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण
तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो.
तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.
जो आपल्या चुका सुधारेल.

त्यामुळे मी हा लेख पेनाने लिहिलाय असं समजूया... कारण पेन्सिलीने लिहिला जरी असता तरी माझा खोडरबर सध्या माझ्या मुलीला सांभाळण्यात व्यस्त आहे त्यामुळे मी लिहिलेलं तो खोडू शकला नसता... पेन्सिल आणि खोडरबराच्या मिलनातून दोन वर्षांपूर्वीच एक permanent marker जन्माला आलाय आणि तो सध्या आमच्या नव्या घराच्या भिंतींवर न खोडता येण्यासारख्या चुका करतोय... असो पुन्हा विषयांतर झालं पण मी लेख whats app वर post करणार आहे त्यामुळे असं विषयांतर करणं मला भाग आहे.
तर मी काय म्हणत होते की whats app वरचे मेसेजेस...

"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..!"

“का?” माझ्या एका खूप लांबच्या पण केवळ whats app मुळे खूपच जवळ आलेल्या ताईने हा मेसेज पाठवताक्षणी मी तिला विचारलं... “पण का?”

"कारण जन्म थेंबासारखा नाही तर कसा असणार? या अनंत विश्वाच्या महासागरात आपण एका थेंबासारखेच आहोत गं... आणि आपल्या आयुष्याच्या ओळी छेदतायत एकमेकांना आणि त्या तश्या छेदल्या की प्रेमाचे त्रिकोण जन्माला येतात आणि वर्तुळ... अगं म्हणजे...सगळंच समजावून सांगता येत नाही काही गोष्टी आपल्या आपण समजून घ्यायच्या असतात..."

ती अजूनही पुढे टाईप करत राहिली असती पण तिचा मुलगा जो त्याच ग्रूप वर आहे त्याने लिहिलं... "आई घरातल्या सगळ्या थेंबांना भुका लागल्यात आणि आता तू नाही वाढलंस तर घरात भलते त्रिकोण तयार होतील..."

“प्रेम त्रिकोणासारखं असतं असं का वाटलं असेल लिहिणाऱ्याला?”, हा प्रश्न मी नवर्याला विचारला. तो अतिशय विचार केल्यासारखं दाखवून म्हणाला “त्याला त्याच्या बायकोने तसं लिहायला सांगितलं असेल... मग तो तरी काय करेल बिचारा...” पण मी काही यावर वाद घातला नाही कारण मला whats app वरचाच अजून एक मेसेज आठवला...

एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातही वार 'सुखाचे' जातील !!

आठवा वार जर परिवार असू शकतो तर मग दिवार, दुश्वार, आवार, उमेदवार का असू नये... यात पण वार आहे की... नमुन्यादाखल लिहायचं झालंच तर...

"एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "दिवार"; नात्यांमध्ये हा आठवा वार उभा राहिला नाही तर सातही वार 'सुखाचे' जातील !!"

एकदा का बादरायणी संबंधच जोडायचा म्हटला की साहित्य कशाशी खातात हे माहित नसलं तरी काही फारसा फरक पडत नाही....

कोणाला आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही.
कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर
मुखाने करा, मनाने नाही,
लक्ष्यात ठेवा, ज्या दोऱ्याला गांठ नसते,
असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो.

पण मला जायचंच नाहीये सूईतून... असं मी म्हणू शकले नाही कारण मला पुन्हा पुन्हा आठवा वार (परिवार) आठवत राहतो... हे असे मेसेजेस पाठवणाऱ्या त्या आठव्या वारातल्याच (परिवारातल्या) ताई, माई, अक्का असतात... त्यांना भलते सलते प्रश्न विचारले तर माझे आयुष्यातले सगळेच वार दु:श्वार होतील...

हे आणि असे अनेक बोधपर मेसेजेस whats app आणि facebook वर फिरतायत... सगळीकडे शुभेच्छा, सुविचार, सदिच्छा, उत्सव, समारंभांचा आनंदकल्लोळ सुरू आहे... पण यातलं काहीच आत झिरपत नाही... सुखावून जात नाही... भारावून टाकत नाही... विचार करायला लावत नाही... अंतर्मुख करत नाही... कुठलीही सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत नाही.... सगळं पोकळ, कोरडं, रखरखीत, रूक्ष, फार वरवरचं वाटत राहतं... असं का?

गेल्या वर्षीच्याच दिवाळीची गोष्ट... घरात बाळाला बरं नव्हतं... साधा सर्दी ताप... पण तिच्या आयुष्यातला पहिला वाहिलाच.... त्यामुळे आमचाही अनुभव पहिलाच... मग त्यामागोमाग होणारी जागरणं, बाळाची चिड-चीड, रडा-रड असं सगळंच ४-५ दिवस चालू होतं... शिवाय दूर परदेशात येउन राहिलेलो... त्यामुळे आपण साजरी केली तर दिवाळी नाही तर रोजच्यासारखाच दिवस... पहिली अंघोळ दूरच राहिली... पण दोन दिवस माझी अंघोळही झाली नव्हती... दिवसभर रडून गोंधळ घालून संध्याकाळी बाळ झोपलं होतं... मीहि बाळाबरोबर थकून झोपले... नवरा ऑफिसातून आला तर सगळ्या घरात अंधार आणि त्याने लाईट लावला..... नवऱ्याच्या चाहुलीने मीही उठले... बाळ थकून गाढ झोपलं होतं...

फोन हातात घेतला आणि मेसेजेस बघत बाहेरच्या खोलीत आले... भांडी घासायची बाकी होती, कपडे धुवायचे बाकी होते, तीन चार दिवसात घराला अगदी अवकळा आली होती... खिडकीत कंदील नव्हता, दारात रांगोळी नव्हती, पणती नव्हती, घरात पक्वान्न नव्हती... फोनवर मात्र शुभेच्छा ओसंडून वहात होत्या... whats app वर ४०-४५ आणि फेसबुक वर शे-दोनशे मेसेजेस येउन गेलेले... मला ते पाठवणाऱ्यांची नावंही आठवत नाहीत... २४० शुभेच्छा म्हणूया हवं तर... एखाद्या माणसाला २४० शुभेच्छा मिळाल्यावर त्याने किती खूष असायला हवं? पण मी खूष नव्हते... भकास, अवकळा आलेल्या घराकडे आणि हाततल्या फोनकडे आळीपाळीने बघितलं आणि नकळत डोळे पाणावले... नवऱ्याने समजून डोक्यावरून हात फिरवला आणि हलकेच थोपटलं... स्वत: हात पाय धूवून आला आणि मलाही तोंड धुवायला सांगितलं... मग देवाजवळ गेलो, त्यानेच दिवा लावला... आणि निरांजनाच्या प्रकाशात प्रसन्न हासत मला म्हणाला... “Happy Diwali!” अमंगळाचा नाश व्हायला तेवढे दोनच शब्द पुरेसे होते...

सुविचार, बोधवचनं त्यांच्या आचरणकर्त्याकडून ऐकली की ती सुसंगत वाटतात, आत भिडतात, नकळत झिरपतात आणि आपल्याही आचरणात येतात, शुभेच्छा खरोखरी जिव्हाळ्याच्या माणसाकडून मिळालेल्या अधिक जवळच्या वाटतात... असे सुविचार आणि अश्या सदिच्छा clear chat केल्यावरही आयुष्यभर लक्षात राहतात...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉटसअ‍ॅपवर दिवसाला १० मेसेज फ्री आणी पुढच्या दहाना अमुक अनुक चार्ज पडेल असा नियम काढला असता तर आपोआप सगळ्या सदिच्छा वार्‍यावर उडलतिल बघा!

लेख छान आहे, उभी कविता आणी आडवा लेख वगैरे पंचेस सहीच Happy
पण इतक्या खुसखुशीत सुरुवातीनंतर शेवट जरा ... ... 'व्हॉट्सॅपीय' वाटला Happy

सुविचार, बोधवचनं त्यांच्या आचरणकर्त्याकडून ऐकली की ती सुसंगत वाटतात, आत भिडतात, नकळत झिरपतात आणि आपल्याही आचरणात येतात, शुभेच्छा खरोखरी जिव्हाळ्याच्या माणसाकडून मिळालेल्या अधिक जवळच्या वाटतात... असे सुविचार आणि अश्या सदिच्छा clear chat केल्यावरही आयुष्यभर लक्षात राहतात...

हा जास्तच पांचट झालाय मेसेज ☺️

व. पु, काळे यांना अशा पकाऊ मेसेजेस चे जनक म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी मराठी रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. पण त्यांची तेंव्हा गाजलेली काही वाक्य आठवलीतर तर आताच्या पकाऊ व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसपेक्षा काही वेगळी नाहीत. इतकंच नाही तर अशा वाक्यांचीच त्यांनी काही पुस्तकंही काढली होती. मला नक्की आठवत नाही पण बहुतेक प्लेझरबॉक्स पुस्तक अशा प्रकारचं होतं.

आठवणींचं एक बरं असतं. साठवल्या की आठवतात ! Happy

नंतर काही वर्षांनी आलेल्या चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्यांनी अनेकाना वेड लावलं. त्यातल्या काही अप्रतिमच होत्या. पण सगळ्याच एकाच दर्ज्याच्या नव्हत्या. किंवा नंतरच्या काही संग्रहातल्या चारोळ्या आणि सध्याचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज यात वेगळेपण शोधणे थोडे कठीणच आहे.

पण वपुंची काही वाक्य फारच महान होती. त्यांचं हे वाक्य मला नुसत्या शब्दांच्या खेळापेक्षाही , कमी शब्दात खूप काही सांगणारं वाटतं. "यहोवाज विटनेस" या ख्रीस्ती धर्माचा प्रचार करणारे लोक घरी आले की मी नेहमी त्यांना वपुंचे हे वाक्य ऐकवतो Happy

आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडातसुधा देव पाहणारी माणसं आहोत.

मला सध्या नको असलेले ईग्नोर करता येते त्यामुळे लांबलचक फॉवर्ड मी वाचतच नाही
पण खाली एक देतेय जो जवळपास गेले वर्षभर फिरतोय वेगवेगळ्या ग्रुपमधुन

*तुझा धर्म कोणता?*

मंदिरावर पडतो
मशिदिवरही पडतो
सांग रे पावसा, तुझा धर्म कोणता?

कोजागिरी ही तुझी
ईद ही तुझीच
सांग रे चांदोमामा, तुझा धर्म कोणता?

दंगलीत हे ही भिरकवतात
ते ही भिरकवतात
दगडाच्या देवा, तुझा धर्म कोणता?

मुस्लिम तुझ्यावर कब्र बनवतो
हिंदू शेवटी तुझ्यातच विलीन होतो
सांग गं माती, तुझा धर्म कोणता?

कोणा भगवा प्रिय कोणा निळा कोणा हिरवा
अन्नासाठी व्याकुळ त्या अनाथाकडे बघून
भुकेपेक्षा मोठा धर्म कोणता,
सांग माणसा?

*-कवी अनामिक*

आज वाचलेले काही मजेशीर फोरवर्डस्
__________________

आता तर हद्दच पार झाली गणिताची..

गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.

१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.

२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.

३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.

४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ

५) तीन पानांचा बेल त्याला
येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची..... हे
इष्टिकाचीतीचे घनफळ.

६) जुन्या हजार पाचशेच्या
बंद झाल्या नोटा,
खरेदी वजा विक्री
बरोबर होईल तोटा

७) मी आणि माझे विद्यार्थी
दररोज खातो काजू ...

चौरसाची परिमिती =
4 × बाजु.

८) खोप्यात खोपा
सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी
बरोबर होईल नफा

९) दहा किलो म्हणजे
एक मण...!!
घनाचे घनफळ
बाजूचा घन....!!

१०) जीवाला जीव देतो तोच खरा मित्र
गणित सोडवायला माहिती हवीत सुत्र

११) सम आणि व्यस्त हे
चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर
तर दुसऱ्यात गुणाकार

१२) "गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!

१३) रविवार नंतर सोमवार
येतो,
रविवार नंतर सोमवार
येतो.....
प्रत्येक ऋण संख्येचा
वर्ग ...
नेहमीच धन होतो.

१४)महादेवाला आवडते
बेलाचे पान...
कोणत्याही त्रिकोणात
एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा
लहान....!!

१५) दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे
घ्यायला,
ग्रुप झाला गोळा.

आवडलं...

शेवट तर वाक्य नि वाक्य पटला.

सुरूवात छान झाली लेखाची मात्र शेवट ओढून-ताणून व्हॉट्सअॅपीय वाटला. >> +1. मजा आली पण वाचायला. मी व्हाट्सअँप वर नाही त्यामुळे अजूनच फिदीफिदी हसू आलं Proud

तर आज मला हे असे मेसेज पाठवायचं कारण टच मध्ये राहता येत , मार्केट मध्ये नवीन काय चालू आहे आहे , काय घडामोडी चालू आहेत वगैरे कळत म्हणून पाठवतो असं एका कॉलेज मित्राने सांगितलं . :झिंज्या उपटलेली बाहुली:

ह्या अश्या मेसेज मध्ये तू सांगितलेले कोणतेही घटक नाहीत उलट अत्यन्त पकाऊ पण आहे असं म्हणताच प्रत्येक वेळेला काही एक्सपेक्ट करायचं नसत अशी फिलॉसॉफी झाडली.
तेव्हा हात जोडून कृपया तुझया ब्रॉड कास्ट लिस्ट मधून काढून टाक एवढंच म्हटलं .

काहीही बाष्कळ विचित्र कारण देतात लोक Uhoh

Pages