अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

Submitted by रसप on 26 January, 2017 - 01:21

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.
'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.
१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांपर्यंत पोहोचलेलं 'निओ नॉयर' टाईप गँगवॉर मूव्हीजचं लोण हे सगळं जर तुम्ही एकसारखंच एन्जॉय केलं असेल तर 'रईस' नक्की पाहा.
चोप्रा, जोहर व तत्सम साचेबद्ध लोकांच्या ठोकळेबाज सिनेमांमधल्या एकसारख्या भूमिकांच्या जोरावर अमाप पैसा व लोकप्रियता कमावून त्यातच रमणारा शाहरुखसारखा चांगला अभिनेता कधी काही तरी वेगळं करेल, ह्याची वाट पाहणंही तुम्ही कंटाळून सोडून दिलं असेल तर 'रईस' आवर्जून पाहा.

ट्रेलर, इतर चर्चा ह्या सगळ्यांतून 'रईस' च्या कहाणीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असावाच. त्यापेक्षा ती वेगळीही नाही. गरिबीत खितपत असणाऱ्या कोवळ्या वयात बेकायदेशीर धंद्यांच्या वाटेवर जाऊन, पुढे त्या वाटेला आपल्या मनानुसार हवं तसं वळवत मोठा होणाऱ्या व्यक्तिरेखा सिनेमासाठी नवीन नाहीत. 'दिवार' पासून अश्या व्यक्तिरेखांच्या 'एक्स' फॅक्टरने भारतीय सिनेमाला मोहवलं आहे. 'रईस' अशीच एक कहाणी आहे ड्राय स्टेट 'गुजरात'मध्ये बेकायदेशीर दारूचा धंदा करत मोठा झालेल्या एका 'रॉबिन हूड'ची. लहान वयात शाळेच्या दप्तरातून दारूचं स्मगलिंग सुरु करणारा 'रईस' (शाहरुख खान) नंतर दारूच्या ह्या हजारो कोटींच्या काळ्या बाजारावर अधिसत्ता मिळवतो. अपेक्षेप्रमाणे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं केवळ तो सिनेमाचा हिरो आहे म्हणून भरपूर उदात्तीकरणही इथे होतं. त्याच्या वाटेवर वारंवार त्याला आडवा येणारा पोलीस ऑफिसर मजमुदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) कितीही कर्तव्यदक्ष असला आणि त्याच्याविषयी आपल्याला आदर वाटत असला तरी प्रेम मात्र 'रईस' बद्दलच वाटेल, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.
'रईस' चा हा प्रवास गुजरातमधील एका छोट्याश्या गावातून आणि दारूपासून सुरु होऊन समुद्र, मुंबई, सोने, खून, दंगली, राजकारण, स्फोटके अशी वेगवेगळी वळणे आणि टप्पे घेत जातो. ह्या दरम्यान त्याला मित्र लाभतात, शत्रू मिळतात आणि मित्रांचे शत्रूही होतात. ह्या सगळ्यातून पुढे निघत, आपला रस्ता बनवत अखेरीस तो त्याच एका अपेक्षित व अटळ मुक्कामी येऊन पोहोचतो, जिथे सिनेमातला प्रत्येक मोठा गुन्हेगार पोहोचत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं, हा सवाल इथे उरत नाही, किती जिंकलं आणि किती हरलं, हा हिशोब राहतो, जो पूर्ण होत नाही.

'कहता हैं दिल बार बार' आणि 'लम्हा' असे पूर्णपणे नाकारले गेलेले सिनेमे बनवतानाच 'परजानिया' सारखा अगदी वेगळ्या संवेदनशीलतेचा सिनेमा देणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया 'रईस' कसा करतात, ह्याचं कुतूहल होतं. एक मोठा व्यावसायिक नट केंद्रभागी असल्यावर साहजिकपणेच त्यांनी विविध मसाल्यांचं समतोल मिश्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस सगळं खूपच सिम्प्लिफाईड वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी वास्तवदर्शी. काही वेळेस हे कथानक अतिरंजित वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी संयत. काही वेळेस 'रईस' हा फक्त एक गुन्हेगार असतो, तर काही वेळेस 'हिरो'. शत्रूच्या अड्ड्यावर एकट्याने जाऊन १०-१२ जणांना अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ठोकणारा 'डॅशिंग' 'रईस' दोन वेळा दाखवून त्यांनी अतिरंजन, हिरोगिरी आणि सिम्प्लीफिकेशनचं पारडं थोडंसं जड केलंच आहे. पण चालायचंच. व्यावसायिक सिनेमा बनवणे म्हणजे काय कुठली बेईमानी नाहीच. तो किती सफाईने बनवला, हे महत्वाचं. गाणी, प्रसंग आणि पात्रांची थोडीफार अनावश्यक घुसवाघुसवी वगळता एकंदर हा मसाला बऱ्यापैकी चविष्ट झाला आहेच.

शाहरुख, नवाझुद्दिन आणि मोहम्मद झीशान अयुब हे कास्टिंग खूप 'इंटरेस्टिंग' होतं.
'रांझणा', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' मधून धमाल उडवणारा अयुब इथे पूर्ण वेळ झाकून ठेवलेलाच वाटतो. अयुबने साकारलेला 'सादिक' म्हणजे 'रईस'चा साईड किक. 'उजवा हात'. भूमिकाच अशी असल्यामुळे त्याचा एकट्याचा असा एकही स्वतंत्र प्रसंग नाही. खरं तर देता येऊ शकले असते किंवा दिलेही असलेले असू शकतात, मात्र ते आपल्या समोर तरी येत नाहीत. शाहरुखसोबतच सतत असल्यामुळे त्याला मुख्य व्यक्तिरेखेवर भारी पडू न देण्याची खबरदारी घेतली गेलेली आहे. सिनेमा संपून जातो आणि आपण आजपर्यंत पाहिलेला 'अयुब' आपल्याला एकदाही जाणवत नाही. तो इतर कुणाही सहाय्यक अभिनेत्यासारखा दुर्लक्षितच राहतो.

नवाझुद्दिन मात्र 'मजमुदार'च्या भूमिकेत जान ओततो. 'कहानी'त त्याने साकारलेल्या सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेपासूनच त्याच्या करियरला दिशा, वेग,आकार वगैरे मिळत गेलं आहे. इथे तो पुन्हा एकदा तो सीबीआय ऑफिसर आठवून देतो. खरं तर अगदीच किरकोळ देहयष्टीमुळे तो ह्या (अश्या) भूमिकेसाठी आयडियल नाहीच, मात्र तरीही तो ती व्यक्तिरेखा विश्वसनीय बनवतोच. त्याचा चाणाक्ष, तडफदार आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर 'रईस' चं एक हायलाईट आहे.

शाहरुख न आवडणाऱ्यांनाही शाहरुख आवडेल, असा शाहरुख 'रईस' मध्ये दिसतो. 'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील. २५ वर्षांच्या अनुभवात शाहरुखने एक अभिनेता म्हणून जे काही कमावलं आहे, त्याचा कस ह्या तीन सिनेमांत लागलेला आहे. 'रईस' म्हणून त्याने जपलेली देहबोली वेगळी आहे. जाणीवपूर्वक काही तरी वेगळं केलं आहे आणि तेही यशस्वीपणे. गेल्या काही वर्षांत 'शाहरुख असह्य आहे' पासून 'शाहरुख काही वेळी खूप आवडतो' पर्यंत माझ्यासारख्या काही सिनेरसिकांना शाहरुख घेऊन आला आहे, हे काही कमी नाही !

पाकिस्तानातून आवर्जून इम्पोर्ट करण्याइतकं 'माहिरा खान' मध्ये आणि तिने साकारलेल्या अत्यंत फडतूस भूमिकेत आहे तरी काय, हा प्रश्न मात्र सतावतो. आपण भारतीय लोक गोऱ्या रंगावर उगाच भाळतो आणि गोरेपणा हे सौंदर्याची एक महत्वाचं लक्षण मानत असतो. माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे. कुणी तिच्यावर भाळावं असे फीचर्स किंवा चार्म तिच्या व्यक्तीमत्वात व तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेत अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या नावाने तर शंखच आहे. ज्या काही १-२ संधी तिला स्वत:ची कुवत दाखवण्यासाठी मिळाल्या होत्या, त्या संधींची तिने छानपैकी माती केलेली आहे.

राम संपत ह्यांचं संगीत विशेष लक्षात राहत नाही. 'धिंगाणा' गाणं थोडा वेळ मनात रेंगाळतं. पण त्यांचं पार्श्वसंगीत मात्र विशेष लक्षात राहतं. 'रईस' चं थीम म्युझिक येणाऱ्या काळात 'कल्ट' होणार आहे, असा माझा अंदाज आहे.

एका आयटम नंबरपुरती सनी लिओन सिनेमात येते आणि असं वाटतं की हिच्या आणि माहिरा खानच्या भूमिकांची अदलाबदली करायला हवी होती. इतपत अभिनय तर सनीही करू शकते आणि इतपत नाच तर माहिरालाही जमत असेलच.

'रईस' आणि 'काबिल' हा तिकीट बारीवरचा मुकाबला कदाचित दिवसागणिक रंगत जाईल. पण ओपनिंगचा विचार करता अपेक्षेनुसार 'रईस' ने सरशी केलेलीच आहे. ह्या वेळी सिनेमा पाहत असताना एक खूप विचित्र बाब जाणवली. गाण्यांवर 'झिंगाट' कल्चरचा हुल्लडबाज नाच करत, हल्लागुल्ला करणारं पब्लिक पहिल्यांदाच शाहरुखच्या सिनेमाला दिसलं. ह्या पूर्वी हे लोक सलमानपटांना हजेरी लावत.

विथ ऑल दॅट, 'रईस' म्हणजे अगदी 'नॉट टू मिस' नसला तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे. कारण शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-raees.html

.

raees-movie-poster.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पाहिला. उगीच ओवरहाइप केलेला सिनेमा! मला खरंच ट्रेलर वरूब बर्‍यापैकी करमणुक तरी होइल असे वाटले होते. पण ती अपेक्षा पण जास्त ठरली.
वयस्क दिसणारा शारुख, न शोभणारे अ‍ॅक्शन सीन्स, डोळ्याला टोचावी इतकी मठ्ठ हिरॉइन.
सुस्र्वातीच्या भागात अग्निपथ ची आठवण झालीच. पण त्यातल्या डायलोग्ज ची सर यातल्या डायलॉग्ज् ला नाहीच.
शारुक असला म्हणुन इतर कॅरेक्टर्स ना काही स्कोप न देणे हे झालेलेच आहे नेहमीप्रमाणे. बरीच पात्रं चांगली स्ट्राँग करता आली असती. त्याचा मित्र, अम्मीजान, अतुल कुलकर्णी , नवाजुद्दीन. पण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे.
नवाजुद्दीन चं बहुधा नुस्त्या रेप्युटेशन पायी कौतुक झालं असावं, कारण त्यालाही काहीच काम नाहीये फारसे. नुस्ते गॉगल घालून ट्रक आडवायचे. शारुक आणी त्याचे काही एकत्र जुगलबंदी वगैरे सीन्स पण नाहीत. ते भेटतात तेव्हा दर वेळी अगदीच थोडक्यात आटोपते घेतलंय. अतुल कुलकर्णीचं ही तसंच. काही वावच नाही. नुस्ता आपलहाशारुक शारुक शारुक पडद्यावर.
बिग लेट डाउन.

जाई, जर आपल्याला आवडणारी व्यक्ती कोणाला खूप आवडतेय यामुळे ती आपली नावडती होणार असेल तर याचा अर्थ ती आपल्या तितक्या आवडीची कधी नव्हतीच.
तरीही आपल्या मताचा आदर आहे, आपल्याला शाहरूख पुन्हा पहिल्यासारखा आवडायला लागो अशी एक शाहरूखचा फॅन म्हणून मनापासून इच्छा व्यक्त करून ईथेच थांबतो.

सपना >>>> अकृत्रिम प्रेम असेल तर असे होत नाही. >>>>
अकृत्रिम प्रेम? माझ्या शाहरूखप्रेमावर संशय Happy
तरीही आजवर मी माझ्या शाहरूखप्रेमाचे फक्त ट्रेलर दाखवले होते. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त नेहमी शिल्लक ठेवले होते. पण आज मात्र या अकृत्रिम प्रेमाच्या आरोपाने खरेच दुखावलो. आता शाखा प्रेमाचा एक सैलाब येणार. ज्यात सारे छोटे मोठे स्टार, सुपर्रस्टार, कपूर, कुमार वाहून जाणार Happy

पण एकंदरीत बरेच लोकांचा आक्षेप पाहता मला वाटते की अमिताभपेक्षा शाहरूखला सरस म्हटल्याने अमिताभवर प्रेम करणारे दुखावले आहेत. पण त्याला ईलाज नाही. अमिताभ माझाही आवडता असला तरी माझ्यामते शाहरूख हा अमिताभपेक्षा सरस आहे. आणि हे माझे प्रामाणिक मत मी माझ्यापाशीच ठेवून या जगाचा निरोप नाही घेऊ शकत, त्यामुळे ते मांडावेच लागले.

पण हे असे घडतेच, त्याला पर्याय नाही. हेच काही वर्षांनी सचिन आणि कोहलीच्या बाबतीत होणार आहे. आताची किंवा पुढची पिढी कोहलीला सचिनपेक्षा सरस बोलू लागताच ज्या पिढीने सचिनला क्रिकेटचा देव मानले आहे ते दुखावले जात या तुलनेविरुद्ध तुटून पडणारच. त्याला पर्याय नाही. जसा मानवी स्वभाव असतो तसेच चाहत्यांचीही एक मानसिकता असते जी त्यांना चुकत नाही. अर्थात मलाही हे लागू आहेच.

पण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे >> असे अजिबात वाटत नाही. इन अँड अ‍ॅज पिक्चर असला म्हणजे मेन हिरो वर फोकस असणार हे नक्कीच होते. त्यात त्या सगळ्यांच्या भुमीका सुद्धा छोट्या असूनही नीट लक्षात राहतात म्हणजे त्या चांगल्या लिहील्या गेल्या आहेत.

नवाझ ला काम नाही असे म्हटले म्हणजे वाटायला लागते की आपण नक्की सेम पिक्चर पाहिला ना ? त्याला तर खुप मस्त रोल दिलेला आहे. तो वेषांतर करून मायकेल जॅक्सन चा नाच दारू पकडायला एक नंबर सीन आहे. परत तो रोड रोलर चालवतो बाटल्यांवर, शारूक च्या एका माणसाला बरोबर शादी असताना फितूर करतो , फोल लाईन्स टॅप करतो. किती तरी मस्त सीन्स आहेत. हे सगळे मिस झाले की काय ?

अतुल कुलकर्णीचा रोल लहान होता पण तितकाच महत्तवाचा होता. उगीच जास्ती स्क्रीन टाईम म्हणजे जास्ती चांगला रोल असे काही नसते. कमी स्क्रीन टाईम मध्ये पण ही सगळी माणसे छाप पाडून जातात. Wink

आता उगीच शारूक आवडत नाही आणि त्याचे बॅशिंग करायला पिक्चर पाहिला असेल तर राहू द्या Lol

अरे नाही नाही, मला शाहरुक आवडतो माफक प्रमाणात का होईना. ट्रेलर पण आवडला होता.
नवाजुद्दीन आवडतोच. कदाचित त्यामुळेच तसे वाटले असेल Happy

Lol

मला तर बर्‍याच दिवसांनंतर हा आणि काबील दोन्ही खुप चांगली पात्ररचना आणि सगळ्यांचे चांगले कॅरॅक्टर डेव्हलपमेंट असलेले वाटले त्यामुळे आश्चर्य वाटले की आपण वेगळे पिक्चर तर नाही पाहिले ना. इतक्यात ते बेफिक्रे , बार बार देखो , ए दिल है मुस्किल वगैरे मध्ये आजिबात चांगले कॅरॅक्टर डेव्हलपमेंट नव्हते. रईस मधले अगदी सगळे , इव्हन छोट्या रोल मधलेही लक्षात राहिले नीट Lol

एखादा सिनेमा अपेक्षा वाढवणारा आहे असं त्याच्या कँपेनवरून किंवा आधीच्या इतिहासावरून वाटलं आणि अपेक्षाभंग झाला तर मला तरी नाही आवडत तो सिनेमा. अजून कुणाचं असं होतं का ?

याउलट डोकं बाहेर काढून या असा क्लिअर मेसेज असेल तर फक्त मनोरंजन म्हणूनच मी अशा सिनेमाचा विचार करते. चेन्नई एक्सप्रेस च्या वेळी डोकं बाहेरच काढून आत गेले होते, कारण ओम शांती ओम मुळे धडा घेतला होता. अगदी तो हॅपी न्यू इयर सुद्धा दिवाळीची आतिशबाजी म्हणूनच पाहिला असता. अशा सिनेमांकडून अपेक्षा ठेवल्या तर झालं कल्याण !

बघितला फायनली. मला ही खूप ओव्हरहाइप्ड वाटला. शाहरूख ने काम चांगले केले आहे (आधीही लिहीले आहे पण डोळ्यात ड्रॉप्स टाकतानाचा सीन आहे, जालिमा गाण्यात आहे, तो खरा शाहरूख, एरव्हीचा नाही), पण आता म्हातारा दिसतो. एक दुसरी उणीव जाणवली म्हणजे तो कधी मिनेसिंग वाटतच नाही यात. गल्लीतील दिलदार दादा वाटतो. वरती लिहील्याप्रमाणे 'हजारो कोटींच्या बाजारावर अधिसत्ता' वगैरे वाला कोठेच वाटत नाही. शाहरूख मला आवडतो, त्याच्या प्रयत्नात काही कमी पडत नाही, पण तो मिसकास्ट आहे इथे. हा अजय देवगण चा रोल आहे.

बाकी पिक्चर अगदीच बंडल आहे. ७०ज मधला ड्रामा तसाच्या तसा आणल्यासारखा. काहीच नावीन्य नाही. नवाज च्या रोल मधेही काही नाही, आणि त्याने तो रोल उचलला जाईल असेही काही केलेले नाही. संवाद तर अगदीच लेट डाउन आहेत. एकदम पुचाट. सलीम-जावेद शी तुलना? सिरीयसली?

पिक्चर बघताना टाइमपास आहे. बोअर होत नाही. पण त्यापेक्षा जास्त काही नाही.

शाहरूखचा रईसचा धागा वर आला आणि मला फेसबूकने आपली जुनी मेमरी वर काढावी असा आनंद झाला Happy
@ फारेण्ड, पोस्टशी सहमत !

सलीम-जावेद शी तुलना >> अजिबात वाटत नाही. पण पिक्चर अगदी लेट डाऊन नाहीये !! त्यामुळे असहमत Lol

Pages