गडकरी मास्तरांना पत्र ...

Submitted by अजातशत्रू on 3 January, 2017 - 02:29

गडकरी मास्तरांना पत्र ...
आदरणीय मास्तर... साष्टांग दंडवत ...
आजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो ? आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत ? चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो ? आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल...

"मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ..."
ही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी ?
तुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत ... तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात हो !
गोविंदाग्रज म्हणून आम्ही तुम्हाला मस्तकी मिरवत राहिलो आणि आज तुम्ही छिन्न विच्छिन्न झालात तरी आम्ही नेहमीप्रमाणे नुसते मख्ख बघत राहिलो !
मास्तर, आमच्यापेक्षा तुम्ही शब्दबद्ध केलेली ती जर्जर 'सिंधू' बरी की हो, जिने 'सुधाकरा'च्या 'एकच प्याल्या'ची नशा उतरवली. आम्ही तथाकथित सुसंस्कृत जातीयतेचे जहरी प्याले पित राहतो अन पाजतही राहतो ! पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही !! आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा ! मी काय म्हणतोय हे तुम्हाला कदाचित कळणार नाही, मास्तर तुम्ही रंगांधळे होतात का हो ?

"जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !...."
असं तुम्ही लिहिलंय ! इथे भगव्याच्या व्याख्या माहिती नसलेले लोक तुम्ही इहलोक सोडून दशकं लोटली तरी तुमच्या जीवावर उठलेत हो !
का तुम्ही प्रणाम केलात ह्या महाराष्ट्राला ? का तुम्ही जरिपटक्यावर जीव लावलात?

"अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा , बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा'
मास्तर या पंक्तीत तुम्ही दळदारी असं न लिहिता दरिद्री असं लिहायला हवं होतं.... नाहीतरी किती जणांना दळदारीचा अर्थ ठाऊक आहे ? मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं ! अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो ! तरीही काही जणांना तुमचा चेहरा नकोसा वाटतो. ते तुम्हाला भीतात मास्तर !

आपले मूल मरणपंथाला लागल्यावर 'राजहंस माझा निजला' असे हळवे काव्य लिहिणारे तुम्ही जगाला कसे उमगणार हो मास्तर ? काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची ? तुमच्या नाटकांना इंग्रज घाबरले असतील. ते गोरे देश सोडून गेले पण आता काळे इंग्रज त्यांचा वारसा चालवत आहेत. गोरयांनी तुमच्या अंगाला हात लावायचे धाडस केले नव्हते पण आताच्या त्यांच्या वंशजांनी चक्क तुमचा पुतळा फोडून त्याचे अवशेष गटारात टाकून आपली अतृप्त विकारवासना शमवून घेतलीय. केव्हढा हा डंख !

"काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ...."
असलंच काव्य तुम्ही सातत्याने का लिहिलं नाहीत मास्तर ? का समाज प्रबोधन करता बसलात ? काय गरज होती देशप्रेम जागवण्याची ? इतके कसे हो तुम्ही अल्पबुद्धी ? 'साजूक तुपावरील नाजूक कविता' हाच विषय तुम्ही का कायम ठेवला नाही ? काही तरी तुम्हाला खुलासे करावेच लागतील ...

"आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥"
असंही तुम्ही लिहिलंय. आता मला सांगा की, पुतळा फोडण्याचा विधिलेख तुमच्या भाळी होता का ? की हा भोग टाळता आला असता ? कदाचित रक्षणकर्ते आणि भंजक दोघेही एक असावेत त्यामुळे हा योग कधी टळला नसता. तुम्ही हे तेंव्हा ओळखून लिहिलंत. तुम्ही अंतर्ज्ञानी होतात का ?

"इश्काचा जहरी प्याला।
नशिबाला ज्याच्या आला॥ हा असा॥
टोकाविण चालु मरणे।
ते त्याचे होते जगणे॥ सारखे॥"
मास्तर तुमच्या नशिबी इश्काचा प्याला येण्याऐवजी काही लोकांनी प्रेमाने जतन केलेला तिरस्काराचा प्याला येऊ पाहतोय. असूद्यात, हरकत नाही. कारण 'टोकाविण चालु मरणे' असं तुम्ही पूर्वीच सांगून ठेवलेय.

मास्तर तुम्ही एकदा भावूक होऊन जात लिहिलं होतं की,
"क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढे॥"
असे पुतळे फुटणार हे कदाचित तुम्हाला आधी कळून चुकले असावे. वर्षाव पडो मरणांचा असं तुम्ही लिहिलंय त्यामुळे असे कितीएक पुतळे फुटले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही हे नक्की !
"स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी।
मराठी रसिकांसाठी ’गोविंदाग्रज’ पाठवी॥" तुमची ही पालवी काही लोकांच्या डोळ्यात सलते ना ! तेंव्हा कृपा करून अशी शब्दपालवी पुढील जन्मी मराठी साहित्यशारदेच्या दरबारी वाहू नका.

१३६, कसबा पेठेतदेखील आता काही शिल्लक राहीले नाही. १९१९ मध्ये याच वास्तूत तुम्ही अखेरचा श्वास घेतला होतात. इथल्या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत तुम्ही वास्तव्यास होतात. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली. आमच्या शासनाकडून व साहित्यप्रेमी मंडळीकडून यथावकाश तुमच्या खोलीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले याचा राग मनात धरू नका. तुमची खोली जोपासून कुठल्या सरकारला काय फायदा होणार होता ? त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो ! तुम्ही आपले साहित्य संमेलनापुरते उरलात हे देखील तुम्ही ध्यानात ठेवा !
तुमच्या माथी 'राजसंन्यास' कायम राहणार आहे, चिंता नसावी.

तुमची ‘चिंतातूर जंतू’ ही कविता आजही प्रसिद्ध आहे. या कवितेत तुम्ही विनाकारण नको त्या गोष्टींची चिंता करून स्वत:सह जगाच्या डोक्याला ताप देणाऱ्या उपद्व्यापी ‘चिंतातूर जंतूं’ना काही मोलाचे (अन् शेलके) सल्ले दिले आहेत. त्यात चिंतातूर जंतू म्हणतो, ‘उगाच पाणी पहा पुराचे फूकट वाहते कितीतरी’ त्यावर तुम्ही म्हणता की, ‘पहावत नसेल तुला जर ते उडी टाक तू त्या पुरात!’ चिंतातूर जंतू पुन्हा म्हणतो; ‘उगाच वाहते हवा मोकळी, वाया जाते फुकाच ती’ त्यावर तुम्ही पुन्हा म्हणता की, ‘नाक दाबूनी जीव दे अन् कर बचत तूच हवा’ एवढे सांगूनही चिंतातूर जंतूची चिंता थांबतच नाही. अखेर तुम्ही वैतागून म्हणता की, ‘देवा तो विश्वसंभार राहूद्या, जरी राहिला तरी या चिंतातूर जंतूना, मुक्ती द्या आधी’
आता माझा साधा आणि अखेरचा प्रश्न. किमान याचे उत्तर तरी तुम्ही द्यावे. मास्तर, ज्यांनी आज पुण्यात तुमचा पुतळा फोडला तेच हे चिंतातुर जंतू होत का ? तुम्ही यांना 'जंतू' म्हणालात पण काहींना हे वाघ सिंह वाटतात. आता एखादे जंतूनाशक पण तुम्हीच सुचवा मास्तर कारण सरकारमध्येही काही जंतू आहेत, व्यवस्था तर जंतूमय झालीय आणि माझ्यासारखे बाजारबुणगे साहित्यप्रेमी जंतू मारण्या इतकं धाडस हरवून बसले आहेत. तेंव्हा मास्तर यावर उतारा तुम्हीच सुचवायचा आहे.

तुमच्यावर माझी फार श्रद्धा आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या पत्राचे उत्तर द्याल. 'बाकी सर्व ठीक आहे..' हे नेहमीचे पालुपद लिहून थांबतो. आणि हो, एक सांगायचे राहिले, कोणी काही म्हणो मायमराठीच्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे 'भावबंधन' चिरंतन असेल याची ग्वाही मात्र छाती ठोकून देतो !

- तुमचाच,
समीरबापू गायकवाड.

( वि.सू. - आपल्या माय मराठीची अवस्था अजूनही तशीच आहे. जी तुम्ही शतकापूर्वी वर्णिली होती -
'आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान
वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....' )

माझा ब्लॉगपत्ता -
https://sameerbapu.blogspot.in/2017/01/blog-post_3.html

ram.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी म्हणाले तस हे पत्र व्हायरल झाल आहे. मला आज व्हॉट्सॅपवर एका ग्रुपमधे आल. नावासहीत व्हायरल झाल हे पत्र तर जास्त योग्य होइल अस मला वाटत.

ह्या घाणेरड्या लोकांना एकदाच आणि कायमची अद्दल घडेल असं काहीतरी करा. निषेध वगैरे बस्स झालं आता. हे अस्तनीतले साप मोठे होऊन अजगर होतील त्याच्या आत हे बस करा
मधे त्या झाकीर नाईक च भाषण ऐकून नागरिकांवर हल्ले झाले तेव्हा त्या दाढीवाल्यावर बंदी घातली तसच आता नितीश राणे आणि संभाजी ब्रिगेड बद्दल होणार का?
तालिबान सारखा हा भस्मासुर आहे हा आत्ताच थोपव नाहीतर सगळ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. हा प्रश्न एका अटीचा नाही सगळ्यांनी एकत्र येऊन हे थांबावंल पाहिजे

अमित, हे असे अनेकांना वाटत आहे, पण ते लोक संघटित आहेत आणि इतर अनेक लोक नाहीयेत.
त्यामुळे कोणी काय करायचे हेच कळत नाहीये. लोकांना वाटते की सरकार, न्याय व्यवस्थेने काही करावे, पण ते सुद्धा एवढे सोपे नाहीये.
तर येथे नक्की काय काय करता येईल यावर चर्चा तरी करूया.
एक मेसेज असा आला आहे की, प्रत्येकाने एक पोस्टकार्ड लिहावे आणि या असल्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करावी.

या सगळ्या गोष्टींच्या निमित्ताने एक प्रश्न - घाशीराम कोतवाल हे नाटक पाहिले का कुणी अनेक वर्षांपूर्वी? नाना फडणविसांच्या अनेक थोर कार्यांपेक्षा त्यांच्या चारित्र्यातल्या उणीवांबद्दलच जास्त लिहीले आहे!!

तेंव्हा एक थोडा मामुली विरोध झाला होता म्हणे!

पण एकूणच कुणाचे पुतळे फोडणे असले प्रकार झाले नाहीत.

मामुली?? बराच विरोध तो ही अगदी शिवसेना स्टाईल झालेला असं वाचलंय. तो ही संघाने केलेला. तें आणि टीम जिवंत होती आणि पुतळे न्हवते. असते तर फोडण्याचे प्रकार झाले नसतील असे वाटणे हे विरोधकांच्या बेटकुळ्याचा अनादर करण्यासारखे आहे की. Wink
बाकी घाशीरामचा समावेश पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात केला तेव्हा तेंडुलकरांवर शब्दशः हल्ला झालेला असं आठवतं. बाकी त्याच्या प्रतिमेचे दहन टाईप हल्ले किती वेळा झालं असतील त्याचा नंबर माहित नाही.

समीरजी छान लिहिलेत.
अहो तुम्ही लिहिलेले सगळे तर मुळात बर्याच लोकानी वाचले देखील नसेल.

लिहीत रहा , शुभेच्छा.

हे पत्र आताच whatsapp वर मिळाले.

लोकसत्ता चा लेख अतिशय समर्पक.
गोविंदाग्रजांनी पानिपत चा फटका ही लिहिलंय ना?
त्यात तर मराठ्यांची प्रचंड स्तुती आणि ते कसे पराक्रमी आहेत हेच लिहिलंय बहुतेक.
मागे एकदा कोणीतरी इथे च टाकला होता तो मजकूर. सापडला कोणाला तर पुन्हा टाका
(पुतळा फोडणार्यांनी बहुतेक वाचला नसणार)

>>>. आनंद यादवांच्या धाग्यावर लिंबुजींचे असे भाष्य आहे. <<<<<
अजुन पर्यंत तरी या जगात माझा कुठेही पुतळा उभारलेला नाहीये...... सबब फोडायला शोधाशोध करु नये..... ! Proud
फार फार तर जुन्या फाटक्या कपड्यांनी तयार केलेले पुतळासदृष काही जाळलेत तरी चालेल Wink
पण माझा पुतळा जाळून, वृत्तपत्रिय/मिडियातील हुकमी प्रसिद्धि मिळेल याची जराही खात्री/ग्यारण्टी नाहीये... Lol

Pages