( परवा दसर्याच्या नवरात्रात घटस्थापना झाल्यादिवशी लिहिलेली कविता )
उपासमारी घरात माझ्या
झूठ सांगतो जगास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"
परंपरेच्या नावाखाली
रोज जोगवा मागत असतो
भूक भागते, प्रसन्न झाली
देवी मजवर सांगत असतो
रोजरोज पुरणाची पोळी
खातो लाउन तुपास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"
देवाचे भक्तांशी नाते
आज केवढे विभिन्न झाले !
देवी नाही ! देवीवरती
धनाढ्य दिसती प्रसन्न झाले
हुंडीच्या काळ्या पैशाने
क्षेत्रोक्षेत्री विकास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"
कधी मंदिरी घालत होते
"गोंधळ", सगळीकडे माजला
राजकारणी महिषासुरही
संबळ पिटतो, खूप मातला
त्रिशूळ घेउन तुलाच माते
निघावयाचे वधास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"
उत्सव सरला, सुगी संपली
स्वार्थी याचक उडून गेले
जगदंबाही स्तंभित झाली
कितीक कोल्हे लवून गेले
सुगी नसूनी जो येतो तो
अंबा म्हणते झकास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"
याचक नाही भक्त तुझा मी
मागायाचे मला वावडे
लीन असावे तुझिया चरणी
ध्यास मनाला हाच आवडे
तुझ्या मंदिरी पायरीवरी
सदैव माझा निवास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३