दुभतं

Submitted by मनीमोहोर on 23 March, 2016 - 13:36

कोकणात आमच्याकडे दुध-दुभतं असं न म्हणता फक्त दुभतचं असं म्हणतात. दुभतं हा आमच्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गावाला फोन केला की विचारलच जातं " सध्या दुभतं कितपत ? " असं आणि तिकडुन " आहे भरपूर " असं उत्तर आलं की वारणा/गोकुळ वापरणारी मी इथे विनाकरण खुश होते आणि बेताचं आहे असं कळल की उगाचच हिरमुसते ही .

गावाला गुरं पाळायची ती बैलांच्या पैदाशीसाठी, दुधासाठी आणि गोबर गॅससाठी. आमचा गुरांचा गोठा आहे
घराजवळच . पक्क बांधकाम आणि लाईट, पाण्याची सोय असलेला. यामुळे गोठ्याची स्वच्छता राखणं ही सोप
होत.

पहाटेच दुभत्या गुरांची धार काढली जाते. त्यानंतर वासरांना दुधासाठी गाईकडे सोडतात. आपल्या दुडक्या
चालीने आईकडे बर्रोबर जातात वासरं. गाय ही आपल्या वासरांना बरोबर ओळखते. आपल्या जिभेने चाटुन त्यांना कुरवाळायला लागते ते दृश्य म्हणजे वात्सल्याचं मुर्तीमंत प्रतीक वाटत मला.

फेसाळलेल्या दुधाच्या कासंड्या घरात आणल्या जातात. त्या धारोष्ण, नैसर्गिक चवीच्या दुधाचा मोह या वयात
ही कधी कधी अनावर होतो. ताज्या दुधाचा, वाफाळणार्‍या चहाचा कप घेऊन पहाटेच्या वेळी खळ्यात बसणं म्हणजे साक्षात स्वर्गसुख !! दुध तापविण्यासाठी गॅसवर ठेवताना थारळ्याची मात्र आठवण आल्याशिवाय रहात
नाही. काही वर्षा पूर्वी पर्यंत आमच्याकडे दूध थारळ्यावरच तापविले जाई. थारळ म्हणजे लाकडी रेज्यांच
दार असलेलं स्वयंपाकघरातल्या भिंतीतलं एक खणवजा कपाट. याला जमीनीत एक उथळ खड्डा असतो. त्यात निखारे घालायचे, त्यावर दुधाच पातेलं ठेवायचं आणि थारळ्याचं दार बंद करुन टाकायच. मांजर, कीडा, मुंगी या पासून आपोआपच संरक्षण ही होत आणि दुध अगदी मंदपणे तापत रहात ऊतु न जाता. दुपार पर्यंत छान गरम रहात आणि भाकरीसारखी जाड साय ही जमते .

पहाटेच करायचं दुसर काम म्हणजे ताकाच. पहाटेच्या थंड वेळी ताक केलं की लवकर ही होत आणि लोणी ही
चांगल येतं. ओणव्याने उभ राहुन ताकमेढ्याच्या खांबाला बांधलेल्या रवीने मोठ्या चिनी मातीच्या डेर्‍यात दही घुसळुन ताक केले जाई. आता ताकमेढीची जागा इलेक्ट्रीक रवीने घेतली आहे एवढाच काय तो फरक. लोणी काढलं की घरात छोटं बाळ असेल तर त्याला थोडसं भरवलं जात घरातला बाळकृष्ण म्हणुन. लोण्याखालचं ताक मात्र कोणी गडी माणसं मागायला आली तर त्यानांच वाटलं जात. उन्हाळ्यात उन्हात काम करुन दमलेल्या गड्यांना ते आवर्जुन दिलं जातं

आमच्याकडे ताक अगदी सगळ्याना आवडतं. किंचित तुरट तरी ही मधुर चवीच वाटीभर ताक प्यायल्याशिवाय जेवण पूर्णच नाही होत. मी तर रोज ताक प्यायल्यानंतर मनातल्या मनात " तक्रम् शक्रस्य दुर्लभम्" हे आपल्याच मनाशी म्हणते.... त्या बिचार्‍या इंद्रदेवाला अमृत मिळत पण असं अमृततुल्य ताक नाही मिळत असो. ताकाची कढी कधी काही न घालता कधी पडवळ किवा काकडीचे तुकडे घालुन किंवा उन्हाळ्यात पिकलेल्या फणसाचे गरे घालुन ही करतो पण तांदळाच्या पिठाची उकड ही विशेष आवडीची. तसेच खुतखुत्या नावाचा एक प्रकारचा भात ही करतो ताक घालुन. शिळ्या भातात आंबट ताक घालुन तो सरसरीत करायचा. त्यात चवीला जिरं , मीठ, वेस्वार हि. मि घालायची आणि गॅसवर पाच मिनिटं उकळवायचा की झालं. तो उकळू लागला की " खुत् खुत् " असा आवाज येतो म्हणून हा खुतखुत्या भात. उन्हाळ्यात मात्र एकंदरच जनावरं कमी दूध देतात, त्यामुळे दही ताक ही बेताचच असत ती उणीव मग उन्हाळ्यात नाचणीची आंबील करुन भरुन काढली जाते. अर्थात आता दुध सर्रास विकत मिळायला लागलाय आमच्याकडे त्यामुळे प्रश्न नाही येत पण तरी ही सवयीने उन्हाळ्यात नाचणीची आंबील केली जातेच .

दर चार आठ दिवसांनी लोणी कढवण्याचा कार्यक्रम असतो. तूप आम्ही मोठ्या मोठ्या चिनी मातीच्या बरणीत ठेवतो. त्या घरच्या तुपाची चव, स्वाद इतर कोणत्याही पदार्थाची चव अधिकच खुलवते. गरम गरम पिठल भात आणि त्यावर घरच तुप ! किंवा मेतकूत भातात तूप... अहाहा स्वर्ग !!! घरी केलेल्या तुपातले लाडु, शिरा असे सर्वच पदार्थ चवीला अप्रतिम लागतात.

श्रावणात आणि भाद्रपदात ओल्या चार्‍यामुळे दुध दुभत भरपुर असत. मग काय... दूध जास्त असेल तर श्रीखंड, बासुंदी, खीर असे पदार्थ वरचेवर केले जातात. पण कधी कधी पेढे ही करतो घरीच. एका मोठ्या परातीत दूध आटवुन खवा केला जातो आणि नंतर त्यात अगदी थोडी साखर घालुन त्याचे फिके पेढे केले जातात. गुलाबी रंगाचे, जायफळ वेलचीच्या स्वादाचे, पापडाच्या लाटीसारख्या चपट्या आकाराचे, घरी केलेले पेढे अप्रतिम लागतात. शहरातल्या कोणत्याही प्रसिदध हलवायाच्या पेढ्यांपेक्षा किती तरी पटीने सरस. शेजार घरी काही कार्य वैगेरे असेल तर मात्र जास्तीच दूध तिकडेच जात. आता विकत मिळत सर्रास दूध तरी ही गरजेला पहिल्यांदा शेजारी विचारण्याचीच पद्धत आहे अजूनही गावाकडे. एवढी जनावरं असल्यामूळे खरवस ही खूप वेळा होतो. घरचा खरवस मिळत असल्याने इथे शहरात मिळ्ण्यार्‍या खरवसाची नेहमीच तुलना होते आणि इथला अगदी चांगला समजला जाणारा खरवस ही त्यामुळे आवडत नाही. ( स्मित)

मुलांना तर " हम्मा " बघण्याचे फार वेड. मुंबईच्या पाव्हण्या मुलांचा मुक्काम तर गोठ्यातच असतो पण तिथली मुलं ही रमतात गोठ्यात. एकदा काय झालं .... घरातला एक तीन चार वर्षांचा छोटा मुलगा बराच वेळ दिसत नव्हता चुकलेला फकीर गोठ्यातच मिळेल म्हणून मी गोठ्यात गेले आणि समोरचे दृश्य पाहुन अक्षरशः स्मिमित झाले. गाईच्या दोन पायांच्या मध्ये उभा राहुन मान उंचावुन हा वासरा सारखं दूध पिण्याचा प्रयत्न करत होता आणि ती गाय ही बिचारी काही न करता स्तब्ध उभी होती.... अर्थात सगळीच जनावरं काही अशी गरीब नसतात. आमचा पाखर्‍या नावाचा एक अति मारकुट्या बैल होता. त्याच्या नजरेला नजर सुध्दा देता येत नसे आम्हाला. असो. एकदा आमच्या एका गड्याला दूधाची गरज होती म्हणून आमची एक गाय आम्ही त्याला दिली होती काही दिवसांसाठी पण ती गाय ओळीने आठ दिवस दावं तोडून आमच्याकडे येत होती. नंतर रमली तिकडे.

जनावर म्हणजे आमच्या घरातले सदस्यच जणु. आमच्याकडे बैल पोळा हा सण नसतो पण नांगरणी झाली की एक दिवस सगळ्या बैलांना छान नटवतात. त्या दिवशी त्यांना कामाला जुंपत नाहीत आणि त्यांना नारळाचा रस पाजतात श्रमपरिहार, कृतज्ञता आणि कौतुक म्हणून. कोकणात नारळ भरपूर म्हणून असेल कदाचित पण आमच्याकडे बैलांना पुरणपोळी खाऊ घालायची पद्धत नाहीये, नारळाचा रसच पाजतात. वसु बारसेच्या दिवशी संध्याकाळी गोवत्स धेनुची पूजा करतात. कुंकवाचा टिळा लावलेल्या गाई फार छान दिसतात त्या दिवशी.

माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी आमच्या भरलेल्या गोठ्याचा उल्लेल्ख वैभव असा करीत. त्याची सार्थकता आज हा लेख लिहीताना मनोमन पटतेय......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा, तुझा प्रतिसाद आला नसता तर तुला विपु करणार होते >>>>>>तु मा ख मै! Proud
कारण तु ही कोकणची डाय हार्ड फॅन आहेस >>>>>>>>>>>अग, मी शरीराने इथे आहे, पण मनाने कायम कोकणातच असते. Happy

थारळं >>>>>....हे नव्हतं कधी पाहिलं . शब्दही ह्या लेखातच कळला. Happy

ममो धन्यवाद कशाला. उलट त्या निमीत्ताने तुझे लेख परत परत वाचले जातात.:स्मित: आणी या लेखातुन मला मसाल्यान्ची लिन्क पण सापडेल.:डोमा:

खूप छान लिहीलं आहे ! वाचताना अनुभवता येतं!

शिवाय लिहिताना कुठेही "गेले ते दिन गेले" टाईप विव्हळता अजिबात नसते. तरीही त्या काळाबद्दल, वस्तूंबद्दल तुमची ममता जिव्हाळा आणि भावनिक बांधिलकी सतत जाणवत राहते.>>>>>>>> +१००० नंदिनी !!

तुमच्या सर्व लिखाणावर एक प्रसन्न समाधानाची दुलई असते. >>> अगदी खरं.

तुमच्या लेखाची दुलई पांघरत मीपण माझ्या आजोळी पूर्वी असणार्‍या गोठ्याची आठवण काढली.

Pages