कोकणात आमच्याकडे दुध-दुभतं असं न म्हणता फक्त दुभतचं असं म्हणतात. दुभतं हा आमच्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गावाला फोन केला की विचारलच जातं " सध्या दुभतं कितपत ? " असं आणि तिकडुन " आहे भरपूर " असं उत्तर आलं की वारणा/गोकुळ वापरणारी मी इथे विनाकरण खुश होते आणि बेताचं आहे असं कळल की उगाचच हिरमुसते ही .
गावाला गुरं पाळायची ती बैलांच्या पैदाशीसाठी, दुधासाठी आणि गोबर गॅससाठी. आमचा गुरांचा गोठा आहे
घराजवळच . पक्क बांधकाम आणि लाईट, पाण्याची सोय असलेला. यामुळे गोठ्याची स्वच्छता राखणं ही सोप
होत.
पहाटेच दुभत्या गुरांची धार काढली जाते. त्यानंतर वासरांना दुधासाठी गाईकडे सोडतात. आपल्या दुडक्या
चालीने आईकडे बर्रोबर जातात वासरं. गाय ही आपल्या वासरांना बरोबर ओळखते. आपल्या जिभेने चाटुन त्यांना कुरवाळायला लागते ते दृश्य म्हणजे वात्सल्याचं मुर्तीमंत प्रतीक वाटत मला.
फेसाळलेल्या दुधाच्या कासंड्या घरात आणल्या जातात. त्या धारोष्ण, नैसर्गिक चवीच्या दुधाचा मोह या वयात
ही कधी कधी अनावर होतो. ताज्या दुधाचा, वाफाळणार्या चहाचा कप घेऊन पहाटेच्या वेळी खळ्यात बसणं म्हणजे साक्षात स्वर्गसुख !! दुध तापविण्यासाठी गॅसवर ठेवताना थारळ्याची मात्र आठवण आल्याशिवाय रहात
नाही. काही वर्षा पूर्वी पर्यंत आमच्याकडे दूध थारळ्यावरच तापविले जाई. थारळ म्हणजे लाकडी रेज्यांच
दार असलेलं स्वयंपाकघरातल्या भिंतीतलं एक खणवजा कपाट. याला जमीनीत एक उथळ खड्डा असतो. त्यात निखारे घालायचे, त्यावर दुधाच पातेलं ठेवायचं आणि थारळ्याचं दार बंद करुन टाकायच. मांजर, कीडा, मुंगी या पासून आपोआपच संरक्षण ही होत आणि दुध अगदी मंदपणे तापत रहात ऊतु न जाता. दुपार पर्यंत छान गरम रहात आणि भाकरीसारखी जाड साय ही जमते .
पहाटेच करायचं दुसर काम म्हणजे ताकाच. पहाटेच्या थंड वेळी ताक केलं की लवकर ही होत आणि लोणी ही
चांगल येतं. ओणव्याने उभ राहुन ताकमेढ्याच्या खांबाला बांधलेल्या रवीने मोठ्या चिनी मातीच्या डेर्यात दही घुसळुन ताक केले जाई. आता ताकमेढीची जागा इलेक्ट्रीक रवीने घेतली आहे एवढाच काय तो फरक. लोणी काढलं की घरात छोटं बाळ असेल तर त्याला थोडसं भरवलं जात घरातला बाळकृष्ण म्हणुन. लोण्याखालचं ताक मात्र कोणी गडी माणसं मागायला आली तर त्यानांच वाटलं जात. उन्हाळ्यात उन्हात काम करुन दमलेल्या गड्यांना ते आवर्जुन दिलं जातं
आमच्याकडे ताक अगदी सगळ्याना आवडतं. किंचित तुरट तरी ही मधुर चवीच वाटीभर ताक प्यायल्याशिवाय जेवण पूर्णच नाही होत. मी तर रोज ताक प्यायल्यानंतर मनातल्या मनात " तक्रम् शक्रस्य दुर्लभम्" हे आपल्याच मनाशी म्हणते.... त्या बिचार्या इंद्रदेवाला अमृत मिळत पण असं अमृततुल्य ताक नाही मिळत असो. ताकाची कढी कधी काही न घालता कधी पडवळ किवा काकडीचे तुकडे घालुन किंवा उन्हाळ्यात पिकलेल्या फणसाचे गरे घालुन ही करतो पण तांदळाच्या पिठाची उकड ही विशेष आवडीची. तसेच खुतखुत्या नावाचा एक प्रकारचा भात ही करतो ताक घालुन. शिळ्या भातात आंबट ताक घालुन तो सरसरीत करायचा. त्यात चवीला जिरं , मीठ, वेस्वार हि. मि घालायची आणि गॅसवर पाच मिनिटं उकळवायचा की झालं. तो उकळू लागला की " खुत् खुत् " असा आवाज येतो म्हणून हा खुतखुत्या भात. उन्हाळ्यात मात्र एकंदरच जनावरं कमी दूध देतात, त्यामुळे दही ताक ही बेताचच असत ती उणीव मग उन्हाळ्यात नाचणीची आंबील करुन भरुन काढली जाते. अर्थात आता दुध सर्रास विकत मिळायला लागलाय आमच्याकडे त्यामुळे प्रश्न नाही येत पण तरी ही सवयीने उन्हाळ्यात नाचणीची आंबील केली जातेच .
दर चार आठ दिवसांनी लोणी कढवण्याचा कार्यक्रम असतो. तूप आम्ही मोठ्या मोठ्या चिनी मातीच्या बरणीत ठेवतो. त्या घरच्या तुपाची चव, स्वाद इतर कोणत्याही पदार्थाची चव अधिकच खुलवते. गरम गरम पिठल भात आणि त्यावर घरच तुप ! किंवा मेतकूत भातात तूप... अहाहा स्वर्ग !!! घरी केलेल्या तुपातले लाडु, शिरा असे सर्वच पदार्थ चवीला अप्रतिम लागतात.
श्रावणात आणि भाद्रपदात ओल्या चार्यामुळे दुध दुभत भरपुर असत. मग काय... दूध जास्त असेल तर श्रीखंड, बासुंदी, खीर असे पदार्थ वरचेवर केले जातात. पण कधी कधी पेढे ही करतो घरीच. एका मोठ्या परातीत दूध आटवुन खवा केला जातो आणि नंतर त्यात अगदी थोडी साखर घालुन त्याचे फिके पेढे केले जातात. गुलाबी रंगाचे, जायफळ वेलचीच्या स्वादाचे, पापडाच्या लाटीसारख्या चपट्या आकाराचे, घरी केलेले पेढे अप्रतिम लागतात. शहरातल्या कोणत्याही प्रसिदध हलवायाच्या पेढ्यांपेक्षा किती तरी पटीने सरस. शेजार घरी काही कार्य वैगेरे असेल तर मात्र जास्तीच दूध तिकडेच जात. आता विकत मिळत सर्रास दूध तरी ही गरजेला पहिल्यांदा शेजारी विचारण्याचीच पद्धत आहे अजूनही गावाकडे. एवढी जनावरं असल्यामूळे खरवस ही खूप वेळा होतो. घरचा खरवस मिळत असल्याने इथे शहरात मिळ्ण्यार्या खरवसाची नेहमीच तुलना होते आणि इथला अगदी चांगला समजला जाणारा खरवस ही त्यामुळे आवडत नाही. ( स्मित)
मुलांना तर " हम्मा " बघण्याचे फार वेड. मुंबईच्या पाव्हण्या मुलांचा मुक्काम तर गोठ्यातच असतो पण तिथली मुलं ही रमतात गोठ्यात. एकदा काय झालं .... घरातला एक तीन चार वर्षांचा छोटा मुलगा बराच वेळ दिसत नव्हता चुकलेला फकीर गोठ्यातच मिळेल म्हणून मी गोठ्यात गेले आणि समोरचे दृश्य पाहुन अक्षरशः स्मिमित झाले. गाईच्या दोन पायांच्या मध्ये उभा राहुन मान उंचावुन हा वासरा सारखं दूध पिण्याचा प्रयत्न करत होता आणि ती गाय ही बिचारी काही न करता स्तब्ध उभी होती.... अर्थात सगळीच जनावरं काही अशी गरीब नसतात. आमचा पाखर्या नावाचा एक अति मारकुट्या बैल होता. त्याच्या नजरेला नजर सुध्दा देता येत नसे आम्हाला. असो. एकदा आमच्या एका गड्याला दूधाची गरज होती म्हणून आमची एक गाय आम्ही त्याला दिली होती काही दिवसांसाठी पण ती गाय ओळीने आठ दिवस दावं तोडून आमच्याकडे येत होती. नंतर रमली तिकडे.
जनावर म्हणजे आमच्या घरातले सदस्यच जणु. आमच्याकडे बैल पोळा हा सण नसतो पण नांगरणी झाली की एक दिवस सगळ्या बैलांना छान नटवतात. त्या दिवशी त्यांना कामाला जुंपत नाहीत आणि त्यांना नारळाचा रस पाजतात श्रमपरिहार, कृतज्ञता आणि कौतुक म्हणून. कोकणात नारळ भरपूर म्हणून असेल कदाचित पण आमच्याकडे बैलांना पुरणपोळी खाऊ घालायची पद्धत नाहीये, नारळाचा रसच पाजतात. वसु बारसेच्या दिवशी संध्याकाळी गोवत्स धेनुची पूजा करतात. कुंकवाचा टिळा लावलेल्या गाई फार छान दिसतात त्या दिवशी.
माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी आमच्या भरलेल्या गोठ्याचा उल्लेल्ख वैभव असा करीत. त्याची सार्थकता आज हा लेख लिहीताना मनोमन पटतेय......
सुरेख! नंदिनी +१ ममो,
सुरेख! नंदिनी +१ ममो, पर्यटनाच्या यादीत तुझं कोकणातलं घर पहिल्या क्रमांकावर आहे कारण ते प्रेक्षणीय अाहे त्याहीपेक्षा ते अाहे जिव्हाळ्याचं! तुझ्या लेखांमुळे आमचाही जीव जडलाय....
छान लिहलयं एकदम! पुर्वी गावी
छान लिहलयं एकदम!
पुर्वी गावी वाड्यात रहात असताना मोठ्या दरवाज्यातुन आत आलो की आधी गोठा गायींचा ३-४ गायी असायच्या...
त्यात किमान दोन दुभत्या आणि १-२ गाभण. ह्या गायी रोज सकाळी शेतात नेणे आणि संध्याकाळी घरी आणने ही एक जबाबदारी होती. नविन घर झाल्यावर मात्र आता गायींचा गोठा शेतातच.. आता दुध शेतातुन घरी आणने.
सगळे डोळ्यापुढे उभे राहिले तुमचा लेख वाचताना!
ममो, खूपच सुंदर लिहीलंय.
ममो, खूपच सुंदर लिहीलंय. वाचताना सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.
आमच्या कोकणातल्या घराची आठवण आली अगदी. फक्त आमचं रहातं घर नसल्याने आता असं नाहीये आणि आता वयं झाली सगळ्यांची. मोठ्या काकांचा तर घर, गोठा हा जीव की प्राण आहे.
तुमच्या सर्व लिखाणावर एक प्रसन्न समाधानाची दुलई असते. >>> हो खरंच, कायम जाणवतं हे वाचताना.
फार सुंदर लिहिलंय. बाकी
फार सुंदर लिहिलंय. बाकी नंदिनी +१
जमल्यास फोटो पण टाका. सगळा लेख स्वतःशी रिलेट करु शकलो.
आज-काल आजोळी जाणंच कमी झालंय. या वर्षी च्या भारतवारीत मुद्दाम आजीला भेटायला एक दिवस जाऊन आलो. सगळ्या चौकशांबरोबर गोठ्यात गायी किती ? हा प्रश्न ही आपसुक विचारलाच. गोठाही पाहून आलो. नेहमीप्रमाणे १-२ चं होत्या. रात्री झोपायच्या वेळी, मामी गोठ्यातून १० दिवसांचं वासरु घरात घेऊन आली आणि खुंटीला बांधून ठेवलं. माजघरातच ! तुडतुडं, एखाद्या गावठी कुत्र्याच्या उंचीचं,निरागस डोळ्याचं. हे मला दिसलंच नव्हतं मगाशी असं झालं एकदम !
ममो, सुंदरच लिहिलयंस.
ममो, सुंदरच लिहिलयंस. नेहेमीप्रमाणेच !
नंदिनी, प्रतिसाद देणं ही सुद्धा एक कसब/ कला आहे. जियो! कसली पोस्ट लिहिलिएस, मस्तच
ममो, काय सुंदर लिहितेस तु. मी
ममो, काय सुंदर लिहितेस तु. मी कोकणात जाऊन आले बघ हे वाचताना. सकाळ -संध्याकाळी गुरं चरायला जाताना-येताना, येणारा त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज, ते गायींचं वासराच्या ओढीने आणि वासरांचं आईच्या ओढीने हंबरणं, त्यांच्या पायांचे आवाज, मधेच गुराख्याचा आवाज. हे पण सगळं आता अनुभवल बघ मी.
खरचं फ़ोटो दाखव की ग.
नन्दिनीला अनुमोदन. ममो अतीशय
नन्दिनीला अनुमोदन. ममो अतीशय सुरेख आणी तृप्त मनाने लिहीलयस. आम्हाला असले सुख कधी मिळाले नाही. पण या लेखातुन नक्कीच मिळाले.
छान लिहिलयसं गं
छान लिहिलयसं गं ममो..
मारकुट्या बैल असतोच नै का प्रत्येक गोठ्यात
आमच्याकडे गायी नाहिच..बैलच निसते..
मागे एक गाय होती अन तिला वासरुसुद्धा होतं.. गावी गेल्यावर त्याच्याशि खेळण्यात, त्याला आंजारण्या गोंजारण्यात मस्त वेळ जायचा.. पुढं त्यांच काय झाल माहिती नै.. जास्त मोठी नै ५वी ६वी मधे असेल मी.. गावी सुद्धा वर्ष दोन वर्षात जाण होतं..
आजी दादाजीमूळे नाळ जोडून आहे.. आता दादाजी (पप्पांचे पप्पा) गेलेत.. आजी आहे.. तोवर ठिक.. पण त्यानंतर तितकी आत्मीयता राहिल न राहिल कुणास ठाऊक
खूपच सुंदर लिहिलंय.....ताज्या
खूपच सुंदर लिहिलंय.....ताज्या दुधाचा वाफाळणारा चहा घेऊन पहाटेच्या वेळी खळ्यात बसणं म्हणजे साक्षात स्वर्गसुखच!! .....दुडक्या चालीने आईकडे बर्रोबर जातात वासरं....हे सर्व वाचताना..... तुमचे स्वयंपाकघर, गोठा, ती पहाट, गाई- वासरे हे सर्व डोळ्यासमोर उभे राहते. तु खरच भाग्यवान आहेस. मला हे कधीच अनुभवायला मिळाले नाही. पण तुझ्या लेखणीतुन मी क्ष्णभर का होईना तिथे जाऊन आले.
नविन माहिती, नविन शब्द समजले.. थारळ, खुतखुत्या भात, ..पण वेस्वार म्हणजे काय ते कळले नाही.
सुरेख लेख. नंदिनी, प्रतिसाद
सुरेख लेख.
नंदिनी, प्रतिसाद मस्तच.
नविन माहिती, नविन शब्द समजले.. थारळ, खुतखुत्या भात, ..पण वेस्वार म्हणजे काय ते कळले नाही.>>>>>>+१
अजून एल कोकण स्पेशल मस्त लेख
अजून एल कोकण स्पेशल मस्त लेख
लिखाणाबाबत नंदिनी आणि ईतर सर्वच प्रतिसादांना प्लस वन!
नेहमी प्रमाणे सुंदर
नेहमी प्रमाणे सुंदर लिहिलयं!
आजोळी म्हशी, बैल वगैरे होते. घुसळखांबावर डेर्यात ताक केले जाई. थारळे मात्र माहित नव्हते. थारळ्याची आयडीया भारी आहे !
खूप छान लेख. हे अस काही कधी
खूप छान लेख.
हे अस काही कधी अनुभवलेलच नाही.. वाचनामुळे परिचित मात्र आहे..
पण पुन्हा वाचून का होईना, पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.
मनामधे रुजलेला अनुभव मनापासून लिहिला की असा साधा, सोपा, सरळ आणि प्रत्ययकारी होणारच..
नंदिनी यांची प्रतिक्रियाही खूप आवडली..
नंदिनीने परफेक्ट प्रतिक्रिया
नंदिनीने परफेक्ट प्रतिक्रिया लिहिली आहे त्यालाच माझा +१
वाचताना लहानपणी माझ्या आत्याकडे हे सगळं असच असायचं ते आठवलं.
खुप सुरेख लिहीलय.
खुप सुरेख लिहीलय.
फारच छान वाटलं हे वाचून !
फारच छान वाटलं हे वाचून !
वॉव ममो...मस्त. मी कोकणात
वॉव ममो...मस्त. मी कोकणात गेले की हे सर्व अनुभवते. आणि खूप आनंदित होते.
आभार सगळ्यांचे परत एकदा लेख
आभार सगळ्यांचे परत एकदा लेख आवडला म्हणुन.
मंजू, नक्की जाउ या सगळ्यांनी कोकणात आमच्या घरी.
नंदिनी, प्रतिसाद देणं ही सुद्धा एक कसब/ कला आहे. जियो! कसली पोस्ट लिहिलिएस, मस्तच >> योकु +१
शोभा, तुझा प्रतिसाद आला नसता तर तुला विपु करणार होते हे वाच म्हणून कारण तु ही कोकणची डाय हार्ड फॅन आहेस हे माहितेय मला. तुझा प्रतिसाद ही छान आहे. फोटो नाहीयेत शोधले खुप, पण नाही मिळाले.
विद्या, देवकी, वेस्वार म्हणजे एक प्रकारचा मसाला असतो. हा कोकणात फक्त आमच्या भागातच केला जातो. दिनेश यांची आहे रेसिपी वेस्वार ची पण आत्ता नाही मिळत आहे. मिळाली की देते.
नितांत सुंदर लेख,
नितांत सुंदर लेख, हेमाताई....
खरोखर तुमच्या कडे केवढे वैभव आहे...:)
तुमच्या लेखात, घरातल्या लहानग्या पासुन तर वृदधा पर्यंत सगळ्यांबद्द्ल भरभरुन प्रेम , माया दिसते...:)
एकदा वाचुन झाला पण पुन्हा वाचते आहे, एकदा वाचुन समाधान होत नाही..
आभार एका सुंदर लेखाबद्द्ल ----------/\---------
सुंदर लिहिलंय. गावची आठवण
सुंदर लिहिलंय. गावची आठवण आलीच.
नंदिनीची पोस्टही सुंदर आहे.
ममो अग तुझ्या लेखात मी लिन्क
ममो अग तुझ्या लेखात मी लिन्क दिली होती वेस्वारची.
http://www.maayboli.com/node/55550
http://www.maayboli.com/node/44285
खूप सुंदर लेख. को़कण कधी
खूप सुंदर लेख. को़कण कधी जवळून अनुभवले नसले तरी, देशावर जेव्हा गवळ्याच्या घरी कधीकधी दुध-खरवस घ्यायला जायचो लहानपणी त्याची आठवन आली. वासरांच्या लीला पहायला मिळायच्या त्यावेळी.
खूपच छान लिहिलंय... गाय (टिळा
खूपच छान लिहिलंय... गाय (टिळा लावलेली), वासरू, बैल सगळे आले समोर... अहाहा वाटल अगदी
खूप मस्त लिहिलय. वाचून सगळे
खूप मस्त लिहिलय. वाचून सगळे डोळ्यासमोर उभे राहीले. मी कधिच हे बघितले नाहीये आणि बघायला मिळेल याची आशाही नाही. माझ्या गेल्या २-३ पिढ्या मुंबईतच आहेत. त्यामुळे गाव असे नाहीच. तुमच्या या अशा लिखाणातूनच मी अनुभवते हे सारे वैभव.
लिखाण आवडलं, आमच्या आजी
लिखाण आवडलं, आमच्या आजी आजोबांपासून फक्त पिशवीतून किंवा दूधवाल्याकडून भांड्यात मिळणारं दूधच पाहिलंय, ही सर्व माहिती नवी आहे.
खुपच सुंदर लिहल आहे. शहरात
खुपच सुंदर लिहल आहे.
शहरात वाढलेल्या आमच्या सारख्यांना ह्या सगळ्याच गोष्टीचा खुप हेवा वाटतो.
काय साजुक, साजुक वर्णन केलंय
काय साजुक, साजुक वर्णन केलंय - अहाहा, सारे काही डोळ्यासमोर उभं र्हातंय !!
धारोष्ण, फेसाळते दुध प्यायलो आहे - त्याची जी चव असते ना त्यापुढे अमृतही फिके पडेल.
थारळं नव्यानेच समजले.
पशूंनाही जपणारी, त्यांच्याविषयी आदर बाळगणारी आपली संस्कृती फारच लोभसवाणी.
धन्यवाद सगळ्यांना. रश्मी
धन्यवाद सगळ्यांना.
रश्मी तुला स्पेशल थँक्स. अग काय झालं मला माहित नाही पण माझ्याच लेखात असलेली लिंक माझ्याच लक्षात राहिली नाही . तु ती लगेच दिलीस म्हणून धन्स.
खुप सुरेख लिहीलय. माझ्या
खुप सुरेख लिहीलय. माझ्या मामाकडे होत 'थारळं', पाहिलेल आहे पण त्याला थारळं म्हणतात हे आत्ता कळ्लं.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
Pages