फुसके बार – २६ फेब्रुवारी २०१६
.
१) जे कोणी शाळेत आहेत किंवा विविध स्पर्धापरीक्षांना बसायचे आहेत, त्यांनी पुढील प्रश्नाच्या उत्तरांची तयारी करून ठेवावी.
क) ज्या गुन्हेगारी कृत्यासाठी संजय दत्त याला शिक्षा झाली ते कृत्य केल्याच्या अनेक वर्षानंतरही त्याचे माफियांशी झालेल्या दूरध्वनीवरील संपर्कांचे तपशील व प्रत्यक्ष संभाषण प्रसिद्ध झाले होते. तरीही त्याबद्दल त्याच्यावर कसलीही कारवाई का झाली नसेल याबद्दल कल्पनाविस्तार करा.
ख) ‘Not an easy walk to freedom’ हे उद्गार कोणी व केव्हा काढले?
ग) संजय दत्तची सुटका केव्हा झाली व त्यानंतर तो कोठे कोठे गेला व का गेला यावर कमीत कमी पन्नास मुद्द्यांमध्ये उत्तर लिहा.
घ) संजय दत्त हा थोडी एक होईना पण शिक्षा भोगून आला, सल्लू मात्र गुन्हा कबूल न करता मोदींबरोबर दिसतो, यात विरोधाभास वाटतो का? असल्यास व नसल्यास तुमचे या दोन्ही उदाहरणांवरील मत व्यक्त करा.
ङ) ‘देशविरोधी वा गुन्हेगारी कृत्ये केल्यामुळे शिक्षा होवो वा ना होवो, पण सेलिब्रिटींच्या कुटुंबावर होणारा परिणाम’ हा विषय पीएचडीसाठी देणे आहे. कोणाला रस असल्यास कळवावे.
च) संजय दत्त याच्या तुरूंगातून सुटकेनंतर पत्रकारांशी बोलताना त्याच्या राष्ट्रध्वजाला प्रणाम करण्याच्या व धरतीचे चुंबन घेण्याच्या कृतीवरून त्याला प्रश्न विचारणा-या धन्य स्वयंप्रज्ञ पत्रकाराचे नाव सांगा.
२) एनडीटीव्ही या एकाच चॅनलवर देशभक्त संजय दत्त याच्या तुरूंगातून झालेल्या ऐतिहासिक सुटकेनंतरच्या त्याच्या पत्रकारपरिषदेचे थेट प्रक्षेपण न करणारे हे एकच चॅनल आहे म्हणून त्यांचे कौतुक करावे म्हटले तर त्यांनीही संसदेत चालू असलेले गृहमंत्र्यांचे भाषण दाखवणे थांबवून संजय दत्तची मुलाखत दाखवणे पसंत केले. यावरून हा खरे राष्ट्रीय महत्त्वाचा प्रश्न आहे याची खात्री पटली.
या देशभक्ताची मुलाखत संपल्यावर मात्र काही चॅनल्सचा पुन्हा संसदेतील भाषणे दाखवण्याचा नाइलाजच झाला.
३) गुलाब नबी आझाद यांनी काल राज्यसभेत छान भाषण केले. त्यात मुद्दे फार परिणामकारक नव्हते. परंतु त्यांची बोलण्याची शैली छान आहे. बोलताना त्यांनी एका उर्दू म्हणीचा उल्लेख केला.
जेएनयुमध्ये ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांच्यावर जरूर कारवाई करा परंतु अहमद की टोपी महमुद के सरपर न रखिये असे ते म्हणाले.
त्यांनी एक छान छोटीशी गोष्टही सांगितली, काश्मिरी. ते म्हणाले काश्मिरमध्ये दरवर्षी बर्फवृष्टी होते. तर नव्यानेच समज आलेली मुलगी तिच्या मोठ्या बहिणीला बर्फवृष्टी पाहून म्हणाली की मी अशी बर्फवृष्टी कधीच पाहिलेली नाही. तिच्यापेछा ४-५ वर्षांनी मोठी असलेली तिची बहिण तिला म्हणते मी तुझ्यापेक्षा अधिक वर्षांची बर्फवृष्टी पाहिली आहे. माझ्यावर श्वास ठेव की मी यापूर्वी याहीपेक्षा अधिक बर्फवृष्टी पाहिलेली आहे.
कॉंग्रेसने भाजपपेक्षा अधिक वर्षे राज्य केलेले आहे, तेव्हा देशभक्तीबद्दल आम्हाला शिकवू नका या अर्थाने त्यांनी हे सांगितले. त्यांचा मुद्दा वादाचा होऊ शकतो, पण त्यानिमित्ताने त्यांच्याकडून छान गोष्ट ऐकायला मिळाली.
४) प्रश्न ऐरणीवर येणे
अमुक अमुक प्रश्न ऐरणीवर आला आहे हा शब्दप्रयोग आजकाल अनेकदा ऐकू येतो. ऐरणीवर एखादे काम करायला घेणे हे म्हणजे एखाद्या गोष्टीवर काम करायला सुरूवात करणे असा त्याचा अर्थ घ्यायला हवा.
मात्र अलीकडे हा शब्दप्रयोग ज्या कामाची गरज आहे त्यासाठी केला जाताना दिसतो.
५) आज राज्यसभेत अरूण जेटलींचे भाषण फार छान झाले. मला आणखी आनंद झाला किंवा समाधान वाटले ते त्यांच्या भाषणातील दोन गोष्टीमुळे.
अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या म्हणून विद्यार्थ्यांवर कारवाई केली गेली. मात्र त्याच अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणा-या पीडीपीबरोबरची युती भाजपला कशी चालते असा प्रश्न विचारला जातो. त्यावर कॉंग्रेस असो किंवा भाजप, त्यांच्यापैकी एका तरी राष्ट्रीय पक्षाचा तेथील सरकारात सहभाग असणे हेच देशाच्या हिताचे आहे असे मी म्हटले होते.
हैद्राबाद विद्यापीठात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केले होते. त्याच्या समर्थनार्थ असे सांगितले गेले की त्यांचा विरोध मुळात फाशीच्या शिक्षेला होता, दहशतवादी मेमनला त्यांचा पाठींबा नव्हता. यावर मी म्हटले होते की मेमनची शिक्षा ही दहशतवादाच्या आरोपाखाली झालेली आहे. दहशतवाद हे अघोषित युद्धच असते. तेव्हा अशा गुन्ह्यात जर फाशीची शिक्षा झाली तर ती मानवतेच्या नावाखाली रद्द करता येणार नाही. तेव्हा आंबेडकरांचे नाव आपल्या संघटनेसाठी वापरायचे आणि आंदोलने अशा देशद्रोही लोकांच्या समर्थनार्थ करणे हे योग्य नव्हे.
आज जेटलींनी या दोन्ही मुद्द्यांचा त्यांच्या भाषणात उल्लेख केला तो मी जो प्रतिवाद केला त्या धर्तीवर. माझ्या कमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचताहेत की काय असे वाटले. सरकारच्या चूका व त्यांच्या धोरणातील त्रुटीही दाखवत मी अनेकदा सरकारवर टीकाही करत असतो. तीदेखील त्यांच्याकडे पोहोचू दे अशी (भाबडी) अपेक्षा. या अर्थाने वर उल्लेख केलेले समाधानही असे भाबडेच.