फिनिश लाईन

Submitted by विद्या भुतकर on 10 February, 2016 - 23:46

फिनिश लाईन

आज खूप दिवसांनी पळाले, म्हणजे रनिंग केलं. जवळ जवळ ३-४ महिन्यांनी. मस्त वाटलं.गेल्या वर्षी दोन हाफ मेरेथोन पळाले, एका पाठोपाठ एक. भारी वाटलं होतं. पुढचे १५ दिवस धड चालता येत नव्हतं ही गोष्ट वेगळी पण केलं याचं समाधान होतं. आज सांगायचं कारण म्हणजे, खूप दिवसांनी पळताना मी कसेतरी ४ कि.मी. पार पाडले, चाललेच जवळ जवळ. वाटलं १३ मैल /२१ कि.मी. कसे पार केले असतील मी?
तर हे अंतर पार कसं पाडलं असेल? सर्वात मुख्य म्हणजे सराव होताच. तरीही पळण्याच्या दिवशी, पहिला मैल वेगाने धावल्यावर धाप लागली. मग पुढे ३ मैलपर्यंत जाताना वाट लागली होती.

वाटलं,' झक मारली आणि असले उद्योग केले. '.

'कशाला काय कारण होतं? सुखासुखी घरात बसले असते ना?'

'अजून १० मैल? शक्यच नाही.'

'निदान थोडं कमी अंतर घ्यायचं होतं.'

'अजून एक हाफ मेरेथोन कशाला हवी होती?'

असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारात होते मी. शेवटी मग गाणी ऐकायला सुरु केली. फास्ट गाण्यामुळे थोडा जोर चढला आणि मी पुढचे दोन मैल धावले. तोवर माझ्या डोक्यात गणित चालूच होतं. ५ मैल झालेत. अजून ८ जायचेत. तेव्हढ्यात माझा स्पीड स्थिरावलेला होता. आजू बाजूचे लोक काय करत आहेत ते पाहून मी एकाद्या जोडीच्या मागे रहायला लागले. त्या दोघी गप्पा मारत जात होत्या.
मी मनातल्या मनात,' इथे श्वास घेता येत नाहीये आणि या काल रात्रीच्या गप्पा काय मारत आहेत?'. त्यांच्या मागे मागे मी २ मैल गेले. तोवर माझ्या लक्षात आलं ७ मैल झालेत. मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केलंय. मग मला जोर चढला. ९ मैल पर्यंत पोचल्यावर मात्र दम लागला होता. १०-११ वा मैल मी सर्वात कमी स्पीडने गेले. डोक्यात अनेक विचार होते. आजूबाजूला लोकांच्या नावाचे बोर्ड पकडलेले लोक उभे होते. त्यांचे प्रोत्साहन होतेच. पण डोक्यात आपण या रेस नंतर काय करू याचाही विचार येऊ लागला.
सर्वात लांबचा पल्ला १२ आणि १३ मैलाचा होता. पाय थकले होते पण थांबत नव्हते. आणि जायचे म्हणले तरी जोरात जात नव्हते. गेल्या काही दिवसांची मेहनत, मेडल मिळाल्यावर होणार आनंद , मुलांचे चेहरे हे सर्व आठवून केवळ मनोबळावर ते शेवटचे अंतर पार पाडले. आजूबाजूच्या लोकांचे आवाज, 'Almost there', 'Almost there' कानात घुमत होते. जवळ जवळ ३ तासात मी १३. १ मैल पार केले होते. ते मेडल हातात घेतलं आणि डोळ्यात पाणी आलंच, कितीही नाही म्हटलं तरी.
आता हे रामायण यासाठी कारण रेसच काय आपलं आयुष्यही असंच असतं ना? एक अंतर असलं पाहिजे पार पाडण्यासाठी. जे पाहून, 'छे जमणारच नाही' असं म्हणून बसायला नको किंवा हे इतके कमी करण्यात काय मजा असंही नको. पण ते इतकं दूर हवं की जे पार पाडल्यावर नंतरसुद्धा स्वत:चं आश्चर्य वाटलं पाहिजे, 'अरे हे आपण कसं केलं असेल?' एक उद्देश पाहिजे, त्यासाठी रोज सकाळी उठून सराव केला पाहिजे. एखाद्या पहाटे त्यासाठी झोप सोडून बाहेर पडलं पाहिजे. आणि रेस सुरु झाल्यावर कितीही अशक्य वाटलं तरी पुढे जात राहिलं पाहिजे.
सुरुवातीला वाटतंच अशक्य आहे. त्यासाठी थोडी गाणी लावायची. बाहेरचा आवाज बंद करून आतला ऐकायचा. लागला दम तर आजू बाजूच्या, पुढे जाणाऱ्या लोकांच्या सोबत जायचं. निम्मं अंतर पार केल्यावर इतके आलोय तर पुढेही जाऊच म्हणून जात रहायचं. सर्वात अवघड म्हणजे शेवटचे अंतर असते. आज पर्यंत केलेले सर्व कष्ट, आपले लोक, बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन, हे सगळं घेऊन जोव गोळा करून सर्व शक्तीनिशी पळत जायचं ती फिनिश लाईन येईपर्यंत. मेडल तर मिळतंच पण मागे वळून पाहताना आपण हे केलं याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हे रामायण यासाठी कारण रेसच काय आपलं आयुष्यही असंच असतं ना? एक अंतर असलं पाहिजे पार पाडण्यासाठी. जे पाहून, आपल्यमणारच नाही' असं म्हणून बसायला नको किंवा हे इतके कमी करण्यात काय मजा असंही नको. पण ते इतकं दूर हवं की जे पार पाडल्यावर नंतरसुद्धा स्वत:चं आश्चर्य वाटलं पाहिजे, 'अरे हे आपण कसं केलं असेल?' एक उद्देश पाहिजेत्यासाठी रोज सकाळी उठून सराव केला पाहिजे. एखाद्या पहाटे त्यासाठी झोप सोडून बाहेर पडलं पाहिजे. आणि रेस सुरु झाल्यावर कितीही अशक्य वाटलं तरी पुढे जात राहिलं पाहिजे.
सुरुवातीला वाटतंच अशक्य आहे. त्यासाठी थोडी गाणी लावायची. बाहेरचा आवाज बंद करून आतला ऐकायचा. लागला दम तर आजू बाजूच्या, पुढे जाणाऱ्या लोकांच्या सोबत जायचं. निम्मं अंतर पार केल्यावर इतके आलोय तर पुढेही जाऊच म्हणून जात रहायचं. सर्वात अवघड म्हणजे शेवटचे अंतर असते. आज पर्यंत केलेले सर्व कष्ट, आपले लोक, बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन, हे सगळं घेऊन जोव गोळा करून सर्व शक्तीनिशी पळत जायचं ती फिनिश लाईन येईपर्यंत. मेडल तर मिळतंच पण मागे वळून पाहताना आपण हे केलं याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. >>> प्रत्येक बाबतीत असा काहीतरी दवणीय निष्कर्श का काढायचा? जबरदस्ती आहे का? एखाद्याला अशक्य वाटत असले तर थांबले पाहिजे. आपल्याला नक्की काय हवे आहे तो विचार करून त्यानुसार पेस बदलली पाहिजे जगण्याची.
नैतर हार्ट अ‍ॅटॅक येइल.

विद्या अभिनंदन .... एखादी गोष्ट ठरवली आणि पूर्ण झाली की मिळणारा आनंद काही निराळाच असतो.... पुढील उपक्रमांना शुभेछा.

कमेन्टबद्दल धन्यवाद. आनु, नक्की करुन पहा. मी पण ५ किमी नेच सुरुवात केली होती.

अमा, त्यासाठी सराव पाहिजे, नाहीतर नक्की हार्ट अट्याक येईल.

विद्या.

मस्त! अभिनंदन!

सुरुवातीला वाटतंच अशक्य आहे. त्यासाठी थोडी गाणी लावायची. बाहेरचा आवाज बंद करून आतला ऐकायचा. लागला दम तर आजू बाजूच्या, पुढे जाणाऱ्या लोकांच्या सोबत जायचं. निम्मं अंतर पार केल्यावर इतके आलोय तर पुढेही जाऊच म्हणून जात रहायचं. सर्वात अवघड म्हणजे शेवटचे अंतर असते. आज पर्यंत केलेले सर्व कष्ट, आपले लोक, बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन, हे सगळं घेऊन जोव गोळा करून सर्व शक्तीनिशी पळत जायचं ती फिनिश लाईन येईपर्यंत. मेडल तर मिळतंच पण मागे वळून पाहताना आपण हे केलं याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही>> मस्त!

मस्त लिहिलंय. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

पण ते इतकं दूर हवं की जे पार पाडल्यावर नंतरसुद्धा स्वत:चं आश्चर्य वाटलं पाहिजे, 'अरे हे आपण कसं केलं असेल?' >>> खरंच!

अमा, मला नाही वाटत तो दवणीय निष्कर्ष आहे. त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाचं त्यांच्यापुरतं केलेलं ते एक्स्ट्रॉपोलेशन आहे.

___/\___

क्या बात है!

आधी वाटलं हा एखादा रनिंगचा किस्सा वगैरे असेल, पण तुम्ही तर जिवनाचं तत्वज्ञानच सांगून गेलात!

फार फार आवडलं!!

मस्त लिहिलंय. अभिनंदन. आज एकदम दोन लेख वाचले पळण्यावर.
तर हे अंतर पार कसं पाडलं असेल? सर्वात मुख्य म्हणजे सराव होताच.सातत्य हवे हेच अंतिम सत्य.

Thanks Piu. Happy