पाच चारोळ्या: (रचनाकाल - १३ ऑगस्ट २०१५)
धुक्यातली वाट चालताना
उगाच हातात हात होते
गृहीत धरलेस भाळताना
धुके जणू तहहयात होते
===============
चोरलेले मन परत देशील ना
मन मनाबदल्यातले नेशील ना
सर्व काही संपले सांगायला
एकदा भेटायला येशील ना
=================
आभाळ, चहा आल्याचा, थोडी भुरभुर
खिडकीत उभी होती हृदयाची हुरहुर
नजरेत मिसळली नजर, तशी ती लपली
ह्यापुढील जगणे म्हणजे निव्वळ कुरबुर
=========================
जिथून कोणी कधी न विन्मुख होत परतला
रस्तारुंदीमध्ये गेले कधीच ते घर
अजून रस्ता चुकून कोणी तिथे पोचला
तोही म्हणतो 'इथेच होते ना अपुले घर'
=========================
फार श्वेतांबरपणा करतात ते
जा ढगांना लाव करड्या झालरी
बघ कसे छीथूस घाबरतात ते
बघ कश्या येतील माफीच्या सरी
========================
-'बेफिकीर'!
>> आभाळ, चहा आल्याचा, थोडी
>> आभाळ, चहा आल्याचा, थोडी भुरभुर..खिडकीत उभी होती हृदयाची हुरहुर
नजरेत मिसळली नजर, तशी ती लपली...ह्यापुढील जगणे म्हणजे निव्वळ कुरबुर<<
हाय बेफी, जुन्या आठवणी जाग्या झाल्यात !!!
सगळ्या चारोळ्या मस्त च... चवथी मात्र चटका लावुन जाते.
सुंदरच!!!!!!
सुंदरच!!!!!!