" आयव...." (मंदारमाला वृत्त)
देवाघरी बाप गेला जरीही तरी माय शेतामधे राबली
कंठातुनी हाक बाहेर आली तिने मात्र ओठावरी दाबली
पान्हा उन्हाने कमी होत गेला मला पेज पाण्यासवे पाजली
मातीत रेघा उभ्या मारताना तिची बांगडी ना कधी वाजली...
कष्टांमुळे चामडी जीर्ण झाली शिरी केस झाले जरा पांढरे
बैलापरी ओढले नांगराला भरे कैक वेळा उरी कापरे
फ़ाटून गेल्या जुन्या सर्व चोळ्या नवी मात्र नाही कधी टाचली
नेसायला वेदना घ्यायची ती घरी पातळे चांगली साचली...
पायात काटे खडे टोचलेले मुके होउनी सोबती राहिले
झोळीमधे झोपताना सदा मी तिला राबताना स्वतः पाहिले
दुष्काळ आला तरी रोज पाणी सभोवार डोळ्यातले शेंदले
शेतातली ढेकळे फोडताना तिने फोड टाचेवरी गोंदले...
तापायच्या सावल्याही उन्हाने कपाळावरी घाम गोठायचा
वारा तिच्या नांगराला त्वरेने स्वतः हात लावून लोटायला
शाळेत टाकायचे लेकराला असे रोज वाडीत सांगायची
भिंतीवरी लावल्या देवतांना फ़ुलांची नवी माळ टांगायची...
डोक्यावरी हात ठेवून आई मला रोज खांद्यावरी घ्यायची
तिची सर्व दुःखे मला पाहताना उरातील श्वासांमध्ये जायची
अंधारल्या झोपडीतून आई नभातील बाबास शोधायची
डोळ्यात ओल्या सुखाच्या क्षणांचे खुळे स्वप्न घेऊन झोपायची ...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
कष्टांमुळे चामडी जीर्ण झाली
कष्टांमुळे चामडी जीर्ण झाली शिरी केस झाले जरा पांढरे
बैलापरी ओढले नांगराला भरे कैक वेळा उरी कापरे
फ़ाटून गेल्या जुन्या सर्व चोळ्या नवी मात्र नाही कधी टाचली
नेसायला वेदना घ्यायची ती घरी पातळे चांगली साचली
छान ! अप्रतिम!
धन्यवाद
धन्यवाद