चित्रपटात न मावलेले लोकमान्य - (Movie Review - Lokmanya Ek Yugpurush)

Submitted by रसप on 6 January, 2015 - 02:39

चहा हा 'चहा' समजूनच प्यायला पाहिजे. जर कुणी म्हटलं की, 'साखरेचा पाक समजुन पी' किंवा 'काढा समजुन पी' तर कसं चालेल ? 'सूप' म्हणून 'बाउल'मध्ये काही तरी आणून द्यायचं आणि म्हणायचं की, 'कोशिंबीर समजुन खा' तर कसं चालेल ? तसंच, एक शौकीन माणूस चित्रपट हा 'चित्रपट' म्हणूनच पाहतो. 'हा चरित्रपट आहे, ह्याला वेगळ्या नजरेने पहा.. ह्याचं बजेट कमी आहे, ह्याला सहानुभूतीने पहा..' वगैरे गोष्टी मनावर दगड ठेवायला लावतात, दुसरं काही नाही. कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहतंच, अपूर्ण राहतंच. वेगळ्या नजरेने, सहानुभूतीने पाहूनही मग प्रतिक्रिया सावधच असते. 'कसा होता?' विचारलं की 'बरा होता... ठीकच होता... वाईट नाही.. अगदीच न पाहण्यासारखा नाही' वगैरे अधांतरी विधानं केली जातात.
'लोकमान्य' पाहिल्यावर माझी तरी प्रतिक्रिया अशीच अधांतरी होती.

लोकमान्य टिळक अर्थात बाळ गंगाधर टिळक अर्थात केशव गंगाधर टिळक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. दस्तुरखुद्द महात्मा गांधी ज्यांना गुरुस्थानी मानायचे असे एक तडफदार नेतृत्व. शंभर वर्षांपूर्वी आजच्या सुधारणा सुचवणारा अद्वितीय द्रष्टा माणूस. टिळकांचे आयुष्य किंबहुना कुणाही स्वातंत्र्यसेनानीचे आयुष्य हे एका २-३ तासाच्या कलाकृतीत बांधणं म्हणजे निव्वळ अशक्यच. काही धागे अपरिहार्यपणे सुटे राहणं स्वाभाविकच. पण, जे धागे विणले जातील त्यांची वीण घट्ट असावी, अशी माफक अपेक्षा 'लोकमान्य' पूर्ण करण्यात कमी पडतो.

आजच्या जगातील एक तरुण पत्रकार. असा एक पत्रकार जो आजच्या विकल्या गेलेल्या, धंदेवाईक पत्रकारितेला अंगीकारून 'अपना काम बनता, तो भाड मे जाये जनता' हे सूत्र अवलंबून चाकोरीबद्ध मध्यमवर्गीय जीवन जगतो आहे. ज्याला आसपास होणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचं फारसं सोयर अथवा सुतक नाही. जो उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहुन, खुल्या कानांनी ऐकून रोज रात्री निर्ढावलेल्या शांतपणे झोपी जाऊ शकतो, असा कुणीही एक सामान्य माणूस निवडा, तो आहे ह्या चित्रपटातला तरुण पत्रकार 'मकरंद' (चिन्मय मांडलेकर).
लो. टिळकांच्या आवाजातील एका ध्वनिफितीचे जाहीर श्रवण असलेल्या एका कार्यक्रमाचे 'कव्हरेज' करण्यासाठी त्याला पाठवण्यात येतं आणि ती ध्वनिफीत त्याच्या निद्रिस्त मनाला जागं करते. उत्सुकता वाढीस लागून तो टिळकांविषयीची अजून माहिती मिळविण्यासाठी त्यांच्यावरील लेखन वाचतो आणि त्यांच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडत जातो. 'त्या' काळातील विदारक परिस्थितीशी तो आजच्या परिस्थितीची सांगड घालायला लागतो. तो अधिकाधिक माहिती मिळवत असताना दुसरीकडे टिळकांचा जीवनपट उलगडत जातो.
ह्या अंगाने ही कहाणी उलगडत जाते. थोडासा 'लगे रहो मुन्नाभाई' आणि बराचसा 'रंग दे बसंती' अधूनमधून डोकावतो.

Lokmanya-Ek-Yugpurush-700x315.jpg

चरित्रपट हे नेहमीच दोन व्यक्तींसाठी पाहिली जातात. एक म्हणजे ती व्यक्ती जिच्यावर तो चित्रपट आधारलेला असतो आणि दुसरी व्यक्ती ती जी ती भूमिका साकारत असते. 'लोकमान्य' लोकमान्यांसाठी पाहाणाऱ्या लोकांना निराश करतो कारण दोन अडीच तासांच्या चित्रपटात टिळकांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त भाग दाखवण्याच्या कसरतीत अनेक ठिगळं एकत्र जोडल्यासारखं वाटतं. कुठलाच एकसंध परिणाम साधला जात नाही. अधूनमधून वाटत राहतं की आता पकड घेईल, आता पकड घेईल. पण दुर्दैवाने तसं होतच नाही. दुसरीकडे लोकमान्यांच्या भूमिकेतील सुबोध भावे मात्र छाप सोडून जातो. टिळकांच्या नजरेतील करारी भाव त्याने असा काही दाखवला आहे की त्याला तोडच नाही. एकूणच त्याने चित्रपटभर अंतर्बाह्य टिळक वागवले आहेत. टिळकांची बहुचर्चित वाक्यं त्याने दमदारपणे उद्गत केली आहेत. त्यांचा त्या ठिकाणी, जसा परिणाम साधायला जायला हवा, तसा तो साधला जातो.
खरं तर इतर सर्वच बाजूंत उणा पडलेला हा चित्रपट सर्व्ह कलाकारांच्या सशक्त अभिनयानेच तोलून धरला आहे, असं म्हणता येऊ शकतं. चिन्मय मांडलेकरनेही आपली भूमिका - ती जरी बऱ्याच अंशी अविश्वसनीय वाटली तरी - चोख वठवली आहे. द्विधा, नैराश्य, बंड असा त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रवास पटकथेत खूप बांधीवपणे मांडला नसला, तरीही तो त्याने मात्र चांगला सादर केला आहे.
प्रिया बापटला विशेष काम नसलं, तरी तिचा वावर नेहमीच खूप आल्हाददायक असतोच आणि इथेही आहे.
गोपाल गणेश आगरकर रंगवाणारा समीर विद्वांससुद्धा लक्षात राहतो, तसेच दाजी खरेंच्या भूमिकेतील अंगद म्हसकरनेही संयत अभिनय केला आहे.
सर्व पात्रांची वेशभूषा अभिनयातील अर्धे काम करत असावी, इतकी अचूक जमून आली आहे, त्यासाठी विक्रम गायकवाड (मेक अप) आणि महेश शेरला (वेशभूषा) ह्यांना विशेष दाद द्यायलाच हवी. तरी सावरकर म्हणून जे पात्र निवडलं आहे (१ किंवा २ च ओळी आहेत त्याच्या तोंडी) ते 'पात्र'च वाटलं मला तर. पण ह्याचं छोटंसं डेबिट 'कास्टिंग'ला पडायला हवं.
संगीत लक्षात ठेवण्यायोग्य नाहीच. मुख्य गीत (बहुतेक 'जीवन आपले सार्थ करा') तर 'लगान'च्या 'बार बार हां..' ची सही सही नक्कलच वाटतं.

वैयक्तिक पातळीवर मला ह्या चित्रपटात प्रकर्षाने एक गोष्ट खटकली. युगपुरुष हे 'युगपुरुष' ह्यासाठी नसतात की त्यांच्याव्यतिरिक्त इतर बहुतेक लोक चांगले नसतात. आगरकर, रानडे व (एकाच दृश्यात आलेले) महात्मा गांधी हीसुद्धा महान व्यक्तिमत्वंच होती. लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना ह्या लोकांना छोटे दाखवण्याची आवश्यकता नव्हती. आगरकर-टिळकांत तात्विक मतभेद होते, ह्याचा अर्थ हा नाही की आगरकरांचे हेतू संशयास्पद होते. चित्रपटात ज्याप्रकारे 'सुधारक' व्यक्तींना ब्रिटीशांचे हुजरे म्हणून रंगवले आहे, ते पटलं नाही.
एकाच दृश्यासाठी गांधींना आणून त्यांना झिडकारून जाणारे टिळक दाखवून टिळकांचं मोठेपण सिद्ध होत नाही. त्यापेक्षा त्यांना दाखावलंच नसतं, तरी चाललं असतं. असंही टिळकांचा कॉंग्रेसमधील सहभाग, मोहम्मद अली जीनांशी असलेले चांगले संबंध, एनी बेझंट, होम रूल चळवळ वगैरे अनेक गोष्टींचा तर साधा उल्लेखसुद्धा चित्रपटात नाही.

कदाचित फार जास्त अपेक्षा ठेवून गेलो असीन, पण कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहिलं आहे, अपूर्ण राहिलं आहे. म्हणूनच परदेशात असलेल्या एका मित्राने जेव्हा मला विचारलं -
'कसा आहे रे लोकमान्य? मी मिस केला !'
तेव्हा मी म्हटलं, 'नेव्हर माइंड, तू विशेष असं काही 'मिस' केलेलं नाहीस.'

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/01/movie-review-lokmanya-ek-yugpurus...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल - लाला लजपतरायांविषयी काही माहीती नव्हती आपल्याला..किंवा सरहद्द गांधी अभ्य़ासाला नव्हते. हा आता लचित बरफुकन बद्दल म्हणालास तर ठिकाय पण आमच्यावेळी भारताचे मरुंदे पार बोस्टन टी पार्टी पासून फ्रान्सची कुठलीशी राणी भाकरी नाहीत तर पाव खा इतपर्यंत काय वाट्टेल ते शिकलोय.

चित्रपट परिक्षण आवडलं .जवळपास प्रत्येक मराठी संस्थळावर या चित्रपटाविषयी निगेटीवच सूर दिसतोय .काही' प्रचारक' मात्र लांब लांब वाक्य 'फेकून'' धागे काढतायत.

>>जवळपास प्रत्येक मराठी संस्थळावर या चित्रपटाविषयी निगेटीवच सूर दिसतोय
मराठी माणसाने कधी कोणत्या चांगल्या गोष्टीचे दिलखुलास स्वागत केले आहे काय ? Uhoh

गंभीर चेहरा ठेवून, ह्म्म्म तसा बर झालय काम पण अजुन खुलवता आले असते, इ. इ. Happy

हास्यसम्राटमधे दिपक देशपांडे यांनी पुणेरी माणुस शोलेबद्दल कसा बोलेल हे जे काही दाखवले आहे ते पहाण्यासारखेच आहे Lol

जेव्हा एखाद्या रेषेला लहान दाखवण्याकरीता दुसरी रेषा लांब काढायचा प्रयत्न केला जातो तेव्हाच तो प्रयत्न फसतो. तीची वाढ खुंटते आणि जेव्हा एखादी रेषा स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याकरीता काढली जाते तेव्हा ती दुरपर्यंत वाढत जाते. Happy

ज्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करा म्हणुन आयुष्य वेचले आहे . त्यांच्या धाग्यावर तुम्हाला विदेशी खाद्यपदार्थ आठवतात ? Uhoh
शेवया का आठवत नाही ? Happy

योग्य निरिक्षण आणि योग्य मुद्दा, तात्काळ बदलून टाकला पहा शब्द.
भाषा शुद्धीची सुचना कोणीही केली तरी स्वागतच Happy
अन्य भाषिक शब्द कंसात दिले आहेत.

सर्व शब्दांना स्वदेशी शब्द वापरलेच पाहिजेत असा दुराग्रह नसल्याने मुळ लेखात आलेल्या "बाउल", "बजेट" सारख्या शब्दांना आमचा (किंवा कोणाचाच) विरोध नाही / नसावा. Happy

Lol खरेतर या धाग्यावर कैच्याकै अवांतर होईल, पण यावरून एक किस्सा आठवला, सांगतोच धागाकर्त्याची माफी मागून.

<अवांतर मोड चालू>
चाळीत राहणार्‍या मराठी माणसाकडे दुधवाला भैय्या येतो, तर हा त्याला विचारतो
कम पैसे मे भागता हैं क्या ? भागता हैं ?
यावर भैय्या Uhoh नही साहब हम तो इधरही हैं, कहाँ जायेगा भाग के ?
नही रे तुम्हारे घर मे बिबी है, बच्चे हैं, फिर कैसे भागता हैं ?
बिचारा भैय्या अजुनच Uhoh क्या बात कर रहे हो साहब, उनको छोडके तो भागही नही सकता हूँ कही Uhoh
<अवांतर मोड बंद>

विश्राम बेडेकर यांनी 'टिळक आणि आगरकर' हे नाटक लिहिले आहे. पुस्तक मिळाले तर जरूर वाचा. अतिशय सुंदर आहे. यामधे भक्ती बर्वे आणि श्याम पोंक्षे यांनी काम केले होते. नाटकाची चित्रफीत उपलब्ध नसेल पण पुस्तक उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

गांधीजींवर भारतात एकही षिनेमा निघाला नाही.
>>>

स्वत:च्या मुलाच्या नजरेतून गांधीजी कसे होते हे दाखवणारा गांधी माय फादर हा सिनेमा भारतातच येऊन गेला.
अक्षय खन्ना आणि अबू आझमींची सून होते त्यात.
हा चित्रपट जरी हरिलाल गांधीच्या चरित्रावर आधारलेला होता तरी गांधीजींबरोबरचं त्याचं नातं हा त्यातला फोकस होता.

एका वेगळ्या वेष्टनातुन सादर केलेले, लगे रहो मुन्नाभाय मधले गांधीजी. इट मेड ए गुड इंपॅक्ट आॅन यंग जनरेशन...
>>>>>>>
सहमत आहे. कुठल्याही चरित्रपटापेक्षा हा चित्रपट नेमका संदेश पोहोचवण्यात आणि एका महापुरुषाच्या तत्वांना प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी ठरला. बापू आणि गांधीगिरी हे शब्द आधीपासूनच प्रचलित होते, पण गांधीगिरी म्हणजे दुर्बलता, नाईलाज, मजबूरी का नाम गांधीजी असा अर्थ काढण्यात यायचा. या चित्रपटाने सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शब्दांमागचा नेमका अर्थ उलगडला. शेवटी काय, तर जेव्हा या तत्वांची आजच्या काळात सांगड घालत ती कालबाह्य नाहीयेत हे दाखवले जाते तेव्हाच ती पटतात.

Pages