वेदना सरते कधी का भोगल्याने?
दु:ख हलके होत असते बोलल्याने
एकटेपण हा खरा वनवास असतो
दूरवर नजरेतही मधुमास नसतो
हायसे! संवाद थोडा साधल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने
ना कळे केंव्हा कशा जुळतात तारा
संपतो गुदमर मनाचा कोंडमारा
मोहरे मन पैंजणांच्या वाजण्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने
तेज अंधार्या मनावर गोंदणारी
ज्योत तुझिया आठवांची तेवणारी
भान हरते प्रेमपत्रे चाळल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने
बोलतो स्वप्नांसवे, माझ्यासवेही
अन् अबोला अन् तिच्या रुसव्यासवेही
गाठ सुटते भाव नेत्री दाटल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने
बाळ रडते का? कशाने? माय जाणे
शांत होते माय गाता गोड गाणे
गौण शब्दावाचुनी संवादल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने
देवपूजेतून जुडतो ईश्वराशी
नाळ तुटते जोडलेली नश्वरांशी
मुक्त होतो चार दुर्वा वाहिल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yqhoo.com
छान...
छान...