मी मतदान का करावे?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 29 September, 2014 - 07:31

लेख पाच वर्षांपूर्वीचा असला तरीही विषय आज देखील तितकाच ताजा आणि परिस्थिती अनुरूप असल्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.

*************************

१३ ऑक्टोबर २००९ रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणूकीत विविध समाजसेवी संस्था, पक्ष संघटना, मान्यवरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी तर मतदान न करणाऱ्यांची तीव्र शब्दांत निर्भर्त्सनाच केली आहे. मतदान का करावे या विषयी अनेक मुद्दे मांडण्यात आले. परंतू मतदान न करणारे ते का करत नाहीत या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मीही कधीच मतदान केले नाही व या वेळीही करणार नाहीय. प्रत्येक वेळी माझ्या मतदान न करण्याला संयुक्तिक कारणे होती. परंतू यावेळी मतदान न करणाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात टीका होतेय ते पाहून मी मतदान न करणाऱ्यांपैकीच एक असल्यामुळे मला मतदान न करण्याची कारणे नमूद करावीशी वाटतात. यातील काही कारणे सार्वकालिक आहेत तर काही तत्कालिक.

नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंग पणाची पातळी ओलांडली. जे नेते नेहमीच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला. सतरा पोलिसाचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही. विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने ते परिस्थितीमुळे नक्षलवादी झाले आहेत. असे वक्तव्य करून पंतप्रधानांना काय सूचित करायचे आहे? ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा साऱ्यांनीच शस्त्रे हाती घ्यावी म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल. शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय? पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आले तर केंद्राकडून भरघोस मदत दिली जाईल. (वाचा लोकसत्ता दिनांक १२ ऑक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी) म्हणजे मतदारांनी दुसऱ्या पक्षाला मत देऊन निवडून आणले तर केंद्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार काय? आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजूला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॅकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे आहे काय?

मतदान करणारे मोठ्या अभिमानाने आपण नुसते मतदान केले म्हणजे फार मोठे नैतिक कर्तव्य केल्याचा आव आणतात. पण मतदान कोणाला आणि का करावे हे पटल्याशिवाय केलेल्या मतदानाला काय अर्थ आहे? या दृष्टीने उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षांची भूमिका या बाबी मतदान करणाऱ्यांपैकी किती जण तपासून पाहतात? मी या गोष्टींचा अभ्यास केला आहे. त्यात प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्ची घातला आहे आणि मगच मतदान न करण्याची माझी भूमिका मी निश्चित केली आहे. ‘मी मराठी’ वाहिनीवर परवाच पाहिलेल्या एका चर्चेमुळे तर ही भूमिका अधिकच पक्की झाली. या चर्चेत रिडालोस चे अबू आझमी, काँग्रेस तर्फे विजय कलंत्री, मनसे च्या वतीने शालिनी ठाकरे, शिवसेने कडून दिवाकर रावते तर भाजपाचे विनोद तावडे यांनी भाग घेतला होता. अबू आझमी यांना मराठी अजिबात समजत नव्हते त्यांमुळे त्यांच्याकरिता प्रश्नोत्तरांचा पुन्हा हिंदीत अनुवाद होत होता. विजय कलंत्रींना मराठी कळत होते पण बोलताना धाप लागत होती त्यांमुळे ते दोन वाक्यं मराठी तर चार वाक्य हिंदी बोलत होते. त्यांना मनसे असेही नीट म्हणता येत नव्हते ते सारखे मनसा असा उच्चार करीत होते. ठाकरे आडनाव लावणाऱ्या मनसेच्या शालिनी यांचे मराठी बोलणे आश्चर्यकारकरीत्या अतिशय वाईट होते. त्यांचा गृहपाठही व्यवस्थित झालेला नव्हता. त्या शक्य तितके कमीच बोलत राहून आपल्या अज्ञानावर पांघरूण घालत होत्या. शेवटी एका श्रोत्याच्या प्रश्नाने हे पांघरूण दूर झालेच. त्याने विचारले की मनसे उत्तर भारतीय व बिहारींना मुंबईतून हाकलायच्या गोष्टी करते मग बांग्लादेशीय घुसखोरांविषयी मनसेची भूमिका काय? यावर शालिनी ठाकरेंनी उत्तर भारतीय, बिहारी व बांग्लादेशीय घुसखोर या सगळ्याविषयी पक्षाची सारखीच भूमिका असल्याचे सांगितले. या त्यांच्या उत्तरामुळे त्या फारच अडचणीत आल्या कारण अबू आझमींनी त्यांना विचारले की देशाचे नागरिक असणारे उत्तर भारतीय, बिहारी व घुसखोरी करणारे परकीय बांग्लादेशीय यांना एकाच तराजूत तोलणे योग्य आहे काय? पुढे ते शालिनी ठाकऱ्यांना म्हणाले,"मॅडम आपको तो ऐसा कहते हुए शर्म आनी चाहिए क्योंकि आपका तो परिवार उत्तर भारत से आकर यहां बसा हुआ है।". यावर शालिनी ठाकरेंनी मौनच बाळगले. दिवाकर रावते व विनोद तावडेंचे मराठी वर चांगले प्रभुत्व दिसून आले त्याचप्रमाणे त्यांचा अभ्यासही चांगला होता. पण त्यांची आक्रमकता टोकाची होती. त्यांनी चर्चेचे सूत्रसंचालन करणाऱ्या राजू परुळेकरांनाच दलाल म्हणून संबोधले. विनोद तावडेंचे हातवारे करणे इतके अंगावर येत होते की एकदा तर रावतेंनीच त्यांचा हात झटकून बाजूला केला.

याशिवाय मी प्रमुख नेत्यांच्या मुलाखती वृत्तपत्रांत वाचल्या तसेच दूरचित्रवाणीवरही पाहिल्या. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार या तिघांचा अभ्यास चांगला आहे आणि संभाषणकौशल्यही वादातीत आहे. अजित पवार तर मुलाखतीत म्हणाले की आपण स्वतःचा मतदारसंघ असणाऱ्या बारामतीत आता शेवटचे दोन दिवस प्रचार करणार आहोत. आपण निवडून येणार की नाही ते सांगू शकत नाही. मतदारांना गृहीत न धरण्याची ही आदर्श विनम्रता माझ्या मनाला फारच भावली. ते माझ्या मतदारसंघात उभे असते तर मी निश्चितच त्यांना मतदान केले असते पण त्यांच्या आघाडीने आमच्या मतदारसंघात दिलेले उमेदवार सरळसरळ आपण अमुक इतक्या मताधिक्याने निवडून येऊ असे सांगतात तेव्हा त्यांना मत देण्याची इच्छाच होत नाही. तीच गोष्ट राज व उद्धव ठाकरे यांची. यांनी दिलेल्या उमेदवारांना शुद्ध मराठी सुद्धा बोलता येत नाही मग सामाजिक जाणिवांचा अभ्यास ही फारच दूरची गोष्ट. फक्त नेत्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांच्या मठ्ठ उमेदवारांना मत कसे काय द्यायचे? रिडालोसची याच्या अगदी उलट परिस्थिती. त्यांचे स्थानिक उमेदवार चांगले अभ्यासू, लोकांच्या समस्यांची जाण असणारे व उच्चशिक्षितही आहेत. तरीही,त्यांना मत देण्याचा विचार फारच जाणीवपूर्वक बाजूला सारावा लागतो कारण त्यांना मत देणे म्हणजे पुढे सत्तेचे कोलीत आयतेच रामदास आठवले व अबू आझमी अशा असमंजस व आक्रस्ताळ्या नेत्यांच्या हाती देणे.

याशिवाय अनेक लहान पक्षांचे तसेच काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांच्याविषयी मला काहीच ठाऊक नाही. काही नावे तर चक्क मतदानकेन्द्रात गेल्यावरच कळतील कारण हे आमच्याकडे प्रचारालाही फिरकले नाहीत. यांनी यापूर्वी काही समाजकार्य केले असल्यास त्याचा तपशील कळणे ही तर फारच दूरची गोष्ट. तसेही विधानसभेच्या मतदारसंघाचा पसारा फारच मोठा असल्याने उमेदवाराला मतदार व्यक्तिगत पातळीवर ओळखत असण्याची शक्यता फारच कमी असते. महापालिकेच्या निवडणूकीत ही शक्यता तुलनेने जास्त असते. तरीही मी महापालिकेच्या निवडणूकीलाही मतदान केले नाही कारण मी आमच्याच नव्हे तर शेजारच्या मतदारसंघातील उमेदवारालाही चांगलाच ओळखून होतो. आमच्या मतदारसंघात पात्र उमेदवार तेव्हा फक्त राष्ट्रवादी पक्षाने दिला होता व ते म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवडचे माजी महापौर माननीय श्री. आर. एस. कुमार. अतिशय सुविद्य व सुशील व्यक्ती. नागरिकांची कामे करण्यात तत्पर आणि अतिशय विनम्र.

परंतू त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाने शेजारच्या मतदारसंघात जावेद शेख या कुख्यात गुंडाला उमेदवारी दिली. या शेख महाशयांनी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंदुकीच्या धाकावर उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले व स्वतः बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या एका मतदारसंघात राष्ट्रवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याचा हातच कापून टाकला. अशा पक्षाला (त्यांचा आमच्या मतदारसंघातील उमेदवार चांगला असूनही) मतदान करून त्यांचे बळ वाढविण्यापेक्षा मी मतदान न करणेच पसंत केले.

याशिवाय मतदानाबाबत गोंधळ निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारांची बंडखोरी. काँग्रेस हा धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारा पारंपरिक पक्ष, तर हे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करतात असे म्हणत प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा शिवसेना हा पक्ष. गंभीर बाब म्हणजे शिवसेनेने तिकीट नाकारले म्हणून उमेदवार थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आणि तिकीट मिळवून निवडणूक लढतो ही थट्टा मतदारांची की लोकशाहीची? म्हणजे एकदम १८० अंशातच हा उमेदवार फिरला. याची धोरणे इतकी लवचीक कशी? की याला सत्तेशिवाय कधी काही धोरण नव्हतेच?

यापुढची महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांच्या पात्रतेत फारसा फरक नसणे. दुकानदाराने काळ्या रंगाचा शर्ट आपल्याला दाखवला आणि आता समजा आपल्याला काळा रंग आवडतच नाही म्हणून आपण त्याला दुसरा शर्ट दाखवायला सांगितले. हा दुसरा शर्टही काळाच फक्त त्यावर मधून मधून अगदी थोडे पांढरे ठिपके आहात. हाही आपल्याला आवडला नाही कारण आपला आवडता रंग पांढरा आहे आणि कहर म्हणजे दुकानदाराकडील साऱ्या शर्टांना काळ्या रंगाच्याच छटा आहेत अशा वेळी आपल्याला निवड करण्यात काही स्वारस्य राहील का? शेवटी दुकानदाराला आपण त्याच्याच आवडीचा कुठलाही एक शर्ट बांधून द्यायला सांगू. नेमके हेच कारण लोकांचा मतदानातला रस संपायला कारणीभूत आहे. कोणीही सत्तेवर आला तरी स्वतःच्या तुंबड्या भरणारच याची उमेदवारांपेक्षाही जनतेलाच जास्त खात्री आहे. कोण किती रकमेचा अपहार करणार या आकड्यांमध्ये काळ्या रंगाच्या विविध छटांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म फरकापेक्षाही कमी फरक आहे. अर्थात एखाद्या मतदारसंघात जावेद शेखसारखा गुंड आणि त्याच्या विरोधात एखादा निःस्पृह समाजसेवक उभा असेल तर कदाचित तेथील १०० टक्के मतदारही मतदान करतील. परंतू असे गुंड बहुतांश वेळा बिनविरोध अथवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन देखील निवडून येतात हेही जनतेच्या आता पचनी पडले आहे.

तसेच निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरोखरच प्रभावीपणे काही करू शकतात की नोकरशाही पुढे झुकतात हाही एक संशोधनाचाच विषय आहे. सरकार पाच वर्षे अथवा त्याहून कमी काळ टिकते नोकरशाही चिवट असून सहजी बदलत नाही. कित्येक अधिकारी तर मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. त्यांमुळे कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी जनतेला फारसा फरक पडत नाही.

निवडून दिलेल्या प्रतिनिधीने आपली कितीही निराशा केली तरी आपण त्याला पुढच्या निवडणूकीपर्यंत बदलू शकत नाही ही लोकशाहीची अजून एक मोठी शोकांतिका. साधे घरातल्या नोकराचे काम पसंत पडले नाही तर त्याला आपण एक महिन्याची आगाऊ सूचना अथवा पगार देऊन नोकरीवरून काढू शकतो पण शासनात इतकी मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी नेमलेला उमेदवार समाधानकारक काम करत नसला तरी सहन करावा लागतो.

ही आणि अशी अजूनही अनेक कारणे आहेत ज्यामूळे मी मतदान का करावे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो. बुद्धिवादी माणसांना असे प्रश्न पडत नाहीत. ते म्हणतात ‘त्यातल्या त्यात’ बऱ्या उमेदवाराला मत द्या. आता जर वर्गात सारे पस्तीस टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे असतील तर ‘त्यातल्या त्यात’ कुणाला उत्तीर्ण करणार? सैन्यातील कठोर पात्रता पूर्ण करणारे फारच कमी उमेदवार मिळतात त्यामुळेच सैन्यात अनेक जागा रिक्त आहेत, पण म्हणून पात्रतेचे निकष शिथिल करून कुणाही ‘त्यातल्या त्यात’ बऱ्याला सैन्यात भरती करीत नाहीत. तेव्हा शेवटी मी इतकेच म्हणेन,
‘मेरे ख्वाबोमें जो नेता है, वो सचमुच हो नही सकता।
किसी औरको मै नेता चुन लु..................... ये हो नही सकता।।

टीप : काही अक्षरांचे रूपांतर व्यवस्थित न होऊ शकल्याने मजकुरात काही किरकोळ दोष आहेत. तरी मूळ मजकुराकरिता गुगल पानांचा दुवा येथे देत आहे.

https://docs.google.com/file/d/0B9-2hmnBdOPQOTkwYzBkZWMtMDhjZi00NDc5LWIy...

त्यानंतर या लेखाला प्रतिसाद म्हणून माझा मित्र श्री. मंदार मोडक याचे आलेले उत्तर त्याच्याच शब्दांत -
माझा मित्र मंदार याची माझ्या लेखावरील प्रतिक्रिया:-

date21 October 2009 13:23
subjectमी मतदान का केले?

प्रित मित्र
चेतन यास,

तुझा 'मी मतदान का करावे?' हा चिंतनशील लेख वाचला. खूप चांगला लेख आहे. आपल्या सर्वांची
हीच समस्या आहे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. राजेशाही नाही म्हणून लोकशाही आहे असे
म्हणायचे दुसरे काय? लोकशाही मध्ये उमेदवार उभे राहणार , त्यापैकी वैयक्तिक पातळीवर बरावाईट कोण
तो ठरवून किंवा चांगला पक्ष बघून मतदान करणे भाग आहे.

पण चेतन तू नकाराधिकार तर नक्कीच वापरू शकतोस ना? मतदानास न जाता तू एकप्रकारे बोगस
मतदानासाठी जागा ठेवतो आहेस असे नाही का वाटत? आपले नाव त्या यादी मधून खोडले गेले
पाहिजे.

पूर्वीच्या कागदी मतदान पत्रिकांमुळे मत बाद करता यायचे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे येण्याआधी आणि
आता काय फरक झाला आहे ते पहा.

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमुळे हजारो टन कागद वाचला. मतमोजणीला लागणारा वेळ वाचला. निकाल
झटपट लागू लागले. एकही मत बाद न होता १००% मते वैध ठरू लागली.अनेक देश भारतातील
इव्हीएम प्रमाणे मतदान घेण्याचे ठरवू लागले. हे सर्व ठीक.खूपच स्वागतार्ह.

पण मतदाराला एकही उमेदवार आवडत नसेल तर? मतपत्रिकेने मतदान करताना नकाराधिकाराची
अप्रत्यक्ष संधी होती. चुकीच्या ठिकाणी किंवा एकापेक्षा जास्त जागी शिक्का मारून मत बाद केले की
झाले. आपले नाव खोडले गेल्याशी मतलब म्हणजे किमान आपल्या नावावर कोणी बोगस मतदान तरी
करणार नाही याची खात्री.पण यातही हे नकाराधिकारातून मुद्दामहून बाद केलेले मत की चुकून बाद
झालेले मत हे ठरवता येत नव्हतेच. ही सर्व मते बाद मतां मध्ये गणली जात.

पुढे इव्हीएम आल्यावर ही 'सोय' बंद झाली. मग नकाराधिकारासाठी विशिष्ट फॉर्म भरून देता येईल
असे पेपर मध्ये आले होते. मी मागील विधानसभा निवडणूकीत हा पर्याय वापरला होता. आमच्या इथे
अवघे ४ उमेदवार होते. मला कोणालाच मत द्यायचे नव्हते. तेथील अधिकाऱ्यांना व्हिटो राईट बद्दल
सांगितले असता त्यांनी त्याबद्दल अनभिज्ञता दाखवली. शेवटी म. टा. चे कात्रण दाखवल्यावर त्यांच्या
डोक्यात प्रकाश पडला. मग एका कॉलममध्ये त्यांनी कोणालाही मतदान केले नाही असे लिहून घेऊन
सही घेतली. बोटाला शाई लावली. नावावर काट मारली. पण या सर्व प्रकारात माझे मत गुप्त राहिले
का? तर नाही. मी कोणालाच मत दिले नाही ही बाब उघड झाली. मग गुप्त मतदान पद्धतीला काय
अर्थ राहिला? म्हणूनच अनेक संघटना नकाराधिकाराचे बटण मशीनवरच हवे म्हणून मागणी करत आहेत
व अशा मतांचीही मोजणी व्हावी असा त्यांचा आग्रह आहे.

वर वर पाहता हे चुकीचे वाटेल. थोडा अभ्यास करून त्यातल्या त्यात चांगला उमेदवार निवडावा असेही
सांगितले जाते. पण हे प्रत्येक वेळी शक्य नसते. उमेदवाराची माहिती मिळवण्यास वेळ असतोच असे
नाही. कधीकधी ही माहिती दिशाभूल करणारी असू शकते. अनेक उमेदवारांच्या नावावर पोलिस केस सुरू
आहेत. या केसेस कोणत्या गुन्ह्याखाली सुरू आहेत हे ही कळू शकते. पण कोणत्यातरी चांगल्या
आंदोलनासाठी तुरुंगात गेलेल्या उमेदवारांच्या नावावरही क्रिमिनल रेकॉर्ड दिसते. हे चुकीचे नाही का?
अग्नी संस्थेने मतदारसंघ निहाय सर्व उमेदवारांची अशी यादी बनवून प्रसिद्ध केली आहे. यात त्या
उमेदवाराचा पक्ष वय, शिक्षण,एकूण मालमत्ता,त्या भागाचा रहिवासी आहे की नाही,पॅन क्र. दिला आहे
की नाही,कन्व्हिक्शनस,पेण्डींग केसेस अशी यादी दिली आहे.

ही साईट पहा

http://www.myneta.info/

मुख्य पक्षांचे उमेदवार सोडल्यास (कदाचित तेही नाहीत) आपल्या मतदारसंघात कोणकोणते उमेदवार उभे
आहेत हे मतदान केंद्रावर गेल्यावर तेथे बाहेर लावलेली enlarged मतपत्रिका पाहूनच कळायचे.
अग्नीच यादीमुळे ही नावे घरबसल्या कळू शकतात. काही असो..मतदान हे पवित्र कर्तव्य आहे असे
मानले चुकीच्या उमेदवाराला मत देऊन पाप केले आहे असे वाटू नये म्हणून हा नकाराधिकारावरील ई-
पत्र प्रपंच होता.

पण आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. आणि उद्या 'निकाल' लागणार आहे. पाहूया घोडामैदान
जवळ आहे. मला तरी वाटते की सध्याचेच आघाडी सरकार परत सत्तेत येईल.

- मंदार.
मंदारच्या पत्राला मी दिलेले प्रत्युत्तर -
मंदारला माझे उत्तर
21 October 2009 14:51
परम मित्र मंदार,

तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुझ्या ई-पत्रातील ’घोडा मैदान जवळ आहे’ या वाक्याने घोड्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले त्यामुळे मी या वाक्याऐवजी ’डुक्कर - उकिरडा जवळ आहे’ अशी मनातल्या मनात सुधारणा करून वाचले. असो.
खाली आजच्या लोकसत्तेतील अग्रलेख दिला आहे तो काळजी पूर्वक वाच. त्यांचे शेवटचे वाक्य "सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे." अतिशय बोलके आहे. माझ्या मतदारसंघात कोणीच उमेदवार / पक्ष लायक नव्हता (मी लेखात लिहिल्याप्रमाणे ज्या पक्षाचे नेते चांगले आहेत उदा. अजित पवार त्यांचे उमेदवार चांगले नव्हते तर चांगल्या उच्चशिक्षित उमेदवारांनी रिडालोस मध्ये सामील होऊन स्वत:ला अबू आझमी व रामदास आठवल्यांसारख्या दिशाहीन नेत्यांच्या दावणीला बांधले होते. असो.)
आता सगळेच उमेदवार इतके नालायक असल्यावर खरे मतदान होवो अथवा बोगस मतदान निवडून येणार यांच्यापैकीच एक. मग या बोगस मतदानाचा बाऊ कशाला करायचा? आणि जर खरेच इतके बोगस मतदान होते तर दर निवडणूकीत ६० टक्क्यांच्या आसपासच मतदान झालेले दिसते ते का? बोगस मतदान झाले तर १०० टक्के नाही तरी निदान ८० ते ८५ टक्क्यांचा आकडा दिसायला हवा. असो. मला वाटते मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.

माझ्या मते सरकार कुणाचे येते ते महत्त्वाचे नाही (कारण सार्‍यांची नियत आणि कुवत सारखीच). आपण त्यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडणे आणि त्यांचा पाठपुरावा (Follow-Up) करणे महत्त्वाचे. पाच वर्षांपूर्वी आपण अशाच आपल्या मागण्या लोकसत्तेमार्फत मांडल्या आणि आपल्याला माननीय मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुखांबरोबर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी चर्चेची संधी मिळाली. आपली ओळखही त्या निमित्तानेच झाली. (आठवण ताजी करण्यासाठी त्या प्रसंगी काढलेले प्रकाशालेख (Photograph चा खरा मराठी अनुवाद) पाठवीत आहे).

https://picasaweb.google.com/102676953318994666706/hMXfXK?noredirect=1#5...

आताही तू म्हणतोस तसे आघाडीचेच सरकार आले आणि पुन्हा विलासरावच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले तर लोकसत्तेने आपल्याला पुन्हा एकवार चर्चेची संधी द्यायला हवी. पूर्वीच्या मागण्या कितपत पूर्ण झाल्यात याचाही ऊहापोह करता येईल. तू मुंबईतच राहतोस तेव्हा शक्य असल्यास कुमार केतकरांची भेट घेऊन ही मागणी करावीस असे मला वाटते. माझ्या आठवणी प्रमाणे तू तेव्हा चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक लिहून घेतले होतेस तेही केतकरांना देऊ शकतोस. मला वाटते सारे जण अत्यंत आनंदाने पुन्हा सामील होऊ शकतील.

वर उल्लेखित लोकसत्ता मधला अग्रलेख

तीन कोटींचा तमाशा!

बुधवार, २१ ऑक्टोबर २००९

येत्या एक-दीड दिवसात महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. विधानसभेवर निवडून येण्यासाठी इरेला पडलेल्या उमेदवारांनी पैशांची केलेली उधळपट्टी ही शरमेने मान खाली जावी, अशी आहे. एकेका मतदारसंघात किमान तीन तीन कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. या हिशेबाने २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण किती पैसे उडवण्यात आले, याचे त्रराशिक मांडले तर तीन हजार कोटींहून अधिक रुपये या तमाशात उधळले गेले आहेत, असे लक्षात येईल. सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे हे पैसे खर्च झाले, ही वस्तुस्थिती आहे. वाईट याचे वाटते, की या पैशात यंदा मोठ्या प्रमाणात बहुतेक लहानमोठ्या प्रसारमाध्यमांनी अत्यंत घृणास्पद अशी भूमिका बजावली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले तर या भ्रष्ट ‘पॅकेजीकरणा’च्या लाटेवर अनेकजण स्वार झाले होते. अनेक ‘मीडिया’ घराण्यांचे मालक, चालक पैशाच्या अशा व्यवहारात आघाडीवर होते, ही वस्तुस्थिती आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक निधीचा एकतृतीयांशहून अधिक हिस्सा प्रसारमाध्यमांना पुरस्कृत करण्यासाठी राखून ठेवला होता, असे म्हणतात. एकाच वेळी दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून पैसे घेतले गेले आणि तिथेही ‘त्यांनी इतके दिले, तुम्ही किती देणार’, अशी सौदेबाजी केली गेली. काही मालक स्वत:च पैसे आणायला बाहेरगावी जात होते अशी उघड चर्चा होती. प्रश्न उमेदवाराने राजकीय आखाड्यात उभे राहून स्वत:ची बोली लावण्याचा होता, ती ते लावत होते. वीस-पंचवीस लाखांच्या आतबाहेर प्रत्येकाचा ‘मीडिया’शी स्वतंत्र व्यवहार ठरत असे, असे सांगितले गेले. अशी ही विक्रीव्यवस्था एकाचवेळी चौघांशी झाल्यास ‘मीडिया’चे ‘पॅकेज’ कोणत्या स्तरावर जात असेल, याचा विचार न करणे उत्तम! अमेरिकेत काही काळापूर्वी ‘चेक-बुक जर्नालिझम’ कुविख्यात होते, पण इथे त्याने ‘आज रोख उद्या उधार’ या तत्त्वाचा डाव मांडला. पत्रकारितेतही पूर्वी काही थोड्यांना दारू पाजली की पुढे सर्व काम सुरळीत होत असे, असे म्हटले जाई. आता हे सर्व ‘ट्रेड इन कॅश’ पातळीवर पोहोचले आहे. तुमच्यासंबंधात गैर न छापण्यासाठी अमुक इतके, चांगले छापण्यासाठी अमुक इतके आणि प्रतिस्पध्र्याची अडचण करून ठेवणारी बातमी छापायचे अमुक इतके, असा हा सारा व्यवहार! काही पत्रकारांनाही त्यासाठी कामाला लावण्यात आले होते आणि त्यांनीही ही ‘कामगिरी’ बिनबोभाटपणे पार पाडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अशा पद्धतीचे व्यवहार झाले, परंतु तेव्हा मतदारसंघ ४८ आणि महत्त्वाच्या उमेदवारांचे प्रमाण त्या मानाने कमी. या खेपेला २८८ मतदारसंघ आणि त्या प्रत्येकाची परिणामकारकता जास्त. स्वाभाविकच ज्यांना निवडून यायचे आहे, अशांनी हा दौलतजादा केला असेल तर नवल नाही. या संतापजनक बाबीची बाजारात चविष्टपणे चर्चा होत असली तरी संबंधित माध्यमांच्या मालक, चालक, पालक यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. ‘पेज थ्री’ संस्कृतीचे हे विकृतीकरण नसानसात भिनल्याचे पाहायला मिळावे, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते? काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पैसे कसे उधळले, याच्या सुरस आणि रंजक कथा अजूनही कानावर येत आहेत. काही मतदारसंघांत स्वयंचलित दुचाकी वाहनांपासून मोटारीपर्यंत अनेक गोष्टींचे वाटप झाले. पुणे शहराचा लौकिक असा, की या शहरातले विद्वान खिशात भजी ठेवून रस्त्याने जाताना वाचन करायचे. आता कुणालाच वाचन करायचे नसल्याने, त्यांच्या खिशात भलत्याच गोष्टी निघतात. खिशात अंगठ्या बाळगणाऱ्यांनी त्या मतदाराच्या बोटात सरकवल्याची सध्या चर्चा केली जात आहे. कोंकणातल्या एका मतदारसंघात एका उमेदवाराच्या जीपमध्ये अगदी अलीकडे एक कोटी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ती जीप चौकशीसाठी ताब्यात घेतली. या जीपमध्ये एक हजार रुपयांच्या शंभर नोटांचे एक बंडल, अशी शंभर बंडले मिळाल्याची चर्चा आहे. गंमत अशी, की ही जीप जेव्हा जवळच्या पंपावर नेण्यात आली, तेव्हा या जीपमध्ये मतदारांना वाटण्यासाठी ५० साड्या असल्याचे ‘निष्पन्न’ झाले आणि गुन्हा दाखल झाला. आता त्या एक कोटीचे काय झाले, याची खुमासदार माहिती चर्चेचा विषय बनली आहे. या हजार रुपयांच्या नोटा तरी खऱ्या का, असे विचारले जात आहे. याचे कारण असे, की महाराष्ट्रातल्या एका शहरात वाटण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. अशा बनावट नोटा चलनात आणायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना शिक्षा अपरिहार्य आहे. ज्याने हे पैसे वाटण्यासाठी दिले, तो कदाचित आता म्हणेल, की मी जेव्हा हे पैसे दिले तेव्हा ते खरे होते, नंतर त्यांचे काय झाले, ते मी कसे सांगणार? सुरस आणि चमत्कारिक अशा या कथांची मालिकाच निवडणुकीत पाहायला मिळाली. महानगरांमधील मध्यमवर्गीय वसाहतींनी आपल्या इमारती रंगवून घेतल्या, तर काहींनी आपल्या वसाहतींना पाण्याच्या मोठ्या नळांचे कनेक्शन जोडून घेतले. काही डोकेबाज व्यवस्थापकांनी आपल्या वसाहतींच्या सर्व केबलजोडची दोन वर्षांची वर्गणी उमेदवाराला भरायला सांगितली आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीने पैसे भरल्याची पावती जेव्हा त्या वसाहतीच्या अध्यक्षांना दाखवली, तेव्हाच त्यांनी संबंधित उमेदवाराला मत द्यायचा फतवा आपल्या सभासदांना उद्देशून काढला, असेही म्हणतात. पूर्वी झोपडपट्ट्यांमध्ये साड्या वाटल्याचे आरोप करणाऱ्या तथाकथित सुशिक्षितांनी या वेळी अशा व्यवहारांमध्ये खुलेआम स्वत:ला झोकून दिले होते. मतदारांना वश करण्यासाठी उमेदवारांकडून कोणकोणते डावपेच लढवले गेले, हे ऐकताना एखाद्याची मती खरोखरच गुंग होऊन जाईल. प्रश्न, कुणी काय घेतले किंवा कुणी काय दिले, यापेक्षा या सगळ्यांकडे एवढे पैसे आले कुठून, हा आहे. या उमेदवारांपैकी कदाचित फारच थोडे गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असू शकतात, फारच थोड्यांचे काळे धंदे असू शकतील, त्यापैकी फारच थोडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बाळगणारे असू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जाऊनही निवडणूक आयोगाचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, हा जसा एक भाग आहे, तसा प्राप्तिकर खात्याची मंडळी या काळात डोळ्यांवर पट्ट्या बांधून स्वस्थचित्त का होती, असा दुसरा प्रश्न आहे. यापैकी काही उमेदवारांची स्विस बँकेत खाती आहेत किंवा काय, याची माहिती तपासण्याची गरज आहे. ज्यांची स्विस बँकेत खाती आहेत, अशांपैकी कुणीतरी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला मदत करायला पुढे आले असण्याची शक्यता आहे. हा उमेदवार निवडून आला, की त्याला दामदुपटीने परतफेड करायला लावायचाही संबंधितांचा डाव असू शकतो. या उमेदवारांपैकी फारच थोड्यांनी कर्ज काढून निवडणुकीची ही दिवाळी साजरी केली असण्याची शक्यता आहे. कोणतीही बँक उद्योगधंद्यासाठी जसे कर्ज द्यायला तयार होते, तशी ती निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे म्हणून कर्ज द्यायला तयार होत नाही. निवडणूक आयोगाने पैसा खर्च करायची जी मर्यादा ठरवून दिली ती यातल्या प्रत्येकाने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ओलांडली असण्याची शक्यता आहे. तरीही निवडणूक आयोग मत व्यक्त करेल, असे नाही. स्विस बँकेने परवाच, आपण भारताला सर्व खातेदारांची नावे द्यायला तयार आहोत, असे जाहीर केले आहे. तसे घडले तर ज्या भारतीयांचे स्विस बँकेत पैसे आहेत, त्यांची पाचावर धारण बसणार आहे. भारतीयांचे ७० हजार कोटी रुपये स्विस बँकेत आहेत, त्यात यांच्यापैकी कुणी नसेल, अशी शक्यता नाही. शेवटी कुणाच्या तरी वारेमाप पैशाच्या जिवावरच हा सगळा मस्तवालपणा केला गेला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी खर्च केलेले पैसे, उतरल्यानंतरचे पैसे आणि निवडून येताच मंत्रिपद लाभावे म्हणून खर्च होणारे पैसे, असे तीन प्रकार सध्या चर्चेत आहेत. त्यात आता सट्टेबाजाराचीही भर पडली आहे. निवडणुकीच्या रिंगणात या खेपेला बरेच कोट्यधीश उभे होते, त्याचाही हा परिणाम आहे. सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख, मुद्देसूद आणि अभ्यास जाणवणारा.

सारेच मुद्दे अर्थातच पटले असेही म्हणू शकणार नाही, कारण मुळात मतदान कुठल्याही परीस्थितीत करावेच या मताचा मी स्वता आहे.

एक पटकन खटले ते नमूद करतो.

>>>>>> ते म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवडचे माजी महापौर माननीय श्री. आर. एस. कुमार. अतिशय सुविद्य व सुशील व्यक्ती. नागरिकांची कामे करण्यात तत्पर आणि अतिशय विनम्र.
परंतू त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाने शेजारच्या मतदारसंघात जावेद शेख या कुख्यात गुंडाला उमेदवारी दिली. >>>>>>

हे लॉजिक मला फारच चुकीचे वाटले.
त्या पक्षाने शेजारच्या मतदार संघात अयोग्य उमेदवार दिला म्हणून आपण आपल्या येथील योग्य उमेदवाराला नाकारले. असे जरूरी नाही की आपला एक उमेदवार निवडून आल्याने सत्ताही त्यांचीच येईल. वा आपला एक उमेदवार न आल्याने नेमके एक सीट कमी पडून त्यांना सत्ता मिळणार नाही. कोणतीही केस पाहता आपण एक योग्य उमेदवार नाकारलात हाच निष्कर्ष निघतो.

ह्या वेळी विधानसभा निवडणुकांसाठी BJP ने सगळ्या party change करून आलेल्या कॉंग्रेस , राष्ट्रवादीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे . हा तर मतदारांचा विश्वासघात आहे ना

नाही जो पर्यंत त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही तो पर्यंत ते स्वच्छच आहेत आणि श्री फडणीसांनी सांगितलेच आहे लंका उधवस्त करण्याकरिता बिभिषण यांची गरज लागते. थोडे धीर धरा राजकारणात बर्याच गोष्टी सुरुवातीला चुकिच्या दिसतात परंतु नंतर त्या बरोबर ठरतात
नमो नमः

<अजित पवार तर मुलाखतीत म्हणाले की आपण स्वतःचा मतदारसंघ असणाऱ्या बारामतीत आता शेवटचे दोन दिवस प्रचार करणार आहोत. आपण निवडून येणार की नाही ते सांगू शकत नाही. मतदारांना गृहीत न धरण्याची ही आदर्श विनम्रता माझ्या मनाला फारच भावली.>

पाच वर्षांनंतर काय मत आहे विनम्रतेबद्दल?

ऋन्मेऽऽष

<< ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव. >>

या नावाचा धागा आपण प्रकाशित केला आहे. राजकारण या शब्दाचा अर्थ आहे राजकीय व्यवस्थापन अर्थात राज्य चालविण्यासंबंधाच्या संदर्भाने केल्या जाणार्‍या बाबी. ऑफिसमध्ये "राजकारण" आले कुठून? अर्थातच आपल्या धाग्यात आंपणास राजकारण या शब्दाचा अर्थ - कंपूबाजी, वाईट प्रवृत्ती, एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी, धूर्तपणा, कावेबाजी, कटकारस्थाने, इत्यादींपैकी काहीतरी (अथवा सर्वच्या सर्व) असा अपेक्षित आहे. आपणच नव्हे तर बहुसंख्य जनता आज 'राजकारण' हा शब्द ह्याच अर्थांचा समानार्थी शब्द म्हणून वापरते. राजकारण या शब्दाचा मूळ अर्थ वाईट कधीच नव्हता. आजही शब्दकोशात या शब्दाचा अर्थ चांगलाच आहे. पण व्यवहारात राजकारण असे बदनाम का झाले आहे?

जोवर या शब्दाला हा शब्दकोशातला मूळचा चांगला अर्थ प्राप्त होत नाहीये तोवर

<< मतदान कुठल्याही परीस्थितीत करावेच >>

या सिद्धांताला देखील काही अर्थ राहत नाहीये. माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदींनी काही काळाकरिता खुप अपेक्षा निर्माण केल्या होत्या पण आता भाजप च्या उमेदवारांची यादी पाहता अपेक्षाभंग झाला आहे.

कारभार मोदी यांच्या सल्ल्यानुसारच चालणार आहे. त्यामुळे आयाराम गयाराम यांच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीमधे काहीही खंड पडणार नाही.
नमो नमः

चांगला तपशिलवार लेख ! बरेच मुद्दे आवडले.
पण,
>>त्यातल्या त्यात’ बऱ्या उमेदवाराला मत द्या. जर वर्गात सारे पस्तीस टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे असतील तर ‘त्यातल्या त्यात’ कुणाला उत्तीर्ण करणार? सैन्यातील कठोर पात्रता पूर्ण करणारे फारच कमी उमेदवार मिळतात त्यामुळेच सैन्यात अनेक जागा रिक्त आहेत, पण म्हणून पात्रतेचे निकष शिथिल करून कुणाही ‘त्यातल्या त्यात’ बऱ्याला सैन्यात भरती करीत नाहीत.<<

इथे आपण निवडून देणारे सरकार व सैन्याची तुलना अप्रस्तुत वाटते. तुलना फारतर कुटुंबाशी करता येईल. घरातील व्यक्ती अवगुणी असेल तर कुटुंब प्रमुख असू शकतेच ना? कितीही नालायक असला तरी कुटुंब प्रमुख हवाच ना? नाहीतर हुकुमशाहीच हवी (आपण जग भरातल्या उदाहरणावरून पाहतच आहोत की हुकुमशाही कालबाह्य होत चाललीय, आपल्या कडे तर अशक्यच वाटते) अन ती ही कल्याण कारी हवी, नाहीतर उठाव वा पाकिस्तान छाप लष्करशाही होणार !

कमीगुणी सरकार फारतर लोअर परफोर्म करेल, अकार्यक्षम असेल, देशाची प्रगती हळू-हळू होईल. ठीकाय ना मग! पण विविध कारणे शोधून, मी मतदानच करणार नाही ही भुमिका टोकाची वाटते. काही "दहशत"वादी गुंड उमेदवार सोडले तर परिस्थिती फारच वाईट आहे असे मलातरी वाटत नाही. शेवटी बदलत्या काळाचा-संस्कृतीचा, बदलते राजकारण-समाजकारण याचाही विचार केला पाहिजे.

चांगला मुद्देसुद व आजच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख. काही मुद्दे पटले.

पण जर तुम्हाला वाटतेय की ज्या मतदारसंघात तुमचे नाव नोंदवण्यात आले आहे तेथे एकही उमेदवार लायकीचा नाही, तर तुम्ही "नोटा" अर्थात वरील पैकी कुणालाच नाही हा पर्याय वापरू शकता. त्यांनाही कळु देत निदान एक तरी आहे ज्याला कळले आहे आपण सगळे नालायक आहोत.

कारभार मोदी यांच्या सल्ल्यानुसारच चालणार आहे. त्यामुळे आयाराम गयाराम यांच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीमधे काहीही खंड पडणार नाही.>>>
असं असेल तर चांगलं आहे पण कॉंग्रेस , राष्ट्रवादी मुळातच महाभ्रष्ट . कारभार मोदी यांच्या सल्ल्यानुसारच चालला तरी त्यावर हे लोक उपाय शोधू शकतात . मोदी महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देणार आहेत का ? कि फक्त गुजरातच्या ? तसंच BJP चा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ? Sad
शिवसेनेला मत द्यायचं म्हनला तरी उद्धव ठाकरेंना विधी मंडळाचा काही अनुभव आहे का? महाराष्ट्राचा विकास करण्याची maturity त्यांच्यात आहे का? अजूनही ते बाळासाहेबांचा आधी रेकॉर्ड करून ठेलेला आवाज ऐकवून प्रचार करतायेत ? केवळ बाळासाहेबांच्या अस्मितेसाठी शिवसेनेची घराणेशाही आपण मान्य करावी का ?
कृपया आपापली मते मांडावीत . माझं ठरत नाहीये कोणाला मत द्यायचं ते .

त्यांनाही कळु देत निदान एक तरी आहे ज्याला कळले आहे आपण सगळे नालायक आहोत.>>>
त्यात त्याचं नुकसान आहे कि आपलं ? कुणालाच मत दिलं नाही आणि कुणी निवडून आलं नाही तर ??

शत प्रतिशत भाजपालाच मत द्यावे!! त्यांच्याकडे मु.मं. पदासाठी तीन उमेदवारा आहेत. म्हणजे मतदारांना चॉईस आहे. बरं तिघांमधेही काहीच मतभेद नाहीत, ते एकमेकांवर कुरघोडी देखिल करत नाहीत. आणि केलीच तर त्यांचा रीमोट दिल्लीत आणि सुपर रिमोट नागपुरात आहेच. दुसरं म्हणजे भाजपाच्या निवडणुक जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे जे उद्योग महाराष्ट्रातुन बाहेर म्हणजे गुजरात मध्ये जात आहेत, ते उद्योग-कारखाने ई. भाजपाचे राज्य महाराष्ट्रात आल्यावर आनंदीबेन लागलीच परत करतील. नाहीतर आदरणीय पंतप्रधान त्यांना तसे करायला भाग पाडतील. मग या गुजराती उद्योगपतींकडे जे रोजगार निर्माण होतील, त्यामध्ये मराठी माणसाचा काहीतरी टक्का असेलच. त्यामुळे राज्यात नवीन रोजगार निर्माण होईल. अच्छे दिन ते हेच असं सांगता येईल.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा. भ्रष्टाचार टाळावा कसां हे भाजपाला माहित नसलं तरी भ्रष्टाचाराला पाळावा कसा याच ट्रेनिंग त्यांना असलं पाहिजे, त्याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना ई. पक्षातुन आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी दिलीच नसती. अशा तयारीच्या पक्षाला मत दिलं नाही तर कुफेहेपा?

शेवटचा मुख्य मुद्दा म्हणजे निवडुन आल्यावर तीनेक वर्षानी 'विदर्भ' राज्याची निर्मिती भाजपा हाती घेईल. त्यामुळे विदर्भाचं कल्याण होईलच, शिवाय काही नेत्यांची स्वप्न 'पूर्ती' देखिल होईल.

सक्तीच्या मतदानाचा हा निर्णय अजिबात पटला नाही.

लोकशाहीचीसुद्धा सक्ती?

अन्वयार्थ लोकसत्ता १२ नोव्हेंबर २०१४

प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्याची तक्रार होते. मतदान न करणारे देशद्रोही ठरतात आणि पैसे घेऊन मतदान करणारेही देशप्रेमी ठरतात. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने मतदान करून लोकशाही सुदृढ करण्यासाठी हातभार लावला पाहिजे, असे बोधामृत प्रत्येक निवडणुकीनंतर पाजण्यात येते. एवढे सारे प्रयत्न करूनही मतदानाची टक्केवारी फार मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत नाही. गुजरात शासनाने यावरील मतदानाच्या सक्तीचा जो हुकमी तोडगा शोधून काढला आहे, तो भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशीच प्रतारणा करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आदेश या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व असते. उच्च पदावरील व्यक्तीने सांगितलेले कोणतेही काम करणे हे तेथे सक्तीचे असते. हीच पद्धत गुजरातमध्येही लागू करण्याचा हट्ट तेथील भाजपच्या शासनाने धरला आहे आणि तो अंगलट येण्याचीच शक्यता अधिक आहे. मतदानाची सक्ती हा गेली अनेक दशके चर्चेतील विषय आहे. आजवर त्याबाबत एकदाही एकमत होऊ शकलेले नाही, याचे कारण घटनेने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मतदान करण्याचा हक्क घटनेने दिला आहे. त्याच वेळी मतदान करायचे की नाही याबद्दलचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही बहाल केले आहे. त्यामुळे अशी सक्ती करणे म्हणजे या स्वातंत्र्याचा संकोच करण्यासारखे आहे. मतदान करता यावे, यासाठी सार्वत्रिक सुटी जाहीर करणे हा एक भाग झाला. मतदान केल्याबद्दल काही सवलती देणे किंवा बक्षिसी देणे ही चूष झाली आणि मतदानाची सक्ती करणे ही हुकूमशाही झाली. लोकशाहीच्या मूलतत्त्वांमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला असताना, त्यावरच घाला घालणारा हा निर्णय केवळ गुजरात शासनच घेऊ शकते. याउपर 'असा निर्णय घेणारे देशातील पहिलेच राज्य' अशी आपलीच पाठ थोपटून घेणारेही हेच राज्य असू शकते. शंभर टक्के मतदान या उद्दिष्टासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न होणे आवश्यक असते. लोकशाही व्यवस्थेत मतदान करण्याने शासकांच्या निवडीत आपला सहभाग असतो, याचे भान शेवटच्या माणसापर्यंत निर्माण करण्यासाठी आजवर देशपातळीवर गंभीर आणि सातत्यपूर्ण प्रयत्न झालेले नाहीत. जसे मतदार, तसे त्यांचे लोकप्रतिनिधी याचा अर्थ मतदान न करणाऱ्याला समजावून सांगण्यात आजवर भारतीय लोकशाहीला पुरेसे यश आलेले नाही. अशिक्षितता हे त्याचे कारण सांगितले जात असले, तरीही अनेक प्रगत लोकशाहीमध्येही संपूर्ण मतदानाचे यश मिळत नसल्याचेच दिसते. उमेदवारांपैकी कुणीही योग्य वाटत नसल्याचे मत व्यक्त करण्याची सुविधाही गेल्या काही वर्षांत निर्माण करण्यात आली. मुक्त वातावरणातील निवडणूक पार पडण्यासाठी या देशातील माध्यमांचा विकास व्हावा लागला, तसे प्रत्येकाने स्वेच्छेने मतदान करण्यासाठीचे वातावरण निर्माण करण्यासाठी लोकशाहीतील प्रत्येक घटकाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सक्तीने मतदान करायला लावणे यालाच लोकशाही म्हणण्याची पद्धत गुजरातपासून सुरू होणार असेल, तर त्याविरुद्ध लोकशाही मार्गानेच जनमत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना २००२ मध्ये यासंबंधी नेमलेल्या समितीने जो अहवाल दिला, त्यामध्येही मतदान आणि कर भरणे याकडे सक्तीची जबाबदारी म्हणून पाहण्यात यावे, असे मत व्यक्त करण्यात आले होते. तेव्हाही या प्रकरणी टोकाचे मतभेद व्यक्त झाल्याने, मतदान ही सक्तीची जबाबदारी करता आली नाही. मतदान न करणाऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवणार का? या निवडणूक आयुक्तांच्या प्रश्नामुळे, अशी सक्ती करायची ठरवलीच, तर त्याचे कोणकोणते परिणाम होतील, याचा विचार गुजरात शासनाने केला असेल, असे सकृद्दर्शनी दिसत नाही.