दैव...!

Submitted by विशाल कुलकर्णी on 1 December, 2008 - 07:35

प्रिय निखील,

कसा आहेस रे ?
खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.
तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी?
नेहेमी सहजपणे जिंकणारा तु, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तु ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळु हळु मैत्रीत रुपांतर होत गेलं.

ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि आपल्या दोघांत चुरस सुरु व्हायची. मग तु जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडुन ऐकायला खुप मजा यायची. आपली बाजु घेवुन एकमेकात भांडणारे दोन मित्र बघितले कि मग आपण दोघे पोट दुखेपर्यंत हसायचो.......

आता बर्‍याच गोष्टी विसरायला होताहेत. या इथे आलो आणि हळु हळु .........................!

तुझाच,

चेतन.....
.....
.....

प्रिय चेत्या,

मला काय धाड भरलीय रे, तुच सांग कसा आहेस तु ? साल्या गेलास तो परत फोन नाही, पत्र नाही. काय हे, जणु काही अंटार्क्टिकावरच राहायला गेलाहेस. पण तुझं पत्र आलं आणि पुन्हा एकदा बालपणीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या.
चेत्या, काय रे, ९ वी ला असतानाची ती ' सामान्य ज्ञानाची' परिक्षा आठवते. ती रे "आंतरभारती शाळेत गेलो होतो आपण? ऐन वेळेला मला एका प्रश्नाचे उत्तर आठवेना आणि तु समोर बसुन मला खुणा करुन ते सांगायचा प्रयत्न करत होतास. आणि मग तुला तिथुन हाकलण्यात आलं...!

काय रे चेत्या, आई कशी आहे रे? तिला शेवटचं भेटलो तेव्हा खुप खंगली होती रे ती? ..बाबांचं अचानक जाणं फार मनाला लावुन घेतलं होतं तिने. तिच्या हातची कारल्याची भाजी आठवली की अजुनही तोंडाला पाणी सुटतं माझ्या. तु लेका कर्म दरिद्री, तिचा स्वयंपाक कधी आवडलाच नाही तुला? आणि नेहा, ती कुठे असते आता?
असो, चेत्या , लिहीत जा रे अधुन मधुन. तु परत येशील ना तेव्हा खुप मजा करु. आपल्या त्या नेहेमीच्या हॉटेल मध्ये जावु जेवायला आणि मग तुझ्या स्टाईलने त्याला अंडे भाजायला लावु. काय भंजाळला होता ना तो कुक तेव्हा? तु लवकर ये बे परत !
आणि नालायका, पोस्ट बॉक्स चा पत्ता काय देतोयस..का माझ्यापासुन देखील लपवतोयस, कुठे राहतोयस ते?
काय रे रेश्माचा काही फोन............?

तुझाच
निख्या.
.....
......
प्रिय निख्या,

आता तुला निख्या म्हणायला कसंतरीच वाटतं मित्रा, तुझ्या सारख्या आय. पी. एस. असलेल्या माणसाला असं हाक मारणं, तेही माझ्यासारख्यानं.......
खरंच रे, तिला मी कधीच सुख दिलं नाही. सावत्र असली तरी आईच होती आणि तिने कधीच सावत्रपणा दाखवला नव्हता. उलट नेहापेक्षाही जास्त जीव लावायची ती मला. पण मी कधी तिला आई मानलंच नाही. एकही संधी सोडली नाही तिचा पाण उतारा करायची. पण तिने कधीही त्याचा राग मानला नाही.
जोपर्यंत होती तो पर्यंत माझं सगळं केलं तिने.
हो..गेली ती....माझ्या बापाने तिला पण सोडलं नाही रे? तो तरी काय करणार म्हणा, ही भुकच फार विचित्र असते?
एक सांगु निख्या, नेहा पण सध्या इथेच आहे रे! तिच्या कडे तर बघवत नाही सध्या, आधीच ती लहानपणापासुनच नाजुक आणि त्यात.....हे......!
मला खुप आवडायची नेहा, त्या आईवर जरी राग असला ना, तरी एखाद्या जपानी बाहुलीसारखी दिसणारी नेहा, माझा जीव कि प्राण होती.
तुला आठवतं मी तुला म्हणायचो सुद्धा, तु जर अजुन ६-७ वर्षांनी लहान असतास तर नेहाचं लग्न मी तुझ्याच बरोबर लावुन दिलं असतं.
रेष्मा......?
स्वप्नं....कधीही पुर्ण होवु न शकणारं स्वप्न !

चल, थांबवतो, बोटं खुप दुखताहेत आता....!

तुझाच,

चेत्या.
.....
.........
प्रिय चेतन,

मला निटसं काही कळलं नाही ?
तु काय म्हणतोयस काहीच संदर्भ लागत नाहीये.
हे बघ, तु बाबांशी भांडुन कलकत्त्याला निघुन गेलास. का भांडलास ते मलाही सांगितलं नाहीस, मलासुद्धा ?
असं काय कारण होतंबाबा? तसंही मोठ्या आईच्या मृत्युनंतर तुझं आणि त्यांचं कधी जमलंच नाही...
पण असं अचानक निघुन जाण्यासारखं काय झालं होतं?
आणि नंतर बाबा गेल्यानंतर काही दिवसांनी आईनेदेखील नेहाला घेवुन मुंबई सोडलं मग नंतर कुणाचीच भेट झाली नाही.
नेहा, आता तुझ्याकडेच आहे हे वाचुन खुप बरे वाटले. काय झाले रे ती खुप आजारी वगैरे आहे का ? काय झालंय तिला. तिला घेवुन इकडे मुंबईत का येत नाहीस. इथे आता खुप चांगल्या डॉक्टर्सबरोबर घसट आहे माझी. इथे दाखवु आपण तिला, तु येच !
या पत्रातला तुझा सुर खुप उदास वाटला. आणि चार ओळी लिहुन तुझी बोटं कधीपासुन दुखायला लागली रे.
जेमतेम अठ्ठाविशी ओलांडली आहेस आता.
तुला आठवतं, अकरावीत असताना तो "संतकाव्यावरचा आठ पानी निबंध तु एका रात्रीतुन लिहुन दिला होतास मला........! आणि आता चार ओळी लिहिल्या की तुझी बोटं दुखायला लागली.
खुप मोठा माणुस झालायस का रे बाबा? मित्राला पत्र लिहायचा देखिल कंटाळा?
तु ये एकदा, मग सांगतो तुला ?
ये रे एकदा, खुप दिवस झाले भेटुन..... खुप आठवणी आहेत त्या सोनेरी दिवसांच्या...
नक्की ये वाट पाहतोय...

तुझा,

निख्या..

ता. क. : आय. पी. एस. अधिकारी देखील माणुसच असतो, आणि मित्रापेक्षा मोठा तर मुळीच नसतो.

तुझाच,

निख्या.
.....
.......

प्रिय निख्या,

तुझं पत्र मिळालं, खुप समाधान वाटलं रे....
तुझ्या सगळ्या तक्रारी मान्य....पण माफ कर मित्रा आता आपली भेट होईल असं वाटत नाही. खरंतर होवु नये असंच वाटतंय मला. कारण चैतन्याने भरलेल्या ज्या चेतनला तु पाहिलं आहेस, ओळखतोस ....तो चेतन सहा वर्षापुर्वी जेव्हा घर सोडलं तेव्हाच वारला.
धक्का बसला ना ऐकल्यावर...मलाही बसला होता, जेव्हा मला कळलं की माझ्या मोठ्या आईचा मृत्यु (आईला मोठी आई म्हणताना, दुसर्‍या आईलाही माझ्या आईचा दर्जा देतोय..मला माझी चुक आणि तिचा मोठेपणा आता कळतोय..पण खुप उशीर झालाय रे)...
तर काय सांगत होतो जेव्हा मला कळलं की माझ्या मोठ्या आईचा मृत्यु कॅन्सरने नाही तर एडसने झाला होता. तिला एडस कसा झाला, हे तुला माझ्यापेक्षा बाबा जास्त चांगलं सांगु शकले असते, पण मुळात तिला एडस झाला होता हिच गोष्ट त्यांनी दडवली, मग त्यामागची कारणे सांगण्याचा प्रश्नच नव्हता.
पण मी सांगतो, हा एडस तिच्याकडे बाबांपासुन आला होता.
माझ्या बापाच्या एकेक सवयी तर तुलाही माहीत होत्याच. मला जेव्हा हे कळालं तेव्हा ती एडसने गेली याचा फार राग नव्हता आला मला,
राग आला होता, तो आपल्याला एडस झाला आहे हे लपवुन केवळ आपल्या वासनेसाठी दुसरे लग्न करणार्‍या धाकट्या आईच्या स्वप्नांची राखरांगोळी करणार्‍या माझ्या बापाचा....
आपल्याला एडस झाला आहे हे माहित असताना आणखी एका मुलीला या जगात आणुन तिचं आयुष्य जन्माला येण्याआधीच उध्वस्त करणार्‍या एका वासनांध नराधमाचा....
घर सोडलं, पण नेहाच्या संपर्कात होतो मी. तिच्या कडुनच कळलं तो नराधम मेल्याचं...
त्यानंतर धाकटी आई आणि नेहा दोघींनाही माझ्याकडे बोलवुन घेतलं....
गेल्या वर्षी धाकटी आई गेली.. एडसने...
अरे हो, सद्ध्या मी कलकत्त्यात नाही, पुण्यात आहे. बरोबर ओळखलंस मी तरी कसा सुटेन रे यातुन...
शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता.
आता तु म्हणशील, एवढं सगळं होईपर्यंत का बोलला नाहीस....
कसा ही असला तरी माझा बाप होता रे तो, खुप प्रेम होतं माझं त्याच्यावर. मीच काय आम्ही सगळ्यांनीच जिवापाड प्रेम केलं त्याच्यावर. त्याचाच गैरफायदा घेतला रे त्याने.
इतक्या वर्षानंतर पत्र लिहिण्याचं प्रयोजन एवढंच की.....
तु खुप केलं आहेस आजवर माझ्यासाठी, हे शेवटचं.....
माझे दिवस संपलेत आता, पण नेहा अजुन आहे रे....तिची काळजी घेशील ? तिलाही........!

तुझा..कदाचित कुणाचाच होवु न शकलेला...

चेतन.

ता. क. : इतके दिवस थांबली होती रेष्मा, गेल्या महिन्यात तिने आत्महत्या केली. आता माझी पाळी.
ती वाट पाहतेय रे, तुझ्या भरवश्यावर नेहाला सोडुन जातोय.

चेतन.

विशाल.....०२/१२/२००८.

गुलमोहर: 

विशाल,
खूपच छान! आणि पत्राचा फॉरमॅट खूप भावला.

कल्पू

विशाल,, आवडली कथा..
दोन मित्रांची जवळीक.. पण अनेक वर्षांच्या गॅप मुळॅ आणि परिस्थितीमुळे आलेला थोडासा दुरावा छान दखवला आहेस...
पण अजुन का नाही लिहिलं थोडं?
--------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

पूर्ण कथा वाचुन झाल्यावर पहिली प्रतिक्रिया "एक मोठा विषण्ण उसासा" (अर्थातच चेतनच्या फरफटीसाठी :-()

निखिल आणि चेतनची मैत्रीची खोली फार भावली. दिवसें-दिवस शैली बहरत आहे. KEEP IT UP.

विल्लप

नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

विषाल, मुळात हा कथेचा फॉरमॅट जुनाच आहे. अनेक मान्यवर लेखकांनी या पध्दतीने कथा लिहील्यात अर्थात विषय वेगवेगळे . तु विषय चांगला निवडलास लिखाणाचा फ्लो मस्तच पण दोन पत्रांनंतर गुढ उलगडल्यामुळे आवश्यक तो परीणाम साधल्या गेला नसावा. य पध्दतीच्या कथांची लांबी जास्त ठेवावी लागते.
असो एकुण कथा छान आहे, आणि असेच वेगळे विषय निवडून लिहीत रहा तुला शुभेच्छा !
.................................................................................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

चाफा, मनापासुन आभारी.
मलाही ते जाणवलं नंतर, डोक्यातही होतं बरंच काही, पण टायपायचा कंटाळा केला...
पाँईंट नोटेड, यापुढे ही चुक होणार नाही.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

विशाल, आत्ताच वाचली कथा. चाफ्फा म्हणतो तसे कर. पण खूप छान लिहितोयस. एड्स एखाद्याच्या आयुष्यात कसा हाहाकार माजवू शकतो हे चांगले कव्हर केले आहेस.

------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

सुरेख फ्लो. मी या फॉर्म मध्ये फार पुर्वी 'नयन' ही कथा लिहीली होती कधी जमलच तर टाकीन येथे.

सुंदर कथा आहे....विषय पण छान आहे..शैली जरी जुनी असली तरी बर्‍याच दिवसांनी अशी कथा वाचायला मिळाली.
आणी खुप छान वाटली..

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

आवडली रे पत्रकथा... कथेचा मूळ विषय, हेतू अगदी व्यवस्थित प्रकट होत आहे..

तुझी शैली छान आहे (मागेही मी एका कथेवर लिहिले होते). आता संवाद न वाढवता कंटेंट वाढव (केवळ ह्या कथेसंदर्भात नाही, इतरही कथांच्या अनुषंगाने)..

किती उदास कथा.. Sad
चांगली लिहिली आहे. "संवाद न वाढवता कंटेंट वाढव" हे पटले.

वेगळिच स्टाइल छान आहे .

हम्म... कथा/पत्र वाढ्वली असती तर अजुन गहन गहिरं होत गेलं असतं. छानय!