श्रद्धा अंधश्रद्धा १ते ५ भाग एकत्र

Submitted by अनिल तापकीर on 7 March, 2012 - 09:21

वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .
मस्त गार वारे सुटले होते तरी त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने घड्याळात पहिले. सव्वा बारा, धक्का बसून त्याने पुन्हा घड्याळ पहिले सव्वा बाराच वाजले होते. म्हणजे त्याला तिथं येऊन फक्त पंधराच मिनिटे झाली होती. अजून पाऊन तास त्याला तिथे काढायचा होता.
मित्रांबरोबर पैंज लावली होती त्याने, 'अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात थांबण्याची' आणि त्याला विश्वास होता कि हि पैंज आपण नक्की जिंकणार कारण भुताखेतांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता.
शहरात शिकायला गेला तेथील शिकलेल्या मित्रांच्या सानिध्यात राहून भूतं-खेतं,घुमणारे भगत, देवाचे बळी,करणी, या सर्व लोकांच्या खुळ्या समजुती आहेत. या मताचा तो बनला होता. शहरातील मित्रांबरोबर तो अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखील काम करायचा.म्हणूनच गावात आल्या आल्या त्याने गावातल्या मित्रांबरोबर स्मशानात एक तास एकट्याने काढायचा अशी पैंज लावली होती.
सद्या जरी आधुनिक विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता, तरी लहानपणापासून मनात काही संस्कार ठसलेले होते आणि मेंदूत ते कुठेतरी लपून बसलेले होते.
तो जेव्हा स्मशानात आला तेव्हा एकही विचार त्याच्या मनात नव्हता.आल्या आल्या त्याने एक सिगारेट शिलगावली नि स्मशानभूमीतील शेडच्या खांबाला टेकून मस्त पाय पसरून बसला. सिगारेट संपेपर्यंत त्याला काही वाटले नाही. आणि कसला विचार देखील आला नाही. सिगारेट विझली .. ..... होता नव्हता तेवढा उजेडही संपला, सगळीकडे गच्च अंधार,जीवघेणी शांतता, दूर गाव,पक्षी, वारा सारं जगच झोपलेले. आणि हा एकटाच टक्क जागा. थोड्याच वेळात जे नको तेच घडू पहात होते. लहानपणी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टीतील भुते नि त्यांचे वर्णन केलेले भयानक आकार त्याच्या डोळ्यासमोर यायला लागले होते.तो त्या विचारांना झटकण्याचा प्रयत्न करत होता. तो जेवढा विचार झटकण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कितीतरी पटीने तेच तेच विचार पुन्हा पुन्हा येऊ पहात होते.
भुते नसतातच या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे तो मनाला वारंवार बजावत होता. तर दुसऱ्या मनात लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतील भूतांचे चित्रविचित्र अवयव फेर धरत होते. अतिशय द्विदा मनस्थितीत असतानाच,शांततेचा भंग करत भयंकर कर्कश्य आवाजात टिटवी ओरडत गेली नि अक्षरशा तो हादरूनच गेला छातीचे ठोके वाढले दरदरून घा म आला. कसे बसे मनावर नियंत्रण आणले.छाती अजूनही धडधडत होती. ----------------------------------------------------------------------------------------------खिशातून रुमाल काढून त्याने चेहरा पुसला. घड्याळ पहिले बारा वीस, त्याला धक्का बसला होता. कारण त्याला वाटले होते कि, एक तास पूर्ण व्हायला फार फार तर पाच-सात मिनिटे राहिली असतील. परंतु तास पूर्ण व्हायला अजून चाळीस मिनिटे बाकी होती. आणि त्याचेच दडपण यायला लागले होते. वेळ सरता सरत नव्हता. मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्यासाठी त्याने डोके झटकले नि पुन्हा सिगारेट पेटवली. जरा शांत झाला. उगाच घाबरलो आपण घाबरण्यासारखे काहीच घडले नव्हते.
सिगारेट संपली, पुन्हा तीच अस्वस्थ करणारी शांतता..... त्या गच्च अंधारात एक एक मिनिट एका एका तासाप्रमाणे भासत होता. काहीही कृती न करता बसल्यामुळे पुन्हा मागचेच विचार त्याच्या डोक्यात यायला लागले होते. तो जेवढे विचार थोपवत होता त्याच्या दुप्पट वेगाने तेच विचार पुन्हा पुन्हा येत होते. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आजच का आठवत्तात हे त्याला समजत नव्हते.
विचार करता करता त्याला रंग पहिलवानाचा किस्सा आठवला.
त्याच्या गावाच्या नि शेजारच्या गावाच्या मध्ये डोंगरांची रांग होती दोन्ही गावात ये जा करण्यासाठी रस्ता एका खिंडीतून जात होता. खिंड खूपच अरुंद नि उंच होती. त्याच खिंडीत बर्याच वर्ष्यापुर्वी तीन मुडदे सापडले होते. दोन पुरुष नि एक महिला यांना कोणीतरी मारून टाकले होते. तेव्हापासून त्या खिंडीविषयी नाना प्रकारच्या दंतकथा तयार झाल्या होत्या. काही किस्से घडले होते कि नाही माहित नाही परंतु रंगवून सांगितले जात.
कोणी म्हणे एकदा एक जण (तो एक जण कोण होता कुणालाच माहित नव्हते ) तर तो रात्रीच पलीकडच्या गावातून अलीकडे यायला निघाला त्याच्या पाहुण्यांनी त्याला रात्रीचे निघायला विरोध केला होता. पण पठ्या लयच डेरिंगबाज कोण खातंय बघतो म्हणाला नि निघाला अकरा वाजले होते. झपाझप चालत खिंडीजवळ आला. खिंडीत शिरण्याअगोदर तंबाकू मळून तोंडात टाकली नि शिरला बिनधास्त, निम्मे अंतर गेल्यावर त्याला आवाज आला.
'
ओ पावनं थांबा जरा येउद्या मला.'
दचकून त्याने मागे बघितले एक उंच माणूस झपाझपा चालत येत होता. जवळ येताच तो माणूस म्हणाला
काय घाबरलो होतो राव, बरं झालं तुमची सोबत मिळाली.
कोणत्या गावाचं पावनं
आवो मी लांब कोकणातला हाय.
मग इकडं कुणाकड वाट चुकला
पावनं थोडी तंबाकू द्या राव लय तलाप झालीय मग सांगतो सगळं चालता चालता.
ह्याने तंबाकू काढून दिली, तो मळू लागला
नि ह्याच लक्ष्य त्याच्या तंबाकू मळनार्या हाताकडे गेले नि त्याचे धोतर पिवळे झाले.
तंबाकू मळणारे हात उलटे होते.
तेव्हापासून खिंडीत एक फेटे वाले भूत आहे हे सगळीकडे झाले. त्या किस्स्यानंतर असे किस्से अनेकदा घडत गेले. पाच नंतर त्या खिंडीतून कोणी जायचे धाडस करीना
त्याच खिंडीत रंगा पहिलवान लागीराला होता,
गावाच्या पारावर जेव्हा तो आला तेव्हा त्याची स्थिती खूपच वाईट होती. पूर्ण अंगावर फक्त एक फाटलेली अंडरवेयर होती. अंगावर खूप जखमा होत्या. धावत येऊन तो पारावर निपचित पडला होता. मधूनच उठून मोठ्याने ओरडायचा नि खिंडीकडे हात करून म्हनायचा डोळे पांढरे करून त्याची नि माझी कुस्ती झाली. पण तो लय मोठा होता. त्याचे हात पाय उलटे होते. अशी बडबड करून तो पुन्हा बेशुध्द पडायचा.
आख्ख्या गावाला वाटले नक्कीच खिंडीतल्या भुताने रंगा पहिलवानाला झपाटले असणार
हा लहान असताना रंगा पहिलवानाचा तो अवतार ह्याने स्वतः पाहिला होता.
आणि आज नको असताना त्याला स्मशानातच तो रंगा पहिलवानाचा किस्सा आठवला होता. रंगा पहिलवानाचा तो घाबरलेला नि वाईट अवस्था झालेला चेहरा त्याला आठवला नि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
शहरात शिकायला गेल्यापासून ह्या सर्व गोष्टी तो विसरला होता. नवीन आधुनिक विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता. परंतु आज काय झाले होते कुणास ठाऊक ते नवीन विचार त्याला आठवत नव्हते. लहानपणी ऐकलेल्या लोकांनी रंगवून सांगितलेल्या भुतांच्या गोष्टीच तेवढ्या त्याला आठवत होत्या. आणि जसजश्या त्या आठवत होत्या तसतशी त्याच्या छातीची धडधड वाढत होती.
बारा चाळीस झाले, वातावरणातील भयानकता वाढली. विचार करून करून त्याच्या मेंदूला बधीरपणा यायला लागला होता. त्याला कधी घाम येत होता तर थोड्याच वेळात थंडी वाजत होती. वातावरण नक्की थंड आहे कि गरम हेच काळात नव्हते.
आता अंधार अधिक गडद झाला. हा सुन्नपणे बसून होता. छातीतील धडधड चालूच होती. राहिलेली वीस मिनिटे केव्हा पार पडतात असे त्याला झाले होते.
तेवढ्यात तो बसला तिथे धप्पकन आवाज झाला. नि तो मोठ्याने ओरडला. आवाज कश्याचा आला हे सुध्दा त्याने पहिले नाही. तो जो पळत सुटला, पळता पळता दोन तीन वेळा पडला चांगलाच मार लागला. तरी सुद्धा लागलेल्या माराची परवा न करता त्याने पार गाठला. पारावर आल्या आल्या मित्रांनी गराडा घातला.------------------------
---------------------------------------आणि जो तो त्याला विचारू लागला काय झाले. त्याची अवस्था खरोखर वाईट होती. त्याला खूप धाप लागली होती छाती जोरजोरात वरखाली होत होती. त्याला बोलताच येत नव्हते. तेवढ्यात तेथे निरंजन आला.
निरंजन त्यांचाच मित्रांपैकी एक, वयाने त्यांच्यापेक्ष्या थोडा मोठा तरीपण चांगला मित्र, तो तेथे आल्या आल्या त्याने सर्वांना बाजूला केले. नि म्हणाला - सगळे बाजूला व्हा त्याला मोकळी हवा घेउद्या. राम तू जा पहिले पाणी घेऊन ये रामाकडे पाहून निरंजन म्हणाला.
शिवाला बाजूला घेतले व विचारले काय झाले ----शिवानं सांगायला सुरुवात केली.
काही नाही रे निरंजन भाऊ परवा पोरं पोरं गप्पा मारत बसली होती. गप्पा भुतांविषयी चालल्या होत्या, गवत्याने, नि विठठलनि दोन किस्से सांगितले. सगळी पोरं मन लावून भुताचे किस्से ऐकत होतो. तेवढ्यात हा सदा म्हणाला आरे काय दोस्तांनो जग कुठे चालले आहे नि तुम्ही अजूनही भूता-खेतातच रमताय अरे ह्या सगळ्या खुळ्या समझुती आहेत. भूतं खेतं , अंगात येणे देवीला बळी देणे , भूत लागले म्हणून उतारा टाकणे ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत.
त्यावर सगळी पोरं फिदीफिदी हसली. गवळ्याचा किस्ना म्हणाला -आरं सदा तू शहरात शिकायला गेला म्हणून तू काय लय श्याना झाला काय, वाडवडीलान्पासून भुतांच्या घटना घडतात देवांच्या ग्रंथामधून सुदिक भुतांच्या गोष्टी सांगितल्यात
त्यावर सदा म्हणाला किसन, पुराणांच्या कथा आता खूप जुन्या झाल्यात ते सगळेच खरे होते कि नाही कुणाला माहित, तुम्ही माझे लहानपणापासूनचे मित्र आहात म्हणून मला मनापासून वाटते कि तुम्ही या खुळचट कल्पना सोडून द्या.
तू आमच्यात जास्त शिकलाय तुझ्या बी काही गोष्टी खऱ्या असतील. रामा म्हणाला- पर हिथं आपल्याच गावात भूतांचा अनुभव आलेले कितीतरी सापडतील.
आरे काही नाही रे सगळा मनाचा खेळ असतो. सदा म्हणाला
त्यावर किस्ना म्हणाला हे बघ सदा, तू म्हणतोस ते आम्हाला बी पटतंय पर आम्ही हिथं गावातच राहतो. महिन्यातून एक दोन तरी भुताटकीच्या कथा कानावर पडतात त्यातल्या दहापैकी नऊ खोट्या असतील पर एखाधी तर खरी असलं ना?
ये किस्ना आरं तो सदा शिकलेला हाय तो काय आपल्याला बोलायला ऐकणार नाय त्यापेक्षा असं करू
किस्नाबरोबर बाकीच्या पोरांनी सुद्धा काय म्हणून विचारले.
ह्या सदाचा भूतांवर विस्वास नाय ना?
सदाने नाही म्हणून मान हलवली
मग ह्या सदाने अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात एकट्याने थांबवून दाखवायचे
ह्या गोष्टीला सदा एका पायावर तयार झाला.
पोरं त्याला म्हणाली सुदा कि काय झाले तर होणाऱ्या परिणामाला तुझा तू जबाबदार राहशील त्याने तेही मान्य केले.
आणि आता दोन तासापूर्वी सदा स्मशानात गेला होता तिकडे काय झाले कोणालाच माहित नाही पर लयच घाबरलेला दिसतोय. त्याला नक्कीच भूत दिसलं असणार
असे म्हणून शिवाने सारी हकीकत निरंजनाला सांगितली.
तेवढ्यात रामा पाणी घेऊन आला. पोरांनी सदाला पाणी पाजले थोडं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडले.
त्याला लागलेली धाप आता बरीच कमी झाली होती. डोळ्यातली भीती मात्र तशीच होती.
निरंजनने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. पण सदा घाबरून ओरडला व बाजूला सरू लागला. किस्ना म्हणाला -सदा आरे घाबरू नको आम्ही तुझे मैतर हाये काय झाले, काय दिसलं का तुला घाबरू नको काय झाले ते सांग
सदा बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण तोंडातून शब्द येण्याएवजी त्याचे दात दातावर आपटू लागले थंडी वाजून आली खूपच जोरात थंडी आल्यानंतर पोरांनी त्याला उचलला, उचलतानाही तो खूप घाबरला व किंचाळायला लागला. पण तसाच त्याला उचलून देवळात नेला.
बहूतेक पोरं देवळातच झोपायची सगळी पोरं त्याच्याभोवती कडे करून बसली. थंडी कमी झाल्यावर सदाला चांगलाच ताप आला
सगळी पोरं चिंताग्रस्त झाली होती. पैंज चांगलीच अंगलट आली होती. ती पैंज नव्हतीच पण भूतांवर विश्वास नसणारा सदा भूतं नसतातच हे आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी सदाने हे धाडस केले होते.
सगळ्या पोरांची खात्री झाली होती कि स्मशानात सदा नक्कीच एखादे भूत भेटलं असणार त्याशिवाय सदा एवढा घाबरणार नाही .
त्यानंतरची सारी रात्र सदाने डोळे मिटले नव्हते.व त्याबरोबर त्याची मित्रांनिदेखील .

दुसऱ्या दिवशी आख्या गावात हि बातमी सगळीकडे पसरली. सदाच्या चुलत्याने गावातल्या पोरांच्या नावाने शिव्या घातल्या. कारण सदाला चुलत्यानेच सुट्टीला गावाला आणला होता. सदाचे वडील नको म्हणत असताना चुलता घेऊन आला होता.
दुसऱ्या दिवशीही सदामध्ये काहीच फरक पडलेला नव्हता . चेहऱ्यावरील भीती जराही कमी झाली नव्हती, थंडी -ताप सारखा येतंच होता. शिवाय रात्रीपासून सदाने काही खाल्ले पिले नव्हते .---------------------------------------
--------------------------------------------गावापासून थोड्याच अंतरावर डोंगरांची रांग होती. काही खडकाळ भाग सोडला तर बहुतेक भाग जंगलाने व्यापला होता.गावातले लोक सहसा घनदाट जंगलाच्या बाजूला जात नसत. जंगलाच्या ठराविक भागातच वावर असे. घनदाट भागात जायचं झाले तर चार दोन जण बरोबर असल्याशिवाय कोणी धाडस करीत नसे.
आणि आज अश्याच घनदाट भागातून ते चौघेजण चालले होते. त्यात सदाचा चुलता दिनकरराव, वडील श्यामराव, चुलती सरूबाई आणि सदा, दिनकररावांनी सदाला घट्ट धरले होते. भेदरलेल्या अवस्थेत सदा बिचकत बिचकत चालला होता. एखाद्या पक्ष्याचा ओरडण्याचा आवाज जरी आला तरी सदा घाबरून ओरडायचा व हाताला हिसका मारून पळायचा प्रयत्न करायचा. परंतु दिनकारावांनी त्याला घट्ट धरल्यामुळे त्याला पळता येत नसायचे.
मुलाची अवस्था पाहून श्यामरावांचा धीरच सुटला होता. मुलगा चांगला शहरात शिकत होता गावात आला नि इतर पोरांच्या नादानं नको ती पैंज लावली, नि होत्याचं नव्हतं झालं देवा भैरुबा माझ्या पोराला लवकर या दृष्टचक्रातून बाहेर काढ तुझ्या नावाने शे पाचशे माणसं जेवायला घालीन. असं मनातल्या मनात पुटपुटत ते चालले होते.

दरीमधून वाहणारा तो लहान ओढा त्यांनी पार केला नि मोठ्या दरडीजवळ ते आले. दरडीलालागुनच ते थोडे पुढे गेले तेव्हा त्यांना ते दिसलं
जाळ्याझुडपांनी वेढलेले होते तरी आत जायला 'एकावेळी एका माणसाला' असा रस्ता होता त्या गुहेच्या तोंडातून त्यांनी आत प्रवेश केला थोडावेळ त्यांना काहीच दिसलं नाही सगळा अंधार होता शिवाय ते उन्हातून आले होते . थोड्या वेळाने त्यांची नजर सरावली व त्यांना थोडे थोडे दिसू लागले.
साधारण दहा बाय पंधराची ती गुहा होती. चांगली दोन पुरुष उंची असल्यामुळे गुदमरल्यासारखे होत नव्हते उलट आतमध्ये चांगला गारवा होता.
गुहेच्या अगदी शेवट कडेला तो बसला होता. उघडाबंब पाठीवर मोकळे सोडलेले करडे केस, कपाळावर शेंदराचा मळवट, कानात मोठाल्या बाळ्या, तारवटलेले डोळे तोंडाने कसलेतरी मंत्र पुटपुटत समोरच्या कुंडात काहीतरी फेकत होता. हातातले कसले तरी धान्य कुंडात फेकताच आग तेवढ्यापुरती भडकायची व साऱ्या गुहेत उग्र वास पसरायचा.
तो होता मांत्रिक राघव, गुहा सोडून कधीच बाहेर पडत नसे. फक्त अमावाश्येच्या रात्री स्मशानात जायचा आणि अगदीच एखादी केस हाताबाहेरची गेली असेल तर गावात जायचा. आजूबाजूच्या दहा वीस गावात त्याचा दबदबा होता. सगळे त्याला घाबरून असत.
मांत्रिकाच्या शेजारी उभ्या असलेल्या सेवकाचे लक्ष या चौघांकडे गेले तो त्यांच्याकडे आला नि हळू आवाजात म्हणाला
महाराज सध्या कामात आहे तिकडे बाजूला बसा दहा पंधरा मिनिटात बोलावतो एवढे सांगून तो पुन्हा मांत्रिकाकडे जाऊन उभा राहिला .
हे चौघेही कोपऱ्यात जाऊन बसले. सदाची चुळबुळ चालूच होती, तो तेथून बाहेर पाडण्यासाठी धडपडत होता नि दिनकरराव व सरूबाई या दोघांनीही त्याला घट्ट धरून ठेवले होते. श्यामरावांची मनातल्या मनात देवाची प्रार्थना चालूच होती.
मांत्रिकाचे अनुस्थ्हान संपले त्याचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या चौघांकडे गेले.त्याने सेवकाकडे पहिले. सेवक लगबगीने त्यांच्याकडे गेला नि चला म्हणून त्यांना खुणावले .
सदाला त्यांनी मांत्रीकापुढे बसवला, दिनकररावांनी थोडक्यात सारी हकीकत सांगितली
मांत्रिकाने सदावर आपले भेदक डोळे रोखले. सदा जास्तच चुळबुळ करू लागला. त्याला धरण्यासाठी या दोघांनाही सारी ताकत पणाला लावावी लागली .
मांत्रिकाने कुंडातली राख घेतली व सदाच्या मस्तकावर लावली. घाबरून सदा जोरात ओरडू लागला.
मांत्रिक आता कसलासा मंत्र पुटपुटत होता आणि झोळीतला अंगारा सदावर फेकत होता. सदाचे ओरडणे चालूच होते.
मंत्र पुटपुटने झाल्यावर तो सदाच्या वडिलांना व चुलत्याला म्हणाला -
लय ताकतवान भुताने डाव साधलाय बराच मोठा बंदोबस्त करावा लागणार हाय आणि खर्च बी मोठा हाय.
महाराज कितीबी खर्च होऊद्या पर आमच पोर बर हुईल ना? शामराव म्हणाले
ह्या राघवाने आतापर्यंत लय भूतांना वठणीवर आणलंय ह्या पोराला चारच दिसात मोकळा करतो.
लय उपकार होतील महाराज तुम्ही सांगान ते आणून देतो दिनकरराव म्हणाले.
तुम्ही काय बी आणू नका आणि तुमाला त्या वस्तू मिळणार पण नाय तुम्ही फक्त पाच हजार रुपये दुपारपर्यंत आणून द्या. हा धोंड्या अशा वस्तू आणीन
यांना घरी घालवून लगेच पैसे घेऊन येतो पर पोराला आता काहीतरी गुण द्या महाराज पोराने खानं पिणं टाकलंय ----दिनकरराव काकुळतीने म्हणाले
तो दोन तीन दिवस असाच वागण पर काय बी काळजी करू नका म्या हाय.
असे म्हणून मांत्रिकाने पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर अंगारा लावला नि यांना या म्हणाला.
चौघांनीही मांत्रिकाला नमस्कार केला नि ते गुहेबाहेर पडले.--------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------दिवस मावळला, नि एक एक जण ती छोटी टेकडी चढून वर माथ्यावर यायला लागला. दिवसभराची कामं आटोपून सायंकाळच्या वेळेत मस्त गप्पा मारायच्या, हास्यविनोदात तास दीड तास घालवायचा असा ह्या मित्रमंडळींचा रोजचाच नियम. त्या नियमाला अनुसरूनच त्या छोट्या टेकडावर एक एक जण जमत होता.
टेकडी छोटीच होती पण तिच्यावर बसले कि सारं गाव दिसायचे. नदी, 'नदीकाठची हिरवीगार शेते पहात गप्पा मारताना दिवसभर केलेल्या कामाचा शीण कुठल्याकुठे पळून जायचा. आल्या आल्या त्यांची थट्टामस्करी चालू व्हायची. पण आज येणारा प्रत्येकजण गंभीर चेहरयानेच येत होता. त्यांचा अल्लडपणा, उत्साह , जोश सारे काही हरवलं होतं गावाला न्याहाळत सारे गप्पच होते.
हि शांतता शिवाला सहन होईना तो म्हणाला - आरं कुणीतरी बोला, आपण काय हिथं मुकसभा का काय म्हणत्यात ते घ्यायला आलो काय?
शिवा, रामा बोलला - आपण काय करून बसलो यार, कुठून बुद्ध्या सुचली नि त्या सदाला मसणात पाठवलं.
त्याला आपण कुठं जा म्हणलो, त्याचा आगाव पणाच त्याला नडलाय शिकल्याली अशीच हुकल्याली असतात.
जरी चूक सदाची होती, तरी गाव आपल्यालाच नावं ठेवतंय -निरंजन म्हणाला.
गावाला नावं ठिवायला काय जातंय त्यांना काय माहितीये आपल्यात काय झालं ते -शिवा चिडून म्हणाला.
मारणाराचा हात धरता येतो पण बोलणाराचे तोंड धरता येत नाही शिवा, सदा आपल्यातच बसत उठत होता म्हणल्यावर गाव आपल्याला जबाबदार धरणारच, आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे निरंजन म्हणाला.
आता आपण रे काय करणार निरंजन भाऊ -रामा म्हणाला.
सदा बरा होण्यासाठी काहीतरी खटपट केली पाहिजे.
पर काय, तो आजारी असता तर आपण त्याला दवाखान्यात घेऊन गेलो असतो. तो झपाटलाय म्हणल्यावर आपण काय करणार -शिवा
त्याला नक्की काय झालंय हे अजून कोणालाच माहित नाही.-निरंजन
अमावाश्येला रात्री बरा वाजता मसणात गेल्यावर काय होतं हे काय सांगायला पाहिजे का?-रामा
आणि आख्ख गाव म्हणतंय सदा लागीरलाय
गावाला बोलायला काय जातंय, ह्याचं त्याचं ऐकूनच नि मनाने त्यात वाढ करूनच गाव अश्या गोष्टी रंगवतंय मला नाही वाटत सदाला भूत वैगेरे दिसले असेल म्हणून.-निरंजन शांतपणे म्हणाला.
मग त्या दिवशी मसनातून तो पळत कशाला आला असता आणि भूत दिसले नसते तर तो एवढा घाबरला का असता -शिवा
आणि त्याचा बाप नि चुलता त्या गुहेतल्या मांत्रिकाकडे घेऊन गेले होते. त्या मांत्रिकाने सांगितलंय कि लय मोठ्या भूतानि झपाटलंय. आणि तो मांत्रिक दोन दिवसात सदाला बरा करणार आहे - आतापर्यंत गप्प बसलेल्या दत्ताने माहिती पुरवली.
मांत्रिकाकडे गेले म्हणल्यावर मांत्रिक त्यांना पाच सहा हजाराला थुका लावणार ......त्यांनी त्याच्याकडे जायला नव्हतं पाहिजे -निरंजन
आरं पर तो मांत्रिक लय पावरबाज हाये म्हणत्यात -रामा.
कसला पावरबाज नि कसलं काय उगाच लोकांना घाबरवून पैसे गोळा करत असतो.-निरंजन
बघू दोन दिवसात कळलंच मांत्रिकाचा गुण नाय आला तर आपणच काही तरी करू -शिवा
यावर सर्वांनी माना डोलावल्या.
जेवणाची वेळ झाली म्हणून ते सर्व टेकडी उतरून आपापल्या घराकडे निघाले.

रात्री बरोबर बरा वाजता श्यामरावांच्या दारावर टकटक झाली. त्या थोड्या आवाजानेही सदा घाबरून ओरडला. घरातले सगळे घाबरून जागे झाले व सदाच्या खोलीकडे धावत सुटले. खोलीमध्ये सदाला दिनकररावांनी पोटाशी धरले होते नि ते त्याला शांत करत होते. घरातले सगळे एकदम घ्ररात शिरले व काय झाले म्हणून विचारू लागले. त्यांच्या गलक्याने सदा अजूनच कावराबावरा झाला. त्याने दिनकररावांना गच्च धरले. त्याची अवस्था पाहून दिनकरराव सगळ्यांच्यावर कातावले.
आरे काय लहान्या पोरांवणी करता सगळे, पोर किती घाबरलय तुमच्या आश्या वागण्याने.
आवो पण काय झालंय ते सांगाना सदाची आई रडत म्हणाली.
वाहिनी काही झालेले नाही दार वाजवतंय कोणीतरी त्या आवाजाने हा घाबरलाय .......
दादा तू जाऊन बघ बर बाहेर कोण हाय ते , श्यामरावांकडे बघत दिनकरराव म्हणाले.
श्यामराव बाहेरून आले व बायांना म्हणाले- तुम्ही पोरांना घेऊन जा बरं आपापल्या खोलीत जरा महत्वाचं काम हाय.
बाया सगळी पोरं घेऊन आत गेल्या.
दिनकररावांनी प्रश्नार्थक नजरेने शामरावांकडे पहिले व काय म्हणून विचारले.
श्यामराव हळू आवाजात सांगू लागले .... राघू महाराजांनी उतारा घेऊन माणूस पाठवलाय.
इतका राच्चा हि काय येळ हाय का ?
हीच येळ हाय म्हणतोय तो -शामराव
बरं बरं ठीक हाय आणा त्याला मी सदाला दारात घेतो.

उतारा टाकून तीन दिवस झाले तरी सदामध्ये काही फरक पडला नाही. फक्त पहिले तो काही खात-पीत नव्हता नि आता बळे बळे चारल्यानंतर चार घास खायचा . बाकी अजून तो काहीच बोलत नव्हता.सारखा घाबरायचा. रात्रीचा घाबरून ओरडायचा व पळत सुटायचा.
दिनकरराव व श्यामराव हतबल झाले होते. मांत्रिकाने पाच हजाराला चुना लावला होता. पाच हजार जावूनही पोरात फरक काही झाला नव्हता. दोघा भावांना काय करावे ते सुचत नव्हते.
दिनकररावांनी सदाच्या कॉलेजला पत्र टाकून सदा आजारी असल्याचे कळवले होते. तो दोन महिने तरी कॉलेजला येणार नाही म्हणून लिहिले होते.

साडे चारची एस टी फाट्यावर थांबली. तिच्यातून तीनचार गावकरी उतरले व त्यांच्या पाठोपाठ ते तिघे तरुण उतरले. त्यांना पाहताच फाट्यावरील सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या. गावात पहिल्यांदाच दिसणारी हि तरुण पोरं कुणाकडे आली असतील हा प्रश्न सर्वांना पडला होता. उत्तरासाठी त्यांना जास्त वाट पाहायला लागली नाही. चहाच्या टपरीवाल्याला ती पोरं विचारात होती.
काका सदाशिव पवार कुठे राहतो.
टपरीवाल्याने त्यांच्याकडे चांगले खालीवर पहिले नि बाजूला पिचकारी टाकली आणि म्हणाला.
ह्या रस्त्याने सरळ जावा गावात शिरल्यानंतर पार लागल तिथं गेल्यावर कुणालाही विचारा बारीक पॉर सुद्धा नेऊन सोडीन तुम्हाला .....एवढं सांगून टपरीवाल्याने विचारले -
कोणच्या गावाचं पाव्हनं
काका आम्ही सदाच्या कॉलेजातले आहोत तो आजारी असल्याचे कळले म्हणून भेटायला आलोत.
बरं बरं जावा हाय घरीच तो.
त्या तिघांनी गावाचा रस्ता धरला

रात्री जेवण झाल्यानंतर सदाच्या खोलीत दिनकरराव, श्यामराव, सदाचे मित्र वैभव, स्वप्नील,आणि हेमंत हे बसले होते. सदाने त्यांना ओळखले नव्हते आपल्या मित्राची अशी अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटले होते. त्यांनी काय झाले हे विचारल्यानंतर दिनकररावांनी सारी हकीकत सांगितली होती.
काका तुम्ही त्याला शहरात घेऊन यायला पाहिजे होते. तिथे आपण चांगल्या डॉक्टरला दाखविले असते -वैभव म्हणाला.
पर बाळा तो काय आजारी नव्हता , डाक्तर क आणून काय झालं असतं तो तर लागीर्लाय नव्ह श्यामराव म्हणाले.
लागीरनं भूतं लागणे हे सर्व खोटे आहे काका, पिढ्यान पिढ्या चाललेल्या ह्या तुमच्या अंधश्रद्धा आहेत.
बघा पोराणु आम्ही अडाणी माणसं हा सदा सुद्धा तुमच्या सारखाच विचार करत होता. आणि त्या पायीच तो मसणात गेला नि हा उद्योग झाला.
ते काहीही असू ध्या काका पण आमचं तुम्ही ऐका त्याला डॉक्टरकडे घेऊन चला हेमंत म्हणाला.
डाक्तर काय करणार हाय असल्या केसला -दिनकरराव
काका नाहीतरी तुमच्या त्या मांत्रिकाने तरी काय फरक पडलाय ......काही नाही तुम्ही त्याला घेऊन आमच्या बरोबर चलाच स्वप्नील म्हणाला.
बरं बाबानु तुम्ही म्हनताय तर पाहू हा पिन उपाय करून

दुसऱ्या दिवशी दहाच्या एस टी सदाला घेऊन ते सर्वजण शहरात गेले-----

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

या अगोदर एक ते पाच भाग खूप छोटे छोटे झाले होते . व खूप उशीरही होत होता. वाचताना लिंक तुटू नये म्हणून हे सर्व भाग एकत्र टाकले आहे. ६वा भाग वेगळा टाकला आहे

धन्यवाद, कौतुक.
बर्याच दिवसापुर्वचि कथा वाचल्याबद्दल नि परखड प्रतिसादा बद्दल

सुरुवात केली आणि एका दमात संपवुन टाकली. जागेवरुन हलुन दिले नाही.
डोळ्यासमोर गाव उभा केला.
फारच छान.