किल्ली

Submitted by वैशाली अ वर्तक on 21 December, 2011 - 11:26

किल्ली

काय वैताग आणलाय या किल्लीने! सळो की पळो करुन सोडले. एवढी छोटीशी वस्तू पण
जर व्यवस्थित जागी ठेवली नाही की झाले. खरच म्हणतात ना गरजेच्या वेळी वस्तू व नोकर मिळाले तर स्वर्ग लाभल्याचा आनंद मिळतो. पण छे कुठले काय? इतके कुठले भाग्य? कुठे ठेवली गेली काय माहित नाही. सकाळी बँकेत जाताना कायनेटिकची किल्ली मिळाली नाही त्या वेळीस
डूप्लीकेट किल्लीचा वापर करुन बँकेत उशीर होत असल्याने वेळ निभावली. बरे झाले ती डूप्लीकेट
किल्ली तरी मिळाली. नंतर बँकेत पोहोचल्यावर टेबलाची किल्ली पर्स मध्ये असून दिसत नव्हती.
त्यामुळे तेथे किल्लीने त्रास दिला. संध्याकाळी घरी आल्यावर मंडळाच्या मिटींगला जावयाचे होते, पण मागच्या मिटिंगचे मिनिट्स लिहावयाची डायरी ज्या कपाटात ठेवली होती, त्या कपाटाची किल्ली मुलाने कोठे ठेवली, तीन मिळाल्याने शेवटी मिनिट्स पुन्हा लिहून काढण्याचा खटाटोप करावा
लागला. अशा रीतीने आज मिराची किल्ली या वस्तूने मानसिक स्थिती पार बिघडवली होती.
वैतागून मीरा झोपली .
मीराला झोप लागली. थोड्याच वेळात काय गंमत! दिवस भरात न मिळालेल्या किल्ल्या
मीराला वाकुल्या दाखवित होत्या. व नाचत होत्या .त्यातील कपाटाची किल्ली तर म्हणत होती
काय ग का वैतागता आम्ह्या सारख्या निर्जीव वस्तूंवर ? आम्ह्मी तर तुमच्या सुखसोयीसाठी आहोत.
तुमच्या वस्तू, घर,वहाने यांच्या सुरक्षिते साठी आहोत. स्वत: नीट व्यवस्थित तुह्मीच आमच्या नियत केलेल्या जागी ठेवा .बस.रहा की मग निर्धास्त होवून . आमच्यावर भरवसा ठेवून जगभर ,देशभर ,गांवभर हिंडता .कुलूप नीट लावून दोन दोनदा ओढून खेचून बंद केले ना याची
खात्री करता पण मग निर्धास्त होवून आह्मास पर्स मध्ये कपाटात वा इतर नियत जागी जपून ठेवा ना ! म्हणजे वैतागावे लागणार नाही .
आमची ऐटच आहे तशी.घराशी आल्या आल्या प्रवेश करताना आमची प्रथम आठवण होते.घरात शिरताच डाव्या अथवा उजव्या हाताला आमच्यासाठी आकर्षक घरे बनवून आमची जागा केली
असते. बाहेर जाता तेह्वा पर्स मध्ये व खिशात अगदी हृदयाशी जपून ठेवता .आमची रूपे अनेक पण काम
मात्र एकच मानव जातीची सेवा करणे .तुमच्या वस्तूंचीनीट काळजी घेणे .त्यांची सुरक्षितता राखणे .
आह्मी तुमच्या सेवेला विविध ठिकाणी हजर असतो .तुमच्या वहानांची सुरक्षितता जपतो .त्यामुळे तुह्मी
धावपळीच्या जीवनात वेळेवर पोहचता .एवढेच काय घरातील कपाटे बँकेच्या लोकरच्या किल्ल्या ,बाहेर
गांवी जाताना सुटकेस ची किल्ली,ऑफिसेसच्या किल्ल्या ,अश्या अनेक ठिकाणी आह्मी तुमच्या सेवेला
हजर असतो .
नवीन लग्न झालेल्या मुल्लीना कपाटाच्या किल्ल्या सासूबाईंनी सांभाळण्यास दिल्या आहेत
हो! म्हणत चांदीच्या छल्ल्यात आह्माला अडकवून कंबरेस लावून मिरवतांना मनात आनंद वाटतो ,पण
जवाबदारी पेलणे जमावे लागते .
लहान मुलांना आनंद देण्याच्या ठिकाणी पण आह्मी आहोतच .किल्ली दिली की चालणारी
खेळणी तेथे पण आमच्याच किल्ली बिरादरीतील किल्लीच असते. जिच्या सहाय्याने खेळणी
चालतात. गाड्या धावतात, बाहुल्या नाचतात ,कुत्रे उड्या मारतात अश्या अनेक खेळण्यात आह्मी
असतो पण त्या खेळण्याच्या किल्ल्या म्हणजेच आमचीच बदलती रूपे आहेत . हीं बदलती रूपे तुह्मी जपली नाहीत तर ती खेळणी निरुपयोगी होतात .आमचे काम एकच तुह्माला आनंद देणे,तुमची
सेवा करणे.
हाश हुश करत ऑफिस मध्ये जाऊन टेबलाजवळ येता व प्रथम आठवण होते ती
आमचीच समोर आवासून पडलेले काम पाहून पर्समध्ये भिरकवलेली किल्ली नाही मिळाली
की जीवाची तडफड करता .पण आधीच योग्य जागी ठेवाना !.
आह्मी जाणतो सध्या धावपळीच्या युगात तुह्मा मानवावर कामाचा ,तसेच जवाबदारीचा खूप
ताण पडत आहे. दिवस भराच्या दगदगीत जीव थाकतोय पण आह्मी निर्जीव वस्तू करणार तरी काय?
आह्माला वाचा नाही .वाचा असती तर ओरडून आह्मी कोठे आहोत.हे तुह्मास सांगितले असते. पण
आह्मास तुह्मी मानवानी या विज्ञान युगात वाचा दिली आहे . त्यामुळे कधी कधी आह्मी चमकून,
प्रकाशित होऊन वा आवाजाने आह्मी आमचे वास्तव्य कोठे आहे ते दर्शवितो .
आह्मास अडकविण्यासाठी कंपन्या ,बँका,मेडीकॅल कंपन्या सर्व जण त्याच्या जाहिरातीसाठी
कीचेन काढतात त्यात आह्मास विराजमान करतात. कुलूमहाशयांचे बरे असते एका जागी बसून
लटकून रहातात. त्यांना आह्मीच बंद करून स्थगित करून ठेवतो.त्यामुळे त्यांना शोधण्याचा
फार त्रास नसतो.
अरे हो ! कुलूप वरून आठवण झाली. पुर्वी रामराज्यात म्हणे चोऱ्या होत नव्हत्या. त्यामुळे आमचे महत्व कमी होते. आज पण शानिशिन्गानापूर म्हणून गांव आहे. तेथे म्हणे
कोणीच घरादारांना ,वाहनांना, दुकानांना कुलुपे लावत नाहीत तेथे पण आमची उपस्थिती
कमी जाणवते.फार पुर्वी पासून भारतात अलीगडला आह्मास बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. तेथील कुलूप-किल्ल्या जगभर प्रसिद्ध आहेत. तसेच कित्येकांना कुलूप- किल्ल्यांचा संग्रह करण्याची पण आवड असते बरे का ! पुण्याला केळकर म्युझियम मध्ये तसेच हैद्राबादच्या सालारजंग
म्युझियम मध्ये आमचे विविध आकार, विविध रूपे अगदी जुन्या काळापासूनच्या कुलूप - किल्ल्या दिसतील
आमच्यात पण एक ताई किल्ली असते . जिला मास्टर किल्ली म्हणतात.
आमच्यातील कोणी एक उपस्थित नसेल तर ती सर्वांचे काम करते. असो. अर्थात आह्मी निष्ठेने सेवा करतो पण आह्मी सज्जन माणसांसाठी आहोत. दुर्जन ज्यांची वृतीच खराब
त्याच्या समोर आमचे काय चालणार ? तेह्वा तशा वृत्तीची माणसे कुलुपावर अत्याचार करून
आमच्या शिवाय तुमच्या सुरक्षितेत बाधा आणतात .त्याला आमचा नाईलाज असतो.
कॉम्पुटर युगात पण आमची भौतिक नाही पण सांकेतिक चिन्हांनी आमचे अस्तित्व आह्मी ठेवले आहे. तेथे आमची आकार विरहित शाब्दिक रूपे आहेत. साहित्यात पण आह्मास सुविचारात
वापर करतातच की,"परिश्रम हीच यशाची गुरु किल्ली"आहे.
आणि हो !एवढेच काय ! जीवनात सकारात्मक भावना अथवा विचार ठेवले की जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलते .व यशस्वी आयुष्य जगता येते .तेह्वा आयुष्याच्या यशाची गुरु किल्ली कळली की सर्व कसे
निर्मल आनंददायी वाटते .ही किल्ली ज्याला मिळाली तो सुखी होतो. तेह्वा आमच्या सामान्य नामी किल्ली या शब्दात पण किती गूढ रहस्य आहे .

तेह्वा मीरा उठ. उगाचच वैतागून झोपलीस.वेंधळ्यासारखी वागल्याने उगाच त्रागा केलास. नीट पहा मी जागच्या जागी व्यवस्थित आहे .

गुलमोहर: