त्यांचा बालदिन कधीच साजरा झाला..

Submitted by झुलेलाल on 14 November, 2011 - 22:21

त्यांचा बालदिन कधीच साजरा झाला..

जवळपास दीड वर्षांपूर्वी आनंदकुमारने आपलं बिहारमधलं घर सोडलं, आणि तो पळून मुंबईत आला. तेव्हापासून तो रस्त्यावरचं आयुष्य जगत राहिला, आणि तिकडे बिहारमध्ये, आनंदकुमारचं सुखवस्तू कुटुंब त्याच्या काळजीनं दिवसागणिक खंगत राहिलं. त्याच्या डॉक्टर वडिलांनी दीड वर्ष त्याचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडलं, आणि मुलगा सापडत नाही असं निश्चित झाल्यावर, आपला मुलगा या जगात राहिला नाही, अशी समजूत करून घेतली.. त्या कुटुंबाचं जगणंही या समजुतीबरोबर दिवसागणिक जळत राहिलं..
.. आठदहा दिवसांपूर्वी अचानक त्या घरात एक पत्र पडलं. डॉक्टरांनी ते फोडलं, आणि वाचतावाचताच त्यांचे डोळे वाहू लागले. आपला मुलगा जिवंत आहे, आणि सुखरूपदेखील आहे, लवकरच तो आपल्याला भेटणारही आहे, या जाणीवेनं त्यांना आकाश ठेंगणं झालं. त्यांनी ही बातमी घरात सांगितली, आणि आनंदकुमारच्या घरातली कोमेजलेली दिवाळी पुन्हा उजळली. घरात रोषणाई झाली, आणि फटाक्यांचीही आतषबाजी झाली.. लगोलग ५ नोव्हेंबरला त्याचे आईवडील मुंबईत दाखल झाले.
गेल्या आठवड्यात, ठाण्याला एका कार्यक्रमात अखेर आनंदकुमार आणि त्याच्या आईवडिलांची भेट झाली. तब्बल दीड वर्षांची ताटातूट संपविणारा तो क्षण अनुभवताना कार्यक्रमाला हजर असलेले दोनशे ठाणे-मुंबईकर अक्षरश भारावून गेले, आणि सभागृहात अश्रूंची फुले ओसंडून वाहू लागली. कुठल्यातरी क्षुल्लक कारणावरून घरातून पळालेल्या आनंदकुमारचं मन परिवर्तन झालं होतं, आणि आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी, आईच्या कुशीत शिरण्यासाठी तोही आसुसला होता. कार्यक्रम सुरू झाला, आणि अचानक आनंदकुमारला समोरच्या गर्दीत आपले आईवडील दिसले.. त्याच्या आईलाही मुलाचा चेहरा दिसला, आणि तो क्षण अक्षरश थिजला. दोन हुंदके सभागृहात अनावरपणे घुमले, आणि नंतर सारे सभागृहच अश्रूधारांनी चिंब झाले..
बालदिनाचा एक अभूतपूर्व सोहळा एक आठवड्याआधीच ठाण्यात साजरा झाला..
मुंबई-ठाण्याच्या रेल्वे स्थानकांवर दररोज घरातून पळून आलेली असंख्य मुले उतरत असतात. मुंबईला उतरल्यावर इथल्या जगण्याचा संघर्ष त्यांनाही छळू लागतो, आणि घरातल्या सुखी जगण्याची सवय लागलेली ही मुलं पहिल्यांदा गर्दीसमोर हात पसरतात. दिवसभर केविलवाण्या चेहऱ्यानं भीक मागूनही पोटाची भूक भागविण्यापुरेसा पसा मिळाला नाही, तर अन्न खाण्याऐवजी अंमली पदार्थ खातात, पितात, किंवा हुंगतात, आणि पोटाशी गुडघे घेऊन नशेत कुठेतरी फलाटाच्या कोपऱ्यावर झोपून जातात. या मुलांना समाजकंटकांपासून वाचविण्याचं, त्यांना आपली चूक उमगावी यासाठी प्रयत्न करण्याचं आणि पुन्हा आपल्या घरट्याकडे आईच्या सावलीत पाठविण्याचं काम करणाऱ्या समतोल फाऊंडेशननं आतापर्यंत अशी अनेक चुकलेली पाखरं पुन्हा घरट्यात परत पाठवली आहेत.
गेल्या आठवड्यात अशीच ४० मुलं आपापल्या आईवडिलांकडे परत गेली. ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमाचे साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांना या सोहळ्याने एका सामाजिक समस्येचे भीषण रूप समोर उभे केले, आणि आईवडिलांचे, कुटुंबांचे छत्र पुन्हा सापडलेल्या त्या ४० जणांनी त्याच दिवशी बालदिन साजरा केला.. बिहारच्या आनंदकुमारप्रमाणेच, काही मुलांचे आईवडील, नातेवाईक अमरावती, भोपाळ, राजस्थानातूनही आले होते. गुजरातमधला राकेश सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला, आणि त्याच्या काळजीनं खंगत खंगत त्याच्या वडिलांनी तिकडे जगाचाच निरोप घेतला. समतोलच्या मनपरिवर्तन शिबिरामुळे राकेशच्या मनात घराची ओढ पुन्हा जागी झाली, पण तो घरी परतला, तेव्हा त्याला प्रेमानं कुरवाळायला त्याचे वडील तिथे नव्हते..
राकेश मुंबईला समतोलच्या शिबिरात आहे, आणि त्याला घरी यायचंय, असं पत्र त्याच्या घरी पोहोचलं, तेव्हा त्याच्या वडिलांच्या मृत्यूनं खरं तर त्याचं घर काळवंडलं होतं. हे पत्र मिळताच, त्या दुखालाही आनंदाचे धुमारे फुटले आणि राकेशच्या घरातल्या काहीजणांना सोबत घेऊन गावातली १५ माणसं खास जीप भाड्याने घेऊन ठाण्याला दाखल झाली. त्या सोहळ्यात त्यांना राकेश भेटला, तेव्हा बालदिनाचा सोहळा हाच असला पाहिजे, याची खात्री उपस्थितांनाही पटली..
समतोल फाऊंडेशनच्या कल्याणजवळील मामनोली येथील मनपरिवर्तन शिबिरात अशा रस्त्यावरच्या अनेक मुलांना मायेची पाखर मिळते, प्रेमाची ऊब मिळते आणि मुख्य म्हणजे, डोक्यावर सावली देणारं छफ्पर मिळतं. फलाटावरच्या आयुष्याची चटक लागलेली काही मुलं कधी लगेचच माणसात यायला राजी होत नाहीत. मग समतोलचे कार्यकत्रे त्यांचे आईवडील, भाऊ-बहीण होतात, आणि त्यांना माणसाची माया लावतात. मग ही मुलं हळवी होतात. असा एखादा क्षण पकडून हे कार्यकत्रे त्याच्या घराच्या आठवणी जाग्या करतात, आणि ते मूल घराच्या ओढीनं आसुसतं. कधी एकदा आईवडिलांना, दुरावलेल्या भावंडाना, आणि गावातल्या हुंदडणाऱ्या मित्रांना भेटतो, असं त्याला होऊन जातं. नेमकी ही स्थिती आली, की समतोलचं पत्र त्यांच्या घरी थडकतं, आणि मुलांना आईवडिलांकडे सोपविण्याचा आनंद सोहळा साजरा होतो.
.. समतोलमध्ये उद्याचा बालदिन कसा साजरा होणार, या उत्सुकतेपोटी संस्थेच्या विजय जाधव यांना फोन केला, तेव्हा तसं काहीच ठरलं नाही असे ते म्हणाले. कदाचित, उद्या, नेहमीप्रमाणे संस्थेचे कार्यकत्रे रेल्वे स्थानकांवरच्या मुलांना एकत्र करतील, त्यांच्याशी गफ्पा मारतील,त्यांच्या वेदना जाणून घेतील, आणि जमलं, तर त्या हलक्या करण्यासाठी हात देतील.. पण हा तर नेहमीचाच कार्यक्रम असतो. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच बालदिन साजरा होतो, असे विजय जाधव म्हणाले. ..
--------------------
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=193...
---------------------
http://zulelal.blogspot.com/

गुलमोहर: 

श्री विजय जाधवांकडून नेहमी या व अजून काही शिबिरांची निमंत्रणं आवर्जून येतात पण अजून जाणं झालं नाहिये. एकदातरी नक्की जाईन Happy