पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम

Submitted by शिवंजय on 18 July, 2011 - 12:12

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही.

तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात. अगदी शंकराचार्यांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, विवेकानंद यांनी ते केलेले आहे. पुष्कर मेळा, गंगासागर, कुंभ मेळे, नैमिषारण्य मेळा,गंगासागर मेळा हे प्रमुख मेळावे आजही लाखोंच्या उपस्थितीत साजरे होतात. हे सर्व मेळावे याची देही याचीडोळा पाहून मी तृप्त झालेलो आहे. पण या सर्वात अद्वितीय, अद्भूत व अविस्मरणीय ठरतो तो आषाढी एकादशीला भरणारा पंढरपूरचा मेळा व वारी, जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी 'अनुभवावी'.

वारी म्हणजे देहू-आळंदी पासून पंढरपुरापर्यंत विठ्ठलनामसंकीर्तन करीत करीत २६० कि.मी.चा केलेला पायी प्रवास.याला सातशे वर्षांची अगाध परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी तेराव्या शतकात वारी केल्याचा उल्लेख आढळतो. निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांसह वारी केल्याचा उल्लेख आढळतो. जगद्गुरू तुकाराम महाराजही पंढरीची वारी करत असत. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण यांनी ती परंपरा चालू ठेवली.त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असे.ही पालखी ज्ञानदेव व तुकोबा यांच्या पादुकांसह पायी,बैलगाडी,हत्ती-घोडे,अंबारी अश्या भव्य विलोभनीय लव्याजम्यासह मोठया दिमाखात जाई.१८६० नन्तर काही कौटुंबिक कारणांमुळे देहू व आळंदीच्या पालख्या विभक्तपणे जाऊ लागल्या.हत्ती घोडे यांचा लवाजमा कमी कमी होऊ लागला; अश्या वेळी "हैबतबाबा" यांनी पालख्यांना पुन्हा एकदा शिस्त व वळण लावले. शितोळे सरकार यांच्यातर्फे वारीच्या व्यवस्थेची व घोडयांची व्यवस्था केली गेली ती परंपरा आजपर्यंत चालू आहे.वारीच्या रिंगणातील दोन घोडे हे शितोळे सरकारांच्या घराण्याकडून आजही येतात.वारीतील आजची शिस्त,भक्तीभाव,एकरूपता,निश्चलता,सौहार्द,समर्पण आणि शरणागती याचे सर्व श्रेय हैबतबाबांना जाते म्हणून आजही आळंदीस देवळात त्यांची पायरी आहे.प्रथम त्यांना नमस्कार होतो आणि मग ज्ञानोबांना. पंढरीला जसा नामदेवांना मान आहे तसा आळंदीला हैबतबाबांना आहे.म्हणूनच आजही वारीच्या रथापुढील पहिली दिंडी हैबतबाबांची असते.
१९३२ पासून देहू व आळंदीहून वेगळ्या पालख्या निघतात. ज्ञानोबांची पालखी पुणे,आळंदी,सासवड फलटण मार्गे सोलापुरात येते तरं तुकोबांची इंदापूर मार्गे वाखरीला त्या एकत्र येतात. ४० वेळा हिमालय पदभ्रमण, सप्तकैलास, २६ वेळा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करूनही मला कधी पंढरीची वारी करता येईल असा विचारही आला नाहीं पण नर्मदा प्रदक्षिणा करताना आमचे ज्येष्ठ मित्र श्री साठे यांच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे मला तो योग लाभला व मी वारीसाठी शेडगे पंचमंडळीच्या देशमुख दिंडीत नाव नोंदवले आणि माऊलीची अनन्य कृपा बघा सहसा कधी कुणाच्या घरी न जाणारा मी आमची मैत्रीण श्रीमती कुलकर्णी यांच्या घरी मुक्कामास गेलो आणि लक्षात आले की ते मूळचे पंढरपुरचे व त्यांच्या घरी माझ्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले गेले ते पायी चालण्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरले. अशा रितीने माउलींनी माझी पूर्वतयारी करवून घेतली.

श्री.कै.केशवराव देशमुख महाराज ९-१-१८७७ ते २७-४-१९४२ जे ज्ञानेश्वरी (एम.ए.ज्ञानेश्वरी विषय घेऊन ) चे गाढे उपासक व प्रवचनकार होते.त्यांच्या प्रवचनाला तुडुंब गर्दी होत असे. त्यांची समाधी आजही पुण्याच्या ओंकारेश्वराच्या देवळात आहे व आजही त्यांच्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीने ७० वर्षानंतरही ही दिंडीची प्रथा सुरु आहे.
यांची दिंडी रथापुढे ४ थी असते तर सर्व दिंड्या दोन गटात असतात (अ)रथापुढे व (ब) रथामागील दिंड्या. रथापुढील दिंड्या या मानाच्या म्हणून प्रसिद्ध आहेत व त्या क्रमाने रथापुढे (एकूण २४) नामगजर,हरीपाठ भजन म्हणत चालतात त्यांच्या पुढे २४ व्या दिंडीपुढे शितोळे सरकारांचे घोडे व त्यांच्यापुढे आळंदीचा नगारा असतो. त्या रथामागे जवळ जवळ २०० च्या वर दिंड्या सामील असतात. जगनाडे महाराजांची दिंडी साधारणपणे सर्वात शेवटी असते.

पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय,अवर्णनीय,अतुल्य व अद्भूत असते कारण; लाखो लोक कोणताही सांगावा अथवा निमंत्रण न देता भक्तिभावाने वारीत सामील होतात. कित्येकजण वर्षानुवर्षे वारी करतात.

बाबामहाराज सातारकर लहानपणापासून

आज ७७ वर्षे वारीत सामील होतात. २००८ जूनला बायपास होऊनही त्यांनी वारी चुकवली नाही. एकदा आई आजारी असताना वारी सोडून जायचे नाही म्हणून त्यांनी आईला वारीच्या ठिकाणी बोलावणे धाडले. असे अनेक जण वारीची कौटुंबिक परंपरा पाळणारे आहेत.मला मात्र नेहमी लहानपणी वाटायचे की मी मोठा होईपर्यंत हे पांढरे कपडे टोपीवाले राहारणार नाहीत पण आजही स्वच्छ पांढरे कपडे घातलेले लाखो लोक वारीत सामील होतात नव्हे त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज सुशिक्षित,उच्चशिक्षित भाविकही वारीत सामील होतात,दिसतात व पर्यटन आदी संस्थांचे कार्यकर्ते पण स्वच्छता अभियानवाले त्यांच्या दिंड्या काढतात.

वारीची पहिली सार्वजनिक जागतिक पातळीवरील नोंद B.B.C ने घेतली. त्यानंतर 'पंढरीची वारी' हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला. आज अनेक परदेशी वारकरी पण वारीत सामील होतात. एकानेव आईनाकोवा या जपानी महिला वारकरी गेली ३५ वर्षे वारी करीत आहेत. नव्हे तो एक अभ्यासाचा विषय झाला आहे. मी स्वतः व्यवस्थापनाच्या (MANAGEMENT) च्या विद्यार्थ्यांना व INTERNATIONAL BUSINESS FINANCE/TRADE च्या विद्यार्थ्यांना वारी,कुंभमेळा यांचे व्यवस्थापन,तंत्रज्ञान (MANAGEMENT TECHNOLOGY)व TRADE POTENTIAL यावर सतत PROJECT घेतले आहेत. वारीचे व्यवस्थापन हा खरोखरीचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. आज आषाढीस दिंडीत जवळ जवळ १० लाख वारकरी वय, जात-पात,लिंगभेद,दर्जा,हुद्दा न मानता पंढरपुरी येतात त्यापैकी २-३ लाख वारकरी पाऊस-पाणी,ऊन-वारा इ.गैरसोईची तमा न बाळगता, कुठल्याही सांगाव्याशिवाय वारीतून पायी पंढरपुरास येतात आणि तेही दरवर्षी न चुकता.सगळ वातावरण विठ्ठलमय झालेले असते

विठ्ठल नामाची शाळा भरली i
शाल शिकताना तहानभूक हरली i i असे वातावरण असते

आजच्या जमान्यातील हे सर्वात मोठे आश्यर्य नव्हे का? कारण आज बोलावूनही कोठे उपस्थित राहण्याची मानसिकता जनसामान्यांच्यात तर नाहीच पण वेळही नाही. राजकीय मेळावे तर पैशांचा पाऊस पाडून

व स्वार्थासाठी (सर्वसाधारणपणे) भरवले जातात. आज १००- २०० चा समूह नियंत्रित करणं कठीण जात आहे.हिमालयातील बद्रीनाथ येथे रात्री शृंगार उतरविताना पाहणाऱ्या १०० माणसांवर नियंत्रण करणं कठीण जात. १०-१२ पट्टेवाले असूनही ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शृंगार उतरवताना व निर्वाण दर्शन घेताना भांडताना मी अनेकवेळा पहिले आहे. त्याउलट वारीत अनेक लाखो वारकरी शिस्तीत टाळ मृदुंग वाजवीत ४-४ च्या समूहाने एकामागे एक चालत असतात. इतरवेळी अरेरावी करणारे पोलीसही त्यांना ''माउली'' म्हणून संबोधतात. आज माझ्यासोबत सहलीला येणार्यांपैकी काही जण राहण्याची व्यवस्था, बाथरूम ( की ज्याचा १० मिनिटांवर वापर केला जात नाहीं) बघून राहायचे की नाहीं हे ठरवतात त्याचवेळी एका बाजूला लाखो वारकरी मिळेल तेथे आंघोळ करतात, कपडे धुतात व अंगावर, पाठीवर वा हातात घेवून चालत असताना वाळवतात. मिळेल तिथे नाहीतर रस्त्यावरच दुपारचा रात्रीचा विसावा घेतात दिवसा व संध्याकाळी मुकाम्मी काहीजण भजन कीर्तन करत दंग असतात तर काही स्वयंपाक करून पंगतीच्या व्यवस्थेत दंग राहतात.काहीही कटकट न करता स्वतःहून हे सर्व करतात. यावर्षी 'सदाशिव नगर' येथील रिंगण अर्धवट झाल्यामुळे बाहेर पडण्यासाठी दोन तीनच गेट असलेले मैदान आता POLICE FIRE व जनरल डायर नसूनही जालियनवाला shaबाग होतो की काय अस वाटत असतानाच कुठेही शिवीगाळ , भांडण, धक्काबुक्की न करता शांततेने सर्वजण एकामागोमाग बाहेर पडले. त्या दिवशी तर जेवणाचे सामान असणारे ट्रक आकस्मिक पोलीस वाहतूक, पोलीस नियंत्रणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत म्हणून हजारो वारकरी भुकेले राहिले तरीही कोणीही तोंडातून 'ब्र' काढला नाही. हे सर्व अद्भूत, अद्वितीय नाही का? वारीतील लोक एकमेकांना ''माउली''

म्हणून संबोधतात. त्यांना कोणतेही व्यसन नसते. (हल्ली आधुनिक युगानुसार काही तंबाखू , गुटका खाणारे तुरळक आहेत त्या साठी व्यसनमुक्त दिंडीही निघते). एकंदरीत कुठलातरी unwarranted, uncontrolled hand of discpline आहे हे जाणवत . स्वशिस्त (self discipline) सौहार्द , सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या षटसुत्रींवर हे सर्व चालते व ती कुणीही कुणावरही लादत नाही.

Economics मधील आदर्श बाजार स्पर्धेतील (perfect competition ) मधील invisible hand व त्याचे आपोआप (automatic ) घडणारे कार्य, कुठल्याही बाजारी स्पर्धेशिवाय येथे प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळते आणि हा automatic force निर्माण होतो तो अध्यात्म व भक्तीभाव व पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचे प्रतिक म्हणून प्रतिष्ठीत पावलेल्या विठोबाच्या दर्शनाची नव्हे मुखदर्शनाच्या अथवा कळस दर्शनाच्या ओढीमुळे. अशिक्षित, अज्ञान वारकऱ्यांची आध्यात्मिक जाण व ज्ञान आजकालच्या सत्संगाच्या नावाखाली fashion म्हणून अभ्यास करणाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे.

आज हजारो ट्रक, ३-४ हजार ST बसेस, water tanker चहावाले, चांभार, कपडेवाले, फळ विक्रेते, गंध लावणारे यांच्या उदरनिर्वाहाचा व बाजारी संपत्ती निर्माण करण्याचा स्त्रोत वारी आणि कुंभ मेले आहेत हेही लक्षात घेणे इष्ट. निदान त्यांचे व्यापारी potentials जाणून घेणे महत्वाचे. हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी balet paper चे गणित मांडणाऱ्या राजकीय आणि शासकीय संस्थांनी वारीतील सार्वजनिक व्यवस्थापन, सुधारण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे. शासनाची एकच mobile lavatory दिसली ती पण वाल्हे गावानंतर गायब झाली. लाखोंच्यासाठी कमीत कमी ५०-६० mobile lavotary , पाणी व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन होणे महत्वाचे व अत्यंत गरजेचे आहे. पाणी, खाद्यवाटप यात दिंडी व्यवस्थापक व सार्वजनिक संस्थाच अधिक आहेत.
अशा या वारीत मात्र सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे शिरवळकर भेटले. ते गेली ७ वर्षे आज १०७ वर्षे वय असलेल्या आपल्या आईला खांद्यावर घेऊन वारी करीत आहेत. त्यांचे म्हणणे आजच्या पिढीला मातापित्याचे महत्व लक्षात यावे म्हणून मला पांडुरंगाने दृष्टांत दिल्यामुळे मी हे करीत आहे.
आणि मग लक्षात येते ते हे की पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णु पंढरीत प्रकट झाले. देवापेक्षाही मातृपितृ सेवेला प्राधान्य देणाऱ्या पुंडलिकासाठी युगानुयुगे डोक्यावर शिवलिंग धारण करून कोणतेही शस्त्र हाती न घेता फक्त शंख हाती घेवून २८ युगे विष्णु विठ्ठल म्हणून उभा आहे. पंढरपुरातील विठोबाचे अवतरणे हेच मातृपितृभक्तीचे प्रतिक आहे हे आजच्या पिढीतील सलमान, रितिक रोशन आदर्श मानणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक करणाऱ्या पालकांनी लक्षात घेणे व तसे मूल्यशिक्षण पाल्यांना देणे महत्वाचे आहे. गणपतीलाही प्रथम पूजेचा मान आहे तो त्याच्या त्याने केलेल्या आई वडिलांच्या सेवेमुळेच .आज शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रावणबाळ, पुंडलिकाच्या आदर्शाचे मूल्य शिक्षण देणे व तेही सहजपणे उपदेशाचे डोस न पाजता होणे महत्वाचे आहे. आजच्या पिढीला पुंडलिकाचा इतिहास ज्ञात असणे महत्वाचे आहे , कारण तोही आजच्या पिढीतील बहुतांश तरुणासारखा मातापित्यांना धिक्काराणारच होता हे फार थोड्यांना माहीत असावे. त्यास कुक्कुटेश्वाराच्या देवळात (काशी \ पिठापूर येथील ) गंगा यमुना सरस्वती या त्रीदेविनी देवतांच्या साक्षात्कारासाठी मातापित्याच्या महत्वाची जाणीव झाली व पंढरपूरच्या विठोबाच्या अवतरण्याचा इतिहास रचला गेला. एवढे जरी आजच्या पिढीच्या लक्षात आले तर,'' IT IS NEVER TOO LATE ''चा विचार करून मातापित्यांची सेवा करण्याची बुद्धी व कार्य व्हावे. कारण आजचे तरुण हे उद्याचे मातापिता व जेष्ठ नागरिक होणार आहेत व ''पेरिले तेच उगवते'' या न्यायाने त्यांनी योग्य पेरणी करावी म्हणून हा लेख प्रपंच.

गुलमोहर: 

>>मी स्वतः व्यवस्थापनाच्या (MANAGEMENT) च्या विद्यार्थ्यांना व INTERNATIONAL BUSINESS FINANCE/TRADE च्या विद्यार्थ्यांना वारी,कुंभमेळा यांचे व्यवस्थापन,तंत्रज्ञान (MANAGEMENT TECHNOLOGY)व TRADE POTENTIAL यावर सतत PROJECT घेतले आहेत. <<
याबाबत अधिक माहिती जाणुन घ्यायला आवडेल.

माझ्या मते, वारीचं सातत्य व वाढती लोकप्रियता या मागे परंपरा आणि आध्यात्म हे दोन प्रमुख ड्रायविंग (मोटिवेटिंग) फोर्सेस आहेत. भक्तिमार्ग आणि आधुनिक व्यवस्थापनाची तत्वं याची सांगड तुम्ही कशी घातली, हे वाचायला उत्सुक. (मात्र, पंढरीची वारी, कुंभमेळे हे "इव्हेंट मॅनेजमेंट" साठी उत्तम उमेदवार (इकॉनॉमिकली व्हायेबल?) आहेत असं तुमचं मत असेल तर गोष्ट वेगळी. )

पूर्वा कुळ्कर्नि
प्रिय संजय सर यांस ,

लेख फारच सुंदर आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा महान आहेतच. वारी बद्दल ची बरीच माहिती मिळाली. वारी चा इतिहास कळला. मानाच्या दिंड्या व त्यांची management great आहे. लाखो लोकं भक्ती भावाने कुठचीही कुरबुर न करता वारीत सामील होतात, त्यापाठी त्यांची श्रध्दा व विठ्ठल च आपला तारक आहे हि भावना आहे.

तुम्ही दिलेले Economics मधील perfect competition चे example आवडले. खर आहे आजकाल सत्संग च्या नावाखाली fashion तर करतातच.व लुटारू पणा पण खूप आहे. मी एका ठिकाणी संत बाबांकडे गेले होते (नाव देत नाही) तिथे कुंकवाची छोटी डबी Rs .१५०/- व पाठी लागून घ्याच म्हणून आग्रह करत होते. मी इतकी irritate झाले त्या बाबांना न भेटताच परत आले.

वारकरी लोकांमध्ये इतकी शिस्त, सहकार्य, सहनशीलता आहे तर शासकीय मदत तर पाहिजे परंतु private सेक्टर , मोठे trust किव्हा चांगले sponserer यांनी लोकाची सेवा केली पाहिजे. for ex एका चांगल्या bakery ने चहा बरोबर biscuits चे stall ठेवायचे. त्यांची add तर होईल व पुण्य पण पदरी पडेल. स्वच्छता तिथे परमेश्वर . मुलभूत सेवा उपलब्ध हव्यातच.

तुम्ही लिहिलेले अनुभव सुद्धा खूप मनाला भिडतात. जाता जाता दिलेले उपदेश हि चांगले आहे. पुंडलिकाची मातृपितृभक्ती अगाध होती. म्हणूनच भगवान विठ्ठल त्यांच्या भेटीस आले. माता पिताना देवा समानच मानले पाहिजे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे खरे आहे. पित्याचे छप्पर डोक्यावर असल्यावर अन्यायाविरुद्ध लढायची सुद्धा ताकद येते.

सर, लेख खूप खूप आवडला. उत्कृष्ट भाषा , clear थिंकिंग . तुमचे विचार पटले.

पूर्वा कुळकर्णी

खूप चांगला लेख आहे हा. मनापासून लिहीलेला. आवडला.

वारकरी संप्रदायाचे निरीक्षण केले असता स्ट्रेस मॅनेजमेंटचेही शिक्षण मिळते. संतांच्या शिकवणीनुसार आहे त्या परिस्थितीत सुखी राहण्याचा महामंत्र भागवत धर्मियांनी अंगिकारला आहे. ठेविले अनंते तैसेचि रहावे यावर कदाचित टीकाही होईल. पण विकास म्हणजे नक्की काय यावर सखोल विचार करायचा असल्यास पंढरीच्या वारीतून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत राहतात.

आपला वारीवरिल हा लेख सानुभव व अभ्यासपुर्ण आहे. अतिशय सुन्दर अशि माहिति तुम्हि सर्वाना दिलित पण मलअ इथे एक नमुद करावेसे वटते (वारी म्हणजे देहू-आळंदी पासून पंढरपुरापर्यंत विठ्ठलनामसंकीर्तन करीत करीत २६० कि.मी.चा केलेला पायी प्रवास.) हा मुददा वारी हि फक्त देहू-आळंदी येथुन निघत नसुन महारश्ट्राच्या कान्यकोपर्तुन निघतात मि स्वताह धुळे जिल्हातुन पंढरपुरापर्यत पायि वारि केलि अहे. अनि ह्य इतर वरया जास्त पल्ला पार करुन येतात वारितिल सन्ख्या जरि जस्त नसलि तरिहि कुटल्याहि सुख्सुविधान शिवय हे सर्व विठ्ठल भेटी साटि अतुर वारकरि अपल सर्वस देववर सोडुन येतात.

वारीमधे सर्वचजण चांगले असतात का ? "पंढरीची वारी" चित्रपटात दाखविले आहे की काही लोक चोरी करण्याच्या उद्देशाने पण आलेले असतात.

सुंदर लेख.
वारीमधल्या अनेकांना प्रत्यक्ष दर्शन होत नाही, केवळ कळसाचे दर्शन घेऊन ते परततात. आता तरी गावकरी, वाककर्‍यांची सोय करतात, पण पुर्वी तसे होत नसावे. तरीही हि परंपरा खंडीत झाली नाही.

मला आलेल्या एका वारकरी बाईचा अनुभव अगदी सांगण्यासारखा. कोल्हापूरला मी चप्पल खरेदी करत होतो, त्यावेळी एक वारकरी स्त्री तिथे बसली. फार तेजस्वी दिसत होती ती. मी तिला पैसे दिले. मी चप्पल घेतच होतो आणि ती अनवाणी होती, म्हणून चप्पल घेऊन देऊ का, असे तिला विचारले.
त्यावर ती हसून म्हणाली, बाबा पोटाला दिलंस ते मोप झालं, पायतान आन्की कश्याला त्ये. माऊली काही पायाला काटा लागू द्याची न्हाई...

अशिच वारि शेगाव वरून हि निघते पन परवा एक दुखद घटाना या वरि बरोबर घडललि एका भरधाव कन्टेनर्ने २५ ३० वार्कर्यान उडवले व त्यवर कहर म्हन्जे पोलिसानि सन्तप्त जमावावर गोलिबार केला.