बालगंधर्व

Submitted by चीकू on 7 May, 2011 - 09:18

कोणी हा चित्रपट बघितला आहे का? सुबोध भावे च्या सकाळ मधील लेखनामुळे खूप उत्सुकता वाढली आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालगंधर्व पाहिला, आवडला. इतरांना बघण्याचा आग्रह करावा असा. वर पूनम, शर्मिला, चिनूक्स, साजिरा यांनी लिहीलंय त्यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही. Happy

काल म्हणे कान फिल्म फेस्टीव्हल मध्ये बालगंधर्वचे दोन स्पेशल शोज होते..

पोर्णिमा, शर्मिला तुम्ही फार छान लिहिलंल. बर्‍याच वर्षापुर्वि बालगंधर्वांचि जन्मशताब्दि कि काहितरी होते. आता नक्की आठवत नाही पण त्यावेळी बालगंधर्वांवर दुरदर्शनवर सारखे कार्यक्रम असत. त्यांच्या जीवनावर एक रंगीत पुरवणीहि होती. हा चित्रपट सुद्धा मला बघायचा आहे.

कालच पाहिला. अप्रतीम.

एकच गोष्ट खटकली म्हणजे वृद्ध बालगंधर्व दाखवताना मेकअप करण्यात एवढी कंजूषी का? कारण वृद्ध बालगंधर्वांचे फोटो बघितले आहेत. त्यामुळे सुबोध भावेच्या अभिनयाला मेकअपची जोड मिळाली असती तर बरं झालं असतं असं वाटतं.
एवढं सोडलं तर संपूर्ण चित्रपट सुंदर झालाय.

आनंद भाटेंनी क मा ल केली आहे. त्याकाळी पल्लेदार ताना घेत. नाटकं 'वन्स मोअर' घेत रात्र रात्र चालत. आनंद भाटे बालगंधर्व शैलीची पुरेपूर अनुभूती देतात. पदं ऐकताना अंगावर रोमांच उठतात. ह्या पदांबरोबरच दोनतीन नवी गाणीही आहेत.

या आनंद भाटेंनी लहान वयात दुरदर्शनवर बालगंधर्वांची पद म्हणुन वेड लावल होत. त्याला या काळात आनंदगंधर्व म्हणुन संबोधल जायच. पुढे मोठा झाल्यावर त्याचा आवाज फुटला इ चर्चा ऐकायला आली. आनंद अजुन गातो आणि बालगंधर्वांची पद गातो हे ऐकुन समाधान पावलो.

मोहिनी निमकरांनी लिहल्याप्रमाणे जोहार मायबाप हे पद म्हणजे मास्टर पीस. हे पद कुमारगंधर्वांच्या आवाजातल माझ्या संग्रही आहे. ( ही काही फार मोठी गोष्ट असणार नाही ) पण जेव्हा कुमारगंधर्वांच्या आवाजात हे गाण ऐकतो तेव्हा बालगंधर्वांची आठवण नक्की येते.

नितीन, जोहार मायबाप जोहार किर्ती शिलेदारच्या आवाजात मिळतेय का ते पहा. तिने खुपच सुंदर गायलेय ते.
मंदार, मला वाटतं विक्रम गायकवाडने मेकपच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेय.
(नीताबाईंनी उजेड पाडला असता तर आणखी छान !)

मि परवा पाहीला हा चित्रपट आणी मुख्य म्हणजे सुबोध आणी रवी च्या उपस्थीतीत.. ते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.. Happy
बाकी या चित्रपटाविषयी वरती छान परिक्षण आले आहे त्यामुळे त्याविषयी मि आणखी काय बोलणार?? नितांत सुंदर चित्रपट.. Happy

या चित्रपटासाठी सुबोधने वजन बरेच कमी केलेय का ? बालगंधर्व थोडे आडव्या बांध्याचे होते असे मोहीनी निमकर पण म्हणताहेत. धर्मात्मा बघितल्याचे आठवतोय मला.

चित्रपट पाहीला... अत्यंत सुंदर!! सुबोध भावे काय देखणा दिसला आहे!!

पण तरीही काहीतरी राहून गेलंय असं वाटलं!!! त्यांच्या आयुष्यातले कठीण आणि दु:खदायक चित्रिकरणच जास्त झालंय असं वाटलं.
म्हणजे, कलाकार म्हणून त्यांची असामान्यता, एकमेवाद्वितिय असणे यापेक्शा त्यांच्या झालेल्या चूका, फसवणूक यांवर जास्त भर दिला गेला..

कारण चित्रपटाच्या उत्तरारधात "बालगंधर्व इतके अव्यवहारी आणि मूर्ख का होते???" असा सूर मला आसपासच्या लोकांमधून ऐकू आला... Sad

मी पण पाहिला..
खरच सुंदर कलाकृती...
सुबोध भावे लाजवाब...
सिनेमाटोग्राफी अप्रतिम...
जुना काळ छान उभा केलाय... पण कुठेही बोरींग वाटत नाही.
संगीत तर उत्कॄष्ट आहेच..
एकुणच काय तर निव्वळ अप्रतिम... Happy

कसदार, लडीवाळ गायकी तूम्हा सर्व तरुण मंडळींना आवडली, याचा फार आनंद झाला.
आनंद भाटे च्या पहिल्या (दूरदर्शनवरच्या ) कार्यक्रमातले गायनही मी ऐकले होते.

कालच 'बालगंधर्व' पाहिला. चहुकडुन या चित्रपटाविषयी इतके काही चांगले ऐकायला येत होते की उत्सुकता अगदी ताणलेली. काल ऐशूशी बोलताना बालगंधर्वचा विषय काढल्यावर ती लगेच म्हणाली, 'सुबोध भावे असाच इतका गोड्डुला दिसतो, तो बाईच्या वेशात किती गोड्डुला दिसेल!' आणि खरेच सुबोध बाईच्या वेषात अगदी गोड, सुंदर, मँगोचिजकेकसारखा आकर्षक दिसलाय.

चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अतिशय सुंदर झालीय. बाह्यचित्रणही एकदम नयनरम्य. बालगंधर्व तळ्याकाठी बसुन भजन गातात ते दृष्य कमालीचे देखणे झालेय. (जोहार मायबाप येईल अशी आशा होती Happy )

पण चित्रपट पाहताना बरेच प्रश्न पडतात. लेखकाने लोकांना बालगंधर्वांचा आयुष्यपट माहित आहे असे समजुन लेखन केले असावे.

बालगंधर्व हे नाटकाकडे कला म्हणुन पाहात होते. त्यातुन अर्थार्जन करावे हे त्यांच्या डोक्यात कधी आलेच नाही. इतरांनी त्यातुन अर्थार्जन केले तर त्यांनी त्याला नाही म्हटले नाही, पण स्वतः मात्र पैशांच्या बाबतीत खुपच उदासिन राहिले. हे असे का? हा प्रश्न चित्रपट पाहताना वारंवार मनात येतो. त्याचे काहितरी उत्तर मिळायला हवे होते.

एकवेळ मी उपाशी राहिन पण भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा भरजरी शालुंमध्येच दिसायला पाहिजेत हे मत ठामपणे मांडणारे बालगंधर्व यासाठी लागणारे पैसे कसे येतील याचा विचार करत नाहीत याचे जरासे आश्चर्य वाटते. एकदा सोडुन अनेकदा विश्वासघात झाल्यावरही ते नव्याने विश्वास कसे काय टाकु शकत होते हे कळत नाही. गौहरकडे राहायला जाण्याआधी त्यांचे घरातल्यांशी संबंध कसे होते हेही चित्रपटातुन कळत नाही. त्यांच्या या सगळ्या वागण्यामागची मानसिकता समोर यायला पाहिजे होती असे चित्रपट पाहताना खुप वाटत राहते. चित्रपटाने केवळ 'जे घडले ते असे घडले' ही भुमिका घेऊन त्यांच्या आयुष्याचा पट मांडला. असे का घडले असावे हे चित्रपटात कुठेही येत नाही. बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल खुपच कमी वाचनात आलेय, त्यामुळे ह्याची उत्तरे कुठे कोणी लिहिली असतील की नाही देव जाणे.

पण शीतलतेजाने चमकणा-या चंद्रासारखे दिसणारे बालगंधर्व स्टेजवर पाहिले की हे सगळे प्रश्न मागे पडतात. बालगंधर्वांच्या एकुणच व्यक्तिमत्वात लहान मुलाचा भाबडेपणा, निष्पाप, निरागस वृत्ती दिसते. सुबोध भावेने बालगंधर्व साकारले म्हणवत नाही. तो ही भुमिका जगलाय. राजाश्रय आनंदाने स्विकारणारे पण लोकांनी मदत म्हणुन देऊ केलेली थैली 'ती तर भिक्षा होईल ना?' म्हणुन नाकारणारे बालगंधर्व साकारताना कुठेही चेह-यावर मोठेपणाचा आव आणलेला नाही. त्यांचे एकुण व्यक्तीमत्व पाहता ज्या नैसर्गिकपणे त्यांनी थैली नाकारली असेल त्याच भावासकट सुबोधने तो प्रसंग उभा केलाय. धैर्यधराच्या भुमिकेतल्या केशवराव भोसल्यांचे जोडे पुसणारी भामिनीही तशीच.. मुळ प्रसंगातही बालगंधर्व असेच दिसले असतील असे वाटते सुबोधचे बालगंधर्व पाहताना.

चित्रपटातली गाणी आनंद भाटेने मुळ गाण्यांइतकीच सुंदर गायलीत. मुळ गाण्याव्यतिरिक्तची गाणीही सुंदर बनलीत.

चित्रपट परत पाहावा तर लागणारच Happy

अतिशय सुंदर चित्रपट ! << सुबोध भावेने बालगंधर्व साकारले म्हणवत नाही. तो ही भुमिका जगलाय. >> १००% सहमत.
पण, खरंच शर्मिला फडके म्हणतात तसं << दोन तासांतच सिनेमा बसवायचा अट्टाहास का? >> हा प्रश्न पडतोच. बालगंधर्वांचीं पदं दाखवणं अपरिहार्य होतं व त्यामुळे त्यांचं रंगमंचाबाहेरचं व्यक्तिमत्व खुलवायला अधिक 'फूटेज'ची सोय करणंही तितकंच आवश्यक होतं. << लेखकाने लोकांना बालगंधर्वांचा आयुष्यपट माहित आहे असे समजुन लेखन केले असावे.>> असा ग्रह होणं सहाजिक वाटतं. थिएटरबाहेर पडताना गोहरबाई व त्यांच्या संबंधांचं एक प्रश्नचिन्हही डोळ्यासमोर येतंच.

आजच "बालगंधर्व" पाहिला. चांगला चित्रपट आहे. सुबोध भावेने बालगंधर्वांचे स्त्रीरूप खूपच चांगले खुलविले आहे. त्याने हसतमुख चेहर्‍याने रंगविलेला स्त्रीभूमिकेचा पार्ट शोभून दिसतो. चित्रपट व सुबोध भावेची भूमिका नेत्रसुखद आहे.

पण चित्रपट खूपच संक्षिप्त (डॉक्युमेंटरीसारखा) वाटतो. चित्रपटात सलगता फारशी नाही. अनेक तुकडे एकत्र जोडल्यासारखे वाटतात. बर्‍याचदा एखादा प्रसंग एकदम थांबवून अचानक नवीन प्रसंग सुरू होतो. बालगंधर्वांच्या आवाजात चित्रपटात एकही गाणे नाही (कदाचित कॉपीराईटचा इश्यू असेल किंवा चांगल्या वाजणार्‍या तबकड्या उपलब्ध नसतील).

मी बालगंधर्वांविषयी काही आख्यायिका ऐकल्या होत्या. त्यांना संगीताची जन्मजात व दैवी देणगी होती. त्यांनी संगीताचे शास्त्रशुध्द किंवा औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते, तरीसुध्दा ते उत्कृष्ट गाऊ शकत होते. ते कोणाच्याही गळ्यातली तान चटकन उचलायचे. गोहरबाईने त्यांची उतारवयात खूप अवहेलना केली व त्यांचे शेवटचे दिवस हलाखीत गेले. यातले किती खरे कोण जाणे.

फार फार छान चित्रपट.
पौर्णिमा, छान लिहीलंय. Happy

नांदीच्या(पंचतुंड नररुंद मालधर) वेळी एकतर सुरुवात फार सुंदर आहे. गणपती एकदम टिपीकल. सगळेच.. Happy
आणि एक कडवं झाल्यावर "ईशवराचा लेश मिळे तरी.. " म्हणत त्या गायकांच्या मागुन सुबोध जी काही एण्ट्री घेतो, तिथेच माणूस खल्लास! पैसे दामदुप्पट!
काय तान घेतात आनंदगंधर्व! सुमधुर.... प्रसन्नरसाचा महापूर नुसता... वाह!!! आणि मग दोन तास उत्सव...

पुढच्या आठवड्यात परत एकदा बघणार आहे.

काल 'बालगंधर्व' पाहिला. (इथली एकही पोस्ट न वाचता गेले होते. आत्ता वाचल्या सगळ्या पोस्टी.)
सिनेमा प्रेक्षणीय आहे. (साड्या-दागिने या मुद्द्यावर शर्मिला, पूनम यांना अनुमोदन. विशेषतः साड्या त्या काळातल्या अजिबात वाटत नाहीत. दागिन्यांबद्दल मलाच जास्त काही कळत नाही. त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही.) सुबोध भावे अप्रतिम.
सिनेमाची धाटणी काहीशी डॉक्युमेंटरी पध्दतीची असणार ही अपेक्षा होतीच. पण चरित्रपट असला तरीही पटकथेवर अजून मेहनत घ्यायला हवी होती असं राहून राहून वाटलं. (उड्या मारल्यासारखी दृष्ये - चिनूक्सला अनुमोदन.)
थोडक्यात, हा दिग्दर्शकाचा सिनेमा न होता कला-दिग्दर्शकाचा सिनेमा झालाय. (अर्थात, त्याची प्रसिध्दी तशीच केली जातीय.)
तरीही, बालगंधर्वांच्या आयुष्याबद्दल आपल्याला सविस्तर काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे सिनेमा कायम लक्षात राहील एवढं नक्की.
(सुबोध भावे स्त्री-वेषात प्रथम विभावरी देशपांडेसमोर येतो, तो प्रसंग खुलता खुलता तिथे एडिटरची कात्री लागल्यासारखी वाटली.)
सिनेमाऐवजी नितीन देसाईंनी त्यावर टी.व्ही. मालिका काढली असती तर.... हा विचार पुनःपुन्हा मनात येतोय.

बालगंधर्वांच्या ताना खास भास्करबुवाबखल्यांच्या. त्यांच्या गळ्याला शोभतीलशा. बरीच पदं खास बालगंधर्वांच्या गळ्याला शोभतीलशी बुवांनी रचली . Happy

छान चित्रपट. सुबोध भावे मस्तच.
मला एक शंका आहे. सिनेमात दाखवलेय तितक्या रकमा असायच्या का त्या काळात? म्हणजे अत्तर २५००० किंवा कर्ज लाखांमधे वगैरे. हा काळ स्वातंत्र्यापूर्वीचा ना? तेव्हा इतक्या रकमांमधे व्यवहार असायचे का?

Pages