|| राजा रवि वर्मा ||

Submitted by आशूडी on 15 April, 2011 - 02:26

शाळेतून बाहेर पडल्यानंतर बर्‍याच काळानंतर श्री.रणजित देसाईंचं पुस्तक हातात आलं. त्यावेळी अशी ऐतिहासिक पुस्तके वाचून भारावलेल्या दिवसांची आठवण आली आणि या निमित्ताने भारतीय चित्रकलेला नवीन परिमाण देणार्‍या राजा रवि वर्म्याशी ओळख तरी होईल या हेतूने वाचायला घेतले.
इतर कोणत्याही ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे यातही स्थलकालाच्या खुणा, वैशिष्ट्ये पुरेपूर उमटली आहेत. संस्थानिकाच्या वाड्यात गेलेले रवि वर्म्याचे बालपण,त्यामुळे उपजतच आलेला राजेशाही रुबाब, त्याचा निग्रही स्वभावाची चुणूक, त्याच्या चित्रकलेची सुरुवात इथपासून कादंबरी उलगडत जाते. प्रस्तावनेत देसाईंनी या विषयाचा पाच वर्ष अभ्यास करुन, जाणकारांशी चर्चा करुन ही कादंबरी लिहायला घेतल्याचे नमूद केले आहे. पण प्रत्यक्षात अपेक्षित तपशीलांमध्ये वाचकाची काही अंशी निराशाच होते. याला उपलब्ध असलेली माहिती हा मूळ मुद्दा विचारात घेतला तरी -
"पण जेव्हा एखाद्या कलावंताचे चरित्र आपण लिहायला घेतो, तेव्हा नुसत्या सत्याचाच आधार घेऊन चालत नाही. तेथे कलावंताच्या कल्पकतेचाही आधारा घ्यावा लागतो हे माझ्या ध्यानी आले. त्यामुळे या कादंबरीत सत्याबरोबरच कल्पकतेचा आधार मला शोधावा लागला. सार्‍याच व्यक्तिरेखा वास्तवातल्या नाहीत. काही कल्पनेतून साकारलेल्या आहेत. याची नोंद वाचकांनी घ्यावी." असे प्रस्तावनेत कबूल करणार्‍या देसाईंकडून काही प्रसंग, पात्र, घटना अधिक खुलवता आल्या असत्या अशी वाचकांनी अपेक्षा केली तर ती अवाजवी ठरु नये. उदाहरणच द्यायचे झाले तर बालपणीच्या काळात चित्रकलेचे धडे गिरवताना जे जे शिक्षक लाभले ते ते आत्मप्रौढी मिरवणारे, आपले संपूर्ण ज्ञान, कला विद्यार्थ्याला देण्याची इच्छा नसणारे असे दाखवताना रवि वर्म्याने एकलव्याप्रमाणे आपले चित्रकलेचे कसब कसे वाढीस नेले,त्यात तो निष्णात कसा झाला हे दाखवायचे राहून गेले असे वाटते. चित्रकलेचे अंग मूळतः असले तरी काही तांत्रिक बाबी जशा की रंगवणे, रेषाकार या शिकूनच घ्याव्या लागतात त्या रवि वर्म्याने कशा आत्मसात केल्या हे ही चितारले असते तर एका कलाकाराचा विद्याभ्यास, जिज्ञासा यांचेही रंग उमटले असते. पण एक दोन प्रसंगांखेरीज याविषयी कादंबरीत काहीच नाही. तसेच, पुराणकालातील प्रसंग चितारण्यासाठी त्यांनी जे देशाटन केले, अनेक धर्मस्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या ज्यातून त्यांची जाण, अनुभवविश्व खचितच समृध्द झाले असे पुढे प्रत्ययास आले; त्या प्रवासाबाबत, अनुभवांबाबत दोन वाक्यांशिवाय कादंबरीत काहीच सापडणार नाही.

तारुण्यातील राजा रवि वर्मा. लग्न झाल्यावर मातृकुल पध्दतीनुसार पत्नीगृही जाऊन वास्तव्य करणारा. तेथे राजकन्या असलेल्या पत्नी पुरुतार्थीचा अहंकारी स्वभाव सहन न होऊन आश्रिताचे जिणे नाकारुन तो पुन्हा स्वगृही येतो. पुढे कालांतराने पती पत्नी सामोरे येतात तेव्हा तो तिला आपल्या घरी येऊन राहशील तर मी आनंदाने संसार करेन, असेही सांगतो. परंतु, तत्कालिन संस्कृतीला, समाजाच्या संकल्पनांना छेद देऊन पतीच्या घरी जाणे ती कुलसंपन्न राजकन्या नाकारते. व आयुष्यभर मुलांना आपल्या घरीच सांभाळते. आता या घटनेचा विचार केला, तर त्या काळानुसार पुरुतार्थी योग्यच वागली नाही का? आज जेव्हा एखादी पत्नी आपल्या पतीला, अशी अट घालेल तर कोण बरे त्या पतीला 'अहंमन्य' व पत्नीला 'स्वाभिमानी' म्हणेल? पण आपला नायक हा मातीचा बनलेला नसून, त्याला कोणतेही मोह,पाश, राग लोभ नाहीतच हे वारंवार दाखवून देऊन त्याला उदात्त करण्याचा चंगच बांधलेला असल्याने वाचक हतबल होतो. या उदात्तीकरणाच्या भावनेच्या भरात अनेक वेळा दोषही गुण म्हणून दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न डोळसपणे पाहिला तर असफल ठरतो. हा प्रसंग सांगताना लेखकाने, काळाचे मापदंडच बदलून, या विचारसरणीबद्दल राजा रवि वर्म्याच्या पाठीवर शाबासकीची थाप चक्क त्याच्या संस्थानिक मामांनी, आईनेही दिलेली दाखविली आहे. या निर्णयाच त्यांना काहीही चूक वाटत नाही. पित्याच्या प्रेमापासून मुले पारखी होत आहेत हे ही नाही. पण जर नायकाचा एखादा भावनिक कोपरा हळवा, दुखरा ठेऊन दुसर्‍या त्याला समजून घेणार्‍या नायिकेचा प्रवेश अपेक्षित असेल तर त्याचे समर्थन करण्यासाठी पुरुतार्थीला करडा रंग द्यायला हवाच होता. अन्यथा, पत्नी मुलांपासून दूर राहून, तत्कालिन समाजरुढींचे बंधन झुगारुन एका तरुण विधवेवर प्रेम, प्रणय करणारा नायक आपल्या बाळबोध वाचकांना रुचेल? आणि मग आजच्या काळाचा मापदंड लावायचा तर पतीगृही राहणार्‍या आजच्या युगातल्या स्त्रिया आश्रित? का? वाचक भेलकांडतो.
आणखी एक, जर रवि वर्मा एक उच्च चित्रकार होता, तर त्याला कल्पनाशक्तीची काय वानवा? पुराणातील स्त्रिया सीता, दमयंती, उर्वशी या चितारण्यासाठी त्याला सुगंधासारखी देखणी स्त्रीच का हवी होती डोळ्यांसमोर?उर्वशी पुरुरव्याचे अर्धनग्न अवस्थेतील चित्र काढण्यासाठी, योग्य ते भाव रेखाटण्यासाठी, सुगंधेला दोन दिवस रंगशाळेत विवस्त्र फिरवत ठेवण्याचे काहीच प्रयोजन समजत नाही. तिचा संकोच (!) घालवण्यासाठी दोन दिवस. ज्याने नुसती चित्रे पाहून एवढे चित्रकौशल्य संपादन केले त्याला तिची रुपरेषा चितारायला एक दृष्टिक्षेप पुरेसा नव्हता? वास्तविक, ज्या घरात स्त्रिया धोतराव्यतिरिक्त काहीच वस्त्र घालीत नाहीत, (असा उल्लेख बालपणीच्या काळचे वर्णन करताना आला आहे) शिवाय ज्याचे लग्नही झाले आहे (सांगण्याचा उद्देश एवढाच की - नग्न स्त्रीच्या दर्शनापासून अजिबात वंचित नसलेला असा तो) अशा रवि वर्म्याला ही गरज का भासावी? याचाच दुसरा अर्थ, त्याची कल्पनाशक्ती थिटी होती असा वाचकांनी घेतला तर तो चुकीचा ठरेल का? मला चित्रकलेचा गंध नाही; पण केवळ, प्रेमाचे, प्रणयाचे, रंजित, कामुक वर्णनांचे रंग भरण्यासाठी रेखाटलेल्या या प्रसंगातून नायकावर फार मोठा अन्याय झाला असे वाटते.

या कामुक, स्त्री सौंदर्याची रसभरीत वर्णने लिहीण्यासाठी केलेली शब्दयोजना म्हणजे निव्वळ विनोद! वानगीदाखल आपण काही वाक्ये, शब्दसमूह पाहू -
- तिची वक्राकार शरीरयष्टी. इथे मला विकारामुळे अष्टावक्र झालेला पुरुष आठवला. कमनीय शरीराकृती म्हणायचेय का?
- कधी वस्त्र सावरत असताना तिला तिच्या धमन्यांतून वाढणारा रक्तदाब जाणवे.
वय काय बाई सुगंधा तुझं?
-लांब केस हिमप्रदेशावरुन कृष्ण प्रवाहाच्या असंख्य धारा कोसळाव्यात तसे
कल्पनेतही हिमालयातून खळाळत येणार्‍या नद्यांचे पाणी काळे पाहू शकत नाही आम्ही वाचक! का नवनवीन उपमा द्यायच्या अट्टाहासापायी त्या हिमालयाला काळे फासता?
-त्या शरीराच्या आकाररेषा केवढ्या प्रमाणबध्द! शिशिरऋतूत निष्पर्ण वृक्षशाखा दिसाव्यात तशा! इथे मला हाडाची काडे झालेली जख्खड म्हातारी आठवली तर तो माझ्या बुध्दीचा दोष.

विरोधाभास तर अनेक ठिकाणी केवळ हास्यास्पद. पान क्र. २५३ वर अंजनीबाईंना ज्या राजा रवि वर्म्याची नजर वासनारहित वाटली तोच राजा पान क्र. २५५ वर एकांतात खालील विचार करत असतो.
विड्याच्या पिवळ्या पानाच्या दुसर्‍या बाजूला टपोर्‍या शिरा उमटल्या होत्या. अंजनीबाईच्या लांबसडक पालथ्या पंजावर पिवळसर रेषा अशाच उठून दिसत होत्या. (!!)
...
एका आतुरलेल्या जीवाचा स्वीकार करायला काय हरकत होती?

अजून पुढे बरेच आहे ते प्रत्यक्ष वाचण्यातच मजा. पण एक प्रथितयश लेखक म्हणून देसाईंच्या काही त्रुटी राहिलेल्या एखाद्या वाचकाला खुपल्या असतील तर त्यात गैर नसावे अशी माझी समजूत. याशिवाय 'मेहता पब्लिशिंग हाऊस' सारख्या नावाचा दबदबा असलेल्या प्रकाशनाकडून 'विणावादन', 'निश्चिल' (असा शब्द आहे? )मध्येच 'कुंचल्या'चा 'ब्रश', 'चित्रसोपाना'चा 'कॅनव्हास' होणे , हे अजिबातच अपेक्षित नाही!
तर हे सारे असे असूनही, राजा रवि वर्म्याबद्दल फारसे साहित्य उपल्ब्ध नसताना जी तोंडओळख झाली त्यात समाधान, धन्यवाद मानायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीडी, मृत्यूंजय सावंतांचीच.
माझं वाक्य थोडं चुकलं आधीचं. देसाईंच्या कादंबर्‍याचा भंपकपणा कळला तसाच मृत्यूंजयचाही असं म्हणायचं होतं.

शर्मिला, तुझा लेख वाचला, किती सारासार, सखोल अभ्यासपूर्ण माहिती आहे त्यात!
धन्यवाद सर्वांना. तुम्ही सारे म्हणताय तशी मीही शाळेत असताना स्वामी, मृत्युंजयची पारायणं केली आहेत. म्हणूनच हे पुस्तकही हाती घेतलं. ज्या गोष्टींनी एक काळ भारावून गेलो होतो, आपलं अवघं विश्व व्यापून टाकणारी शाळा, सवंगड्यांसोबतचे खेळ, बागा, मैदानं इथे आज पुन्हा जाऊन आलो तरी मन रमत नाही. तीच गत काही पुस्तकांची. तेव्हा का भारावून गेलो होतो या प्रश्नाला आज अर्थ नाही, आपल्या आवडीनिवडी बदलल्यात हे मात्र जाणवतं. काही गोष्टी नॉस्टॅल्जियासाठीच आपल्या आयुष्यात येतात, त्या तशाच राहू द्याव्यात! Happy

छान लिहीलंस आशु.
त्या उपमा विचित्रच वाटल्या. निस्सीम चाहते असल्यावर होणार्‍या दुर्लक्षाबद्दल पूर्ण सहमत. फार आवडलं होतं असं नाही, पण बिन देअर..
शर्मिला, तुमचा लेख संकेतस्थळावर नाहीये. अजून कुठे वाचता येत असल्यास आवडेल वाचायला.

त्या शरीराच्या आकाररेषा केवढ्या प्रमाणबध्द! शिशिरऋतूत निष्पर्ण वृक्षशाखा दिसाव्यात तशा! इथे मला हाडाची काडे झालेली जख्खड म्हातारी आठवली तर तो माझ्या बुध्दीचा दोष.>>> Lol

शाळकरी वयात हे पुस्तक वाचल होतं तेव्हा आवडलं होतं. आता खरच सगळी गम्मत वाटते Happy

शर्मिला फडक्यांनी लिहिलेल्या लेखाची लिंक मिळेल का? वर दिलेली लिंक चालत नाहीये.

भाऊंनी दिलेली साईट मस्तच Happy

खरंच भंपक हाच शब्द अतिशय योग्य आहे या कादंबरीला!! शाळकरी वयातच वाचली आणि तेव्हासुद्धा प्रचंड हसले होते.. Proud

वय काय बाई सुगंधा तुझं?>> Lol

ओठांचं रुप जेवढं सुकुमार, तेवढंच दाहक. त्यांच्या एका स्पर्शानं जीवनाचा सारा दाह विझून जावा.'दाहक' चा अर्थ काय आहे नक्की?

लोहा लोहेको काटता है ?

नुकतेच 'राजा रविवर्मा' वाचून संपवले.
घोर निराशा.

हातात घेतेलेले पुस्तक अर्धवट ठेवायला आवडत नाही, केवळ म्हणूनच वाचून पूर्ण केले.

एके काळी रणजित देसाईंच्या स्वामी, श्रीमान योगी ह्या कादंबर्‍यांवर अतोनात प्रेम होते. आता पुन्हा वाचायला घेतल्या तर प्रेम कमी होईल की काय ह्या शंकेने हात लावायचा धीर होत नाहीये.

वयानुसार वाचनानंदाचे क्रायटेरीया बदलत जातात, बहुदा! Proud

++++++++++

राजा रविवर्मा च्या बायकोचे नाव पुरुतार्थी असल्याचा सगळीकडे उल्लेख आहे. परंतु एका पानावर ते 'पुरुषार्थी' असे छापले गेलेय.
आशू ने उल्लेख केलेले मुद्रण दोष तर बर्‍याच ठिकाणी जाणवलेच. पण काही लॉजिकल चुकाही आहेत.

त्या बडाबाईला राजा रविवर्मा ती त्याला स्वत:च्या बहिणीसमान असल्याचे सांगतो. आणि अगदी पुढच्याच १-२ पानांवर तिच्याविषयी विलासी स्वप्ने रंगवतो. Uhoh

रविवर्मा चे २ धाकटे भाऊ असतात. रवि नंतर राज आणि सर्वात धाकटा गोद. पैकी राज रविवर्मा प्रमाणे चित्रकलेत पारंगत होतो तर गोद वर्म संगीत शास्त्रात! पण मध्ये एका पानावर रविवर्मा राजवर्मा शी बोलताना जे संवाद करतो त्यात राज वर्मा आणि संगीतशास्त्राचे कनेक्शन दाखवलेय. ते खटकल्यावाचून राहत नाही.

आशू ने लिहिलेला मुद्दा हि लगेच जाणवलाच होता वाचतानाच. की लहानपणी जर का स्त्रियांना शरीराचा वरचा भाग अनाव्रुत्त पाहण्याची सवय असलेल्याला चित्रे काढताना सुगंधाला कपडे काढून स्टुडीओ मध्ये फिरवण्याचे प्रयोजन मुळीच पटत नाही. मुळात सुगंधा हे कॅरॅक्टर जर का काल्पनिक असेल तर पुस्तकाची पाने वाढवण्यासाठी अनावश्यकरीत्या घुसवल्यासारखे वाटते.

लिओनार्दो द विंची च्या बर्‍याच चित्रांबद्दल असा एक प्रवाद आहे की कुण्या एका स्त्रीचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून तो ती व्यक्तीचित्रे साकार करत असे. रविवर्मा च्या बाबतीत ही अशा एका काल्पनिक स्त्रीचे पात्र उगीच निर्माण केले काय!

Pages