मॅग्निट्युड ९.०

Submitted by सावली on 22 March, 2011 - 05:42

दिवस - ११-मार्च-२०११
स्थळ - तोक्यो

१३:३०
ऑफिस मध्ये सेमिनार होतं. साधारण दीडशे बाहेरचे लोक शोरूम मध्ये आलेले. बॉसने माझे नेहेमीचे काम सोडून मला सेमिनारचे फोटो काढायला सांगितलं. आवडीचं काम पण नेहेमीचा कॅमेरा नव्हता म्हणून त्याचा एस ९५ घेतला. नेहेमीचा कॅमेरा नसल्याचं वाईट वाटलंच पण ते किती बरं झालं ते नंतर कळलंच

१४:४६
जरा हलतेय का बिल्डींग ? असं वाटलं. तसही मला खूप लगेच भूकंप जाणवतो. मी बोलेपर्यंत सगळ्यांनाच जाणवलं. बिल्डींग आधी हळूच झुलायला लागली मग काही सेकंदात जोरजोरात गोलाकार घुमायला लागली असं वाटलं. शोरूम मधली प्रोडक्ट्स सगळी धडधड खाली पडली. तरीही कोणी किंचाळल नाही. सगळे खुर्च्या सोडून खाली बसले. बिल्डिंगची रोटेशन जरा कमी झाली असं वाटतंय तोच एकदा जोरदार धक्का बसला. माझ्या डोक्यावरच असलेले वरचे लाईट्स साठी सिलिंग मधे असलेले दरवाजे खाड खाड उघडले आणि बिल्डिंग वरखाली धडाधडा हलायला लागली. एकदम रफ धावपट्टीवर विमान उतरताना कसं वाटतं तसच काही सेकंद वाटलं. मग बहुधा भूकंप थांबला पण बिल्डीगचे झुलणे हळूहळू होत होते. भूकंपामध्ये टिकाव धरण्यासाठी विशिष्ठ रचना केलेली असल्याने ते कमी व्हायला जास्त वेळ लागतो.

१४:४६ नंतर दोन तीन मिनिटे.
सगळे जरा उभे राहिले. बॉसने येऊन मला याचे व्हिडियो शुटींग नं करण्याबद्दल विचारलंच. तर मी त्या पडलेल्या सामानाचे फोटो काढले. अजुनही समोरच्या बिल्डिंग जोरदार झुलताना दिसत होत्या. आमच्या बिल्डिंगमधल्या सिक्युरिटीने तिथेच थांबायची अनाउन्समेंट केली. म्हणून तसेच थांबलो.

१४:४६ दुसऱ्या धक्क्यांम्तर अजून काही मिनिटे
डेस्क जवळ परत आले. नवर्याचा फोन लागेना.डेकेअरचा फोन लागेना. नेटवर बघितलं तर इवाते का कुठेतरी जपानी स्केलवर ७ दिसलं. सात म्हणजे इथे सगळ्यात जास्त !! म्हणजे भयानक काहीतरी झाल्याचा अंदाज आला. तोक्यो जपानी स्केल ५प्लस दिसलं. त्सुनामीची वॉर्निम्ग दिसली. नवऱ्याचा इमेल आला त्याला उत्तर दिलं आणि लगेच मायबोलीवर मंजिरीसाठी एक मेसेज टाकला. तेवढ्यात माझ्या बरोबर काम करणारा आत आला. तो जिन्यांवरून ११व्यामजल्यावर आला आणि खूप घाबरलेला दिसला. त्याने सांगितलं आत्ताच्या आत्ता खाली चला. या बिल्डीगला तडे गेलेत. तेवढ्यात पुन्हा एकदा तसाच व्हर्टिकल धक्का बसला आणि पुन्हा आमचे विमान लँड झालं. तेवढ्यात बिल्डिंग वाल्यांनी अनाउन्समेंट केली कि बाहेर जा.
नवऱ्याला एक इमेल टाकला आणि खाली निघालो. इतक्या टेन्शन मध्ये सुद्धा आमच्या स्टाफ ने सगळ्या १५० लोकांना जिन्याने सावकाश उतरायला मदत केली. कोणीच धक्काबुक्की धावपळ केली नाही. म्हातारे लोकही होते ते हळू हळू उतरले तरी त्यांच्या मागचे सगळे सावकाशीने खाली गेले.विचार केला तर १५० बाहेरचे आणि १५ स्टाफ असे १६५ लोक एका शोरूम मधे. एकच एक्झिट होतं. सगळे घाबरून धावायला लागले असते तर?

१५:२०
खाली उभे होतो. कोणाचेच फोन लागत नव्हते. सगळे टेन्शन मध्ये खाली उभे होते.

१५:३०
बिल्डिंग सिक्युरिटीने चेक करून सगळं सेफ असल्याचे सांगितलं. आणि बाकीचे सगळे लोक वर पुन्हा जायला लागले. माझा ऑफिसचा वेळ संपला असल्याने मी निघायचा विचार केला. पण नक्की कसे जावे हे कळेना. ट्रेन बंद असल्याचे कळलेच होते. इथून निघाले तर नंतर नवऱ्याशी काही सम्पर्क राहणार नाही म्हणून सरळ घरी जायला होत नव्हतं. मग त्याच्या ऑफिस पर्यंत चालत गेले. आणि तिथे खाली त्याला शोधले पण त्यांना खाली जायची ऑर्डर नव्हती. आणि फोनही लागत नव्हते.

१६:१०
फोन लागत नाही म्हणून तोक्यो स्टेशन मधे पब्लिक फोन शोधायला गेले. तर स्टेशन पूर्ण भरलेले. अजूनही मला कुठे काय किती झालेय याची फारशी कल्पना नव्हतीच. पण इथे अंदाज आलाच. फोनला खूप मोठी लाईन. तेवढ्यात थोडस इंटरनेट चालू आहे असे वाटले. म्हणून नवऱ्याला इमेल केला पण तो गेलाच नाही. नेट बहुतेक ब्लॉक झालं. मग पुन्हा त्याच्या ऑफिस मधे चालत गेले.

१६:५०
नवऱ्याला फोन करुन खाली बोलावले. त्याला अजून काम होतं पण बहुतेक त्याला बाहेरच्या गर्दीचा अंदाजही नव्हता. शेवटी खाली आला तो आणि आम्ही निघालो.

१७:००
बसने जाण्यासाठी बसच्या थांब्यावर गेलो तिथून रांगेचा शेवट शोधात निघालो. दोन रस्ते पार करून गेल्यावरही शेवट दिसेना तेव्हा तो नाद सोडून एका टॅक्सीच्या रांगेत उभी राहण्याची चूक केली. बराच वेळ उभे राहिल्यावरही अजून काही शे मीटर रांग होतीच.

१७:३०
चालत घरी जायचा निर्णय घेतला. स्टेशन मध्ये जाऊन पाणी घ्यावे असा विचार करून गेले तर सगळी दुकाने सामान संपल्याने बंद! शेवटी एका वेंडीग मशीन मध्ये पाणी मिळाले.
मग एका ठिकाणी फोन बुथ शोधून रांगेत उभे राहिलो. लेकीच्या डेकेअर मध्ये फोन लावला. तिथे सगळे आलबेल असेल अशी खात्री होतीच त्याप्रमाणे होतेच. तिथे लोकांना , मुलांना ट्रेन केलेलं असतंच त्याप्रमाणे सगळे मध्ये येऊन एकाजागी बसले. डोक्यावर काही पडणार नाही याची काळजी घेतली. इमारतीला काही झालं तर मुलांना पालकांनी कुठे भेटायचं हे ही सांगून ठेवलेलं असतंच. पण सगळे डेकेअरमध्येच होते. त्यामुळे काळजी नव्हती. त्यांनी मुलांना रात्रीचे जेवण वगरेही दिले.

१८:००
चालायला सुरुवात केली रस्त्यात प्रचंड गर्दी. पण तरी सगळे शांतपणे चालत होते.त्याच्या फोनवर नेट चालू होतं म्हणून रस्ता शोधायला जीपीएस उपयोगी पडलं. रस्त्यात सगळ्या गाड्याही थांबल्या होत्या. काही ठिकाणी दिवे नसल्याने अंधारही होता.

२१:००
लेकीला डेकेअर मधनं घेतलं. सगळ्या सेन्सेईचे हजारवेळा आभार मानले. काही सेन्सेई आज तिथेच रहाणार होते. अजूनही काही पालक पोचले नव्हते. सगळ्यांची चौकशी करून घरी आलो. दरवाजा उघडताना धाकधूक होती काय्य काय पडलं असेल असा विचार करत होतो. पण नशिबाने सगळं ठीकठाक होतं. कुठे काही पडलं नव्हतं. आल्यावर सगळ्यात आधी टीव्ही लावला आणि मग काय प्रचंड उत्पाथ झालाय याची कल्पना आली.

रात्री १ पर्यंत
बराच वेळाने घरी आणि इतर काही मैत्रिणीशी सम्पर्क झाला. बातम्या बघून भयंकर वाटत होतं. मध्येच केव्हातरी भूकंपाचे धक्के बसतच होते. रात्री झोपायला गेल्यावरही झोप येतच नव्हती बाहेरचे लाईट चालू ठेवले. ईव्हेंक्यूएशन ब्याग तयार करून दरवाजाजवळ ठेवली. कुठे जायचं त्याचा म्याप आधीच सिटी ऑफिस ने दिलेला तो काढून ठेवला.

दुसरा दिवस सकाळ:
उठून आधी बातम्या लावल्या. पुन्हा अजून जास्त डीटेल्स आले होते. खेळण्यासारख्या दिसणाऱ्या गाड्या आणि बोटी वाहून जाताना बघायला भयानक वाटत होतं. गावच्या गावे अक्षरश: वाहून गेली होती.
सकाळीच दुकानात जाऊन थोडं आठवडयाच सामान आणलं. थोडं रेडी टू इट पण आणून ठेवलं. लाईट , ग्यास गेले तर काय खाणार असा विचार करून. सकाळीच हे सगळे करणे किती उपयोगी होतं ते कळलंच नंतर. नंतर सगळ्या दुकानात खडखडाट झाला होता.
पुन्हा एखादा धक्का बसत होताच. मध्येच केव्हातरी टीव्हीवर टिंग असा आवाज होऊन येणाऱ्या भूकंपाची नोटीस यायची आणि काही सेकंदात पुन्हा धक्का.
एका जवळच्या मैत्रिणीच्या आईबाबांचे घर सगळे वाहून गेले पण आईबाबा सुखरूप आहेत असंही कळलं.

दुसरा दिवस दुपार:
मला पहिल्यांदा अणुभट्टीची बातमी कळली. सगळ जपानी मध्ये असल्याने सुरुवातीला नीट कळत नव्हती. मग एका मैत्रिणीला भाषांतर करायला सांगितलं. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

आधी फुकुशिमा दाई इची १बान मधे एक स्फोट झाला आणि धूर आला असा एक व्हिडियो टीव्हीवर दिसला. तो दोन वेळा दाखवल्यावर गायबच झाला. त्यामुळे जरा टेन्शन आलं. कि नक्की काय लपवत आहेत ते कळेना. तो व्हिडियो नंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत दाखवला नव्हता. शिवाय थोड्या वेळाने अजून एक फोटो. त्यात सकाळी ९ वाजताच्या फोटोत त्या प्लांट ची इमारत दिसत होती तर दुपारी चार च्या फोटोमधे फक्त त्याचा सांगाडा दिसत होता. मग बऱ्याच उलट सुलट इंग्रजी बातम्या, अनालिसीस वगरे ऐकून शेवटी संध्याकाळी एदानो यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी स्फोट झाल्याची बातमी दिली. आणि आधी ३.५ किमी मध्ये धोका असल्याचे सांगितलं. नंतर ते १० किमी केलं. खरंतर हे प्लांट भूकंप झाल्यावर आपोआप थांबले होते. लाईट गेल्यावर बॅकअप डिझेल पॉवर वर शिफ्ट झाले होते. पण नंतर आलेल्या त्सुनामीने डिझेल पॉवर सप्लाय खराब झाला आणि प्लांटचे तापमान प्रचंड वाढले.

पुढचा सगळा वेळ टेन्शन मध्येच गेला. आता भूकंपाची भीती नव्हती फारशी. पण रेडीएशनचे काय ते कळत नव्हते.
रविवारी अजून एका रीअ‍ॅक्टर मध्ये स्फोट झाला आणि आग लागली. रेडीएशन थोडावेळा पुरते वाढले. आणि पुन्हा कमी झाले. आता २० किमी मधल्या लोकांना बाहेर काढलं आणि ३० किमी मधल्या लोकांना शक्यतो घरातच राहून ए.सी वगरे सगळे बंद ठेवायला सांगितले.

सगळ्या एव्हेक्युएट केलेल्या लोकांना खायला प्यायला फारसे मिळत नव्हते. एखादी ओनिगिरी, एक डोनट, एक बाटली पाणी असे जेवण. काही ठिकाणी थोडी बरी परिस्थिती होती तिथे सूप किंवा नुडल्स शिजवून मिळत होते. अशा परिस्थितीतही लोकं प्रत्येकी एक बेन्तो आणि एक बाटली पाणी हे आपले आपण घेत होते. उगीच कुनी खेचाखेची नाही. ओरबाडून घेणे नाही. कोणाची फारशी तक्रार नाही.
सतत काही तासांनी प्राईम मिनिस्टर कान किंवा एदानो यांची प्रेस. कॉन्फ असायची. काय करणार आहेत. काय परिस्थिती आहे याबद्दल ते नीट उत्तरे द्यायचे. शिवाय तोक्यो इले. पॉवर कंपनी काय करतेय, तिथे लोकं कसे प्रय्तन करत आहेत हे सांगायचे.
११तारखेचा भुकंप ९.० रिश्टर स्केलचा होता हि बातमीही आली. आधी ८.९ चा सांगितला होता.
अजुन साधारण १०००० लोकांचा ठावठीकाणा कळत नव्हता. साधारण ३००० मृत घोषीत केले होते. घरे, आणि इतर वित्तहानी तर अपरिमित होती.

आम्ही सगळा वेळ बातम्या बघण्यामध्ये बिझी असल्याने लेक प्रचंड वैतागलेली होती. त्यात मध्ये मध्ये येणारे भूकंपाच्या सुचना आणि काम थांबवून एका जागी बसणे यामुळेही तिला जरा भीती वाटत होती. तिच्या खेळातही , ब्लॉक्स च्या खेळण्यातही ती भूकंप भूकंप खेळत होती. बघून वाईट वाटत होतं, पण इथल्या सगळ्याच मुलांना असंच वाटणार ना!

सोमवार १४ मार्च-
नेहेमीसारखेच ऑफिसला गेलो. नेहेमीची कामं सुरु केली. पॉवरसेव्हिंग करण्यासाठी एलेव्हेटर, एस्कलेटर बंद होते. पण कुठे कोणाची तक्रार चिडचिड दिसलींच नाही. ट्रेनही बऱ्याच बंद होत्या. किंवा खूप कमी फ्रिक्वेन्सीने चालत होत्या. प्लेटफॉर्मवर जायला इतकी गर्दी होती कि रांगा अगदी पायऱ्या चढून वर तिकीट गेट्स च्या बाहेर आल्या होत्या. पण लोक शांतपणे रांगेत उभे होते.
ऑफिसमध्ये आवराआवरी करत असतानाच अजून एक भूकंपाचा धक्का बसला. त्या नंतर बॉसने ऑफिस चे शोरूम् आठ दिवस बंद ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस बंद ठेवायचा निर्णय घेतला.
ही अनिश्चितता बघून मग आम्ही दोघेही फोनवर बोललो. थोडे दिवस भारतात राहूयात का असा विचार करायला लागलो. हं निर्णय फारच कठीण होता. शिवाय सगळे आमचे जपानी मित्र मैत्रिणी इथे असताना सगळ्यांना सोडून जाणे पटत नव्हते. शेवटी रात्री पुन्हा एकदा बोलून निर्णय घ्यायचे ठरवले.खरंतर घरातूनही लेकी साठी प्रेशर येत होतं कि लगेच परत या.
घरी येऊन मंजिरी आणि नेरीमाशी बोलले. त्यांनीही सांगितले कि त्यांच्या ओळखीचे काहीजण परत जात होते. मग पुन्हा नवऱ्याला फोन केला तर त्याने नुकतेच तिकीट बुकही करून टाकलेले. त्या एजंटने सांगितले कि लगेच बुक केलेत तर १६चे मिळेल नाहीतर मग १८ /१९ चे मिळेल. हे ऐकून त्याने लगेच बुक करून टाकले. हा निर्णय घेतल्यावर रात्री दोघेही झोपू शकलो नाही. फारच वाईट वाटत होतं.
टीव्ही वरच्या बातम्या चालूच होत्या. आता बातम्यांचे स्वरूप जरा बदलून रेस्क्यू ऑपरेशन्स आणि इतर गोष्टी दाखवत होते.

मंगळवार १५ मार्च -
आज ऑफिस नव्हतेच. पण मग इतर लायब्ररीची पुस्तके परत देणे. नर्सरी मध्ये जाऊन सांगणे अशी कामं केली.सगळया भाज्या दुघ वगरे नर्सरी मध्ये नेऊन दिले म्हणजे फुकट जाणार नाही. नर्सरी मध्ये सेन्सेईना वाईट वाटलं. आणि त्याहून जास्त वाईट मला वाटलं. पण शेवटी निर्णय घेतलेला होता. काही जपानी लोकही हिरोशिमा, किंवा ओसाका अशा लांबच्या शहरात निघाले होते.
पुन्हा मध्येच तोक्यो मध्ये थोडं रेडीएशन आढळल्याची बातमी आली. आजही प्रेस. कॉन्फ झाली.
दुपारी एअरपोर्ट वर जाण्यासाठी काही उपाय मिळत नव्हता. बसेस बंद होत्या. ट्रेन बंद होत्या. शेवटी एका ठिकाणी प्रीपेड टेक्सी केली.
संध्याकाळी एक मोठा भूकंपाचा धक्का बसला. तोक्यो मधेही बऱ्यापैकी जोरात वाटला. हा धक्का शिझुओका मध्ये होता. तिथेही थोडीफार हानी झाली.

बुधवार १६ मार्च -
सकाळ पासून धावपळ करतच होतो. साडे दहा वाजता ठरल्या प्रमाणे गाडी आली आणि आम्ही निघालो.
रस्त्यात गर्दी असेल असं वाटलं होतं. पण अजिबातच नव्हती. त्यामुळे लवकर पोचलो. आत घुसल्यावर मात्र क्षणभर दचकायलाच झालं. खूप गर्दी. बरेच लोकं पथारी पसरून चक्क झोपले होते. काही फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या.
तिथे पोचल्यावर थोड्याच वेळात पुन्हा एक भूकंप झाला. हाही वरखाली होणारा धक्का होता.
विमान वेळेवर सुटेल का याची जराशी धाकधूक होती. चेक इन आणि सिक्युरिटीसाठी प्रचंड मोठ्या रांगा होत्या. वेळेवर सगळं होऊन विमानात बसलो. टेक ऑफ झाला आणि थोड्यावेळाने किंचित टर्ब्युलन्स आला. तसं लेकीची पहिली रिएक्शन "ममा, भूकंप!"

गुरुवार १७ मार्च-
आमच्या परतण्याने घरातले सगळेच खुश!
दुपारी खेळताना लेकीने एक बोट बनवली आणि सांगितलं कि नवीन प्रकारची बोट आहे ती त्सुनामी मध्येही बुडत नाही!

--------------------
आधी हे लिहायचे राहीलेच होते त्या बद्दल क्षमस्व.
इथे मायबोलीवरच्या अनेक मित्र मैत्रीणींनी ज्या आपुलकीने चौकशी केली त्यामुळे खरच फार छान वाटले. आपली काळजी करणारे इतके लोक आहेत ज्यांना आपण बघितलेलेही नाही हे जाणवुन अगदी हेलावुन गेले. यासाठी मायबोली आणि मायबोलीकरांचे मनापासुन आभार.

---------------------
अनेक गोष्टी लिहायच्या राहिल्यात.पण जसे आठवले तसे लिहीले.
इतक्या सगळ्या आपत्तीमधेही लक्षात रहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे जपानी लोकांची सहनशीलता, आणि कुठल्याही परिस्थितीमधे नियम न तोडता रहाण्याची शिस्तप्रियता!
कुठच्याही दुकानात कुठेही लुटालूट नाही, कुठेही उगाच धक्काबुक्की नाही, उगाच दुसर्‍याला, सरकारला दोष देणे, आक्रोश करणे नाही.
जपान च्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात दुसर्‍या महायुद्धा नंतरचा हा सर्वात कठीण प्रसंग आहे असे सांगुन लोकांना सहकार्याचे आवाहन केले.
आता परवाच कुठल्यातरी वर्तमान पेपर मधे वाचले की हे नुकसान भरुन काढायला अमुक वर्षे लागतील, इतके मनुष्यबळ लागेल वगैरे वगैरे. पण मला मनापासुन खात्री आहे की जपान लवकरच हे नुकसान भरुन काढून पुन्हा ती राख झालेली सगळी घरं तशीच्या तशी उभी करेल. आणि गेलेल्या माणसांच्या स्मृती मनात जपुनही पुन्हा एकदा जपान आपलं अस्तित्व सिद्ध करेल.
हे देशप्रेम, हि मानसिकता या लोकांनी कुठून आणली असेल?

---------------------
तुमची मदत इथे पाठवा-
Official Donation collection accounts, announced by several NGOs.
Telecasted in NHK (national telecast) as well.
Please generously donate to this.

Central Community Chest of Japan,
5F Shin Kasumigaseki Bldg., 3-3-2 Kasumigaseki, Chiyoda-ku, TOKYO, JAPAN 100-0013
info@c.akaihane.or.jp
http://www.akaihane.or.jp/english/eng20.html
Post Office Account Number 00170-6-518

जपान अर्थक्वेक रिलिफ फंड.
जपान रेडक्रॉस
URL: http://www.jrc.or.jp
http://www.jrc.or.jp/english/relief/l4/Vcms4_00002070.html

गुलमोहर: 

सावली तुम्ही सगळे सुखरूप आहात हे वाचून खूप बरं वाटलं आपल्याला पर्याय तरी आहे .. भारतात परतायचा..तिथला सगळ्या लोकांना सलाम..

बापरे, किती कठीण प्रसंग. आणि सगळ्यांनी अतिशय उत्तमरित्या हँडल केला. हॅटस् ऑफ!
दुसर्‍या दिवशी तुम्ही सगळे सुरक्षीत आहात हे वाचून खूप खूप बरं वाटलं. तात्पुरते भारतात यायचा निर्णय पण योग्यच.

भयंकर अनुभव गं. शुभेच्छा, तुम्हाला व जपानलाही!! माझी पण एक मैत्रिण रात्रभर ऑफीसात अडकली, मुली शाळेत व नवरा कामानिमित्त भारतात होता. ते पण सर्व सुखरुप आहेत.

ह्या भयंकर धक्क्यात आणि त्यानंतरच्या आपत्तींमधेही माणुसकी, नागरिक कर्तव्यं ह्याची जाण ठेवणारा प्रत्येक मोठं अन लहान जपानी बघून मी देवाकडे खरच प्रार्थना केली... की पुढला जन्मं जपानी मातीत दे.

सगळ्यांना धन्यवाद.
खरतर आम्ही वाईट परिस्थितीमधे वगरे नव्हतो. म्हणजे लाईट, पाणी, जेवण सगळ व्यवस्थित होतं. फक्त आफ्टरशॉक्स बसत होते. पण जे त्या भुकंप आणि त्सुनामी झालेल्या भागात आहेत त्यांची फार खराब स्थिती होती/ आहे. कित्येक लोकांना आता परत जायचं कुठे हा प्रश्न पडलाय. कित्येकांचे सगळे कुटुंब डोळ्यासमोर वाहुन गेलय. आणि एकटे म्हातारे आजोबा नाहीतर आज्जी उरल्यात. त्यांनी काय करायचं आता देव जाणे.
एका व्हिडीयो मधे तर मुलं आणि लोक धावत उंच जागी जाता जाता वळुन पाहिल्यावर मागचे सगळे पाण्यात जाताना मुलं बघताहेत. आपलं घर असे जाताना पाहुन ती लहान मुलं रडत होती ते पाहुन इतकं वाईट वाटतं. त्या मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल?
जपान मिडीयाने काही गोष्टी लपवल्या असाव्या अशी मलाही शंका आहेच. पण तरिही त्यांचे लिडर्स आणि राजकारणी लोकं घाबरुन घरात बसुन नव्हते. ते सतत लोकांसमोर येऊन बोलत होते. सगळ्यात आधी स्फोटाची बातमी दिली त्या आधी मि. एदानो नी स्वतः हेलीकॉप्टर मधुन जाऊन तपासणी केली होती. शिवाय मला अस वाटलं कि उगीच भारंभार सगळ्या बातम्या न्युज मधे आल्या तर मास पॅनिक होऊन जास्त नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी काही गोष्टी लपवल्या असु शकतात.
बहुतेक जपानी लोक मात्र सांगितलेल्या बातम्यांवर पुर्ण विश्वास ठेऊन होते.
खरोखर नुसता भुकंप असता तर जपान मधे फारसे नुकसान झाले नसते. ९.० असला तरी बरिच घरे छोटी लाकडाची बांधलेली होती. मोठ्या बिल्डींग तर पुर्ण स्टील स्ट्रक्चर च्या असतात. त्या मधे असे धक्के पचवण्याची क्षमता असते. बहुतेक सगळ्या नविन बांधलेल्या स्ट्र्क्चर मधे हि सोय असते. त्या बिल्डिंग अशा धक्क्यात हलतात म्हणुनच पडत नाही ( मोडेन पण वाकणार नाही च्या उलट!)
वर कोणीतरि म्हणाले आहे की हा प्लांट बांधताना कशी काय चुक केली? मी वर लिहिल्याप्रमाणे सगळ्या बॅकअप सिस्टीम चालु झाल्या पण त्सुनामीने पाणि गेल्याने मग खराब झाल्या आहेत. कदाचित हि अशी त्सुनामी अगदीच अपेक्षित नसेल. किंवा तोक्यो इले. पॉ. कंपनीची चुक असेल ते आता येईलच बाहेर. पण पुढच्या वेळी नक्कीच हि चुक होणार नाही असं वाटतय.
इव्हॅक्युएशन बॅग मधे सगळ्यात आधी बाळ असल्यास लहान बाळाचे कपडे, मिल्क पावडर, डायपर ठेवावे. वेगळे कॅन्ड फुड मिळते ( इमर्जन्सी साठीच ) ते थोडे ठेवावे. बाकी वर सांगितले आहेच.

सावली, रैना, जाईजुई, अश्विनी - खूप छान लिहिलं तुम्ही. कुणी आपल्या माणसाकडून असं वाचायला मिळालं की आणखी परिणामकारक ठरतं जे घडलं ते.

सावली , मंजिरी आणि इतर सगळ्यांनी कुठल्या परिस्थितीला तोंड धैर्याने तोंड दिल याची आम्ही फक्त कल्पनाच करु शकतो.
जपानी लोकांच्या सहनशीलतेला , संयमाला लाख लाख प्रणाम.
ह्या आपत्तीत प्राण गमावलेल्या सगळ्या नागरिकांना श्रद्धांजली , जपान लवकरात लवकर पुर्व पदावर येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

इतक्या सगळ्या आपत्तीमधेही लक्षात रहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे जपानी लोकांची सहनशीलता, आणि कुठल्याही परिस्थितीमधे नियम न तोडता रहाण्याची शिस्तप्रियता!<< खरेच या लोकांचे कौतुक करावे तितके कमीच, आपत्कालीन व्यवथापनाचे महत्व यांच्याकडुन शिकावे.

ही परिस्थीती आपल्या इथे उद्भवली असती तर मागच्या वेळेस प्रमाणे अनेक मत्री आणि त्यांचे नातेवाहीकांनी आपापले खिसे भरून घेतले असते.

आणि एकटे म्हातारे आजोबा नाहीतर आज्जी उरल्यात.
आपलं घर असे जाताना पाहुन ती लहान मुलं रडत होती ते पाहुन इतकं वाईट वाटतं. >>> Sad

सगळी संकटे त्या चिमुकल्या देशाला का बरे?>>>
जगभरातील ७० ते ८० टक्के मासेमारी जपानमधे होते. समुद्रातल्या देवमाशालाही सोडले नाहीये त्यामुळे थोडाफार का होईना पाण्यातील पर्यावरण साखळीला धोका निर्माण झाले असेलच. तसेच बर्‍याच ठिकाणी भराव घालुन लँड रिक्लमेशन केले आहे त्यानेसुध्दा पर्यावरणाचा समतोल बिघडला असणारच.

जपानी लोकांच्या संयमाला आणि धीराला सलाम आहेच. त्यांच्या या संयमाला जबाबदार आहे लहानपणापासुनची शिकवण व आजुबाजुला वावरणारे सर्व नागरीक त्या अंगी बाळगलेल्या शिस्तीचे पालन करत असतात. मनुष्यप्राणी हा आपल्या आजुबाजुला घडणार्‍या घटनांचेच अनुकरण करत असतो. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तिथे सतत भुकंप होत असल्याने सर्व इमारतींचे बांधकाम भुकंपाला लक्षात घेऊनच केलेले असते. गेल्या अनेक वर्षात अनेक भुकंपातही फारशी हानी न झाल्याने मानसीक आधार जपानी जनतेला आहे. त्यामुळे कदाचीत ते एवढ्या संयमाने वागत असतील. सरकारवरील विश्वास व सुरक्षीततेचे आत्तापर्यंतचे अनुभव यातुनच हे घडले असावे. आपल्याकडे चेंगराचेंगरी, भिती वगैरेमुळेच अनेक अपघात घडतात कारण लोकांना भुकंप वगैरे झाला तर इमारत कोसळेलच याची खात्री आहे.

अर्थात टेपकोने केलेला हलगर्जीपणा मात्र पटत नाही. सर्व सुरळीत झाल्यावर मात्र यावर भयंकर गदारोळ उठणार आहे. जपानकडुन ही अपेक्षा नव्हती. त्यामुळेच एका बाजुला जनतेत मास पॅनीक होईल या भितीने केले असेल तर दुसर्‍या बाजुला रेडीएशनच्या समस्येमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानची इमेज दुभंगली जाईल म्हणुन मुद्दाम मेडीया सेन्सॉर होत आहे असे वाटते.

या सर्व समस्यांमधुन जपान हा देश परत उभा रहावा हीच सदिच्छा.

सावली , मंजिरी आणि इतर सगळ्यांनी कुठल्या परिस्थितीला तोंड धैर्याने तोंड दिल याची आम्ही फक्त कल्पनाच करु शकतो.
जपानी लोकांच्या सहनशीलतेला , संयमाला लाख लाख प्रणाम.
ह्या आपत्तीत प्राण गमावलेल्या सगळ्या नागरिकांना श्रद्धांजली , जपान लवकरात लवकर पुर्व पदावर येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .>> अगदी अगदी मला हेच म्हणायचे होते. मी रोज तुमच्यासाठी व जपानातील जनतेसाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही सुखरूप पोहोचलात हे किती चांगले.

बातम्या बघुन आणि वाचूनच थरकाप होत होता, आता आखो देखा हाल वाचला ! सर्व सुखरूप परत आलात , बर वाट्लं. जपानी लोकांबद्दल आदर होताच आता तो आणखीनच वाढ्ला.

भयानक अनुभव. जपानला लवकरात लवकर सावरायची मदत मिळो!

मला एकच कळले नाही, इतका मोठ्या हेक्टरचा भुकंपाची काहिच सुचना न्हवती का?

केपी पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे हे प्रॉब्लेम झाले असं वाटत नाही. मुळात तिथली जमीनच भुकंप आणि ज्वालामुखी प्रवण अशी आहे. त्यामुळे भुकंप येणे किंवा ज्वालामुखी येणे कॉमन आहे.
बाकी टेप्को बद्दल हो. त्यांच्या कडून हलगर्जी अपेक्षित नव्हती.

ध्वनी, भुकंपाची काही दिवसापुर्वी नोटीस देऊन नक्की कुठे भुकंप होणार हे सांगणारी यंत्रणा माझ्या माहीतीत तरी अस्तित्वात नाही. साधारण काही सिसमिक अ‍ॅक्टीव्हीटीची नोंद घेतली जाते पण तरीही सेंटर कुठे / किती रिष्टर स्केलचा धक्का बसेल हे सांगणे सध्यातरी शक्य नाही. जपान मधे दोन तीन मिनिटे अगोदर नोटीस द्यायची सोय आहे. ती शक्य तेव्हा देतातही.
त्सुनामीची नोटिस भुकंप झाल्यानंतर एका मिनीटात येते. त्सुनामी किती मोठी आणि कधी किनार्‍यावर येणार हे डिटेल सांगितले जाते. लोकांना इव्हॅक्युएशन करण्यासाठी सर्व भाषांतुन टिव्ही, रेडीयो वर सांगितले जाते. पण या वेळजी त्सुनामी भुकंप झाल्याच्या १५ मिनीटात आणि १० मिटर उंचीची होती. किनार्‍यापासुन साधारण ५ किमी अंतरापर्यंत आत ती काही मिनीटात गेली. याची १५ मिनीटे आधी वॉर्निंग दिली तरी लोक ५ किमी दुर पोचणे शक्यच नव्हते. तिथे ज्या उंच बिल्डीग होत्या त्यांच्या जवळपास चौथ्या मजल्या पर्यंत पाणी पोचले. अशा मोठ्या इमारती फार नव्हत्याच.

मलाही काय लिहावं ते समजत नाही. भयंकर आहे सगळं! निसर्गापुढे आपण किती क्षुद्र याची जाणिव पुन्हा झाली जपान मधले फोटो आणि व्हिडिओ पाहून.

जपानी जनतेच्या धैर्याला, सहनशीलतेला आणि संयमाला सलाम! इथे काही काळ टीव्हीवरच्या बातम्या पाहून डोके सुन्न झाले होते. आपले जपानस्थित माबोकर सुखरूप आहेत हे कळाल्यावर खूप हुश्श झाले. वडिलांकडे सध्या एक जपानी बाई शिकायला येतात, त्यांचा त्यांच्या घरच्यांशी भूकंपानंतर चोवीस तास संपर्कच होऊ शकला नव्हता, खूप टेन्शनमध्ये होत्या. त्यांच्या घरचे सगळे सुरक्षित आहेत हे कळाल्यावर ते टेन्शन कमी झाले.

सावली, तू हे सगळं लिहिलंस हे खूप चांगलं केलंस. जपान लवकरात लवकर पूर्वस्थितीत यावा हीच प्रार्थना.

काय लिहावं समजत नाही. ह्या आपत्तीची बातमी घरी सांगितली तेव्हा लेक हॉलमधेच होती ऐकत आमचं बोलणं. झोपताना हज्जार प्रश्न विचारले तिने. आपण समुद्रापासून किती लांब आहोत, जपान पासुन किती लांब आहोत? इथे येणार का भुकंप आणि त्सुनामी? तुझं ऑफिस किती दूर आहे समुद्रापासून? इ.इ. बरीच डिस्टर्ब वाटली बातमी नुसती ऐकून, तर तिथल्या लहानग्यांची काय अवस्था झाली असेल हे समजू शकते.

तुम्ही सुखरुन आलात म्हणून खुप बर वाटलं.

Sad
जपान सारख्या देशाला असा शाप का मिळावा हे कळत नाही.
पण अनुभव एकदम छान लिहिला आहे.
बादवे जपान च्या लोकांचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे..
राहुन राहुन ८ कोटी लोकसंख्या असलेला देश.. महाराष्ट्र राज्या एवढीच लोकसंख्या आणी तेवढाच भुभाग.. तरी सुध्दा जगातील नं २ ईकोनॉमी.. हॅट्स ऑफ टु जपान
आणी त्या ऊलट महाराष्ट्र .. ६+ तास लोड शेडींग.. ईंफ्रास्ट्रक्चर च्या नावाने बोंबाबोंब, बकाल शहरे, रस्तावर खड्डेच खड्डे.. अतिपैसा मिळाला म्हणुन माज करणारे लोक.
त्यातल्या त्यात पश्चीम महाराष्ट्र बरा आहे.. पण विदर्भ आणी मराठवाडा.. अतिशय मागासलेले विभाग आहेत..

बापरे, खरेच काय झाले असेल त्या लोकांचे...पण ज्या पद्धतीने जपान दुसर्या महायुद्धानंतर उठला तसाच आत्ताही उठेल याबाबत अजिबात शंका नाही.
त्यांच्या जिद्दीला आणि कठोर परिश्रमांना हॅट्स ऑफ...
बाकी, सावली तुम्ही सगळे माबोकर सुखरूप आहात हे ऐकून खूप बरे वाटले...

Pages