"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग २ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

Submitted by sudhirkale42 on 16 February, 2011 - 03:13

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग २ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

----------------------------------------------------
पुनर्मूल्यमापन
कुठल्याही गोष्टीचे पुन्हा मूल्यमापन करताना सर्वात पायाभूत गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्‍याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्माची आवड असलेले कां समजले जाते? आपण अध्यात्मिक कसे आणि ज्या अध्यात्मिकतेची आपण इतकी बढाई मारतो ती आपल्या आयुष्यात कुठली भूमिका पार पाडते? जात, संस्कृती आणि भाषा याबाबत इतकी विविधता असलेला आपला देश अद्याप एकसंध कसा राहिला? तो असा एकसंध राहिला ते भारतीयांचा 'आत्मा' एक असल्यामुळे कीं आपल्यातल्या ’सकल-भारतीयत्वा’च्या वाढत्या जाणीवा बळे-बळे जोपासलेल्या उच्चतेच्या जाणीवेमुळे नसून या उलट आपण खरेखुरे कसे आहोत याची पक्की जाणीव झाल्यामुळे आहेत?
वरील प्रश्नांची उत्तरे थंड डोक्याने देणे जरूरीचे आहे. हे प्रश्न टीकेचे मोहोळ उठविण्यासाठी किंवा कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी विचारलेले नाहींत. त्या प्रश्नाचे तसे मूल्य कांहींच नाहीं, ते केवळ आपले मूल्यमापन पुन्हा करण्यास भाग पाडण्यासाठी आहेत. या प्रश्नाची उत्तरे देता-देता या पुस्तकाचा दडलेला उद्देशही उलगडेल आणि तो उद्देश इथेच सारांशाने सांगणे हितावह होईल असे वाटते. भारतीय लोक सत्तेच्या समीकरणाबाबत अतीसंवेदनाशील असतात. सत्ता मिळविणे म्हणजे आयुष्याची एक कायदेशीर ध्येयपूर्ती आहे असे ते समजतात आणि सत्तेशी तडजोड करण्यात, तिच्याशी जुळवून घेण्यात आणि सत्तेचा केंद्रबिंदू शोधण्यात ते आपला धूर्तपणा वापरतात. ते सत्ताधार्‍यांबद्दल आदर बाळगतात आणि त्यांच्याबरोबर स्वार्थापोटी सहकार्य आणि संगनमत करायला उत्सुक असतात. सत्तेसाठी गटबाजी करायला किंवा कारस्थाने शिजवायला ते एका पायावर तयार असतात. सत्तेच्या मोहाचा व प्रलोभनाचा त्याग करतात त्यांचा ते आदर करतात. पण हा आदर त्यांच्या या वृत्तीचे अनुकरण करण्यासाठी नसतो तर केवळ त्यांच्या अशा मोहावर विजय मिळविणार्‍या वृत्तीच्या आदरापोटी!

वरिष्ठांसमोर नम्र पण कनिष्ठांबद्दल बेपर्वाई
अलीकडे झालेल्या बदलांची चर्चा आपण (या पुस्तकात) नंतर करू पण हे बदल जरी झाले असले तरी भारतीय लोकांचा कल अधिकारपदाच्या क्रमवारीला अतोनात मान देण्याकडे असतो. ज्यांना ते स्वतःपेक्षा वरिष्ठ समजतात त्यांच्यापुढे ते जरूरीपेक्षा जास्त झुकतात आणि ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी ते बेपर्वाईने वागतात, त्यांना उपेक्षितात किंवा त्यांची हेटाळणी करतात. त्यामुळे स्वतःच्या सामाजिक स्थानानुरूप असणार्‍या स्वतःबद्दलच्या सन्मानाच्या कल्पना आणि स्वतःची वैयक्तिक प्रतिमा याचे भारतीयांच्या लेखी भरमसाट महत्व असते. त्यांची उपजत प्रवृत्तीनुसार आणि स्वभावतः त्यांचा कल लोकशाहीकडे नाहीं. इथे लोकशाही इतकी सहजासहजी रुजली याचे कारण या पद्धतीने झटपट मोठे होता येते आणि वैयक्तिक सत्ता, शक्ती आणि वैभव प्राप्त करून घेता येते याची त्यांना झालेली जाणीव!
भारतीय नागरिक इहलोकापलीकडचा विचार करणारे कधीच नव्हते किंवा कधीच असणारही नाहींत. त्यांना जगात उपलब्ध असलेल्या ऐहिक सुखसोयींचा प्रचंड सोस असतो आणि ते श्रीमंतांकडे आदराने पहातात. ते नफ्यामागे इतरांपेक्षा जास्त चिकाटीने लागतात. त्यामुळे ते धूर्त व्यापारी किंवा कल्पक आणि चतुर व्यवसायी बनू शकतात. त्यांची पावले खंबीरपणे जमीनीवर असतात आणि डोळे आपल्या जमाखर्चाच्या कीर्दवहीवर! (As in the case of temporal power) इहलोकाच्या 'कायद्या'नुसार भारतीय लोक अंतिम यशस्वी निकालाला महत्व देतात, तो मिळविण्यासाठी अनुसरलेल्या मार्गाला नाहीं. भारतीयांचा अध्यात्मिक कल जरी एक तत्वज्ञानाचा भाग म्हणून उदात्त असला तरी भारतीय लोक त्यांचा आपल्या धार्मिक चालीरीतींत केवळ सत्ता आणि वाईट मार्गाने वैभव मिळविण्यासाठी समावेश करतात. वाईट काळातून जाताना या तत्वज्ञानाचा उपयोग होतोच कारण त्यामुळे भारतीयांची चिकाटी वाढते. बहुतेक भारतीय इहलोकाच्या पलीकडीचा जो विचार करतात तो केवळ त्यांना स्वतःला ताबडतोब मिळाणार्‍या फायद्याशी संबंध नसलेल्या त्यांच्या भोवतालच्या सामाजिक वातावरणाबद्दलच्या औदासीन्याचा भाग असतो.

ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार बरोबर?
समाजातील असमता, गलिच्छपणा आणि मानवी हाल-अपेष्टां यांचा आश्चर्य वाटावे इतक्या सहजपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचा पुरावा म्हणजे त्यांचा स्वतःत पूर्णपणे गुंतून जायचा स्वभाव! भारतीय लोक व्यवहारी असतात आणि त्यांचा दृष्टिकोन स्वाभाविकपणे अनैतिक असतो. हिंदु धर्मात पराकोटीच्या पापाची कुठलीही व्याख्या नाहीं. कुठल्याही कृतीचे ठराविक संदर्भात समर्थन करता येते आणि हिंदू लोक देवाला नित्यनेमाने 'लांच' देतात! भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे कारण आपले ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार ही चुकीची गोष्ट असे मानलेच जात नाहीं. भ्रष्टाचार पकडला गेला तर त्यावर जो नैतिक गदारोळ उठतो त्याची तीव्रता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात स्वीकारण्याजोगा असतो त्याच्या विषम प्रमाणात असते. नैतिकतेची कल्पना आणि उच्च विचारसरणीचे तत्व भारतीयांना एक तात्विक पातळीवर आवडते पण रोजच्या आचरणात तत्व ते अव्यवहार्य म्हणून दुर्लक्षिले जाते.

मिरविण्यापुरती आधुनिकता?
नेहरूंच्या किंवा पाश्चात्यांच्या व्याख्येनुसर 'आधुनिकता' म्हणजे कुठल्याही विषयावर बुद्धीचा वापर करून पूर्वग्रहाशिवाय विचारपूर्वक प्रतिसाद देणे. अशी आधुनिकता हे सुशिक्षित भारतीयांचे लोकांत सांगायचे ध्येय आहे. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय आणि वस्तुनिष्ठपणे असे म्हटता येईल कीं असे ध्येय अंगावर चढविलेली आधुनिकतेची झूल आहे व या झुलीच्या खाली भारतीयांवर सातत्याने असलेली रूढींची पकड लपविली जाते असे. भारतीयात आधुनिकता आणि रूढी ज्या पद्धतीने एकत्र नांदतात ती पद्धती खरोखर अनोखी आहे. शेवटी हिंदू हे हाडाचे अहींसावादी नसून ते व्यवहारीपणे हिंसेच्या मर्यादा समजून घेतात. जिवंत रहाण्याच्या अंतिम ध्येयासाठी ते हिंसा टाळायला तयार असतात. आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात. त्यांची इतर धर्मांबाबतची ऐतिहासिक सहिष्णुता-खास करून लष्करी शक्तीचे पाठबळ असलेल्या धर्मांबाबतची-या संदर्भात समजण्यासारखी आहे. भारतातही जातीय दंगली होतात आणि जरी त्या ज्या पद्धतीने दाखविल्या जातात त्यांना 'प्रमाण' मानता येणार नाहीं. साधारणपणे ज्या हिंसेमुळे कांहीं प्रमाणात का होई ना अस्थिरता किंवा अराजक निर्माण होऊन समाज व्यवस्थेला भीती निर्माण होऊ शकते अशा हिंसेच्या भारतीय लोक विरुद्ध असतात. पण जातीय उच्च-नीचतेची किंवा शुद्धतेची अंमलबजावणी करण्याच्या नियंत्रित वातावरणात-ज्यात हिंसेला परंपरागत अनुज्ञा असेल किंवा जिथे आपल्या संख्येचे प्राबल्य असेल तिथे हिंदूही इतरांइतकेच हिंसक बनू शकतात!
कांहीं ठळक स्वभाववैशिष्ट्ये वर दिलेली आहेत पण ते त्यांचे संपूर्ण वर्णन नव्हे. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मनुष्यस्वभावात अगणित वेगवेगळ्या सूक्ष्म छटा असतात आणि स्वभाववैशिष्ट्यांत नेहमीच विशिष्ट तफावत असू शकते. भारतीय स्वभाववैशिष्ट्यांचे हे शब्दचित्र म्हणजे एक टीकात्मक समालोचनाचा प्रयत्नही नव्हे. हे शब्दचित्र आणि आपल्या स्वत:बद्दलच्या परंपरागत प्रतिमा यात नक्कीच फरक आहे. पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.

गुलमोहर: 

या अनुवादावर काय प्रतिक्रिया अपेक्षित आहेत?
सर्व लिखाण चर्चात्मक उहापोह नसून निष्कर्षवादी (Judgemental) आहे.
उदा:>>
समाजातील असमता, गलिच्छपणा आणि मानवी हाल-अपेष्टां यांचा आश्चर्य वाटावे इतक्या सहजपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचा पुरावा म्हणजे त्यांचा स्वतःत पूर्णपणे गुंतून जायचा स्वभाव! भारतीय लोक व्यवहारी असतात आणि त्यांचा दृष्टिकोन स्वाभाविकपणे अनैतिक असतो. हिंदु धर्मात पराकोटीच्या पापाची कुठलीही व्याख्या नाहीं. कुठल्याही कृतीचे ठराविक संदर्भात समर्थन करता येते आणि हिंदू लोक देवाला नित्यनेमाने 'लांच' देतात! >>
अशा प्रकारच्या लेखकांची कींव येते कारण स्वस्त व सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी असे खळबळजनक विधाने असलेले लिखाण ते पाश्चिमत्य वाचकांना नजरेसमोर ठेवून करतात.
हे पवन कुमार कोण्?यांची वैचारिक खोली काय आहे?
कुठल्या वाचन्/लेखन्/मननातून या विचार प्रणालीचा उगम झाला आहे?
अन शेवटी
सुधीरजी-आपला या लेखनाचे भाषांतर करणे हा वैयक्तिक निर्णय असेल पण इथे माबा वर कुठल्याही प्रस्तावने शिवाय टाकण्याचे प्रयोजन काय आहे?

हे पुस्तक सर्व भारतीयांनी वाचावे असे मला वाटते म्हणून.
अगदी पहिल्या लेखात याबद्दल मी लिहिले आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले Being Indian हे पुस्तक वाचले. भारतीय लोक जसे वागतात तसे ते कां वागतात याची चर्चा या पुस्तकात आहे. उदा. आपण फितुरी कां करतो, पैसे कां खातो, दांभिक कां आहोत, आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे कां असतात वगैरे वगैरे! मला तर हे पुस्तक वाचताना "आपण आरशात तर पहात नाहीं ना" असाच भास होत होता आणि संपविल्यावर वाटले कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे एवढेच नव्हे तर प्रत्येक पदवीच्या अभ्यासक्रमातही ते लावले गेले पाहिजे.
माझे वडील रोज गुरुचरित्र वाचायचे, माझी आई आजही शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचते, मी कांहीं स्तोत्रें म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची दहा-एक पाने रोज प्रत्येक भारतीयाने वाचावी असे मला वाटते.

अर्थातच या पुस्तकाबद्दलचे हे माझे वैयक्तिक मत आहे व ते प्रत्येकाला पटेलच असे नाहीं. आपण हे मूळ पुस्तक वाचावे असे मला वाटते.

सुधीरजी, मला वाटतं की लेख जोडले तर प्रस्तावना आणि मागील लेख शृंखला सहज नवीन वाचकाना मिळू शकतील.

मी यापुढे आधीच्या लेखांचे दुवे द्यायचे ठरविले आहे. ज्याला हे लेखन आवडेल व वाचावे असे वाटेल तो/ती स्वतः जोडून घेऊ शकेल.
खरे तर लहान-लहान तुकडे करायची सूचना एका वाचकाने केली होती ती मलाही पटली. सलगपणे वाचायला हे 'जड' वाचन जरा भारी पडत आहे असे मलाही जाणवले. तसेच प्रत्येक परिच्छेदावर एक छोटेसे शीर्षकही इतर संस्थळावरील वाचकांच्या सूचनेवरूनच देत आहे. मूळ पुस्तकात अशी शीर्षके नाहींत.
सकारात्मक सूचनेबद्दल धन्यवाद.

नक्की कोणत्या भारतीयांबद्दल लिहीले आहे? आंतर्देशीय भारतीय, जे जगात सगळीकडे भटकत असतात, (अति श्रीमंत), की जे कधी स्वतःचे खेडेगाव सोडून तालुक्याच्या गावीसुद्धा गेले नाहीत,
अंबानी सारखे भव्य सुंदर घरात रहाणारे की झोपडपट्टीत रहाणारे? शेतकरी, की आय टी मधले लोक? राजकारणी की अजिबात मतदानसुद्धा न करणारे? शाळा कॉलेजात शिकलेले की न शिकलेले? मिलिटरी मधले की नसलेले?

तर असे अनेक प्रकारचे सर्वजण भारतीय असताना सर्वांना सरसकट लाच खाणारे, फितुर असे कसे म्हणता येईल? म्हणून मला या लेखकाचे म्हणणे पटले नाही.

जर तुम्ही समाजात रोजच्या व्यवहारात आपल्याला भेटणार्‍या, ज्यांच्याशी आपले कामानिमित्त संबंध येतात, त्यांच्याबद्दल बोलत असाल, तर त्यातहि सगळेच एकसारखे नसतात, बरेच जण प्रामाणीक असतातच, नियम पाळतात नाहीतर सगळे उद्योगधंदे केंव्हाच बंद पडले असते! नुसतीच गुंडगिरी उरली असती!

माझ्या मते भारतीय व्यक्ति नाही तर भारतीय राष्ट्र, भारतीय समाज हे प्रचंड गोंधळलेलेले आहेत. आपले वैदिक ज्ञान, आपल्या परंपरा खर्‍या की पाश्चिमात्य पद्धति बरी? आणि मग अर्धे लोक म्हणतात धर्म खोटा, नि अर्धे म्हणतात, नाही नाही, आपला धर्मच श्रेष्ठ! परराष्ट्रनीतीत शांतता, अहिंसा, देशात मात्र जिकडे तिकडे हिंसात्मक आंदोलने, अगदी भर लोकसभेत, विधानसभेत!!

व्हॅलेंटाईन डे करतील पण अमेरिकनांसारखी समाजशिस्त जमत नाही! अमेरिकनांसारखे लाजलज्जा, नीति अनिती सगळ्याला गुंडाळून ठेवून मिळतील तिथून पैसे करायला बघतात, पण ते नवीन कल्पना, संशोधन, नवीन शोध लावून नाहीतर एकमेकांना बनवून!

शिस्त, राष्ट्रभावना इ. जरा कमी पडताहेत. काम उरकण्या ऐवजी, चांगले करण्या ऐवजी कसले तरी मूर्खासारखे कायदे नि नियम केले आहेत की कुणाचेहि काम धड होऊ नये.

याला अर्थातच वेळ लागतो. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षे म्हणजे अजून देशाची अवस्था एखाद्या १ ते २ वर्षे वयाच्या मुलासारखी आहे. आपण कुणितरी स्वतंत्र व्यक्ति आहोत ही जाणीव असते, पण पुरेसे शिक्षण नि ज्ञान नसल्याने, कुठल्याहि प्रकारचे नियम पाळणे वगैरे समजत नाही. जे दिसेल ते मला हवे, नाही मिळाले तर आरडा ओरडा करून, किंचाळून हट्ट करायचा.

जरा अजून साठ सत्तर वर्षांनी आपले जगभर हिंडून आलेले, जग पाहिलेले, हुषार लोक बरोब्बर समजतील की जुन्या भारतातले काय घ्यायचे नि नवीन पाश्चिमात्य संस्कृतीतले काय घ्यायचे. मग भारत एकदम सर्वोत्कृष्ठ देश बनेल, कारण मुळात भारतात प्रचंड बुद्धिमत्ता आहे! जगातल्या कुठल्याहि देशापेक्षा जास्त.

झक्कीसाहेब,
पहिली गोष्ट म्हणजे मी इथे जी उत्तरें देतो ती लेखकाची मतें मला जितकी समजली आहेत त्यावर आधारित आहेत. मते श्री. वर्मांचीच आहेत, पण मला बर्‍याच प्रमाणावर पटली नसती तर या पुस्तकाचा अनुवाद करायच्या फंदात मी पडलोच नसतो! (हा अनुवाद करताना मी माझा भरपूर वैयक्तिक वेळ कारणी लावत असतो.)
माझ्या मते ही मते फक्त भारतीयांनाच लागू होतात असे नाहीं तर सार्‍या मनुष्यजातीला लागू पडतात. भारतीयांना जरा जास्त लागू होतात, पण आपल्यापेक्षा पाकिस्तानच्या लोकांना जास्तच लागू होतात असे मला वाटते.
माझ्या अनेक बॉसेसपैकी एक अमेरिकन बॉस होता (सध्या स्वगृही परतला आहे). जेंव्हां मला आपल्या सरकारच्या कांहीं गोष्टी आवडत नसत व मी त्या बोलून दाखवीत असे त्यावेळी तोही म्हणायचा कीं ब्रिटिश लोकशाही ७००-८०० वर्षे जुनी आहे, अमेरिकन लोकशाही २००+ वर्षे जुनी आहे तर भारताची लोकशाही (त्यावेळी) ५०-५५ वर्षाची आहे तिला प्रौढ व्हायला वेळ लागेल हे लक्षात ठेव. हे मला आजही आठवते व पटते.
हा बॉस भारतात अनेक वेळा आलेला व त्याने भारतीयांशी अनेक वर्षें व्यवहार केलेला होता आणि त्याने सांगितलेल्या बर्‍याच 'कथा' मला या पुस्तकात दिसतात. (ही १९९४-९६ ची गोष्ट आहे, हे पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झालेले आहे.)
शेवटी आपण भारतीय असे आहोत काय?
प्रत्येक भारतीय असा नक्कीच नाही. नाहींच. नाहीं तर आपला देश आज superpower व्हायच्या उंबरठ्यावर नसताच! भारतीयांच्या creativityला तोड नाहीं. अनेक आपत्ती असूनही आज भारत असा मोठा झालेला आहे!
पण वर्मांची कांही वाक्ये मात्र हृदयाला घरे पाडतात, माझ्या तरी. उदा. ५००० वर्षांपेक्षा जास्त जुन्या संस्कृतीच्या मुशीत तयार झालेले आपण भारतीय प्रत्येक आक्रमकांचे अगदी सहजपणे, विनासायास गुलाम कसे झालो? गुलामच झालो नाहीं तर आपण त्यांच्याशी संगनमत केले, फंद- फितुरी केली, त्यांना जिंकायला मदत केली आणि नको ती माहिती पुरवून त्यांचे राज्य भक्कम केले. मग ते बहामनी साम्राज्य असो, मोगल असोत, ब्रिटिश साम्राज्य असो, मराठेशाही असो वा पेशवाई असो. आपली गद्दारी सगळीकडे स्पष्ट दिसते.
आजही आपले लोक गद्दारी करतच आहेत, त्याचे समर्थनही करताना दिसतात. मग ते २६/११च्या हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तान्यांना मदत करणारे कलकत्त्याचे लोक असोत किंवा इथे झालेल्या इतर दहशतवादी हल्ल्यांत त्यांना मदत करणारे भारतीय असोत किंवा आपल्या अमेरिकेबरोबरच्या अणुविद्याकराराला चीनच्या बाजूने विरोध करून विलंब लावणारे साम्यवादी असोत.
आजही "Being Indian"मध्ये उदाहरण म्हणून दिलेली माणसे आपल्यात वावरत आहेतच! अगदी ताजे उदाहरण म्हनजे PDP सरकारने केलेल्या Power Point Presentation मध्ये अक्साईचिन आणि काराकोरमचा भाग चीनचा दाखविला आणि काश्मीरचा कांहीं पाकव्याप्त भाग पाकचा दाखवला. (आपला म्हणून दाखविलाच नाहीं!) वर त्याचे समर्थनही महबूबा मुफ्ती करतात. http://tinyurl.com/5rc5zxl हा दुवा उघडा आणि वाचा.
असे पुस्तक वाचून (किंवा वाचायला लावून) कांहीं वर्षांनी तरी आपण बदलू अशी मला आशा काय अगदी खात्री वाटते.
हे पुस्तक वाचताना आपल्याला आला तसा मलाही प्रथम राग आला. पण मग लक्षात आले कीं आपण आरशात पहात आहोत. कुणावर रागवायचेच असेल तर आपण स्वतःवरच रागावले पाहिजे.
पुढे जेंव्हा लेखक आपल्या फंदफितुरीसारख्या विषायवर येतील तेंव्हां तर अंगाचा तिळपापड होतो!