राजकोटला नोकरीसाठी जायचे ठरवले तेंव्हा बिग इंस्टिट्युट, प्रोफ़ेशनल ग्रोथ, बेटर पे अँड पर्क्स इ.इ. लेबलच्या मागे ते गाव कसे असेल, लोक कसे असतील असला काही विचार अजिबातच केला नव्हता.
राजकोटमधली माझी मे महिन्यातली गरम, दमट पहिली सकाळ. नउ वाजेपर्यंत आरामात लोळून मग मी वर्तमानपत्र आणायला बाहेर पडतो, एक चौक मग दुसरा, त्याच्या पुढचा; चालतोय, चालतोय पण पेपरचा एकही स्टॉल दिसत नाही.शेवटी थकून परततो आणि बिल्डींगच्या वॉचमनला विचारतो; ’यहां पेपर नहीं मिलता है क्या?’ तो आश्चर्याने उत्तरतो, ’क्यों नहीं, सब मिलते है; शाम को!’ रविवारी सकाळी उठून पेपर कशाला वाचायचा, हा प्रश्न त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत असतो. वेलकम टू राजकोट!
पुढच्या दोन वर्षाच्या वास्तव्यात राजकोटचा हा निवांतपणा पदोपदी अनुभवायला मिळाला.
या शहराला फ़ार मोठा, जुना इतिहास नाही. एकतर हे शहरच ठरवून वसवले गेले आहे. या शुष्क प्रदेशात भरपूर पाणी असलेली जागा पाहून जाडेजा घराण्याच्या राजांनी इथे राजधानी स्थापली. राजकोटच्या त्या काळाच्या फ़ारच थोड्या खुणा आता शिल्लक आहेत. ब्रिटीश राजवटीचा ठसा मात्र इमारतींच्या रुपाने अनेक ठिकाणी दिसतो. केवळ संस्थानिकांसाठी सुरु केलेले ’राजकुमार कॉलेज’ हे त्यातले सर्वात महत्वाचे मॉन्युमेंट. तिथे राजपुत्रांच्या घोड्यांसाठी बनवलेला ’पार्किंग लॉट’ देखील आहे.
गुजराती माणूस म्हणजे पैशाला चिकट, थोडा लबाड, अशी आपल्या मनात जी प्रतिमा आहे (मुख्यत: हिंदी सिनेमातील प्रोटोटाईपमुळे) तिचा इथे अजिबात अनुभव येत नाही. ल़क्षात घ्या, हा गुजरात नाहीए तर सौराष्ट्र आहे आणि इथे घाई नामंजूर आहे. पानपट्ट्यांचा अपवाद सोडल्यास बहुतेक दुकाने सकाळी दहा नंतर उघडतात, दुपारी एक ते चार बंद असतात आणि रात्री कितीही वाजेपर्यंत चालू असतात. धंदा करायचा जोश, कसही करुन गिर्हाईकाला गटवायची अहमहमीका कुठेही आढळत नाही. मात्र या निवांतपणाचा कळस जन्माष्टमीच्या दिवसात होतो. त्यावेळी गावात कर्फ़्यू असल्याप्रमाणे सर्व दुकाने पूर्ण आठ दिवस बंद असतात. या सुशेगाद कारभाराची दुसरी बाजू म्हणजे इथली प्रचंड महागाई. भाज्या, किराणा, कपडे सगळचं एकदम चढ्या भावात मिळतं. सगळ्या जगात मंदी येईल पण इथली अनाकलनीय महागाई अजिबात हटणार नाही.
इतरवेळी आरामात कामं उरकणारे हे लोक घाई फ़क्त एका गोष्टीत दाखवतात, गाड्या चालवताना. भारतीय ट्रॅफ़िकमधले सर्व अवगुण इथे एकवटले आहेत. बेशिस्त वाहतूकीची आपली मराठी व्याख्याच इथे बदलून जाते. पहिली गोष्ट म्हणजे इथे सरकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वातच नाही. बहुतेक रिक्षा म्युझियममधे ठेवण्याच्या लायकीच्या आहेत आणि पेट्रोलसदृश कसल्याही द्रव्यावर चालतात.थोड्याफ़ार सी.एन.जीवाल्या रिक्षा वाट्टेल ते दर सांगतात (सगळ्या रिक्षात कॉमन असणार्या गोष्टी दोनच, 'अमिसा' पटेलचा फोटू आणि 'हिमेस'भाईचे गाणे). या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रचंड प्रमाणात असलेली दोन आणि चारचाकी वाहने. शहरात २-३ ठिकाणीच सिग्नल आहेत, ट्रॅफ़िक पोलिस हा प्राणी फ़क्त काही मोठ्या चौकात आणि तो ही रविवारीच दिसतो. इथे गाडी चालवायची एकच रीत आहे ’घुसा’, कुठूनही, कसेही. पार्किंगची इथली पद्धत तर अद्वितिय आहे, गाडी बंद केल्यावर जिथे थांबेल तिथेच ती सोडून देतात मग ती रस्त्याच्या मधोमध का असेना. त्यात इतरांनाही काही वाटत नाही. त्या ’सोडलेल्या’ गाडीला वळसा घालून वाहतूक शांतपणे चालू राहते.
हे सर्व कमी म्हणून की काय पण संपूर्ण शहरात सर्वत्र गाई-गुरे फ़िरत असतात. यात विशेष ते काय असे तुम्हाला वाटेल, पण आहे! एकतर ह्या प्राण्यांची संख्या अतिप्रचंड आहे. दिवसरात्र ही गुरे गावभर चरत असतात आणि आख्ख्या गावाचाच एक गोठा करुन टाकतात. अर्थात हा गोठा बनवण्यात सर्व राजकोटी मनापासून सहभागी असतात. कचरा हा कचरापेटीत टाकायचा हेच यांना मान्य नाही. तो सरळ रस्त्यावर फ़ेकून देतात आणि ’गाय खा लेगी’ असं सांगून पुण्य मिळवल्याचे समाधान मिळवतात.
खाण्यापिण्याच्या बाबतीत हे एक अजब गाव आहे. सुरवातीला मला वाटले इतके कडक शाकाहारी गाव दुसरे नसेल. पिझ्झा हट सारख्या इंटरनॅशनल चेनमधे देखील नॉनव्हेज मेनू मिळत नाही आणि अधिकृतपणे नॉनव्हेज मिळणारी २-३च हॉटेल्स आहेत. पण नंतर लक्षात यायला लागले की हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. राजकोटच्या मुस्लिमबहुल ’सदर’ भागात नॉनव्हेजची ’कॅरी होम पार्सल’ सेंटर्स आहेत आणि ती तुफ़ान चालतात, फ़क्त आपण हे खातो असे उघडपणे मान्य करायला सामान्य राजकोटी तयार नसतो. जुना वैष्णव सांप्रदाय आणि नविन स्वाध्याय परिवार, स्वामिनारायण पंथ इत्यादींचा हा एकत्रित प्रभाव आहे. ’पिण्या’च्या बाबतीतदेखील तोच प्रकार आहे. ड्राय स्टेट असल्याने सरसकट वाईन शॉप्स दिसणार नाहीत पण गरजूंना आपली तहान भागवणार्या जागा बरोबर माहिती असतात, सगळा उघड छुपा कारभार!
राजकोटच्या खाद्यसंस्कॄतीचे खरे वैशिष्ठ्य आहे तिथली आईस्क्रिम्स. इतकी फ़्रेश, चविष्ट आणि श्रीमंत आईस्क्रिम्स मी अद्याप इतर कोठेही खाल्ली नाहीत. आईस्क्रिममधे कसलाही इसेन्स अजिबात घालत नाहीत, जो काय फ़्लेवर असेल तो ओरिजनल, त्यामुळे मँगो आईस्क्रिम आंब्याच्या सिझनमधेच मिळणार. आईस्क्रिमचा जो काही प्रकार असेल ती गोष्ट त्याच्यात प्रचंड प्रमाणात सापडणार, म्हणजे अंजिर आईस्क्रिम घेतले तर त्यात अक्षरश: घासाघासाला अंजिर मिळणार, त्यात अजिबात कंजूषी नाही. उगीच दोन काजू, तीन मनुका आणि अर्धा अंजिर टाकून त्याला ’मस्तानी’ म्हणायचे हा प्रकार नाही!
माझ्या शिक्षकी पेशामुळे पालकांशी सतत संपर्क आला आणि राजकोटचा स्वभाव कळायला अजूनच मदत झाली. त्याआधी महाराष्ट्रात काही वर्षे काम केले असल्याने ’जागरुक पालक’ नामक प्राण्याची माझी चांगलीच ओळख होती, पण इथे सगळा उलटाच कारभार. एकतर तुम्ही इंग्रजीत बोललात की तुम्ही ग्रेट हे गृहीत धरले जाते (गुजरात्यांचे इंग्रजी हा एक चावूनचोथा झालेला विषय आहे त्यामुळे त्याबद्दल फ़ार काही लिहीत नाही. फ़क्त राजकोटमधल्या काही पाट्या जशाच्या तश्या लिहित आहे- ’ड्रीम होल’, ’सन कोमप्लेक्ष’, ’झेरोक्ष सेंटर’, ’हेर सलून’ इ.इ.). मुळात मुलाकडून यांच्या फ़ारश्या अपेक्षाच नाहीत. ’मी तुला म्हणतोय का की ६०% वगैरे मिळव, पण नीट पास तरी हो’ असं मुलाला अजिजिने सांगणारे बाप पाहिले की माझे मन भरुन यायचे! अगदी हुशार मुलांच्या बाबतीतही बहुतेक पालक उदासिनच असायचे, ’हां, म्हणतात सगळे की फ़ार हुशार आहे, बघू काय करतो ते’ अशी वृत्ती. कारण मुलगा फ़ार शिकला तर बिझनेस कोण करेल ही भितीही असतेच. कडवा पटेल समाजात तर घरटी एक माणूस ’फ़ोरेन’मधे आहे त्यामुळे मुलाने १२वी किंवा फ़ारतर डिग्री मिळवावी आणि मग यूएस, यूके, कॅनडा, गल्फ़, केनिया, अंटार्क्टीका इ.इ. ठिकाणी असलेल्या नातेवाईकाकडे जावे असा सरळ हिशेब. त्याला भारतातच शिकायचे असेल तर भरपूर पैसे घेउन वाट्टेल ती पदवी द्यायला महाराष्ट्र-कर्नाटकात काय कमी कॉलेज आहेत? अर्थात या सगळ्याला अपवाद आहेच आणि तो मुख्यत: मुलींचाच आहे.
माझ्या तिथल्या वास्तव्यात गुजरात विधानसभा आणि लोकसभा अशा दोन निवडणूकाही पाहता आल्या. दोन्हीही वेळा स्थानिक उमेदवाराचा चेहरा कुठल्याही पोस्टरवर कधीही दिसला नाही. सगळीकडे एकच चेहरा 'नरेंद्रभाई मोदी'. जणू आख्या राज्यात एकच माणूस निवडणूक लढवतोय. मोदींची एक 'लाईव्ह' प्रचारसभाही अनुभवली. आवाजावर प्रचंड प्रभुत्व, लोकांवर जादू करण्याची अफाट ताकद आणि त्याचबरोबर प्रत्येक आविर्भावातून प्रकटणारा उद्दाम आत्मविश्वास. संपूर्ण भाषणात त्यांनी उमेदवाराचा उल्लेख अशरशः एका वाक्यात संपवला आणि उरलेले सगळा वेळ फक्त 'मी, मी आणि मी, तुम्हाला मी हवा असेन तर याला निवडून द्या'
माझ्या मते भारतीय राजकारणात इतका पराकोटीचा आत्मकेंद्री आणि अनअपोलोजेटीक नेता दुसरा नाही.
वृत्तीने मला राजकोट-सौराष्ट्र कायमच औरंगाबाद-मराठवाड्यासारखे वाटले. अगदी स्मॉल-स्केल इंडस्ट्रीच्या अर्थकारणापासून ते ’अमदावादी-सुरती आमची उपेक्षा करतात’ या ’मुबै-पुणेवाले आम्हाला कमी लेखतात’ सारख्या तक्रारीपर्यंत! तोच निवांतपणा, जीवनाचा संथ वेग, आपुलकीने बसवून आदरातिथ्य करणारी माणसे.
दोन वर्षात या गावाने खूप काही दिले, शिकवले, मोठे केले. काही गावं पहिल्या भेटीतच मित्र होतात तर काहींच्या बैठकीतले व्हायला वेळ लागतो. राजकोटची आणि माझी ओळख अजून अपुरी असतानाच अनपेक्षितपणे महाराष्ट्रात परत यायची संधी मिळाली. राजकोटची साथ ठरवले होते त्यापेक्षा लवकर सुटली. आता उरलेल्या गप्पा मारायला या अघळपघळ मित्राची कधी गाठ पडणार याची मी वाट पाहतोय.
किती मस्त ओळख करुन दिलीय या
किती मस्त ओळख करुन दिलीय या गावाची ! माझे (भावनगर मुंबई ) विमान एकदा तिथे उतरले होते, एवढाच त्या गावाशी संबंध. मी भावनगरला जास्त वेळा गेलोय. तिथे जरा बरा कारभार असायचा, आईस्क्रीम मात्र अप्रतिम, तिथेही.. आणि पेढे, बर्फी वा !!
मस्त लिहिलयसं आगाऊ ! माझे
मस्त लिहिलयसं आगाऊ ! माझे सुरतचे दिवस आठवले ( फक्त मोदींविषयी सोडुन , त्या माणसाने गुजरातसाठी केलेलं कार्य अद्वितिय आहे. )
>>उगीच दोन काजू, तीन मनुका
>>उगीच दोन काजू, तीन मनुका आणि अर्धा अंजिर टाकून त्याला ’मस्तानी’ म्हणायचे हा प्रकार नाही!
बाप रे! ह्या वाक्यावरून इथं रणकंदन झालं नाही म्हणजे मिळवलं. लेख मस्त आहे.
सगळा उघड छुपा कारभार! >>> छान
सगळा उघड छुपा कारभार! >>>
छान विरोधाभास
लेख मस्त आहे. छान माहिती
लेख मस्त आहे. छान माहिती मिळाली.
आगावा, तुझी शैलीच इतकी ओघवती
आगावा, तुझी शैलीच इतकी ओघवती आहे की काहीही लिहीलेस तरी सोडवत नाही. स्पष्टच सांगायचे तर मला हा अतिशय सुस्त असलेल्या राजकोटचा अतिशय वेगाने घेतलेला धावता आढावा वाटला....
पण तरीही आवडला कारण तो आगाऊने लिहिलेला आहे.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
ह्म्म्म्म्म्म्म... फक्त
ह्म्म्म्म्म्म्म... फक्त information साठी बरेच सोर्स उपलब्ध असतात हल्ली. पण 'लेखकाच्या नजरेतुन' मधली गम्मत वेगळी असते. आणी ती शैली तुझ्याकडे आहे. ( बाकी लता-आशा ने सुरांच्या बाबतीत आणी पुल-वपु नी लेखन शैलीच्या बाबतीत आपल्या सवयी फार चोखंदळ केल्या आहेत. त्यामुळे जरा कुठे कणसुर लागला किंवा दर दोन वाक्याला हशा किंवा 'व्वा' आल नाही तर मानसीक थकवा येतो.. . हे अवांतर 'आगाउ'पणा म्हणुन सोडुन देण्यासाठीच कंसात टाकले आहे. )
ते मोदींबद्दलच मात्र खटकलं. मुळात निवडणुकींच्या प्रचारासाठी अस काहिस project व्हावं लागणं हे साहजिकच आहे. पण तुला ते तसे वाटले ह्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. गुजरातसाठी त्यांनी गेल्या १० वर्शात खुप केल हे मात्र नक्की. असो..
छान लिहिलयस. मनापासुन आवडलं.
वा. सहज, सोपं आणि अपाल्हाळिक
वा. सहज, सोपं आणि अपाल्हाळिक वर्णन. छानेय!
परेश, 'कंसा'तले फार
परेश, 'कंसा'तले फार आवडले!
मोदींच्या कामाबद्द्ल प्रश्नच नाहीए, राजकोटमधले पहिले काही दिवस मला 'अजिबात लोडशेडींग नसणे' या अदभुत प्रकाराची सवय होत नव्हती
छान ओळख रे आगावा !
छान ओळख रे आगावा !
डबल झाल्याने प्रकाटाआ
डबल झाल्याने प्रकाटाआ
'अजिबात लोडशेडींग नसणे' या
'अजिबात लोडशेडींग नसणे' या अदभुत प्रकाराची >>>>
हा हा हा... मध्ये मला एक समस आला होता.
महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे खेड्यापाड्यातून दर तीन तासांनी आनंदोत्सव साजरा केला जातो....
लोक आनंदाने आरोळ्या ठोकतात.....
"लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली,........"
छान आहे लेख आगाऊ. बहुदा आपण
छान आहे लेख आगाऊ.
बहुदा आपण निवडणुकीची भाषण ऐकली नाहीत. नरेंद्र मोदी जर केवळ आत्मप्रौढीने भाषण करत असतील असे जरी खरे मानले तरी ते रास्त मानावे लागले. फक्त लोड शेडींग हा मुद्दा इथल्या राजकारण्यांनी तडीस न्यावा.
बहुदा आपण निवडणुकीची भाषण
बहुदा आपण निवडणुकीची भाषण ऐकली नाहीत>>> मी निवडणूकीतील प्रचारसभेच्या भाषणाबद्द्लच लिहीले आहे.
मोदींची आत्मप्रौढी चुकीची आहे का बरोबर हा प्रश्न नाहीए, असा इगो असलेले नेते सर्वच पक्षात आहेत, मोदींचे विशेष हे की ते त्यांचा इगो जाहिरपणे प्रकट करायला नेहमीच तयार असतात.
मस्त खुसखुशीत लिहिलं आहेस.
मस्त खुसखुशीत लिहिलं आहेस. कडवा पटेलांबद्दल तर अगदी अगदी
आगावा, मस्त लिहिलं आहेस..
आगावा, मस्त लिहिलं आहेस.. तुझी शैली भारी आहे.
आगाऊ, मानलं रे तुला. तुझी
आगाऊ, मानलं रे तुला. तुझी निरिक्षणशक्ती, तुझी शैली, फार म्हणजे फारच भारी आहे आणि त्याला असलेली विनोदाची झालर...भारीच कॉम्बो. तू नक्की एक फेमस आणि लाडका शिक्षक असशील, ह्याचा मला आज अंदाज आला.
आवडलं...
आवडलं...
आगाऊ, खुसखुशीत ओळख करून दिली
आगाऊ, खुसखुशीत ओळख करून दिली आहे राजकोटची! मला हे गाव अपरिचित असले तरी येथील अनेक माणसांशी संपर्क आलेला आहे. वागायला-बोलायला अघळपघळ, अतिशय व्यवहारकुशल, शिक्षणाच्या बाबतीत जरा उदासीन, कामधंद्याच्या बाबतीत चौकस आणि जराशी ठाय लयीत वावरणारी ही माणसे सहजी विसरू न शकणार्यांपैकी. त्यांची बोलीही त्यांचा हा अॅटिट्यूड दर्शविते. आणि शहरी कृत्रिमपणा त्यांच्यात अभावानेच आढळतो. आणि हो, खाण्यावर मनापासून प्रेम असते!
मस्त लेख. नीधपला अनुमोदन.
मस्त लेख.:-)
नीधपला अनुमोदन.
मस्तच रे...
मस्तच रे...
मस्त लिहिलस रे लिहिता रेह.
मस्त लिहिलस रे
लिहिता रेह.
अकृत्रिम वाटला त्यामुळे
अकृत्रिम वाटला त्यामुळे आवडला.
’जागरुक पालक’ नामक प्राण्याची माझी चांगलीच ओळख होती >>>>>
मी तुला म्हणतोय का की ६०% वगैरे मिळव, पण नीट पास तरी हो >>>>>>
आगाऊ शिक्षका तुमची डायरी
आगाऊ शिक्षका तुमची डायरी आवडली बरे
कडवा पटेल समाजात >> ते कडवा
कडवा पटेल समाजात >> ते कडवा पाटीदार असे असायला हवे ना? चांगला लिहलाय.
उमेदवारांची नावे नाहित हे बरेच की, थेट अमेरिकेसारखे झाले हे तर. ओबामा महत्वाचा! त्याची भाषने ऐक, तो पण मला निवडून द्या, मी महत्वाचा असेच म्हणतो. नेत्याला निवडून द्या. नेता महत्वाचा. बाकी काय ट्रेनचे डबे, रुळावरुन धावणारे.
केदार, कडवा पाटीदार हा
केदार, कडवा पाटीदार हा शब्दप्रयोग खान्देशात करतात, सौराष्ट्रात 'पटेल'च.
ओबामाच्या देशात प्रेसिडेंशिअल लोकशाही आहे, आणि आपल्याकडे संसदीय हे मी तुला सांगायला हवे का?
मस्त. राजकोट अगदी समोर दिसलं
मस्त. राजकोट अगदी समोर दिसलं तुझ्या चित्रमय शैलीमुळे आणि बारिक निरिक्षणामुळे. औरंगाबाद-मराठवाडा तुलना आणि मोदींच्या व्यक्तिमत्वाचे चित्रण परफेक्ट.
छान लेख.
छान लेख.
आगाऊ, खूप मस्त लिहीलेस. तुझी
आगाऊ, खूप मस्त लिहीलेस. तुझी शैली खास आहे. आवडले.
Pages