झोप आणि डुलकी

Submitted by suchel-tas on 6 April, 2010 - 19:15

झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप. डुलकीला त्याची सर नाही. मला तर बस/लोकल मध्ये बसल्या मिनटाला झोप यायला लागते. त्यात जर खिडकीपासली जागा असली तर सोन्याहून पिवळ.

पूर्वी तर मला बस मध्ये अशी जोरदार झोप यायची की खिडकीच्या दांड्यावर डोकं आपटून निदान २-३ वेळा तरी कपाळमोक्ष व्हायचा. बसमधून उतरल्यावर कपाळ हे एका साईडनी टम्म फुगलेलं. पण त्याची फिकीर नाय करायची. झोप सलामत तर कपाळ पचास. बरोबर एखादी पिशवी असली आणी त्यात जाड स्वेटर किंवा त्या टाईप काही असलं की मग ती पिशवी खिडकीच्या दांड्यावर ठेवून त्याचा उशीसारखा वापर करून ताणून देता येते. कंडक्टरपण असला निवांत येतो की त्याला ओरडून सांगावस वाटत, बाबा रे मला झोपायचं, तेव्हा पटकन माझ तिकीट काढ. मी मुद्दाम खिडकीपासली जागा पकडतो, कारण त्या दांड्यावर डोक ठेवून निवांत झोपता येत. चुकून कधी दोन लोकांच्या मध्ये किंवा कडेला बसावं लागलं की खरी बोंब होते. बराच वेळ (म्हणजे १५-२० मिनट) मोठ्या मुश्कीलिनी डोळे बळच ताणू ताणू झोप आवरायचा प्रयत्न करतो खरा पण नाईलाज को क्या इलाज!! शेवटी चष्मा वरच्या खिशात जातो आणी समोरच्या दांड्याला घट्ट पकडून ताठ बसायचा प्रयत्न करत झोपेच्या प्रवासाला सुरुवात होते.

आता शिस्तीत काही झोपण जमत नाही. मग, एका बेसावध क्षणी, पहिल्यांदा डाव्या बाजूला जोरात मान पडते. शेजारचा माणूस पहिल्यांदा नुसताच खांद्यानी आपल्या डोक्याला ढुशी मारतो. मी खाडकन जागा होतो आणि ओशाळ होत, परत सरळ झोपायचा प्रयत्न करतो. डाव्या बाजूनी असा प्रसाद मिळाल्यावर आपसूकच मान किंचित उजवीकडे कलते. आता ढुशी मारण्याची वेळ उजवीकडे बसलेल्यावर येते. दोन्हीकडून टोले खाल्ल्यावर आता मान खाली घेऊन समोरच्या दांड्यावर डोकं ठेवतो. पण छे!! तस झोपण काही जमत नाही. हळूच बाजूच्या दोघांकडे नजर टाकतो, ज्याचा चेहेरा कमी रागीट दिसत असेल, त्या बाजूला हळूच मान कलते. ह्यावेळी मात्र झोप बऱ्यापैकी सावध असते. फार फार तर १ - २ वेळा त्यांच्या खांद्यांवर मान जाते पण ह्यावेळी हुशारीनी, त्यांनी ढुशी द्यायच्या आत, पटकन मान सरळ करतो. मनात पक्क ठरवतो की पुढच्या वेळी काही झालं तरी खिडकीपाशीच बसायचं. मला काही काही लोकांच जाम कौतुक वाटत ते शेवटच्या लांबलचक सीटवर बिनधास्त ताणून देतात. दुसरे प्रवासी येऊन त्यांना उठवायचा प्रयत्न करतात पण हे ढिम्म हलत नाहीत. ही कला मला ह्यांच्याकडून एकदा शिकायचीये.

व्यवस्थित झोप घ्यायला पण पोषक वातावरण हवं. म्हणजे उन्हाळा असेल, दुपार असेल तर आधी मजबूत आमरसाचं जेवण झालेलं पाहिजे आणि मग खोलीत पडदे बीडदे लाऊन, अंधार करून, पंखा/कुलर लावून मग झोपण्यात जी मजा आहे ना त्याला काही तोड नाही. (गांधीजीनी बहुदा ही गोष्ट मिस केली :-)) आणि अशा वेळी बेल वाजली की, पुलं म्हणतात त्याप्रमाणे दरवाजाबाहेर कुबेर जरी त्याचा खजिना द्यायला आला असेल ना तरी त्याचे हात कलम करून टाकावेसे वाटतात. जेवल्या जेवल्या झोपू नये, शतपावली घालावी हे जरी बरोबर असलं तरी शतपावली घातल्यावर साली झोपच उडून जाते. आमरसाच जेवण झाल्यावर जे काय डोळे जड झाले असतात ना त्याला झोप हा एकच पर्याय आहे.

रात्रीच्या झोपेच गणितच वेगळ आहे. ९ आणि १० वाजता झोपतात ती काही खरी झोप नाही. ते उगीच काहीतरी नियम किंवा शिस्त लावून घेण्यासारख आहे. तंगड्या वर करून एखाद पुस्तक वाचत किंवा सिनेमा बघत जेव्हा डोळे जड होतील ना तेव्हा झोपायला जाव. आजूबाजूचा माणूस घोरणारा असेल तर मग सालं झोपेचं खोबर होऊन जात. हे एक बर आहे की आपल्याला झोपेत आपलच घोरणं ऐकू येत नाही. नाहीतर झोपणच मुश्कील झालं असतं.

गुलमोहर: 

>>म्हणजे उन्हाळा असेल, दुपार असेल तर आधी मजबूत आमरसाचं जेवण झालेलं पाहिजे आणि मग खोलीत पडदे बीडदे लाऊन, अंधार करून, पंखा/कुलर लावून मग झोपण्यात जी मजा आहे ना त्याला काही तोड नाही.<< अगदी खरय. Happy