पश्चिमेचा सांजवारा

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 March, 2010 - 05:38

(पुर्वार्ध यापुवी येथे पोस्टवला होता. उत्तरार्धाला प्रमाणाबाहेर वेळ लागला. दोष माझाच. म्हणून मग संपुर्ण लेख काही बदलांसह सलग प्रकाशित केलाय.)

अज्ञात......
प्रत्येक माणसातला त्याला माहिती नसलेला 'तो'
अज्ञात......
जाणवूनही न कळालेली भावना .........

व्यक्ताची भाषा;
अव्यक्ताची अभिलाषा......

प्रतिभा, प्रज्ञा, बुद्धी, श्रिया
एकाच अर्थाचे विविध पैलू..
ज्ञानवंतांनाही न कळालेल्या कितीतरी बाबी
रोज शोध लागूनही बरंच कांही बाकी...

कस्तुरीमृगासारखं. त्यालाही कुठे माहीत असतं की ज्याच्या शोधात तो सैरावैरा पळतोय तो गंध त्याच्याच नाभीतला आहे.... तसच असतं आपल्या सगळ्याचं. जगाच्या कानाकोपर्‍यात डोकावणारे आपण स्वतःमध्ये डोकावतच नाही. तेवढी एक जागा राहते शोधण्याची. पण आपल्यातलाच एखादा निघतो या अज्ञाताच्या प्रवासावर. या प्रवासात त्याला शब्द, संज्ञा, अर्थ, भाव, भावना..... असे कोणी ना कोणी भेटतातच. ती भेट वरवरची नसते. आत्म्याने परमात्याला साद घालावी तशी. कडकडून झालेली भेट.... आणि अशा भेटीत जन्म घेते एखादी कविता. जी मग मनामनात विखुरते. पेरणीस निघालेल्याने चौफेर भिरकावलेल्या बियाणासारखी. एखाद्या मनात तिला हवी तशी भुमी मिळाली की मग ती रुजते. अंकुरते, फुलते.......पुनःप्रत्ययाचा आनंद देत रहाते. पण अशी कविता रचणारा तो कवि मात्र 'अज्ञात'. ते तसं का आहे ? .... याच स्पष्टीकरण वर दिल्याप्रमाणे.... कविच्या शब्दातच.

जगरहाट,
जीवनाचं, शोधांचं....
प्रत्येक आवर्तनात रिकामं होऊनही
नेटानं पुन्हा पुन्हा भरुन येणारं.....

कुठून येतं हे सारं ??
कुणालाच माहित नाही..

'मी' च्या शोधातल्या या प्रवासाचे लागेबांधे जीवनाशी, जगाशी जोडले जातात. त्याच्याही नकळत. त्या अनाम शोधाच्या वाटेवरला हा जीव ' को अहं ?' च्या हाका मारत असतो. येणार्‍या प्रत्येक प्रतिसादाचं स्वतःच्या कुवतीप्रमाणे विश्लेषण करत पुढे पुढे जात राहतो. वेगळी, अनोळखी, कुतूहल जागवणारी वाट. या वाटेवर सोबत असली तर ती स्वतःचीच. भुतकाळाच्या उजेडाकडे पाठ करून भविष्याच्या अंधारसावल्या न्याहाळत जाणारा एक अगम्य अनभिज्ञ प्रवास........ ज्याच्या उगमाचा नीटसा अंदाज नाही ही की त्याच्या अंताची कोणतीही खात्री नाही.

हाच काळपरत्वे केलेला वेगवेगळा प्रवास
म्हणजेच "अज्ञातकुळाच्या" कविता

माबोवर नियमित कविता वाचणार्‍यांसाठी हे नाव 'अज्ञात' नाही. कदाचित काही जणांसाठी हा कविही 'अज्ञात' नाही. माझ्या वर्षाखेरीच्या नाशिक प्रवासात त्यांची गाठभेठ झाली. काही गप्पा झाल्या. त्यांचा येऊ घातलेला अलबम ऐकला तोही कारच्या काचाआड. योग्य जागा. गर्दीतलं एकटेपण असावं तसचं. इथे फक्त कविता होती.... सुर होते.... ताल होता...... बोलणार्‍याचे शब्द आणि ऐकणार्‍याचा हुंकार. यात 'नकोसं वाटावं' अस काही आत झिरपण्यास जागाही नव्हती. सुर्याने नुकतेच डोळे किलकिले करून पाहण्यास सुरुवात केली. त्या सकाळच्या प्रहरी गुलाबी म्हणण्याजोगी थंडी होती. पण कारमध्ये मात्र पाऊस बरसत...रिमझिमत होता.... कवि नखशिखांत ओलेता आणि मी सरींवर सरी झेलत चिंब होत होतो. ही काही त्यांची मुलाखत नव्हे..... हा त्या भेटीचा, त्या आगळ्यावेगळ्या महफिलीचा सारांश....

"पश्चिमेचा सांजवारा" ...... विषय साधाच. दोन शब्दात मावणारा.... अर्थ मात्र असीम...... शब्दबद्ध केलेली प्रत्येक भावना त्या शब्दांच्या परिघात व्यक्त होत असली तरी त्या भावनेची आभा त्या परिघाबाहेर असतेच. या प्रभावळीला परिघ नाही की तिची त्रिजाही सांगता यायची नाही. हेही तसेच. पण इथे मात्र याचा सदर्भ पावसाशी गुंतलेला. तसं माझं आणि पावसाचं जन्माचं नातं. आईला पहाटे जेव्हा कळा सुरु झाल्या तेव्हा प्रचंड पाऊस होता. गुडघाभर पाणी साचलं होतं. त्यातून वाट काढत हॉस्पिटलची वाट धरली होती. मी डोळे उघडले तेव्हा पाऊस 'मी' म्हणत होता. म्हणून पावसाशी माझं जन्माचं नातं.

प्रत्येक वर्षी गुंजणारा हा मल्हारराग मला कदाचित त्यामुळे नेहमीच नवा वाटतो. 'नेमेचि' येणारा असला तरी मला मात्र पावसाळा नेहमीच उंबरठ्यावरील मापटं उलटवून पहिल्यांदा गृहप्रवेश करणार्‍या लाजर्‍या-बुजर्‍या नववधूसारखा वाटतो. नुकत्याच प्रेमात बहरणार्‍या प्रेमवीराला त्याची प्रेयसी प्रत्येक भेटीत जशी नेहमी वेगळी व नवथर वाटते तसाच माझा दर पावसातला अनुभव. आकाशातले कृष्णमेघ, वातावरणातला गारवा, उल्हसित करणारी शीत हवा आणि मग बरसणार्‍या सरी.... पण प्रत्येक पावसात मला वेगळेपण जाणवते. मी ही तोच... तो ही तोच.... पण तो जलाधारांचा स्पर्श, ती अनुभूती..... जणू मी नेहमी नव्यानेच अनुभवतो.

अशा पाऊसवेड्या माझ्या मनाला मग पहिल्याच कवितेच्या पुढील ओळी ग्रीष्मातच नव्हे तर शिशिरातही सुखावतात. त्यात पं. शौनक अभिषेकी यांचा भिजलेला स्वर.......

नभ उतरून आलं झाल मेघाळ आभाळ
नव्या पावसानं नेलं सार्‍या जगाचं गबाळ
चिंब भिजले आकाश मोर झाली काळी माती
खुणावत अंकुरास वाहू लागला पन्हाळ

कुंचल्याच्या पहिल्या वहिल्या फटकार्‍यातच दुडदुडत येणारी ती पहिली सर डोळ्यासमोर उभी राहते. क्षणार्धात सगळं पाऊसचित्र भोवताली उभं राहतं. भरून आलेलं आभाळ, झेपावलेल्या सरी, ग्रीष्माचा दाह झेलून झेलून भेगाळलेली धरा, पोळलेल्या त्या देहावर फुंकर घालणारा पहिला वहिला थेंब, तो स्पर्श, त्या स्पर्शाने अक्षरश: नर्तन करू लागलेली काळी माती, मातीच्या ओलावल्या देहावरून ओघळणार्‍या ओहोळाने अंगावर ढलपं घेऊन निजलेल्या बियाणाला घातलेली शीळ.... हे नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. त्याला ती तशी 'नजर' असावी लागते. तो 'चष्मा' असावा लागतो. जे पाहीलं ते त्याच रुपात पुन्हा शब्दात गुंफून सादर करण्यासाठी जिव्हेवर त्या शब्दांचा राबता असावा लागतो. वर्षा-सहा महिन्यांनी भेटणार्‍या मित्राबाबत जिव्हाळा तेव्हाच वाटेल... जर तो मनाच्या अलवार कप्प्यात दडून बसला असेल तर... शब्द तसे असावे लागतात. तरच ते अशा अनुभूतीच्या वेळेस विजेच्या वेगाने अधरांकडे झेपावतात. शब्दांच्या वैभवाबद्दल बोलावं तर या बाबतीत कवि 'कुबेर' आहे हे मला नेहमीच वाटत आलय. तशी सगळी त्या शारदेचीच लेकरे. पण असते एखाद्या मुलावर तिची जास्त माया.... का ? ते तिचं तीच सांगेल...

सण ओलावल्या रानी म्हणे 'पेर्तेव्हा' गाणी
हिरवळल्या जमाती उतू गेला वनमाळ
मन रंगाची कमान भय जिरले गुमान
मल्हाराच्या बेटावर दरवळ सदाकाळ

सरींवर सरी बरसतात. अवघी सृष्टी चैतन्यमय होते. आधी सण घनात साजरे होतात आणि मग रानात... रानातून शेतात... मोकळा भकास सन्यस्त माळही हिरवळतो. अंगाखांद्यावर तृणफुलांची वाकळ घेऊन कुटूबवत्सल होतो. निसर्गातला थुई थुई नाचणारा आनंद बागडत मनात पोहोचतो. आभाळातली इंद्रधनुची कमान मनाच्या क्षितिजावर विराजमान होते. मन पाऊस होऊन दरवळतं.

उन्हा आली सोनकळा भला सजला श्रावण
फुलावर गोळा दंव घुमे सावळं कोकीळ
सुवासिनीचं माहेर गौर मंगला मंगल
झिम्म फुगडीचा फेर घर सुखाचा समेळ

उत्सव फेर धरू लागतात आणि उत्साह उतू जाऊ लागतो. श्रावण मंगलाष्टकं गाऊ लागतो. सृष्टी ताल धरू लागते. सुना पुन्हा लेकी होऊन मायेच्या पदराआड घुटमळू लागतात. परकरातल्या खेळांना सख्या सयांसोबत खोचलेल्या पदरासह पुन्हा आमंत्रण देतात.

शीण गेला मैलावर मंद पहाटेची वेळ
मोहरल्या सार्‍या वाटा विरघळला विव्हळ
वसु वासराचा पडे माझ्या अंगणात तळ
जिवाभावाचं वावर भरे रेशमाचं खळं

रिकामं घर भरतं. चार भिंतीना नव्याने घरपण येतं. एकटेपणाचा, त्याच-त्याच क्षणांचा मनाला विळखा घालून बसलेला शीण पागोळ्यांसोबत वाहू लागतो. मनातला आनंद हिंदकळला की मग घरादारात नांदतो. संवाद खुद्खुदू लागतात. किंचित कोमेजलेल्या नात्यांच्या वेलीवर अलवार शिंपण होते. हळूच एक पालवी त्यात नव्याने अवतरते. पाऊस मात्र बाहेर अजूनही बहरत असतो.

खरतर कवितांच्या नंदनवनात भटकत असताना मध्येच नेहमीच्या रुक्ष चर्चा नकोश्याच असतात. पण कधी कधी त्या टाळता येत नाही. शिवाय कवितांचा प्रवास गाण्यापर्यत कसा झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता मनाला होतीच. जशी मला तशी तुम्हालाही असेलच. अज्ञातांच्या कविता 'पश्चिमेचा सांजवारा' होऊन संगीताच्या क्षेत्रात वाहायला लागल्या यामागे नेमके कष्ट कोणाचे हे जाणून घेणे ही महत्त्वाचेच. फूल फुलते.. गंध पसरतो.... पण तो तेवढ्या भागापुरताच मर्यादित रहात नाही... संपुर्ण परिसर त्या गंधाने धुंद होतो. ही किमया वार्‍याची.... अज्ञातांच्या अज्ञात कविता ज्ञात होण्यामागे नेमकं कोणं हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा मनात येणं साहजिकच होत म्हणा.

यात पहिलं नाव प्रकर्षाने आलं ते श्री. धनंजय गोवर्धने यांच. (कवी-लेखक-फाईन अर्टिस्ट-फोटोग्राफर्-फिल्म मेकर - ते स्वतःच एका वेगळ्या लेखाचा विषय आहेत.) कवितासंग्रह छापावा ही त्यांची कल्पना. पण वैयक्तिक ओळखीमुळे आपण कवितांची तटस्थ निवड करू शकणार हा त्यांचा अदमास. मग हे कार्य मुक्तविद्यापीठातील डॉक्टरेट मित्राकडे सोपवण्यात आलं. पण वेळेअभावी त्यां मित्राला मुहुर्त मिळाला नाही. त्यानंतर श्री. मिलिंद जोशी (कमर्शियल आर्टिस्ट), श्री. विनायक रानडे (कमर्शियल प्रिंटर), स्वत: कवि आणि श्री. गोवर्धने यांच्या बैठकीत दृकश्राव्य माध्यमाचा पर्याय निघाला. कवितांच्या कथेवर श्री. गोवर्धने यांनी फिल्म बनवायची, संगीतकार मकरंद हिंगणे यांनी सगीत द्यायचं आणि भुमिका स्वतः कवीने करायची. याला कवीचं नाटकाचं अंग कारणीभूत ठरलं. जाहीरात व इतर व्यवहाराच्या बाजू श्री. जोशी व रानडे यांनी खांद्यावर घ्यायचं ठरवलं. पण कवि मात्र अज्ञातच असावा ही कवीची भुमिका अनिच्छेने का असेना इतरांनी मान्य केली. खुद्द नाशिकात अज्ञात यांना कवि म्हणून ओळखणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आहेत. पण त्यांच्या ट्रॉफी व मोमेन्टो बनवायच्या कार्यक्षेत्रात त्यांचा बराच दबदबा आहे. त्यांच्या www.layakari.com या वेबसाईटवर सगळा प्रपंच उपलब्ध आहेच. असो.

पहिली कविता तेवढ्यापुरती संपते. आता तिला नवं घर मिळालेलं असतं. नव्या पाहुण्याच्या स्वागतात मन रमते-न्-रमते तोच श्री. चारुदत्त कुलकर्णी यांचा धीरगंभीर आवाज भोवताल व्यापतो.

काळासोबत गुरफटलेलं नात्यांचं जोतं
खांद्यावरून उतरलं की विरघळून जातं
संपृक्त तेवढंच आठवणीत रहातं
वय कातर होतांना काठावरती येतं

'वय कातर होताना' या एका बाबतीत मी कवीशी सहमत होत नाही. हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. वयाचं माप इथे लावताच येत नाही. प्रवास म्हटला की सहप्रवासी आलेच. सहप्रवाश्यांशी जडणारं नातं. एखादं स्थानक येतं. कधी आपण तर कधी सहप्रवासी उतरून जातो. प्रवास चालु राहतो. नवा प्रवासी शेजारी येऊन बसतो. नव्या गप्पा रंगतात. आधीच्या गप्पात गवसलेला सुर त्यात असतोच. बोलण्याच्या ओघात त्या आधीच्या प्रवाश्यासह केलेल्या गप्पातील काही ना काही आठवतं. त्यातला संदर्भ येतो. उतरुन गेलेला प्रवासी त्यामुळे पुन्हा आठवतो. आपला प्रवास संपेपर्यंत हा एक वेगळा प्रवास चालू असतोच. गप्पांचा, वादांचा, ओळखींचा, आठवांचा.......

संगीतकार मकरंद हिंगणे नव्याने तार छेडतात. दुसरी कविता लयबद्ध होऊन पदन्यास करत येते.

एकवेळी पावसाळी भेट ही झाली अशी
वेदना भिजली तळाशी उमलली गोंडस कळी

एखादी सांज पुन्हा पाऊस आपल्या कुशीत घेतो. तो तिला कवटाळून कुरवाळत असताना भिजलेलं मन जुन्या आठवणीत रमू लागतं.

भर पावसाळ्यात एकदाच अवचित दिसलेली ती....., जाता-जाता पाठमोरा वळून.. ओसंडणारं हासू आवरत... सुखावून गेलेला तो............, बालपणी लपाछपीच्या खेळात दडलेली व पुन्हा कधीही न दिसलेली एखादी बालमैत्रिण.........., एका कटींग चहासोबत फुंकलेली अर्धी सिगरेट तशीच अ‍ॅशट्रेमध्ये तशीच सोडून गेलेला मित्र..........., दुरवर चालता-चालता अचानक हात सोडून वेगळ्या वाटेवर गेलेला सोबती, सायकल शिकताना पाठीमागे सीट धरून धावणार्‍या अन आता गाडीच्या पाठच्या सीटवर हक्काने बसू इच्छिणार्‍या बापाची रिकामी झालेली जागा........, रात्रभर उशाशी जागी आई आता कायमचे डोळे मिटून निजलीय याची खोलवर रुजलेली जाणिव......,

........पावसाच्या सरी मनाच्या घळीतल्या अंधार्‍या कपार्‍यातून नागमोडी वळणं घेत सुकल्या, दुर्मुखलेल्या काठांना भिजवत जातात. आत खोलवर दडलेलं काही ओलावतं, सुखावतं आणि वेदनेच्या त्या अंकुराला पालवी फुटते.

पंख मेघांचे जणू आकाशवेडी पाकळी
पाय मातीचा भरारी मात्र अवखळ मोकळी

क्षणांसाठी पंख फुटलेल्या मुंग्याचे थवे पावसात भिरभिरू लागतात. पंख लाभताच आकाशाकडे झेपावू लागतात. जशी सरींचा ओलावा लाभताच वेदना उमलून वयात येते आणि सगळ्या बंधनाना विसरून बाहेर झेपावते. पण... मुंग्याच्या त्या पंखात इतकं बळ नसते की त्या त्यांच्या आकाशाला गवसणी घालण्याच्या स्वप्नाला पुर्ण करू शकेल. त्या पुन्हा मातीत कोसळतात. पण तो अवखळपणा काही संपत नाही. पुन्हा झेपावणं चालूच असतं. या पावसाळी वेदनाही तशाच. त्यांना दिलासा हवा असतो. पण त्या जाऊन जाऊन जाणार कुठे ? जुन्या काळात... क्षणभरासाठी... मन, देह सगळं त्या काळात रुंजी घालू लागतं. मग त्या पुन्हा परततात.... जुन्याच कोषात. भुतकाळ बदलता येत नसला तरी तो बदलण्याची इच्छा पुन्हा पुन्हा जन्म घेत राहते. क्षणभंगूर असली तरी भावना हवीहवीशी असते.

बिल्वरांच्या दहिवरांनी भरून गेल्या ओंजळी
आंसवे विसरून गेली खार त्यांचा वेंधळी

एकदा का स्वतःची हतबलता जाणवली की मग मनाला आलेली भरती डोळ्यांपर्यतं पोहोचते. येनकेनप्रकारे तो उचंबळ बाहेर येऊ पाहतोच. आठवांचे, जाणिवांचे प्रतिबिंब, बिल्वरासारखे, ओघळणार्‍या प्रत्येक आसवात पुन्हा दिसू लागते. सरणार्‍या चित्रफितीसारखे ते क्षण आसवातून डोळ्यासमोर सरत जातात आणि मग हलकं होणारं मन त्या आसवातील क्षार विसरून पुन्हा त्याच्या नेहमीच्या जगात परतू लागतं.

मनाची जडणघडण किती विचित्र ! बरसणार्‍या सरींचं आसवांशी नेमकं काय नात असावं हेच कळत नाही. कुठे ना कुठे... कधी ना कधी.... एखादी सर मनाला एकांतात गाठतेच. मग ती त्याच्यासवे बोलते, त्यातील एखादा चर कोरते, आतल्या तटबंदीमागे साकळलेलं वाट मो़ळळी पाहताच उसळतं आणि शेवटी मन सरीसोबत नातं सांगत डोळ्यातून बरसतं.

आपल्याच नकळत पंडीतजींचे स्वर आपल्या मनातला एक कडीकुलपात कोंडलेला कोनाडा परवानगीशिवाय खोलतात आणि आपण मग त्या कोनाड्यातल्या एकेका क्षणाला पुन्हा आत कोंडून घालण्याचा प्रयत्न नव्याने करू लागतो. एखादा थेंब ओघळतोच. इथे आम्ही जरा विसावा घेतो. गारठ्यात घेतलेला वाफाळलेला चहा पुन्हा पुन्हा हवाहवासा वाटतो. बेहद आवडणारा जिन्न्सा पुन्हा पुन्हा जीभेवर घोळवावासा वाटतो. कवि कवितेबद्दल बोलू लागतात. कविता पुन्हा समोर साकारते. नव्या रुपात, नव्या ढंगात, नव्या रंगात. आधी न उलगडलेले अनेक पदर आता उलगडतात. कविता मुळ धरू लागते. तिला नवी पालवी फुटू लागते. तो परिमळ जाणवू लागतो........................

यानंतरचं काम म्हणजे कविता निवडणे. १६०० कवितांच्या गठठ्यातून श्री. गोवर्धने यांनी आठवड्याभरात ३०० कविता नक्की केल्या. वाचनाचं कार्य अर्थात कवीमहाशयांचं.

श्री. मकरंद हिंगणे हे पं जितेंद्र अभिषेकी यांचे गुरुकुल शिष्य. संगीत विशारद, पंचवटी कॉलजमध्ये संगीत विभाग प्रमुख. स्वतःचे संगीताचे वर्ग, काव्यप्रेमी, गाण्यातलं काव्य जपण्याचं भान असलेलं व्यक्तीमत्व. त्यांनी दोन सीडीजच्या हिशेबाने ३०० कवितांपैकी १६ कविता निवडल्या. गाण्यांचे ट्रेक रेकॉर्ड झाले पण स्वत: कवीवर्य तिकडे फिरकले ही नाहीत. मग एका रात्री श्री. हिंगणे यांनी फोनवर अज्ञातांना कळवलं की दोन गाणी स्वत: पंडीत शौनक अभिषेकी गायलेत. मग उरलेली सहा गाणी आपणं गाणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी म्हणताच, अभिषेकींनी त्या गाण्यांसाठीही वेळ दिला. त्यानंतर पंडीतजींनी कवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि भेट झाली. त्यांच्या गप्पात देवकी पंडीत गाणी गाण्यास उत्सुक असल्याचं कळलं. पण ठरलेल्या ट्रॅक्समध्ये ऐनवेळी बदल शक्य नसल्याने हा योग हुकला. कदाचित पुढच्या सीडीत हा योग येईलही. कोण जाणे !

आणि पुन्हा तोच धीरगंभीर आवाज...

लाट येते जाते, खूण खुणा होते
वाहता वाहता घेणार्‍याला गहिरी साद देते

नितळ कधी गढूळ कधि घाट कधि सपाट
वाट शोधित आखाताशी एक रूप होते

जळाच्या काठाशी बसणार्‍यांनी लाटांचा खेळ पाहीला असेलच. एखाद दुसरा दगडही पाण्यावर भिरकावला असेल. एका लाटेला छेदत तो दुसर्‍या लाटेवर आरुढ होऊन पलिकडे गेलेला पाहीलाही असेल. पण कधी त्या लाटांच गुज ऐकण्याचा प्रयत्न केलाय का ? कधी या लाटा बरचं काही सांगून जातात. फक्त ऐकणार्‍याला ती भाषा कळायला हवी. किनार्‍याला येऊन भिडणारी लाटांची आवर्तने त्यांच्या गमनागमनाची खूण ठेवून जातात. ती खूण सागराच्या हद्दीच्या खुणा होतात. किनार्‍याकडे झेपावणारी प्रत्येक लाट सांगराच्या अंतरंगातील खळबळीस पृष्ठभागावर परावर्तित करते. जसं मन कधी कधी मनातील चलबिचल चेहर्‍यावर प्रतिबिंबित करते. लाटांचे बोल ज्यास समजतात, त्याला मग सागराच्या अंतरीची हाकही ऐकू येते. जसा जिवलगाला आपल्या चेहर्‍यावरून आपल्या मनातील अचूक स्पंदनांचा स्पर्श होतो.

लाटांची रुपे प्रत्येक वेळेस वेगळीच. कधी नुसतच नितळ पाणी तर कधी मात्र त्या सोबत वाळूही. कधी ती येते उचंबळत, खळखळत तर कधी हलकेच गर्दीतून डोकावून पहाणार्‍या एखाद्या उंच माणसासारखी मान उंचावून पाहात येते. सरतेशेवटी किनार्‍यावर पोहोचलेली लाट पुळणीत विरते वा मागे सरुन दुसर्‍या लाटेत विलिन होते. मनातल्या आवर्तनासारखं. कांद्याला सोलत जावं आणि शेवटी डोळ्यात आसवांशिवाय काही न उरावं तसच. सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकीला धरून अशाच येतात. भुतकाळाच्या भक्कम पायावर उभा असलेला वर्तमानाचा क्षण पापणी लवण्याआधीच खालच्या पायात समाविष्ट झालेला असतो. भुतकाळाचा थर वाढत जातो.

लाटांच किनार्‍याशी नातं असतं. एक अशब्द नातं. आवेगाने रौद्र रुप धारण करत, अक्राळविक्राळ तांडव करत येवो वा संथपणे एखाद्या रमणीसारख्या लयबद्ध हालचाली करत येवो, सरतेशेवटी किनार्‍याशी आली की लाट शांत होते आणि सगळी ख़ळब़ऴ बाजूस सारून शांतपणे त्याच्या मिठी एकरूप होते. या मुक्या नात्याचं लाघव जाणवलय का कधी ?

पुन्हा तार छेडली जाते. नवे गीत उमलते.

मुक्या कळ्यांची फुलली नाती
कुठे उमलली मधुवंती
रानामधल्या उजाड राती
अखंड स्फुरल्या स्नेहल वाती

पावसात रमता-रमता कवि इथे अंतर्मुख होतो. स्वतःला शोधता शोधता वेगळ्याच वाटेवर पोहोचतो. पंचमहाभुतापासून बनलेला देह भरकटून पुन्हा निसर्गाच्या वाटेवर गेला तर त्यात नवल ते काय ? बहरलेला भोवताल त्याला रमवू लागतो. मनाच्या आवर्तनातीला एका आवर्तनाचे दुसर्‍याशी असलेले लागेबांधे शोधण्याचा हा प्रवास निसर्गात ठायी ठायी आढळणार्‍या अबोल नात्याशी येऊन क्षणभर स्थिरावतो. पानाआड लपून बहरणार्‍या कळ्या आणि उमलणार्‍या कळ्यांचा दरवळ.... कळ्याफुलातील अनामिक नातं.... अनुत्तरीत... इथे शास्त्राच्या फुटपट्ट्याही निकामी ठरतात. काळ्याभोर अमवास्येच्या उजाड रातीत कुठे प्रकाशाची तिरिपही नाही. चंद्र नाही की चांदण्या नाही पण त्या अंधाराला छेदायला आहेत असंख्य काजव्यांच्या राशी. त्यांचा तो शीतल स्नेहल प्रकाश भिरभिरतो रानावनात, झाडापानात, मनामनात.

निसर्गाचं प्रतिबिंब मनात आहेच की. मनात उमलणार्‍या भावना नकळत कुठे ना कुठे नाते जुळवून जातात. या भावनांच एकमेकींशी असलेलं नात वेगळं. उदास भकास एकांतात अचानक मनात एखाद स्फुलिंग जागृत होतच. रात्रीच्या गर्द आकाशात अचानक काहीतरी सरसरत वर गेल्यासारखं वाटतं. तेव्हा वर पहावं तर एक ठिणगी दिसते. मग एक प्रकाशाचा लोळ.... त्याचा तो आवाज... आणि मग सहस्त्रावधी रंगीबेरंगी ठिणग्या. दिवाळीतील आतिशबाजी. मनातही हा अविष्कार घडतो कधी ना कधी. एखाद्या उजाड एकांतात. मनासह गात्रेही चिंब होतात.

झाडाखाली सदा सावली
फांदी फांदी प्रीती प्रीती
कुशीतला विश्वास असा की
फिरकली कधी न अवती भीती

विस्तारलेल्या झाडाच्या खाली पांथस्थालाच नव्हे तर झाडाखाली अंकुरलेल्या कोवळ्या कोंबानाही त्या सावलीचा आधार आहे. आईच्या कुशीत तिच्या बाळाला असावी तशी सुरक्षितपणाची भावना त्यांच्या मनातही आहे. सावलीच्या आशेने आलेल्या व सावलीतच जन्म घेणार्‍या कोंबाचे झाडाशी नातेच वेगळे.

एकटया जीवाला मनाचा आधार. अंधार दाटला की सावलीही सोबत सोडतेच. पण मन असतच सोबतीला. धीर द्यायला. कोणत्याही परिस्थितीत. भेदरलेल्या आत्म्याला तेवढाच 'कुणीतरी आहे' असा विश्वास. मनाने एकदा ताबा घेतला की भावना अस्तित्व व्यापू लागतात. अशात जर एखादी हवीहवीशी तार छेडली गेली तर...... कुठूनतरी कानावर मधूर गाण्याचे सुर जरी कानावर आले तर आपण ओळी गुणगुणायला लागतो. मनात काही वेगळं घडत नाही. एखादी सुक्ष्म तार छेडली गेली की झंकारांचा प्रतिध्वनी रंध्रारंध्रात तोच ताल भरून उरतो. त्या हिंदोळ्यावर हेलकावताना मग जोजवणारी भीतीही स्पर्श करत नाही.

आज अचानक तीच मिसळली
वारा होउन अवती भवती
गंध उधळला रंग लेउनी
तिलाहि भाळुन गेली नियती

धुंदावणार्‍या वार्‍यावर जेव्हा एखादी फुललेली कळी स्वार होते. तेव्हा मग ती तिची उरत नाही. तिला स्वतःच असं अस्तित्व राहत नाही. देहातला आत्मा जसा पुन्हा पंचमहाभुतात विलिन व्हावा तशी तिही वार्‍याशी एकरुप होतू पहाते. तिचं हे एकरुप होणं जाणवतं ते तिच्या गंधातून. तो गंध आसमंतात पसरतो. तिचं अवतीभवती असलेलं अस्तित्व जाणवून देतं. मग आपणही अंतरीचा मागोवा घ्यावा तसा त्या गंधाचा मागोवा घेतो. गंधाची गमत वेगळीच. तो वरवर राहत नाही. तो आत जातो. खोलवर. आपल्याच नकळत, आपल्यात तो गंध त्याची पाळमुळं शोधू लागतो. गंध ओळखता आला तर मग समोर दृश्य प्रतिमा साकार होते. तो आकार, ते रंग.... नजरेला जे जाणवते तेच. मग प्रतिमेला जोडून नवी प्रतिमा.... प्रतिमांची एक मालिकाच... भराभर नजरेसमोरून जाते..... माणूस आठवणीत हरवून जातो.

भावना दिसत नाही. त्यांना स्पर्श करता येत नाही. त्या फक्त जाणवतात. कधी कधी तर शब्दातही व्यक्त करता येत नाही. एका मनाच्या दुसर्‍या मनाला तेव्हाच जाणवतात जेव्हा त्या दोन मनात एक सुक्ष्म नातेबंध असतो. मुलगा पडला की त्याच्या जखमेतून रक्त येण्याआधी आईच्या डोळ्यात पाणी आणि ओठात 'सांभाळ' आपसूक यावं तसा नातेबंध. भावना आकार घेतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक हुबेहुब आपल्याच आकारात, रंगरुपात दिसतात. आरशात पहाव्या तशा. मग त्याच खर्‍या वाटू लागतात.

दिसे न कांही तरी सोबती
अमर क्षणांची येई भरती
अश्रू हीच फुले श्रद्धेची
पाउल पाउल माती माती

वार्‍याला समर्पित झाल्यावर कळीचं जिवितकार्य संपन्न होते. 'काहीतरी देऊन गेलो' एवढचं तिला पुरेसं. तो एकमेव क्षण तिला अमर करून जातो. तिच्या त्या बलिदानावर फुलं तरी कुणी वाहायची ? मातीतून आलेली ती मातीत मिसळून जाते. पुन्हा जन्म घेण्यासाठी. कदाचित निसर्ग अश्रू ढाळत असेल तिच्यासाठी. दवरुप घेऊन.

भावनाबद्दल बोलत होतो मी मघाशी.... अदृश्य सोबती.... 'ट्रिगर दाबताच गोळी सुटावी' तसा ट्रिगर दाबला जातो...... कशानेही...... भावना उचंबळून वर येतात. म्हणजे कुणाला तरी भेटण्याची आस असते. कामाच्या व्यापात ते शक्य होत नाही. चालढकल होत राहते. मन तीळ तीळ तुटतं. आणि मग एकदाचा तो क्षण येतो. भेट होते. कधी निशब्द तर कधी भरभरून....... आणि मग इथे भावना बोलकी होते. शब्दात नाही. अश्रूत... आनंदाच्या... कधी दु:खाच्याही.... मनात असलेली भेट झाल्यावर दु:खाश्रू कशाला ?... असं वाटल का ? पुन्हा कधी भेट होईल याची शाश्वती आहे का कुणाला ? त्या अश्रूत कुठे तरी हा भाव असतोच. दु:खाची झालर असलेला. अश्रूंचा बांध फुटतो पण त्या अश्रूंचं स्पष्टीकरण झणी देता येत नाही. पण तो क्षण तो मात्र कोरला जातो मनाच्या पटलावर. 'पाऊल पाऊल माती माती' हे नातं फार वेगळं आहे. मातीतून जन्मास आलेला मातीत जातो.हे नातं कधीही दुभंगू शकत नाही. नातं असलं तर अस हवं तेव्हाच तर ती भावना वेड्यागत डोळ्यातून वाहेल ना..... नुसत्या कोरड्या नात्यांचा काय उपयोग ? भक्ताचं भगवंताशी, पालकांच मुलांशी, त्याचं तिच्याशी, मित्राचं मित्राशी...... नात असं हवं ज्याला दुभंग माहीत नाही. यात असतो तो फक्त अभंग....

गाणी झाली. एडिटींग झालं. आता प्रश्न होता निवेदनाचा म्हणजेच मधल्या जागा भरून गीतांची जोडणी करण्याचा. अज्ञातांनी सांगितलेला क्रम श्री. मकरंद यांच्या क्रमाशी जुळला आणि श्री. धनंजय गोवर्धने यांनी अनुमोदन दिले. मग निवेदन लेखन व निवेदन या दोन्ही गोष्टी दोघांच्या संगनमताने अज्ञातांच्या गळी पडल्या. आता कविता लिहीणं हा 'प्रोसेस' पुर्ण वेगळा. आतून येणारा. पण निवेदनाचं तस नाही. ते ठरवून लिहावं लागतं.. काय लिहावं, कसं लिहावं, किती लिहावं, गद्य असावं की पद्य असावं, धागा कसा असावा...... विचार विचार विचार... म्हणजे फक्त जन्म दिला म्हणजे काम संपत नाही. पुढे पुन्हा पालनपोषणाच्या जबाबदार्‍या आहेतच. शेवटी एकदाचा मजकूर निश्चित झाला.

वार्‍याचा गारवा माळावरती मारवा
गंध ओल्या झुळुकेचा घुमतो व्याकुळ पारवा

कळीपाठी नवी कळी रोज तशीच तरी वेगळी
सरींसोबत पागोळी पाण्यावरती रांगोळी

मनाची अस्वस्थता दिशांचे संदर्भ बदलून टाकते. वार्‍यातला गारवा, रखरखलेल्या माळावरची अनामिक हुरहुर. अनोळखी गंध वाहून आणणारी एखादी झुळुक, घुमणार्‍या पारव्याचा चित्कार.... सगळे संदर्भ मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतात. मन आनंदी तर जग आनंदी... मन कष्टी तर जग कष्टी. 'रोज तशीच तरी वेगळी'...जीवनचक्रातला एक महत्त्वाचा धागा या ओळीत आहे. हे विधान निव्वळ एका कळीसाठी नाही हे सांगण्यासाठी पांडित्याची गरज नाही. जे रोज आहे त्यात वेगळेपण शोधण्यात आयुष्य खर्ची पडतं. कधी ते क्षणाच्या दहाव्या भागातही गवसतं तर कधी ते गवसण्यासाठी आयुष्य क्षणभंगूर ठरतं.

पावसाचा आनंद घ्यावा म्हटल तर झेलण्यासाठी इथे नुसत्या सरीच नव्हे तर त्या सरीनी एकत्रित येऊन निर्मिलेली पागोळीही आहे. जितकं झेलाल तेवढा त्याचा मनमुराद आस्वाद घेता येईल. नाहीतर मग ती नुसतीच पाण्यावरची रांगोळी पाण्यासोबत वाहून जाईल. जीवनाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेण्यावर आहे. क्षण येतात आणि जातात. आपण त्यातले नेमके कोणते जगतो ते महत्त्वाचे. जगण्याच्या नादात कधी कधी जगणं हरवून जातं.

पुन्हा आसमंतात धुंदावणारं संगीत आणि तेच भिजलेले सूर...

बरसुन गेला श्रावण सरला मेघ
नभातिल नितळ जाहले तारे
येउ घातले शुभ्र हिमाचे
शीत गुलाबी वारे

पांघरून दंव गोंडस
हसले तृण हिरमुसणारे
तरारली रंध्रातुन अवघी
मोगरी शिवारे

मदनगंध रंगात नाहिले
रेशिम हुळहुळणारे
स्वप्नाविण सृष्टीत पाहिले
हवे हवेसे सारे

हे एक शब्दचित्र. शब्दचित्रात अज्ञात माहीर आहेत याची इथल्या अनेक वाचकांना जाणिव आहेच. आधी वाटल होतं... या कवितेच्याही अंतरंगात शिरावं.... कविता कशी चकतीवरच्या पांढर्‍या रंगासारखी भासते. पहाताक्षणी त्यात तेवढा एकच रंग आढळतो. पण मुळात तसं नसतं कधी कधी. या पांढर्‍या रंगात सात रंग दडलेले असतात. ती चकती गरगर फिरवली तरच नजरेस पडतात ते. तेवढा तो फिरवाफिरवीचा त्रास घ्यायला हवा. त्याशिवाय तिच्या अंतरंगातले रंग उलगडायचे नाही. पण या कवितेबाबत हा प्रकार मी करणार नाही. जळाची मजा अनुभवायची असेल तर नेहमीच त्यात उतरलचं पाहीजे अस आहे का ? नाही ना. मग.

म्हटलं या चित्राचाच आस्वाद घ्यावा. श्रावणातील एक धुंद नितळ रात्र, हवेतला गुलाबी गारवा, त्या रात्रीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत उगवणारी पहाट, गवतफुलांवर ओथंबून राहीलेले दवं, फुलारलेली शिवारे... हे इतकं पुरेसं आहे नाही मनाच्या गाभ्यातील अलवार रेशिम हुळहुळण्यासाठी... अशा वातावरणात ज्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत नाहीत त्याच्यासारखा अरसिक तोच म्हणावा. अवतीभवती इतकं काही असेल तर डोळे मिटण्याची गरज काय ? उगाच झोपायचं.. स्वप्नांची वाट पहात... मग स्वप्नांच्या गावाला जाऊन तिला वा त्याला भेटायचं.... कशाला एवढा टाईमपास.... इथे प्रत्येक गोष्ट तिच्या वा त्याच्या प्रतिकात्मक स्वरुपात आहेच. देखनेवाली नजर चाहीए असं म्हणतात ते काही खोट नाही. दिलसे .. प्रयत्न करून तर पहा.

नाटकात अनेकदा भूमिका करूनही अज्ञातांना त्यांच्या आवाजाबद्दल कांहीच कल्पना नव्हती. रेकॉर्डिंगला तो योग्य वाटेल किंवा नाही ह्याची खात्री नव्हती. नाशिक आकाशवाणीवरील निवेदक श्री. जयंत ठोंबरे किंवा श्री. धनंजय यांच्या ओळखीने श्री. किशोर कदम यांना विचारावं असाही विचार झाला. परंतु स्वत: कवीने वाचलेली कविता वा निवेदन हे इतर कुणाहीपेक्षा जास्त प्रभावी होईल आणि समजा नाहीच पूरक झालं तर दुसर्‍या कुणाचा विचार करता येईलच ह्या श्री. मकरंद यांच्या ठाम मताला अनुसरून अज्ञातांच्या ट्रायलचा निश्चय पक्का झाला.

आयुष्यातलं स्टुडियोतलं पहिलं रेकॉर्डिंग !! हवाबंद खोलीत, श्वासाचीही नोंद घेणार्‍या माईकसमोर, कानाला इयरफोन लावून अज्ञात. गाण्याचा ट्रॅक सुरू होऊन संपला की निवेदन करायचं. झालेलं ऐकायचं. ओके झालं की पुढचं गाणं. ट्रायल जमली. आवाज बरा वाटला. श्री. मकरंद, श्री. धनंजय आणि रेकॉर्डिस्ट श्री. प्रशांत पंचभाई यांचं आवाजावर आवाजी एकमत झालं आणि कामाला सुरुवात झाली. कानात तानपुरा घुमायला लागला आणि अज्ञातांनी स्वर लावला. कधीतरी केलेला गाण्याचा रियाज कामी आला. गाण्याच्याच पट्टीत निवेदन होणं गरजेचं असल्यानं तानपुर्‍याचा साज !

पहिला टेक झाला. बघणार्‍यांचे चेहरे हसरे वाटले. अज्ञात संभ्रमातच. एकेक करत सर्व जागा भरल्या गेल्या. संपूर्ण सीडी निवेदनासहित पहिल्यांदाच सद्गदीत होऊन त्यांनी पूर्ण ऐकली. बहुतेक सर्व पहिल्याच टेकमधे ओके झालं. कांही शब्द; विशेषतः शेवटचे; जे बोलण्याच्या ओघात स्पष्ट येत नाहीत ते दुरुस्त केले. आता वापरलेले वाद्यांचे बॅलंसिंग, बॅक्ग्राउंडला हर्मनीसाठी बेस गिटार, निवेदन आणि गाण्यांचं योग्य मिक्सिंग्-फेड इन फेड आउट करणे बाकी होते जे काम संगीतकार आणि रेकॉर्डिस्ट्चे होते.

मुकी आंसवे कशी शोधिती
पाण्यामधली गांवे
मुळी न आहे थोडेसेही
इंगित मजला ठावे

कसे कळावे स्पर्श कोणता
झुळुक हळूच सुखावे
एक मात्र रंध्रात पान्हवे
परिमळ वाटे गावे

नकोस येऊ पुढे कधीही
असे सदाही व्हावे
बंधित आणि चिरंजीव मी
नावे तुझ्या रहावे

कवितेच्या गावी गेलो की गद्यातले निवेदन मग नकळत पद्याकडे वळते. त्यातही निवेदनकर्ता स्वतः कवी असेल तर.. एका कवितेची पार्श्वभुमी सांगणारी दुसरी कविता. खर तर हा एक हल्का अनुभव. प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. याला या भुतलावर कुणी पारखा असेल असं मला वाटत नाही. फक्त त्याची नोंद घेतली गेली असेलच असं नाही. घेतली तरी अशा अलवार शब्दात नसावी आणि असलीच तरी मी त्या वाटेवरचा पांथस्थ कधी झालो नसेन. तसा प्रश्न शब्दांचा वा भाषेचा नाही. भावनांचा आहे. तू आहेस आणि तुझ्याशी मी निगडीत आहे एवढं पुरेसं. हा प्रेममार्ग असो वा भक्तीमार्ग.... संदर्भ तोच. वाट वेगळी... दिशा वेगळी.... शेवट तोच. एखाद्याची आठवण, एखाद्याचा ध्यास.... यात जर आकंठ डुबलो तर मग काय ? जळात डुंबलेल्या माणसाच्या भोवतीच नव्हे तर नाकीतोंडीही पाणीच. मग जो ध्यास मनाला लागला त्यात जर आकंठ बुडालो की मग तो व्यापतोच आपलं अस्तित्व. अशावेळी ज्याचा ध्यास आहे त्याची अनुपस्थिती जाणवत नाही. कारण तो आहे... आपल्याच रंध्रारंध्रात्...वेगळा असा नाहीच.

झरले नभ हिरवळले कातळ
भिजू लागले शेत
जुनेच स्वर अंकूर नव्याने
गाउ लागले गीत

मेघसरी पोटात उसासे
होउ लागले शीत
विझलेली धग गंध उमलली
बंधन आठवणीत

जळासवे वाहिली वेदना
पण घडले विपरीत
सुखावली वसुधा; पण झाले
व्रण उघडे धरणीत

रसग्रहण करायलाच हवं का ? नाही ना. पण तरीही करतोच. पुन्हा पाऊस, त्यात कातळांवर अंकुरलेलं शेवाळ... (दगडाला पाझर म्हणतात तस तर नाही ना ? ) आणि पावसासोबत जुनीच प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु होते. बरसणार्‍या सरी भेगाळलेल्या धरेकडे झेपावतात. भेगा पाणावतात. धग शांत होते. मृदगंध पसरतो. पाण्याचा भर ओसरतो आणि या भेगा स्पष्टपणे जाणवतात. पण हे एवढ्यावर संपत नाही. ओघळणार्‍या आसवांनी आतला आठवणींचा कातळ सैलावतो. त्या क्षणांची हिरवळ हळूहळू पृष्ठभागावर येऊ लागते. पुन्हा जुन्या खपल्या खरवडल्या जातात आणि आठवणी डोकं वर काढतात. सल असतात काही. कायम सलत राहणारे. आसवांचा एक सडा त्यांना सुखावून जातो. सल ताजा होतो. कोंब फुटावा तसा बाहेर येऊ लागतो. वेदनेची तीव्रता जाणवली की मग आसवांचा पूर येतोच. मग पूर ओसरताच थोडं बरं वाटू लागत. जीव शांत होतो. पण नकळत तो जुना जाणता सल मात्र या निमित्ताने पुन्हा ताजा होतोच. त्याचं काय ? म्हणतात ना की जगात ७५ टक्के पाणी आहे आणि शरीरातही. शास्त्रसंमत आहे ते. मग कवितेतल्या निसर्गाची नाळ मनाच्या तळाशी जुळली तर नवल ते काय ?

डी जी स्टुडियोचे मालक श्री. दीपक घारापूरकर, तसे अज्ञातांचे मित्रच. पण त्यांनाही कवी अज्ञात कोण हे त्या दिवशी कळलं होतं. श्री. मकरंद यांनी अज्ञातांना दिलेला शब्द चोख पाळला होता. श्री दिपक यांचे वडील पं. गजानराव उर्फ काका घारापूरकर यांचं अज्ञातांवर गेल्या पस्तीस वर्षांपासून, वारंवार न भेटूनही आणि संगीत क्षेत्राशी फारसा जवळ नसूनही, त्यावेळी अज्ञातांच्या पहिल्या वहिल्या संगीताच्या कार्यक्रम आयोजनानिमित्ताने झालेल्या सौहर्दपूर्ण वादामुळे विशेष प्रेम. त्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी कौतुकाने भरभरून आशीर्वाद दिले. अज्ञात त्यांच्या चरणी आदराने लीन झाले. आठवडाभरात संगीताचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि पहिली सीडी रेकॉर्ड झाली. मग अज्ञात. श्री. मकरंद आणि श्री. धनंजय. तिघेही मिठाई-श्रीफळ-दक्षिणा घेऊन बाहेर पडले. त्र्यंबकेश्वर सोडल्यावर जव्हारच्या घाट रस्त्यावर सीडी लावली. ४५ मिनिटे काचबंद एसी मधे स्तब्ध प्रवास करीत प.पू भक्तराज महाराजांच्या मोरचुंडी ह्या छोटेखानी निवांत शांत पवित्र आश्रमात पोहोचले. महाराजांची गादी आणि शिवालयाचे भावपूर्ण अर्चन करून पादुकांवर सीडी अर्पण केली. याच ठिकाणी, बाबांच्या अस्तित्वाच्या साक्षीने, अज्ञात आणि श्री. धनंजय यांनी कवितांच्या निवडीची पहिली फेरी तीनेक महिन्यापूर्वी पूर्ण केली होती. मोरचुंडीहून परत येतांना त्र्यंबकेश्वरला, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीवर सीडी नैव्यद्य दक्षिणा अर्पून मंडळी माघारी परतली

किती अमीषे परिसकथेची भुलले मन एकांतक्षणी
बंद पुकारुन वाहुन गेले बांधावरुनी पाणी

कळा पेटल्या विझल्या झाली त्याची एक कहाणी
काळोखाच्या झळा सावल्या मंतरल्या कोणी !!

परिसाला स्पर्श करणार्‍या लोखंडाचं सोनं होते म्हणे. आयुष्यात असे परिस कधी कधी कोणत्या ना कोणत्या वळणावर लाभतात. जाताना हे परिस आपल्या आयुष्याच्या दैनंदिनीतील काही पाने व्यापून जातात. कधी बसून ही जुनी पाने चाळली की पुन्हा त्या कथा जिंवत होऊन डोळ्यांसमोर येतात. मनाचा एखादा हळवा कोपरा त्या आठवणींनी गलबलतो. 'नाही... कधीच नाही' हे ठरवलेलं असतं पण मेंदूने सांगितलेली ही सुचना डोळ्यांना कळली तरी वळत नाही. पाणी वाहायचं म्हटलं की वाहतेच. भिंतीवरची एखादी अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेली फ्रेम काढली तरी त्या फ्रेमची चौकट मात्र दृश्य रुपात भिंतीवर तशीच असते. मग ते झाकायला तिथे दुसरी फ्रेम लावणं क्रमप्राप्त होतेच. तो ठसा झाकला गेला तरी पुसला काही जात नाही. कुणीतरी असच त्या ठश्यासारखं ठाण मांडून असतं. मनाच्या एका भिंतीवर.

आठवणी दुखद असो वा सुखद... त्या कळ्यांसारख्या डोकावतात... बहरतात.... उमलतात... मग पुन्हा कोमेजतात. जाता जाता त्यांचा गंध देऊन जातात. बघता-बघता तरळून गेलेल्या क्षणाचीही एक कहाणी असतेच. मग अशा कळ्यांची.. आठवांची कहाणी ... आठवांचा भार ओसरतो... मनासोबत डोळे मिटतात. तात्पुरता अंधार झाकोळून टाकत सारं. पण ती झळ सोसवत नाही आणि मन टक्क उघडतं. तेव्हा क्षितिजावर रेंगाळत असलेली आठवण अजूनही असते. तिच्या सोबत असतात तिच्या सावल्या... वेगवेगळ्या... एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सावल्या असाव्या तशा... जादुगाराच्या पोतडीत अजब वस्तू एकामागोमाग एक निघाव्या तशा या आठवणींशी निगडीत सावल्यांची मालिका... मंत्रवल्यासारखी... एकीतून दुसरी... दुसरीतून तिसरी..

पश्चिमेचा सांजवारा आणि व्याकुळ पारवा
सावली हरवून गेली पेटवूनी मारवा

पाहुनी अस्वस्थ वेळा स्नेहज्योतीचा दिवा
तापल्या रात्रीत जागा छेडु लागे चांदवा

साजरा आक्रंद वेडा छेद देई अंबरा
संचिते उकलून सारी आळवी अन अंतरा

मावळतीची दिशा अन निराशेचा सूर यांच एक अनामिक नातं आहे. आयुष्य मावळतीला गेलं की मग कधी कधी गेल्या क्षणांचा लेखाजोखा हाती घेतला जातो. काय कमावलं ? काय गमावलं ? यात कमावलेलं असतं त्यापेक्षा गमावलेल्या क्षणांच्या सुया मनाला टोचत राहतात. पारवा म्हणजे इवलसं पाखरू. या अनंताच्या अफाट पसार्‍यातील एक नगण्य अस्तित्व. त्यात त्याची व्याकुळता. नगण्य असलं तरी त्याला अस्तित्व आहे हे त्याच्या दृष्टीने पुरेसं. असा पारवा मावळतीच्या वेळेस... आयुष्य सांजावताना निवांत होतोय तोच आठवणी वार्‍यावर स्वार होऊन त्याच्या दिशेने येतात. एखादी झुळूक सुखावते तर एखादी गारठवते. सुर्य अस्तास जातो आणि सावलीची सोबतही संपुष्टात येते. 'एकला चालो रे' हा मानवाचा मुलमंत्र. येताना एकटा आणि जातानाही. संध्याछायेत जाणवतं की आजवर सोबतीस असलेले किती पुढच्या प्रवासाला निघून गेलेत आणि किती फार मागे रेंगाळलेत ते. मग हे एकटेपण छळायला लागतं.

आयुष्याला अर्थ देऊन गेलेला गोतावळा समोर उभा राहतो. डिजीटल कॅमेर्‍यातील एकेक चित्र पाहून, तपासून घ्यावे तसा एकेक प्रसंग अस्वस्थ मन:पटलावर उमटू लागतो. मनाची अस्वस्थता वाढते. रात्र जड होऊ लागते. जगाला शीतलता देणारा आकाशीचा रोजचा चांदवाही मनाला पोळतो.

मनाचा हा आक्रंद झिडकारून टाकता येत नाही. हव्याहव्याश्या वाटणार्‍या गोड गुपितासारखा तो मनासोबत असतो. साजरा वाटणारा आक्रंद... पण कधी तो अशा अस्वस्थ वेळी तीव्रता गाठतो. मनाच्या सगळ्या अज्ञात सीमा ओलांडून जातो. पुन्हा पुन्हा आकाशाकडे झेपावून माघारी फिरणार्‍या पाकोळीसारख्या या आठवणींचा आक्रंद भोवतीच घिरट्या घालतो. मग उमलतात काही नवीन गोष्टी. ज्यांचा कधीच विचार केलेला नसतो. काही सुखावह तर काही वेदनादायक. मग त्यांच्या पारायणात चित्र पुर्ण स्पष्ट होतं. मनातला एक गुंता नकळत सुटतो. त्या गुंत्याचं एक टोक सापडतं आणि गोष्टी उलगडतात.

या सर्व उठाठेवी होत असतांना अज्ञातांच्या पत्नी सौ. माधुरी जपानमधे त्यांच्या मुलीकडे होत्या. हे प्रकरण त्यांच्या न कळत पूर्ण करून दिवाळीच्या पाडव्याला एक सरप्राईज भेट म्हणून द्यावं ह्या विचारांनी कामाच्या गतीने वेग घेतला. गंमत म्हणजे सौं. अज्ञात यांना कविता ह्या विषयात फरसा रस घेत नाही. निदान कवितांच्या संगीतमय रूपाने त्यांच्यात थोडी गोडी निर्माण व्हावी ही अज्ञातांची माफक अपेक्षा.

ओवाळणीची विशेष उत्सुकता ! मोठं स्पेशल पॅकिंग. पॅकिंग वरून साडी पैठणी असल्यासारखं. एकेकाचे गेसवर्क सुरू. वेळ आली. ओवाळणी घातली. पॅकिंग उघडल्यावर निघालेला 'सीडी' चा उंदीर !! तसा हलकल्लोळच झाला थोडा. प्लेअरवर लाऊन पाऊण तास ऐकण्याचा कार्यक्रम. पण कुणाची सीडी ?? .............

अज्ञातांच्या भावंडांना आणि आई वडिलांनाही ते कविता लिहितात हे प्रथमच कळले होते. त्यात शौनक
अभिषेकींनी गाइलेली सीडी !! असा वेगळाच माहोल तयार झाला. मात्र "अज्ञात" नावावर सर्वांनीच आक्षेप घेतला. खुद्द घरच्यांनाच जर कवी अज्ञात असेल तर मग आमच्यासारख्यांच काय ? असो.

तेच गवाक्ष बुलबुलही कक्षेस किनारा नाही पण
मन पराधीन भटके असीम दूरस्थ गातसे कोणी

अक्षय हा प्रवास जीवनभर खेळते पटावरती राणी
हसते रडते कधि तरंगते पापणीत अवघड पाणी

खिडकीत बसून जेव्हा आपण डोकावतो तेव्हा त्या खिडकीची एक ठराविक लांबीरुंदीची चौकट असते. त्या चौकटीतून पाहणारे आपण. आपल्यापण लांबीरुंदी, उंची, वजनाच्या व्याख्या आहेतच की. त्या नियत क्षेत्राच्या बाहेर आपण आपला विचार करू शकत नाही. पण त्याच चौकटीच्या बाहेर जेव्हा नजर जाते तेव्हा समोर असलेल्या किंबहुना पसरलेल्या जगाला सीमा नसल्याचं जाणवतं. नजर दूर क्षितिजापर्यंत जाते. आपल्या लेखी तीच या अवकाशाची, धरेची चौकट. त्याच्यापलिकडे नजर जात नाही. पण मन जाते. त्याला अडवू शकेल असा आहेच कोण ? ते आहे परमेशासारखं निराकार, सर्वव्यापी, सर्वत्र. म्हणुन तर माणसात ईश्वर आहे असं म्हणतात संतज्ञानी. या मनाला मात्र त्या क्षितिजापलिकडचे सूर ऐकू येतात.

मनाचा हा अव्याहत चालणारा प्रवास शरीराचा श्वास चालू आहे तोपर्यंत चालू असतो. याच्या बिंबात कधी आपण हसतो, कधी रडतो. भावनांच्या सरमिसळीचा उगम तो या मनाच्या गाभ्यातूनच आणि त्याचे दृश्य प्रतिनिधित्व असते ते डोळ्यातल्या पाण्यात. आनंद असो वा दु:ख... पापण्या ओलावतातच.

थोडी गझलच्या अंगाने जाणारी असली तरी ही गझल नाहीच. तशी प्रत्येक गझल ही एक कविताच. पंडीतजी सूर छेडतात तेव्हा आभास हा गझलचाच असतो.

या सुप्त ओळखीला कुठलेच नाव नाही
चंद्रास खंत जेंव्हा लाटेस गाव नाही

प्रत्येक नात्याला नाव हवं हा अट्टाहास आपलाच. त्यापलिकडे जाऊन विचार करायचाच नाही. ज्याला नाव देता येत नाही ते नातं अनैतिक का वाटतं याचा उलगडा अजून झालेला नाही. किडलेलं मन जोवर स्फटिकासम नितळ होत नाही तोवर हा वाद चालणारच. पण खरचं कधी विचार केला की वाटतं प्रवासात ऐनवेळी तहान लागल्यावर पाण्याचे घोट देणारा तो आपला कोण ? चालता-चालता आपल्याला ठेच लागली असता डोळ्यात पाणी आणि चेहर्‍यावर दु:ख आणणारी ती अनोळखी आपली कोण ? मनमुराद खळखळून हसताना दूरवर बसलेले कुणी त्या हास्यात नकळत सहभागी होतात ते आपले कोण ? केवळ फोनवर झालेल्या ओळखीचं कधी कधी भेटीत रुपांतर होतही नाही. पण नातं आहेच. मग ते कोणतं ? साधी तोंडओळख असताना तिच्या वेदनांनी जेव्हा मन गलबलतं तेव्हा तिचं आपल्याशी नेमकं नात कोणतं ? अशा कितीतरी ओळखी ज्या फक्त ओळखी न राहता त्या पलिकडे काहीतरी असतात पण काय ? भरतीची लाट चंद्रोदयानंतर उसळते. ओसरते. कोणासाठी ?

उर्दाळल्या क्षणांचा शरघाव खोल देही
हृदयात वेदनेचा सल बोचरा विदेही

क्षण एक पुरेसा असतो घायाळ करण्यासाठी. मग ते शस्त्राने असो वा शब्दाने. काळ प्रत्येक जखमेवर मलम लावतो. तिला ओंजारतो. गोंजारतो. पण सल उरतोच. वण उरतोच. शरीरावरील घाव सर्जरी करून झाकताही येतात. पण ते आहेत हे लक्षात राहतं कारण मनाचे वण तसेच असतात. उघडेबोडके. कायम.

दूरस्थ जो दिलासा कुरवाळतो व्यथा ही
अनिकेत त्या जगाशी नाते असून नाही

प्रश्न म्हटलं की उत्तर आहेच आणि जखम म्हटली की मग औषध आहेच. व्यथेवर दिलासा असतोच. नजरेच्या टप्प्यात असलाच पाहीजे असं नाही. पण व्यथेला हेही पुरेसे की कुठे तरी तिचा दिलासा आहे. तो कोणत्या जगात वावरतोय याचीही कल्पना असतेच असं नाही. पण तो आहेच हा विश्वास मात्र ठाम असतो. विरहात रात्र जागणार्‍या डोळ्यांना दर्शनाची आस असते. 'येणार' इतका दिलासा पुरेसा असतो. खात्री असते, पण तरीही विरहाची व्यथा काही संपत नाही. ती असतेच.

माझेच मी गर्‍हाणे सांगू कसे कुणाला
ज्याचा सही सुगावा संवेदनेत वाही

आपल्याच वेदनांचा जगभर ढोल का बडवावा ? ज्याला सांगावं तो काही विवंचनारहीत नाही. मग उगाच दु:खांचा बाजार मांडण्यात काय अर्थ ? वेदना आहे म्हटले की संवेदना आलीच. 'क्रियेला प्रतिक्रिया' असावी तसेच. एखाद्या संवेदनशील मनाला या वेदनेची न सांगता जाणीव होईलच.

अस्पर्श जाण ओली वेडावते जिवाला
चुकले कसे म्हणावे; मी संत नाही

नकळत कोणत्या ना कोणत्या क्षणी हातून एक चूक घडते. घडल्या चुकेची जाण छळते. कारण परिणामांना जबाबदार आपण असतो. कधी वाटतं की पुढे व्हावं आणि चूक कबूल करावी. पण त्यासाठी लागणारे धाडस अंगी नसते. आपल्या चुकांची कबूली देऊन त्याची शिक्षा भोगायला तयार होणे हा सामान्य माणसांचा गुणधर्म नव्हे. हे तर संतांचे काम. ते आपणास शक्य तरी कसे व्हावे ?

तसं पहायला गेलो तर यातली प्रत्येक द्विपदी सुटी वाटते. दोन पायर्‍या उतरून पुढे गेलो तर मग यातला संबंध जाणवतो. माळेला गुंफणारा धागा दिसत नाही तसाच हा एक अदृश्य धागा या प्रत्येक द्विपदीतील परस्परासंबंध सांगून ज्ञातो. हा अनुभव न आलेला माणूस विरळाच !

नाशिकच्या मोजक्या जाणकारांना कुठलाही संदर्भ न देता ऐकवून थोडा धीर आल्यावर, श्री. मकरंद हिंगणेसह मंडळी नाशिकच्या आरती डिस्ट्रिब्युटरच्या श्री. रवी बारटक्के यांना भेटली. त्यांना सीडी ऐकवली व त्यांनीच सुचविल्याप्रमाणे ती पुण्याच्या फाउंटन म्युझिक कंपनीचे कांतीभाई ओसवाल यांना ऐकवली. त्यांनाही ती आवडल्याने त्यांनी ती प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शवली. विनायक रानडेंच्या सहकार्याने नाशिकच्या "विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने" निर्मिती करण्याचं दायित्व स्वीकारलं. काळपरत्वे कंपनीने त्यांच्या आर्टिस्टकडून कव्हर डिझाईन करून पाठविले.

योगायोगाने, अज्ञात त्यांच्या दुसर्‍या मुलीकडे "दुबई फेस्टिवलच्या" निमित्ताने दुबईला असतांना, तिथे ४,५,६, मार्च २०१० ला झालेल्या, "दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलनात" ध्यानी मनी नसतांना, संमेलनाध्यक्ष महाराष्ट्रभूषण कवी मंगेश पाडगांवकर यांच्या शुभहस्ते "पश्चिमेचा सांजवारा" चे, सुप्रसिद्ध भवगीत गायक अरूण दाते यांच्या उपस्थितीत आणि दुबई महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्थ आणि माजी अध्यक्ष डॉ. उदयशंकर बोलन, सदस्य श्री. जोशी यांच्या साक्षीने गौरवपूर्ण अनावरण झाले.

येत्या २६, २७, २८ मार्च ला पुण्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनापूर्वी / संमेलनात फौंटन म्युझिक कंपनीच्या स्टॉलवर आणि इतर ठिकाणी सीडी विक्रीस उपलब्ध होईल. त्याआधी नशिकला एखादा प्रेस रिलीज होईल.

आता महफिलीची सांगता....

सरला दरवळ सुकला कातळ
विरली नभात मेघावळ
हसले नितळ टिपुर चांदणे
खोल निळ्या आभाळावर

कांही सूर सुरात मिसळले
कांही हरवलेले गवसले
कांही निसटूनही उमटले
काळजावरती

गंध ओसरलाय. ओलावल्या निसर्गाची ओल सरलीय. आकाश निरभ्र झालय. आतातर रात्रीचा घनाचा पसाराही नाही. जे आहे ते फक्त लुकलुकतं चांदण. मन अगदी निरभ्र झालय.

अशात एक पहाट... दिवाळी पाडव्याची. पंडिता किशोरी आमोणकर यांच्या महफिलीची वेळ. नाशिकच्या नेहरू चौकात श्रोते जागा अडवून, बिलगून बसलेले. समोर रंगमंचावर वाद्ये आणि वादक तयार. पहाटे साडेचरला अपेक्षित असलेली महफिल वाट पाहून वैतागलेल्या श्रोत्यांसमोर सात वाजता सुरु झाली. गायिका तान घ्यायला तयार.... वाद्यांचा मेळ झाला. वादकांनी नुसत्या नजरेच्या इशार्‍यावर त्यांची तयारी दर्शवली आणि गायिका सज्ज झाल्या. ती पहिली तान, पहिली हरकत, पहिली सम.... जीव श्रवणयंत्रात येऊन थबकलेला.... आणि वातावरणात ते अद्भूत स्वर्गीय स्वर...... आणि मग समोरच्या श्रोत्यांबरोबर त्या स्वरांच्या गंगेत न्हात गेला अवघा आसमंत... सजीव... निर्जिव.... आता काही होतं तर फक्त सप्त सूरांची अवर्णनीय बरसात......

किरण चांदणं मधाळलं
मखर स्वरांनी तेजाळलं
खोपा खोपा फांदी फांदी
चिमण पाखरू पान्हाळलं

आकाशात विझत असलेल्या चांदण्यानी त्या स्वरमाधुर्याचा जाता-जाता रसास्वाद घेतला. समोरच्या पिंपळपारावर विसावलेल्या गजाननाचा इवलासा गाभारा अलौकीक स्वरांनी तेजाळला. ती सुरेल तान ऐकताच पिंपळपानाच्या आड असलेल्या घरट्यातून चिवचिवाट करणारी पाखरं आपला चिवचिवाट विसरली.

आत स्वर बाहेर स्वर
अन अभिसरण हे उमाळलं
पानावरच्या दंवात भिजुनी
इंद्रधनूही ओशाळलं

आता स्वर फक्त आसमंतातच नव्हे तर अतर्मनात होते. श्वासातच नव्हे तर नसात होते.... त्यात दौडणार्‍या रक्तात होते.... रोमरोम त्या स्वरांची जादू अनुभवत होता. पानावर थबकेलेल्या दवबिंदूतून परावर्तित होणारा पहिला सुर्यकिरण नेहमीप्रमाणेच सप्तरंगांची उधळण करण्यास निघाला खरा, पण सप्तसुरांच्या वर्षावात चिंब झालेल्या कोणी त्याची दखल घेतलीच नाही. एवढं कारण त्याचा तोरा जिरवायला पुरेसं होतं.

नदीकाठ अन गार वारा
ऊन देखिल शहारलं
चौकामधल्या भिंतीवरती
पिंपळपान तरारलं

गोदावरीच्या पात्रातलं पाणी किनार्‍याजवळ उचंबळायला लागलं. लाटेवर लाटा येऊन थडकत होत्या. अंतरी एकेक तान घेऊन मागे सरत होत्या. अवखळ वारा त्याच्याही नकळत थंडावला. स्वरमोहीनी नखशिखांत पांघरून असलेल्या कुणाला त्यांच्या अस्तित्वाने साधी शिरशिरीही येण्याचा प्रश्न नव्हता. याची जाणिव त्या कोवळ्या उन्हाला न झाली तर नवल ते काय ? स्वरांच्या साक्षात्काराने तेही शहारलं. इतकचं नव्हे तर चौकातल्या जुनाट भिंतीच्या फटीत नुकतच पालवी फुटलेलं पिंपळपानही त्या स्वरमार्दवाने तरारलं. नजर वळवून सुरांच्या स्त्रोताला शोधू लागलं.

स्वर्ग उतरे धरेवरी
जीव भिजला वरचेवरी
गात्र गात्र लाटेवरी
कातर मनही पाणावलं

स्वर्गीय आनंद घेण्यासाठी स्वर्ग पाहण्याची गरज नाही. संगीतात इतकी जादू आहे की ते वाळवंटाचे नंदनवनात रुपांतर करू शकते. परमेश्वरांने म्हणूनच काही गळ्यांमध्ये स्वतःचा निवास स्थापित केलाय. तो तेथूनच सर्वसामान्यांशी संवाद साधतो. ईश्वरप्राप्तीचा आनंद याचि देही याचि डोळा गवसल्यावर अजून या जीवाला काय हवयं ? तृप्त मनाला अजून आस शिल्लक राहणार तरी कसली ? आत्मा परमात्म्यात विलिन झाल्यावर देहांचा अवयवांचा भ्रम नाहीसा होतो. पंचेंद्रियांना पंचमहाभुतांची जवळीक लाभल्यावर 'मी'पण असं काही उरतच नाही. अशी सर्वोच्च समाधीची अवस्था गाठल्यावर मनाला पाझर तो फुटणारचं.

महफिलीची सांगता अशीच व्हायला हवी होती. कवितेचे गीत होते आणि स्वरलहरीवर स्वार होऊन ते सर्वत्र विहरू लागते. आज अज्ञांतांच्या निव्वळ आठ कविता स्वरबद्ध झाल्यात. येत्या काळात इतरही होतील यात शंका नाही. तेव्हा पुन्हा त्याच गोदावरीच्या तीरावर बसून त्या गीतांचा आस्वाद घेता येईल... येणारा दिवाळी पाडवा नव्या गीतांच्या रोषणाईत उजळून निघेल.

आता कवींच्या शब्दात म्हणायचं तर "सीडीतील सर्वच कवितांना मकरंदने दिलेल्या चाली, मला स्वतःला माझ्या कुवतीप्रमाणे समर्पक वाटल्या, तरीही त्यातल्या ६ व ७ क्रमांकाच्या कवितांच्या 'चाली, संगीत, गण्याची लय आणि शौनकचं त्याप्रतीचं योगदान' हे, त्या कविता लिहिल्या गेल्या वेळची 'प्रेरणा, भावना, मनःस्थिती, वातवरण, अवस्था आणि परिणीती' यांची शतप्रतिशत किंबहुना त्याही पलिकडची अनुभूती प्रत्येक वेळी देतात असं मला प्रकर्षानं वाटतं. अजून एक महत्वाची बाब म्हणजे संगीतकार मकरंद हिंगणे याने कुठल्याही प्रकरचे मानधन न घेता ह्या कवितांचा विशेष सन्मान केला आहे. पं. शौनक अभिषेकी यांनीही, निव्वळ कवितांचे शब्द-आशय-विषय आणि मकरंदने त्यावर घेतलेली प्रमाणिक मेहनत यांचा आदर करून केवळ खर्चापोटी आवश्यक तेवढेच मानधन स्वीकारले आहे ही नमूद करण्याजोगी बाब आहे. "

कवितांच्या जन्माबाबत अज्ञांतांचे मनोगत त्यांच्याच भाषेत "खरं तर प.पु. भक्तराज बाबा हयात असतांना, परंतु स्वप्नात, मला म्हणाले "कांही लिहितोस की नाही ?". मी 'नाही 'म्हणालो. म्हणाले, "मग मी सांगतो ते लिही" आणि कुठल्याशा भजनाची ओळ सांगितली. ते उत्तम भजने लिहीत आणि सुरेल गातही असत. ती ओळ लिहिता लिहिता मी त्याला लागून पुढची ओळ गुणगुणलो त्यावर "येतं तर काय लिहायला, लिहीत जा" म्हणाले आणि जाग आली. मी हा आशीर्वाद समजून लिहीत सुटलो. कळत नकळत अज्ञातातून मिळणार्‍या प्रेरणेप्रमाणे. जे उत्तम आहे ते "ह्या प्रेरणेतून" आलेलं आणि जे सपक आहे ते "मी लिहितो ह्या अविर्भावातून गळालेलं" असं मी प्रामाणिकपणे समजतो. म्हणूनही कवी "अज्ञात"!!"

उचंबळ प्रवाहाचा
फड्फड ओल्या पंखांची
भरली ओंजळ मोत्यांची
तरीही खंत तशीच
कांहीतरी उरल्याची

प्रवाहाचा उंची गाठण्याचा प्रयत्न... नव्या पंखात उडण्याची उर्मी..... मोत्यांनी भरलेली रिती ओंजळ तरीही......

गुलमोहर: 

कौतुका... हा लेख.. लेख तरी कसे म्हणु याला? जे काही आहे, ते आजपर्यंतच्या तुझ्या लेखनाचा कळस ठरावे.
सर्वप्रथम अज्ञांतांचे मन:पूर्वक अभिनंदन ! आता प्रतिक्षा त्या ध्वनीफ़ितीची...

निदान छायाचित्रे डकवण्यासाठी का होइना पण माझा या नितांतसुंदर लेखास हातभार लाभला हे माझे भाग्यच, धन्स मित्रा !

कौतुक,

कवितेच्या झालेल्या ह्या सन्मानानं मला नि:शब्द केलंय.
लिहिणार्‍या लेखणीला स्तब्ध करावं असं लिहिलंयस एवढंच म्हणेन मी.

मागे हरीष दांगटांनी एका कवितेला अशीच आभाळाएवढी उंची प्रप्त करून दिली होती.
आवेगानं बरसणार्‍या आसक्त थेंबांना मायेची ओंजळ मिळावी असा हा आनंद आहे.

कसं उतराई व्हावं यातून ????

........................अज्ञात

दक्षे, अज्ञात आहेत त्या फोटोत. ओळख पाहू ? लेख वाचण्यास तुला वेळ मिळो ही श्रींच्या चरणी प्रार्थना !
विशल्या, माझ्या सगळ्या उपद्व्यापात तुला कायम हातभार लावावा लागणार आहे. या जन्मात तरी मी संगणकज्ञानसंपन्न होण्याची शक्यता दृष्टीक्षेपात नाही. तेव्हा मी कायम 'धन्स' मध्येच !!!
अज्ञात, तुमच्या सुरेख कवितांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मीच केलाय. कितपत जमलाय ते लवकर कळेलच.

कौतुक : सिंपली ब्रिलीयंट.... खुपच छान लिहीलयस !!!! अभिनंदन !!!

अज्ञातांची ही अत्तराची कुपी प्रकाशनापुर्वी मिळायच भाग्य मलाही लाभलय. माझ्या गेल्या नासिक ट्रिपला मी व सौ अज्ञातांना भेटलो त्यावेळेस ही सिडी मिळवली. अन लगेच गाडीत ऐकलीही...वारंवार...इतकी ती अप्रतीम झालीय्.. निवेदन्,संगीत अन एकुणच सगळ उत्तम जमुन आलय्...अज्ञात जागोजागी जाणवतात त्या कवितांतन...
गुरुजी.....सलाम आपल्यातल्या कविला अन त्याहुनही मोठा सलाम आपल्यात दडलेल्या उंच माणसाला... !!!!

सस्नेह : गिरीश

हे लिखाण म्हणजे जस अम्रूताचा घनु कार्यक्रमात ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवर राम शेवाळकरांच निरुपण तसच वाटल.कवितांनि झालेच पण आपल्या विवेचनानेहि मन त्रूप्त झाले.

कौतुक,

एका मराठी कवीनं दुसर्‍या हयात कवीच्या कवितांचं इतकं सुंदर रसग्रहण! मी अक्षरश: भारावून गेलोय. काय सुंदर लिहिलयंस! वा! Happy

शरद

कौतुकास्पद!
एका कविच्या भेटीचा व तदनंतरच्या अल्बमचा अनुभव अतिशय लिलया पेलला आहे.
कौतुक/ अज्ञातजी, आपले दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
हिर्‍याला जसे कोंदण हवे, तसे येथे अतिशय भावमय व गूढ व्यक्तिमत्वाला कोंदण मिळाले आहे, असे वाटतेय. keep it up !
-सस्नेह.

कौतुक तुझे कौतुक!!!! खुपच छान लिहीलयस !!!! अभिनंदन !!!!!!
एका मराठी कवीनं दुसर्‍या हयात कवीच्या कवितांचं इतकं सुंदर रसग्रहण! मी अक्षरश: भारावून गेलोय. काय सुंदर लिहिलयंस>>>>>>१००००००% सहमत!!!!
अज्ञात तुमचे मनापासुन अभिनंदन!!!!!!

ग्रेट ! सुपर्ब ! कौतुक ....

अज्ञातजी ... आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

आमच्या उदंड शुभेच्छा !!!! गोदेच्या पाण्याइतक्या, काळ्यारामाच्या कळसाइतक्या, ब्रह्मगीरीच्या उंचीइतक्या .....

खरच, कौतुकास्पद !!!
पण कौतुक कोणाचे करावे ? कळीचे की फुलाचे ! इतक्या सगळ्या भावना केवळ चार ओळीत माडणार्‍या कवीचे की चार ओळीतून नेमक्या विचारान्चा पिसारा उलगडून दाखविणार्‍या, रसग्रहण करणार्‍या रसिकाचे ? खरच, दोघेही ग्रेट आहात !!!!
मी ही सीडी ऐकली होती, खूप आवडली; पण आपण काव्य-रस 'ग्रहण' करण्या ऐवजी 'गिळला' होता असे हे वाचल्यावर वाटायला लागले. आता पुन्हा सीडी ऐकताना वेगळा अनुभव मिळेल.
सर्व मायबोलीकरानी एकदा जरूर ही सीडी ऐकावी, तुम्हालाही निश्चितच आवडेल अशी माझी खात्री आहे.
कौतुक, पुन्हा एकदा तुमच अभिनन्दन !!

अप्रतिम, अत्युच्च दर्जाच्या काव्याचं तितकंच अनमोल रसग्रहण वाचून धन्य झाले! कौतुक आणि अज्ञातजी दोघांचंही हार्दिक अभिनंदन!! ध्वनिफीत मिळवून ऐकणार नक्कीच! Happy

<<<<पण कौतुक कोणाचे करावे ? कळीचे की फुलाचे ! इतक्या सगळ्या भावना केवळ चार ओळीत माडणार्‍या कवीचे की चार ओळीतून नेमक्या विचारान्चा पिसारा उलगडून दाखविणार्‍या, रसग्रहण करणार्‍या रसिकाचे ? खरच, दोघेही ग्रेट आहात <<<<>>>>

१००टक्के अनुमोदन !!!

अज्ञातजी ... आपण ह्या विषयावर मुक्त विद्यापीठात बोललो होतोच !!!!
पण इथे मर्म्गग्राही विवेचन आणि तेवढ्याच उत्कट कवितांची तोंडओळख झाली...
आता सीडी आणण्याचा उशिर आहे...

लाख, लाख शुभेच्छा !!!!

अभिनंदन अज्ञातजी,
कौतुकराव,तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच.

हल्ली मायबोली सुटलीय माझ्या हातुन............. त्यामुळे हे असं होतं, सगळ्यांचं वाचुन झाल्यावर मी वाचलं. Sad कौतुक, तुझं हृदयी अभिनंदन. तु अज्ञातांवर इतकं सुंदर लिहिलंयस की ते आता अज्ञात न रहाता ज्ञात झालेत! तुझ्यावर लिहावं असं वाटायला लागलंय. त्यासाठी भेटायला हवं. तुला निट जाणुन घ्यायला हवं. अज्ञातांबद्दल काय बोलावं! हम्म.........
शब्द शब्द पाकळ्या, मिळुनी फुल जाहले. गंध की नशाच ही, सूर अर्थ आगळे.

अज्ञातजींच्या कविता तर नेहमीच वाचत आलीये..पण ह्या लेखामुळे..त्यांच्या मनोगतामुळे आणि प्रत्येक ओळीतुन कौतुकनी केलेल्या रसगहणामुळे त्यांच्या बद्दल नितांत आदर वाटु लागला आहे. (कौतुकना तर दंडवत आहेच!!!! त्यांच्याबद्दल आता काय लिहीणार Happy )
अज्ञातजी तुमचं मनापासुन खुप खुप अभिनंदन..तुमची कधी भेट होईल किंवा तुमचं नाव कधी तरी कळेल का हे माहीत नाही..पण त्या फोटोत तरी तुमचे दर्शन झाले हे खरोखर भाग्य आमचे!
पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा!!

सर्व सहृदांचे कृतज्ञ आभार. सीडीज सर्वत्र बाजारात उपलब्ध झाल्याचे समजले आहे. शौनक अभिषेकी यांचे न्यू अराईव्हल आहे.

.....अज्ञात