असे जाहले सुलेखन!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 December, 2009 - 10:30

दाराची बेल वाजली, दार उघडले तर शेजारच्या जोशीकाकू उभ्या होत्या. त्यांना कसलासा पत्ता हवा होता. एका कागदाच्या चिटकुर्‍यावर तो पत्ता मी घाईघाईने लिहून दिला. सहजच त्यांची नजर माझ्या हस्ताक्षराकडे गेली व त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार निघाले, "काय सुंदर हस्ताक्षर आहे हो! अगदी मोत्यासारखं... आमच्या मीताला शिकवा ना जरा... तिच्या बाई तक्रार करत होत्या तिच्या हस्ताक्षराबद्दल!" मी काकूंना मीताला तिच्या हस्ताक्षराबाबत मदत करायचे आश्वासन दिले खरे, पण त्यांनी केलेल्या कौतुकाने ह्या बोटांना ज्या ज्या लोकांनी उत्तम वळणाचे, शिस्तीचे आणि सौन्दर्याचे 'अक्षर'दान दिले त्यांच्या त्या अथक प्रोत्साहनाला मनाने उत्स्फूर्त अभिवादन केले.

असे म्हणतात की घरातील वातावरणाचा परिणाम घरातील लहान मुलांवर होत असतो. भाग्य म्हणजे आमच्या घरात आजी-आजोबा दोघेही सुशिक्षित होते. आजोबा ब्रिटिश साहेबाच्या हाताखाली मिलिटरीमध्ये हिशेबनीस होते. त्यांचे हस्ताक्षर मोडीच्या वळणाचे, तिरपे पण सुवाच्य होते. त्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी पुठ्ठ्यावर कागद चिकटवून त्यांवर विविध श्लोक, आरत्या, सुविचार, स्तोत्रे, वंशावळ लिहून घरात तक्त्याप्रमाणे टांगले होते. जाता-येता त्यांवर नजर पडत असे. दत्ताची आरती, स्नानाचे वेळी म्हणावयाचे श्लोक, मानसपूजा आणि अजून बरेच काही....शिवाय रोज ते आपल्या दिनक्रमातून वेळ काढून त्यांच्या खास डायरीत दैनंदिनी लिहायचे.... त्यांना असे एकाग्र होऊन, डोळ्यावरचा चष्मा सावरत, एक हाती लिखाण करताना पाहिल्याचे मला अजून स्मरते आहे. ते लिहायचे ते देखील त्यांच्या एका ठराविक, ठेवणीतील फाऊंटन पेन ने! त्या पेनची अगदी एखाद्या मौल्यवान चीजवस्तूप्रमाणे काळजी घ्यायचे ते! पेनात शाई भरणे, त्याच्या नीब मध्ये साचलेला कचरा साफसूफ करणे, आधीचे नीब खराब झाल्यावर नवे नीब बसविणे हे सगळे अगदी समारंभपूर्वक व्हायचे! मग त्यात जराही व्यत्यय आलेला त्यांना खपत नसे. शिवाय म्हणायचे, "ह्या लेखणीनेच माझ्या कुटुंबाचे पोट भरले. ती सरस्वती आहे. तिची नीटच काळजी घ्यायला पाहिजे!"
आजीचा पिंड शिक्षिकेचा. उभी हयात तिने प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करणे व शिकवण्या घेणे ह्यांत घालवली. आपल्या गोलसर, वळणदार अक्षरांत तिच्या एका खास वहीत ती बालगीते, कविता, कोडी, कूटप्रश्न, उखाणे इत्यादी लिहून ठेवायची. त्यातील गाणी तिच्या गोड किनर्‍या आवाजात म्हणून दाखविताना आमच्यासमोर तिची वही ठेवायची. "बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून" पासून ते "किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्ही सांजा, अजून कसे येती ना परधान्या राजा..." अशी कैक अवीट गोडीची गाणी तिच्या त्या जादुई वहीत तिने टपोर्‍या अक्षरांत टिपून ठेवली होती. आम्हीपण तिच्या बरोबर ती गाणी म्हणायचा प्रयत्न करीत असू. ती कधी आम्हाला बागेत, मैदानात खेळायला घेऊन जायची तेव्हा तिच्याबरोबर काठीच्या, काड्यांच्या सहाय्याने मातीत गिरगिटलेली धुळाक्षरेही चांगलीच आठवतात. त्या दोघांमुळे चांगल्या अक्षराचे संस्कार बालवयापासून मनावर झाले.

आई - वडिलांचे अक्षरही देखणे, गोमटे होते. नकळत आपले अक्षरही त्यांच्याइतकेच चांगले झाले पाहिजे हा विचार मनात पक्का होत गेला. जेव्हा जेव्हा नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या सुंदर अक्षराची वाखाणणी करीत तेव्हा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आम्हां मुलांना त्या अक्षराचा वारसा पुढे नेण्याची आठवण करून देत.
मग आमची काय बिशाद खराब अक्षर काढण्याची? पाटीवर, फळ्यावर आणि कोणी पाहत नसताना घरातील दारांवर, भिंतींवरही आम्ही सुलेखनाचे धडे गिरवत असू! वेळप्रसंगी एखादा धपाटा मिळे, पण घरातील भिंतींच्या जमीनीलगतच्या भागावर जाणीवपूर्वक आमच्या लेखन-सहाय्यासाठी ऑईलपेन्ट देण्यात येई. सरावासाठी गुंडाळी फळा आणून त्याला भिंतीवर मानाचे स्थान दिले जाई. त्यातही एक प्रकारचे सुप्त कौतुक असे. कधी कधी घरी आलेल्या पाहुण्यांना हळूच आमचे वह्या, फळे, भिंतींवरचे हस्तकौशल्य दाखविले जाई.

शाळेत हस्ताक्षर - सुलेखनाचा तास सक्तीचा असायचा. अक्षर-लेखनासाठी वेगळ्या वह्या पुस्तके असायची. त्या वहीला आम्ही पुस्ती म्हणत असू. आमच्या शिक्षिकाही तळमळीने, जीव ओतून शिकवायच्या, प्रोत्साहन द्यायच्या. सुलेखन-पुस्तिकेबरोबरच बोरूनेही लिखाणाचा सराव घेतला जायचा. बोरूला तासायचे, टोक करायचे, शाईच्या दौतीत बुडवून वळणदार अक्षर काढायचे - त्यातल्या त्यात काना, मात्रा, वेलांट्या, आकार, उकार सुबक देखणे कसे आकारतील याकडे श्वास रोधून लक्ष दिले जायचे. या सर्वांत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. अक्षरलिखाणात गुंग झाल्यावर कधी हळूच जिभलीचे टोक बाहेर येऊन नाकाच्या अग्राला स्पर्श करायचे तेही कळायचे नाही.

प्रत्येक वही मोत्यासारख्या अक्षरांनी सजलेली पाहताना मनात गुदगुल्या व्हायच्या. आपलीच पाठ आपण थोपटावी असे वाटून जायचे. त्याला अपवाद मात्र गणिताच्या वह्या! इथे तेवढी आकड्यांची खाडाखोड, फुल्या, उलट्या-सुलट्या बाणांची रांगोळी असायची.

चांगल्या हस्ताक्षराचा फायदा असायचा तसाच तोटाही! शाळेत निबंध, भाषेच्या विषयांत उत्तम हस्ताक्षराबद्दल हटकून अधिक गुण मिळायचे, त्याचबरोबर गणित-शास्त्र-भूगोलांच्या उत्तरपत्रिकेत थापाथापी केली असेल तर लीलया पकडली जायची. मैत्रिणीची गृहपाठाची वही आपली म्हणून पुढे करता यायची नाही आणि मैत्रिणीलाही बिकट प्रसंगात आपली वही तिची म्हणून पुढे करणे दुरापास्त होऊन बसायचे! वरच्या वर्गांतील उत्तम हस्ताक्षराच्या, चांगल्या गुणांच्या वह्या पिढीजात वारशाप्रमाणे आमच्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श बाळगून आम्ही आपापले लिखाण सुधारावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात असे.

कधी शाळेच्या बाहेरील किंवा दर्शनी भागांतील फळ्यांवर लिखाण करायला मिळत असे. त्या निमित्ताने कोणता तरी नावडता तास बुडविता आल्याचा आनंदच अधिक असे! प्रगतीपुस्तकावरील 'सुन्दर अक्षर' हा शेरा कॉलर ताठ करत असे, आणि वर्गाच्या हस्तलिखितासाठी पानेच्या पाने सुवाच्य, एकसारख्या अक्षरात लिहायला लागल्याने हाताची बोटे दुखून येत असत. परंतु तेच हस्तलिखित शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात जेव्हा मानाचे स्थान पटकावत असे व सगळेजण त्यातील हस्ताक्षराचे भरभरून कौतुक करत तेव्हा सारे श्रम सार्थकी लागल्याचा आनंद मिळत असे. चवथी व सातवीची स्कॉलरशिपची वर्षे वगळता उरलेल्या सर्व वर्षांमध्ये हे अक्षर चांगले राहिले. त्या वर्षांमध्ये मात्र भराभरा लिहिण्याच्या नादात 'अक्षराची पार वाट लावली आहे पोरीने' हे ऐकणेही अनुभवले.

शालेय वर्षांमध्ये शाईचे फाऊन्टन पेन वापरणे सक्तीचे असल्याने अक्षर आपोआप चांगले येई. पण कॉलेजमध्ये गेल्यावर बॉलपेन हाती आले आणि हस्ताक्षराचे मूळचे सौंदर्य कमी झाले. शिवाय आता अक्षरापेक्षा लिखित मजकुराला जास्त महत्त्व होते. तरीही अगदी बिघडून बिघडूनसुध्दा अक्षराचा घोटीवपणा, सुवाच्यता अबाधित राहिली.

कॉलेज संपल्यावर रोजच्या नियमित लिखाणाची सवयही संपुष्टात आली. गरजेप्रमाणे हातात पेन घेतले जात असे. मग संगणकाचे आगमन झाले. आता त्याच्यावरही लिखाण (टंकलेखन) करता येऊ लागले. पाहता पाहता वह्या-पेनांचा जमाना मागे पडला. आता तर कागदावर लिखाण करणे कमीच झाले आहे. शिवाय कागदनिर्मितीसाठी किती झाडे खर्ची पडतात हे वाचल्यावर पूर्वीसारखे कागदांचा फडशा पाडणे होत नाही. पूर्वी घरी रीमच्या रीम फूलस्केप कागद आणले तरी ते आठवड्यात संपायचे.... कारण घरातील सगळेच माना खाली घालून कुरूकुरू लिहिण्यात पटाईत! पण आता असे होणे नाही.... त्या ऐवजी आम्ही नित्यनियमाने, प्रामाणिकपणे संगणकाच्या कळफलकाला वेठीला धरत असतो.

तरीही आज कोणी हस्ताक्षराची स्तुती केली की नकळत मन सुखावते. शुभेच्छापत्रांत, गिफ्टवरील लेबलवर मजकूर लिहिताना आपोआप डौलदार अक्षरांची माला आकार घेते. चुकूनमाकून कोणाला पत्र पाठवायचे झाल्यास आपल्याच हातातून कागदावर उमटलेल्या अक्षरांची दृष्ट काढावीशी वाटते! Happy
परवा इमारतीतून खाली उतरत असताना देशमुख काकू त्यांच्या चार वर्षांच्या नातवावर कडाडताना दिसल्या. विचारले तर म्हणाल्या, "अहो, दोन महिनेपण झाले नाहीत नवा रंग देऊन! आणि ह्याने पहा भिंतींवर काय काय लिहून, गिरगिटून ठेवलंय माझं लक्ष नसताना...."
मला क्षणभर भिंतींवरील आमच्या उभ्या-आडव्या-तिरप्या रेघांच्या गिरगिटीला, रेखाटनांना कणभरही नावे न ठेवता त्यांचे कौतुक करणारे, आम्हाला समजावून फळ्यावर लिहिण्यास प्रवृत्त करणारे आजी-आजोबा, आई-बाबा आठवले आणि मीदेखील हसून देशमुख काकूंना म्हणाले, "जाऊ द्या ना काकू, त्याला आजच एक मस्त फळा आणि खडू द्या आणून.... आणि बघा, तुमच्याकडे एक नवा अक्षरवीर जन्माला येईल."

--- अरुंधती कुलकर्णी.

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

गुलमोहर: 

छान लिहीलय. आवडले. आमच्या शाळेत वेगळा तास असायचा शुद्धलेखनाचा तेव्हा अगदी घोटून घोटून अक्षर नीट काढले जायचे बाकी वेळी मात्र जमेल तसे. जुनी पत्रे, कॉलेजच्या वह्या, ग्रीटींग कार्ड्स यावरचे माझे लिखाण बघुन कधी काळी माझे अक्षर सुंदर होते यावर आता माझाच स्वतःचा विश्वास बसत नाही. आता वाणसामानाची यादी करण्यापलीकडे हातात पेन आणि कागद धरला जात नाही.

छान लिहिलय... हल्ली खरच कागदावर काही लिहिलच जात नाही आणि लिहिलच तर अक्षर काही खास येत नाही आणि हात लगेच भरुन येतो.. कधीकाळी तिन तिन तास पेपर कसे लिहायचो हेच कळत नाही. Wink

सध्या लेकीला अक्षर कस छान असल पाहिजे ह्याचे धडे मात्र देत असते. Happy

अरुंधती,
एका महत्वाच्या विषया बद्द्ल तुम्ही लिहिलेत छान केले.
तुमचा लेख वाचून समर्थांनी केलेले 'लेखनक्रियानिरूपण' आठवले. अक्षराचे गुणदोष, लेखनाचे गुणदोष, याची अतिशय बारकाईने चर्चा यात समर्थांनी केली आहे आणि ती सुद्धा फक्त २० ओव्यामधे. मायबोलीच्या वाचकांसाठी खाली डकवतो आहे. अर्थ अधिक समजून घेण्या करता http://www.scribd.com/doc/11974402/- इथे १९वा दशक काढून पहाता येईल.

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक एकोणविसावा : शिकवण समास पहिला : लेखनक्रियानिरूपण

॥ श्रीरामसमर्थ ॥ बालके अक्षर बाळबोध । घडसुनी करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १
॥ वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें । कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें । येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥
अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोसरपण । तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ॥ ५ ॥
वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना । खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाकार ॥ ६ ॥
पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें । दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळींचे ॥ ७ ॥
कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना । गरज केली हें घडेना । लेखकापसुनी ॥ ८ ॥
ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन । जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं । मध्यस्त लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥
भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें । कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ॥ ११ ॥
ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा । प्राणी मात्रास उपजे हेवा । ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥
काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी । चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥
घट्य कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे । लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ॥ १४ ॥
सुर्या कातर्या जागाईत । खळी घोंटाळें तागाईत । नाना सुरंग मिश्रित । जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥
नाना देसीचे बरु आणावे । घटी बारिक सरळे घ्यावे । नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥
नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी । चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥
हिंगुळ संग्रहीं असावे । वळले आळिते पाहोन घ्यावे । सोपें भिजौनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८ ॥
तगटी इतिश्रया कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या । नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥
नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवणें । पेट्या कुलुपें जपणें । पुस्तकाकारणें ॥ २० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रियानिरूपणनाम समास पहिला ॥

आहाहा!!किती छान वाटलं वाचून..खरच अगदी वेगळा पण महत्वपूर्ण विषयाला हात घातलास.. माझं ही एकेकाळी सुरेख अक्षर होतं..पण खरच आता काही लिहायची वेळच येत नाही.. रेडीमेड ग्रीटींग कार्ड्स, ई मेल्स मुळे हॅण्ड रिटन अगदी रेअर झालय.. तुझा लेख वाचून काहीतरी हाताने लिहून काढायची खुमखुमी जागृत झाली..थॅन्क्स!!

खूप आवडलं लिखाण अरुंधती. माझ्या शाळेत सुलेखनाचा वेगळा तासच होता. अक्षर सुधारण्यासाठी त्याचे फायदेच झाले. चित्रकलेच्या परीक्षांसाठीही. आता हातात कीबोर्ड आल्यापासून अक्षर खराब होत चालले आहे मात्र..

तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@ श्रीकांत : तुम्ही दिलेली लिंक व समर्थांच्या 'लेखनक्रियानिरुपणा'बद्दल मनापासून आभार! Happy

अरुंधती,

जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

माझ्या घरी आई आणि बाबा दोघेही शिक्षक होते. आम्ही चार भावंडं होतो. बाबा आम्हाला रोज मराठी, हिन्दी, इंग्रजी आणि संस्कृत - चारी भाषेत शुद्धलेखन काढायला लावायचे. आणि ते रात्री जेवताना तपासायचे. आणि काही शुद्धलेखनाच्या तसेच हस्ताक्षराच्या चुका असल्या तर तिथेच चापटपोळी, धम्मकलाडू वगैरे द्यायचे. आई शिक्षिका असल्याने मध्ये पडायची नाही.

पण आता त्या सर्व गोष्टींचे महत्व कळते. माझं अक्षर अगदी मोत्यासारखं नाही पण कल्चर्ड मोत्यांसारखं जरूर आहे.

शरद

अरुंधती छान लिहीलंयत. चांगलं अक्षर असलं की लोकांची वाहवा मिळते हे खरंच, पण तोटे ही खूप असतात. अक्षर चांगलं म्हणून सगळं आपल्याच अंगावर ढकललं जातं. स्वानुभव.