Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 12, 2006 « Previous Next »

Archanamandar
Monday, June 12, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहोर आताशा गप्प गप्प असतो
कसा कुणास ठाऊक खिन्नसा दिसतॊ
वाटतं काय झालंय ते विचारावं...
पण मग त्याच्या प्रश्नांना उत्तर काय द्यावं

म्हाताऱ्या चरबट वडानं त्याला समजावलं होतं
कोपऱ्यातल्या सदाफुलीनं हसायला शिकवलं होतं

वडच आता पारंब्यांचे हात टेकून उभा आहे
सदाफुलीचा अवास आता घमघमायला लागलाय

गुलमोहोराला सावित्री नाही सत्यवानाची कथा नाही
तशी काही चिंता नाही मनाला कसली व्यथा नाही
तरीसुद्धा कुढत असतॊ, एकटाच वेडा वाढत असतॊ

बोलत नाही, फुलत नाही
वाऱ्यानं सुद्धा हलत नाही
पानगळ आता सुरू झालीय

त्याचं त्यालाच सांभाळायचंय
मला खूप काही सांगायचंय
एकदा भेटायला जायचंय.

Jayavi
Monday, June 12, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली...........खूप गोड आहे गं तुझी हट्टी कविता :-)
वैभव.... सही!
देवा, अर्चना....... छानच रे!


Archanamandar
Monday, June 12, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक खूप सुरेख वाक्य वाचायला मिळालं.


"When I am writing
I am not here
And when I return
I am gone"

मला हे फारच आवडलं आणि वाटलं

"जेव्हा मी लिहीते तेव्हा मी मी नसते
आणि जेव्हा मी असते तेव्हाहि मी नसतेच"

अजून काही रुपांतरं सुचत असतील तर सुचवावीत.

आपण अशीच काही वाक्य, वाक्प्रचार आणि कविता दिसल्या तर इथे देऊन त्यांचं रुपातर सुचवू शकतो, एक नवीन बी बी वर नाहितर इथेच... कशी वाटते आयडिया?

अर्चना.


Vaibhav_joshi
Monday, June 12, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा ....

गज़ल लिहीण्याचा प्रयत्न केला आहेस ही खरंच चांगली बाब आहे ... मदत व्हावी ह्या हेतूने काही गोष्टी सांगतो ....
१) गज़ल ही वृत्तातच असली पाहिजे
२) प्रत्येक शेर हा साधा, सोप्पा आणि सुटसुटीत असायला हवा ... " जसं आपण समोर बसून बोलतोय " ( इती थोर कै. सुरेश भट )
३) काहीतरी म्हणायचंय आणि काय म्हणायचंय हे पावलोपावली जाणवायला हवं
बाकी नियम वगैरे आपण भेटू तेव्हा बोलूच ( म्हणजे मला जितकं कळतंय तेवढंच मी बोलेन )
:-)

तुला मदत म्हणून एक गज़ल लिहीतो ...

दरबार ....

पावसाचा रंगला दरबार होता
आसवांनी छेडला मल्हार होता

दर्द होता सोबती ठेका धराया
मज समेवर यायला आधार होता

मारव्याने जान होती ओतलेली
आर्ततेने गाठला गंधार होता

कैकदा सौदामिनी आली कडाडत
दाद आल्याचाच आविष्कार होता

भैरवी सरताच सरले श्वास माझे
त्याच टाळ्या तोच सोपस्कार होता

संपली मैफ़ल तरी ना संपलो मी
माझिया राखेतही झंकार होता


Devdattag
Monday, June 12, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव थँक्स रे..
खरं सांगायच तर ह्या अधी मी गज़ल लिहायचा प्रयत्न केला होता.. पण तितकेसे जमले नाही..
यावेळेस एका पाठोपाठ एक शेर सुचत गेले आणि सगळी कविता टायपून झाल्यावर वाटले की जर तुझ्याबरोबर किंवा सारंग बरोबर बसलो असतो ही कविता घेउन तर चांगली गज़ल बनली असति..
आपण भेटल्यावर निश्चित बोलु या विषयावर..:-)


Zaad
Monday, June 12, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुद्राच्या लाटांवरती जपून ठेव पाय
ही साधी गोष्टही तुला माहीत नाही की काय?

भरतीलाही असती किनारे सांगती वारे
इथे तुझे माझे खोटे खोटे पंखही अपुरे
आणि पंखांवरून आकाशाची महती ठरे
ही साधी गोष्टही तुला माहीत नाही की काय?

तुझ्या मनामधला मेघ माझ्या डोळ्यांत दाटे
तुझ्याही काळजात कळ मला टोचता काटे
अद्वैतालाही द्वैताचे इथे चपखल फाटे
ही साधी गोष्टही तुला माहीत नाही की काय?

समुद्राच्या लाटांवरती जपून ठेव पाय
रेतीवरती नुमटू दे तुझ्या मनाचा ठाव
रेती निसटली की हातात उरतेच काय?
ही साधी गोष्टही तुला माहीत नाही की काय?



Mruda
Monday, June 12, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वच जण "सही" लिहीताहेत. .
सगळ्यांच लिखाण नीट वाचून आस्वाद घ्यायची इच्छा असते पण वेळ कमी पडतो. . हळहळ वाटते. .


तू. . . .

तू चांदण होउन ये
मी रात्र होउन येईन
तू सुगंध म्हणून ये
मी चंदन होउन पाहीन. .

तू वारा होउन ये
मी पावा होउन गाईन
तू स्पर्श म्हणून ये
मी रेशीम होउन राहीन. .

तू रंग होउन ये
मी इंद्रधनु होईन
तू साज म्हणून ये
मी रूप होउन खुलीन. .

तू रस म्हणून ये
मी तृष्णा होउन येईन
तू सुख होउन ये
मी हास्य होउन फ़ुलीन. .

तू सागर होउन ये
मी लाट होउन उठीन
तू शब्द म्हणुन ये
मी कविताच होउन जाईन. .

तू केंव्हाही ये, कसाही ये
मी वाट पाहीन
तू येईपर्यंत मी
क्षण होउन राहीन. .

मृदा







Lopamudraa
Monday, June 12, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदा..,अर्चना,झाड.. सुंदर आहे फ़ारच छान...!!!
मीनु तु बरसलिये अगदी... आवडल्या सग़ळ्या..
दोन दिवसानंतर आल्यावर खरच हळहळ वाटते... घाइ होते... वाचायची..वैभव, बापु,देवदत्ता.. नादमय.. तुमच्या सुंदर कवितांना दरवेळी शब्द तेच... बाहेर पडतात... सुंदर...!!!


Lopamudraa
Monday, June 12, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली तुझी कविता आत्ता वाचली... खुप आवडली...!!!

Zaad
Monday, June 12, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी आणि अमेय...दोघांच्याही कविता खूपच सुन्दर!
वैभव,दोन्ही गज़ला केवळ अप्रतिम!
नादमय,श्यामली,तुषार,अर्चना...सगळ्यांनीच भारी लिहीलंय!!
मृदा...सुंदर कविता. शेवटचं कडवं खूपच भावलं... एक विषयांतर.....कालचा चंद्र पाहिला का कुणी? सुर्याच्या आकाराइतकं मोठं बिंब होतं...माझ्याप्रमाणे तुम्हीही चंद्राचे उपासक असाल म्हणून सांगितलं. :-)


Mruda
Monday, June 12, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड धन्यवाद. . हो. . सुंदर असंतं ते दृश्य खरंच. .
मृदा


Ameyadeshpande
Monday, June 12, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो...
बापू तुमचं म्हणणं अगदी खरं आहे... निनावी, उगाच का लाजवते? :-)

मृदा :-)
झाड, कळत नाही काय "भारी" आहे रे...
वैभव, मदत म्हणतोस आणि दरबारच भरवतोस की :-)


Bhramar_vihar
Monday, June 12, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, आताच नश्वर वाचली! वाचताना काही नाही, पण वाचून झाल्यावर जाणवलं की अंगावर काटा आला होता. पु.लं. नी म्हटल आहे की माणसाचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे कविता. तुम्हा सर्वाना वाचून हे अगदी पटत!

Archanamandar
Monday, June 12, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांनी आज गुलमोहोराला भेटले
सगळा सुकुन गेला होता
फांदि न फांदि वाळली होती
उभा होता एकटाच
कावळ्यांच ओझं सांभाळत

समोरचा वड केव्हाच पडला होता
तिथला औदुंबर आता पुढे आला होता
त्याच्या मागची बांबूची दाटी
शीळ मारत सळसळत होती

शेजारची अबोली नेहेमीप्रमाणे मंद हसली
अशोक वृक्षानं मान हलवून ओळख दिली

कुंपणाजवळची छोटी रोपं
केवढीतरी उंचावली होती

माझा गुलमोहोर मात्र गप्पच होता
थोडासा उदास थोडासा केविलवाणा.
त्याच्या बुंध्यावरून हात फिरवला
आणि घशात एकदम खरखर झाली

किती वय झालं याचं
किती ऋतु गेले असे
प्रेमात पडून, बहरून, सुखावून
किती तरी दिवस झाले

हळूच त्याची काटकी गळली
गुलमोहोरानं स्मित केलं
पूर्वीच्या कितीएक आठवणी
पुन्हा एकवार दाटून आल्या

मी म्हटलं कसा आहेस?
तो पुन्हा एकवार हसून म्हणाला,
काही थोडी पानं आहेत
तीच काय ती हिरवाई

आताशा सावलीसुद्धा पडत नाही
आणि एकदम गप्प झाला...

मी ही तशीच परत फिरले
उंच झालेल्या बोगनवेलीवर
कागदी फुलं शोभत होती
पहात पहात पुढे गेले
आणि एकदम जाणवलं---

आपण किती मोठे झालो !

Pkarandikar50
Monday, June 12, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When I am writing
I am not here
And when I return
I am gone....
खूप अवघड प्रश्न आहे पण माझ्यापरीने सोडवतोय.

हे मी जेंव्हा लिहीन
तेंव्हा मी ईथे नसणार आहे
आणि जेंव्हा माघारा परतेन
तेंव्हाही नसणारच आहे...

बापू.


Pkarandikar50
Monday, June 12, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zaad,

'ही साधी गोष्टही'कविता सुन्दरच आहे पण 'अद्वैतालाही द्वैताचे फाटे' ही ओळ मला तितकीशी नाही पटली. तीच्या वरच्या दोन ओळींत तर द्वैताकडून अद्वैताकडे जाणारा प्रवास मांडला आहे? का माझी काही गफलत होतीय?

बापू.


Tusharvjoshi
Monday, June 12, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जेव्हा मी लिहितो
तेव्हा मी नसतो
मी परत येतो
तेव्हा मी नसतो

तुषार जोशी नागपूर


Ashwini
Monday, June 12, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाही एक प्रयत्न..

मी जेंव्हा लिहीते
तेंव्हा मी इथे नसते
अन् जेंव्हा परतून येते
तेंव्हा संपलेली असते


Vaibhav_joshi
Monday, June 12, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When I am writing
I am not here
And when I return
I am gone....

with due respect i beg to differ. a POET never takes birth for one poem because he never knows this is THE POEM .
He keeps on returning. He thrives on uncertainty.

त्या अनुषंगाने

जेव्हा मी हे लिहीत असेन
तेव्हा मी इथे असेनही कदाचित
आणि जेव्हा लिहून परतेन
तेव्हा .... नसेनही कदाचित


Ninavi
Monday, June 12, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW!!!
THAT'S IT!!
ही uncertainty आणि dissatisfaction तर जिवंत ठेवतात कलाकाराला. ते उरलं नाही तर.. (s)he is gone..
सकाळपासून सगळी भाषांतरं वाचत्ये.. and something was missing..
This is IT!


अर्चना, अजून असं काही छान वाचण्यासारखं असलं तर जरूर शेअर कर. नवा बीबी उघड हवं तर.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators