अदला बदली

Submitted by iam_1june on 31 July, 2010 - 06:52

मित्रांनो मायबोलीवरील ही माझी पहीलीच कथा...मला विश्वास आहे की मज पामराचा पहीला प्रयत्न आपणास आवडेल. काही सुधारणा असल्यास नक्कीच सुचवा.

" ए भाई किसीको तो पुछ लो" शेवटी माझा वैतागलेला मेंदु बोलला. रात्री १०.३० ची वेळ.

शंभू, नरेश, राजु व मी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. घरुनच निघायला उशीर झाल्यामुळे उशीरा पोहचणं स्वाभाविकच होतं. मुख्य रस्ता सोडुन गाडी कच्च्या रस्त्याला लागली आणि आमचे हाल व्हायला सुरुवात झाली. त्यात आमचा ड्रायव्हर त्याच्या बाजुची काच उघडी ठेवुन गाडी चालवत होता. ( काय तर म्हणे थंडीत गाडीच्या सगळ्या काचा बंद केल्या तर काचेवर धुकं जमा होऊन काहीच दिसत नाही. ) त्यामुळे आम्ही थंडी + धक्के असा दुहेरी मारा झेलत होतो. आठ वाजायला आले तेव्हा धुकं एवढं पडायला लागलं की काहीच दिसत नव्हतं. पण पठ्ठ्या गाडी थांबवायला तयार नव्हता. तसं आम्हाला पण थांबायचं नव्हतं म्हणा.कारण लग्न आटोपुन लगेच माघारी फिरायचं होतं.
कसेबसे मित्राच्या गावी पोहचलो. लग्न, जेवण आटोपलं. पैशाचं पाकीट मित्राच्या हाती कोंबुन परतीच्या वाटेला लागलो तेव्हा ९.३० वाजत आले होते.आता थंडीचा आणि धुक्याचा जोर इतका वाढला होता की परत जाणे जवळ जवळ अशक्यच वाटत होतं. शेवटी सर्वानुमते कुठेतरी मुक्काम करायचा निर्णय झाला आणि आपापल्या बायकांना फोन करुन त्यावर शिक्कामोर्तब पण झालं. घनदाट धुक्यातुन आमची हॉटेल किंवा लॉज ची शोधमोहीम सुरु झाली.भयंकर थंडीपुढे पोटातल्या दारुने सुद्धा हात टेकले होते. लग्नातल्या भरपुर जेवणामुळे मेंदुवर झोपेची अनिवार नशा चढत होती पण त्या नशेच्या पडद्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृपेमुळे मध्ये मध्ये छेद जात होता. जवळ जवळ एक तासाचा शोध असफल होतांना दिसत होता. तेव्हा मेंदुने वरीलप्रमाणे आपला वैताग बाहेर काढला होता.

" किको पुछु सा? अठे ते काळो कुत्तो भी कोणी!" ड्रायव्हर चे खरमरीत उत्तर. हे ही खरंच होतं म्हणा. जवळ जवळ एक तास होत आला होता पण कुणीही किंवा काहीही दृष्टिस पडलं नव्हतं. तसेही राजस्थानात थंडी खुप असते आणि लोक सुद्धा लवकर झोपी जातात. " कतरी देर सु घुम रया पर....." ड्रायव्हरचे पुढील शब्द धुक्यात विरले. "एक मिनीट! एक डोकरा छे वठे. वाको पुछे हा." ड्रायव्हरला तो धुक्यातला म्हातारा कसा दिसला देव जाणे. हातातला टॉर्च सांभाळत उभ्या असलेल्या म्हातार्‍या जवळ गाडी थांबली. " बा सा अठे रहन रो वास्ते लॉज कठे छे?" ड्रायव्हरने विचारले. टिपीकल राजस्थानी म्हातारा होता तो. डोक्यावर रंगबिरंगी मोठा फेटा, भरगच्च पांढर्‍या मिशा, चेहर्‍यावरच्या सुरकुत्यांमागे लपलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, अंगावर धोतर आणि बंडी, खांद्यावर घोंगडी, एका हातात टॉर्च तर दुसर्‍या हातात तेल पाजुन तयार केलेली लोखंडाची मोठी शेंबी असलेली भली थोरली काठी. " देखिये यहाँ से कुछ दुर एक हॉटेल हैं पर वहाँ कोई कमरा मिलेगा या नही ये मैं नही बता सकता. यहाँ से जो अगला मोड आयेगा वहाँ से बाए मुड़ जाईये, ४-५ की.मी. बाद सिधे हॉटेल पहुंच जायेंगे."

एवढा गावरान म्हातारा आणि एवढी शुद्ध हिंदी ? मला नवल वाटले. पण आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी खुप नवलाई पाहीली असल्यामुळे अप्रुप मात्र वाटले नाही. इतर वेळ असती तर कदाचित मी त्या म्हातार्‍याची चौकशी पण केली असती पण झोपेत पेंगुळ्णार्‍या डोळ्यांनी परवानगी दिली नाही. म्हातार्‍याचे आभार मानुन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.

गडद धुक्यातल्या त्या वाटचालीत ड्रायव्हर ने गाडी कधी हॉटेलच्या दारासमोर लावली कळले नाही. " उतरो सा! " मी बाकी सगळ्यांना उठवले. पेंगुळ्लेल्या मनाने आणि आंबलेल्या शरीराने मी गाडीच्या बाहेर पाऊल टाकले, आणि.....क्षणार्धात झोप कुठल्या कुठे पळुन गेली. मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यातुन एक सावधतेचा इशारा आला. अशा माळरानात एवढे पॉश हॉटेल? आणि दरवाज्यावर ते कसले भयंकर शिल्प? भीतीची एक अनामिक लहर पाठीच्या कण्यातुन अगदी शेवट्पर्यंत लहरत गेली. च्यायला या विशाल च्या कथा वाचणं सोडलं पाहीजे! नको तिथे, नको तेव्हा, नको ते विचार येतात. तर्कशक्तीने भीतीवर मात केली आणि हॉटेल्च्या दरवाज्यात पाय ठेवला.

पाच जणांसाठी रुम बूक करतांना त्रास झाला नाही पण काउंटरवरच्या त्या माणसाच्या डोळ्यांतील चमक मनात अस्वस्थता निर्माण करत होती. रुम नं. १०३ व १०४. शंभू , नरेश व मी १०३ मध्ये तर ड्रायव्हर व राजु १०४ मध्ये. आल्या आल्या एका जास्तीच्या रजईची ऑर्डर देऊन पलंगावर पहुडलो.डोळ्यांतील झोपेची जागा आता अस्वस्थतेने घेतली होती. वरवर काहीच दिसत नसलं तरी इथे काहीतरी धोकादायक नक्कीच होतं. एवढा पट्टीचा झोपणारा मी पण झोप म्हणता कशी येईना. शंभू, नरेश झोपी गेले पण मी मात्र झोप येत नाही म्हणुन की वेळ जात नाही म्हणुन टी.व्ही. बघत होतो. बघत कशाचा होतो ? फक्त चॅनल बदलत होतो. सहज म्हणुन मोबाईल वर नजर टाकली तर बॅटरी पुर्ण रिकामी होऊन तो बंदपण झाला होता. बापरे! आता बोंबला! मोबाईल डिसचार्ज झाला म्हणजे मला अर्धा जीव गेल्यासारखं वाटतं. टीव्हीत पाहण्यासारखं काहीच दिसत नव्हतं म्हणुन तो बंद केला आणि कशाचा तरी विचार करायला लागलो. नेमका कशाचा ते आठवत नाही कारण विचार एवढ्या पटापट बदलंत होते की कशाचाच अर्थ लागत नव्हता.

अचानक दचकुन तंद्रीबाहेर आलो. बाजुला बघतोय तर शंभू झोपेत चक्क रडंत होता. अगदी अभद्रपणे पण एका संथ लयीत. मध्येच 'नही! नही!' म्हणत होता. रडतांना त्याचा चेहरा मात्र रडका न दिसता खुप विद्रुप दिसत होता. मी घाबरलो. आयला! हे काय नविन ? इतके दिवस झाले शंभूला ओळखतो पण तो झोपेत रडतो हे माहीतच नव्हते. मनाचा हिय्या करुन त्याला उठवले. " शंभू ! ए शंभू! अबे उठ ! जल्दी! क्या हुआ?" अचानक तो रडायचा थांबला. अगदी आकस्मिकपणे यंत्रवत डोळे उघडले आणि एक नजर माझ्यावर टाकली. मी शहारुन उठलो. ती नजर त्याची नव्हतीच. अथांग कुटीलता भरलेली, कुठल्या तरी मृतदेहावर ताव मारण्यासाठी टपुन बसलेल्या धुर्त कोल्ह्याची होती ती नजर. त्या थंडीतदेखील माझ्या कानांमागुन घाम निथळायला लागला. अंतर्मन मनाला सावधगिरीचा इशारा देत होते. "नको रे बोलुस त्याच्याशी! हे काहीतरी वेगळं आहे." पण ऐकेल तर ते मन कसलं? " ए क्या हुआ था? क्यों रो रहे थे? " कसेबसे कंठाच्या बाहेर पडलं हे वाक्य. " कुछ नही! एक बुरा सपना आ गया था| लगता हैं दारु ज्यादा हो गयी हैं| "

मी जरा आश्वस्त झालो. दारु माणसाला संवेदनशील बनवते म्हणतात. ( आणि कदाचित संवेदनशुन्य सुद्धा ) आणि संवेदनशील मन सत्यच नाही तर स्वप्न सुद्धा इतक्या तिव्रतेने ग्राह्य धरतं की ते स्वप्न होते हेच स्विकारायला धजत नाही. आणि मग त्या स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. चांगले....वाईट. " छ्या: कमकुवत मनाचा साला! दारु पिल्यामुळे वाईट स्वप्न पडते काय? काहीतरीच... साल्याच्या मनातंच काहीतरी वाईट असेल. आपल्याला नाही पडत बुवा असली वाईट स्वप्नं. " भीती दुर करण्यासाठी माझ्या कमकुवत मनाने सारवासारव केली. मी शंभू कडे बघितले. तो भकास नजरेने छताकडे बघत होता. मी परत विचारात बुडालो. झोप तर येतंच नव्हती. एवढ्यात शंभूचे(?) वाक्य कानी पडले. " अमोलजी आप सो जाओ |" त्याच्या आवाजातील बदल माझ्या लक्षात आला पण त्या वाक्यासरशी माझे डोळे पेंगुळायला लागले. मेंदु न झोपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण कित्येक दिवसांचा जागा असल्यासारखा मी एका मिनीटात झोपी गेलो.

मला पडत होते ते स्वप्न होते नक्कीच पण मध्येच अतंर्मनाची टोचणी येत होती की हे काहीतरी खुप धोकादायक आहे. मी एका अंधार्‍या खोलीत कशावर तरी झोपलेलो होतो. कुठे आहो याची काहीच कल्पना नव्हती. जणु बाहेरचा संपुर्ण अंधार त्या खोलीत साकळ्लेला होता कारण बाहेर टिपुर चांदणे पडलेले होते. दुर कुठेतरी भेसुर आवाजात चाललेली कोल्हेकुई मनात भीतीचे सावट वाढवत होती. येथे नक्कीच आपल्या जीवाला धोका आहे. इथुन याक्षणी पळुन गेलं पाहीजे. अंतर्मनाने परत एकदा इशारा दिला. पण हातपाय जणु एखाद्या मंत्रशक्तीने बांधुन ठेवले होते. आणि अचानक नाकातील केस जाळणारा अतिशय उग्र आणि कुबट दर्प जाणवला. जीव कासावीस झाला. जीवाच्या आकांताने मी मदतीसाठी ओरडलो पण तोंडातुन गुं गुं शिवाय आवाजच निघाला नाही. देवा! वाचव रे मला यातुन! शरीराच्या अन् मनाच्या जाणिवा बोथट व्हायला लागल्या आणि अचानक खोलीच्या एकमेव खिडकीत मला शंभूचा चेहरा दिसला. " मुझे माफ कर देना अमोल जी ! वो मुझे मेरा बच्चा माँग रहा था क्योंकी वो रात के ठीक बारा बजे पैदा हुआ था| पर मैने अपने बच्चे को बचाने के लिये अदला बदली कर ली| क्योंकी आपने ही तो बताया था की आप भी रात को ठीक बारा बजे.........." पुढचे शब्द हवेत विरले आणि मी मरुन पडलो.

ghost.jpg

गुलमोहर: 

बापरे!!!! मला वाचताना भिती वाटली..
म्हणजेच तुम्ही या लिखाणात यशस्वी झालात..:)
छान लिहिलत..लिहित रहा..:)

Happy
शेवटचं वाक्य नसतं तर पंच जास्त चांगला बसला असता असं वाटतय..
त्याला रात्री १२ चं कसं कळलं ते नाही कळलं
- कथा चांगली आहे.

चांगली आहे कथा. Happy
वातावरणनिर्मिती मस्त जमून आलीये. पण उत्कंठा ताणायची होतीत ना अजून. मध्येच अचानक संपल्यासारखी वाटली. Sad