ये परतीचा वारा...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

नियती तुम्हां, आम्हां सर्वांना एक कोडं घालते, आयुष्य नावाचं विलक्षण कोडं. प्रत्येकासाठी वेगळं आणि वैचित्र्यपूर्ण. एकाला घातलेलं कोड पुन्हा दुसर्‍याला नाही, तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्‍याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.

खरोखर विल़क्षण आहे! एवढ्या मोठ्या जगड्व्याळ पसार्‍यात कुठेतरी एक जीव जन्मतो, दिसामासी वाढतो, वाट्याला आलेल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव गाठीशी जमा करतो, त्यातून शिकतो, कधी हसतो, कधी रडतो. वाट्याला आलेले काही क्षण मनात अक्षय जपतो, काही विसरु पाहतो. काही काही क्षणांच्या आधाराने जगण्यासाठी नव्या उमेदीने पालवतो आणि काही क्षणांपुढे पार खचतो, शरणागती पत्करुन केविलवाणा होतो. कधी सूर जुळतात, कधी बेसूर होऊन दुखरी नस बनून ठसठसतात, आणि तरीही कोड्याची भूल सुटत नाही..

*मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

दिवस येतात, जातात. कित्येक घटना घडत राहतात. लहान, मोठ्या, लक्षणीय, नगण्य. कळत नकळत आठवणींची मोहर कुठेतरी मनाच्या तळाशी अलगद उमटवून जातात. प्रश्न निर्माण करतात, कधी कधी उत्तरं घेऊन येतात. निरुत्तरही करतात, तर कधी नव्या जाणीवांना सोबतीला आणतात आणि तुम्हां आम्हांला अधिक समृद्ध बनवून जातात, उत्तरं शोधायचीच खोटी. अर्थात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं, असंही नाहीच. आणि समजा, सापडलेल्या उत्तरात नवीन प्रश्न लपलेला असेल, तर? जेति, जेति म्हणताना कधी ना कधी नेति नेति म्हणावं लागत असेल का?

लयबद्ध गतीने, तुमच्या आमच्या आयुष्यात सुख दु:खांची चक्रं फिरतात. सुखावतात, दुखावतात. आपल्या, परक्यांची जाण देतात, शहाणं करुन सोडतात. उन सावलीचा खेळ जणू. कधी मनाची उमेद बांधण्यासाठी हात देतात, आणि कधी आपल्या सावलीलाही आपल्याचसाठी परकं करुन जातात. मन मात्र प्रत्येक क्षणामध्ये गुंतून पडतं, सुखाबरोबर तृप्त होतं, आणि दु:खानं पोळून निघतं.

... आणि चक्र सुरुच राहतं.. शेवटी हातात गवसतं काय? म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीच नाही.

आणि असंच चक्र सुरु असताना, कधीतरी, हळूहळू थोडं फार उमगायला सुरुवात होते. ज्ञात अज्ञाताच्या पाठशिवणीच्या खेळाकडे नजर जाते, त्याच्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात. सोबतीतला एकलेपणा आणि एकलेपणातली सोबत जाणवते आणि एक दिवस कळून येतं,

*शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

जाणीवा अधिक संवेदनाक्षम बनतात आणि आपल्या हाती तसं पाहिलं तर काही काही नाही हे जाणवून थोडंफार सुटल्यासारखंही होतं. आता कसली भिती? दिशा कधीच्याच ठरलेल्या असतात, त्यातले खाचखळगे, राजमार्ग सगळं काही आधीच रेखलेलं असतं, आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी. कळूनच जातं सारं काही. तोवर परतीचा मार्ग समोर येऊन ठाकलेला असतोच. पण, आता कसं, सारं काही लख्ख समोर असतं, कसलीच घाई नसते. आता कदाचित सगळंच सोपं बनून गेलेलं असतं.

*नाही मज घाई, पण वेग धरी होडी
जाताना एखाद्या शब्दातच गोडी
जो दुवा दिलास त्यात शीण मिटे सारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

आता राग, लोभ मावळलेले असतात. फारशा तक्रारी राहिलेल्या नसतात. एकच छोटंसं मागणं राहिलेलं असतं, मागणं कसलं, विनंती. अगदी शेवटची. हरवलेलं काहीतरी आता गवसायला लागलेलं असतं आणि आता ते पुन्हा हरवू नये एवढीच इच्छा असते. म्हणून, एवढंच एक सांगणं होतं,

*मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....

कदाचित, कोडं उकलायला सुरुवात झालेली असते...

समाप्त.

*कवितांच्या ओळी कवीवर्य बा. भ. बोरकर ह्यांच्या.

विषय: 
प्रकार: 

शैलजा, ह्या लिखाणाला लेखही म्हणूनही संबोधणार नाही, किंवा ललित म्हणूनही... माझ्यासाठी हा एक 'संवाद' आहे... तुझ्याशी 'घडलेला' आणि त्याचवेळी स्वत:शीही !
स्वत:लाच रोज कळत-नकळत विचारले जाणारे प्रश्न, त्याची कधी मिळणारी, कधी न मिळणारी तर कधी मिळूनही नाहीच मिळाली असं वाटणारी उत्तरं आणि त्यातून जन्माला येणारे नवीन प्रश्न ... सगळंच अतिशय संयमित शब्दात लिहिलं आहेस. या संवादातला हा संयमीतपणा मला खूप भावला आणि जवळचा वाटला !

छान लिहीलंस. अगदी आरपार. भाषा पण मस्त आहे तुझी.
बाकिबाबांची कविताही अगदी चपखल. छान तर असतेच ती. आणि विषय कुठलाही असो त्याचं बेयरिंग न सोडता शब्द अशा सफाईने गिरक्या घेतात. आपल्याला कळायच्या आत एक सुरेख शब्दरांगोळी तयार होते आपल्याच डोळ्यांसमोर. फार आवडते मला त्यांच्या कवितेची "ब्रँड बाभ" लय.

शैलजा.. आत्ताच वाचल हे... मस्तच लिहलयस. तुझ्या बाबांबद्दल वाचुन वाइट वाटले. मायबोलिवरच्या माझ्यासारख्या तुझ्या अनेक मित्र मैत्रिणींचे शुभचिंतन तुझ्यासोबत आहे याची मला खात्री आहे.

मित्रा, हसरी धन्यवाद.
हो मुकुंद, ज्यांना कळाले होते त्या माबोकर मित्र मैत्रिणींनी मला खूप सावरले. धीर दिला. माबोमुळे तुम्हां सर्वांचं जे मैत्र मिळालं, ते खूप महत्वाचं.

हे लिखाण म्हणजे तुझ्या बाबाना उत्तम श्रद्धांजली .एवढ्या परीपक्व विचारांची उंची मुलीनी गाठल्यावर
या जगाचा निरोप घेण ,खरच परीपूर्ण जीवन .ग्रेट .

? Sad

Pages